Saturday 30 April 2011

आयपीएलनं आपल्याला काय दिलं?


आता आयपीएल सुरू आहे. हळूहळू ते रंगात येतंय. पण पहिल्या दोन आयपीएलची मजा त्यात नाही. तेव्हा आयपीएलचा नशा सगळ्या देशाला चढला होता. तिसरं आयपीएल आपण सगळ्यांनी सचिनसाठी पाहिलं. आता वर्ल्डकप नुकताच झालाय. त्यामुळे आयपीएलचा अजून मजा येत नाहीय. पण म्हणून आयपीएलचं महत्त्व काही कमी होत नाही. कारण ती एक क्रांती आहे.

दुसरं आयपीएल संपलं तेव्हा मी मटामधल्या विंडो सीटमधे आयपीएलवर एक लेख लिहिला होता. मला हा लेख खूप आवडला होता. आज आयपीएलच्या मॅच बघतानाही तो लेख आठवतो. त्या लेखातले अनेक संदर्भ आज जुने झालेत. पण त्यातले मुद्दे महत्त्वाचे आहेत, असं मला वाटतं. आज वेस्ट इंडिज पाकिस्तानविरुद्ध हरतंय आणि त्यांचा मेन प्लेयर केविन पोलार्ड मुंबई इंडियन्सकडून खेळतोय. क्रिस गेल रॉयल चॅलेंजर्सकडून खेळतोय. वाईस कॅप्टन ब्रावो टेस्ट सिरिज सोडून इथे येऊ घातलाय. मलिंगाने आयपीएल खेळण्यासाठी थेट टेस्ट क्रिकेटमधूनच निवृत्ती स्वीकारलीय. आता यावर टीका करायची की क्रिकेटकडे बघायचा आपला दृष्टिकोन बदलायचा, हे आपणच आपलं ठरवायचं. 

Thursday 28 April 2011

आई, दार उघड !


कोल्हापुरात आई अंबाबाईच्या गाभा-यात तिच्या लेकींनी प्रवेश केल्यावरून बरीच गडबड सुरू आहे. अफवा उठवल्या जात आहेत. मोर्चे काढले जात आहेत. कुणी पुजारी आत्मदहन करण्याची धमकी देतोय. शाहू महाराजांच्या करवीरनगरीत हे घडताना बघून वाईट वाटतं. याच कोल्हापुराने पुरोगामी लढायांत महाराष्ट्राचं नेतृत्व केलंय. त्यामुळे तिथले काही नतद्रष्ट या चांगल्या गोष्टीविरुद्ध मोर्चे काढून काहीही बडबड करतात, तेव्हा वाईट वाटतं. पण त्याला कुणी फारसं महत्त्व देत नाही, तेही बरंय. बायकांनी गाभा-यात केलेल्या पूजेचं आपल्याला आता अप्रूप वाटतंय. पण अगदी सहा सात महिन्यात हे नेहमीचं होणार आहे.

शाहू महाराजांच्या काळात याच गाभा-यात ब्राम्हणेतरांनाही अशाच प्रकारची प्रवेशबंदी होती. तेव्हा काही मराठा तरुण या गाभा-यात घुसले म्हणून तिथल्या पोलिसांनी त्यांना मारहाण केली होती. कैदेतही टाकलं. त्याविरुद्ध प्रबोधनकारांनी अंबाबाईचा नायटा म्हणून प्रबोधनमधे अग्रलेख लिहिला होता. त्यात त्यांनी शाहू छत्रपतींनाही सोडलं नव्हतं. असंच चालणार असेल, तर या अंबाबाईला रस्त्यावरच्या मैलदर्शक दगडांपेक्षा महत्त्व कशाला द्यायचं असं त्यांनी ठणकावलं होतं. अशावेळेस देवळं फोडणारे अफजुलखान, औऱंगजेब हे मोठेच महात्मे वाटतात, अशी मल्लिनाथी करायलाही ते विसरले नव्हते. याचा अर्थ प्रबोधनकारांना आई जगदंबेविषयी श्रद्धा नव्हती असं नव्हतं. सार्वजनिक नवरात्रौत्सवाची स्थापना त्यांनीच केलेली.

Sunday 24 April 2011

गुढीपाडवा हे हिंदू नव वर्षं नाही

गुगल सर्चवर सापडलेला गिरगावच्या शोभायात्रेतला एक यूट्यूब ग्रॅब. 
आज सकाळी नुकतेच दात घासून झाले होते. मोबाईल वाजला.

मी सामंत सर बोलतोय कल्याणहून. तुमचा लेख खूप आवडला हो. अगदी बरोबर आहे, तुम्ही लिहिलंय ते. तुम्ही लिहिलेलं सगळं पटलं. अगदी मनापासून.

थँक्यू थँक्यू.

मी आमच्या कल्याणमधल्या नव वर्ष शोभायात्रा समितीचा गेली बारा वर्षं पदाधिकारी आहे. तरीही सांगतो, पटलं तुमचं. हो, ते हेडगेवारांसकट सगळं पटलं. मुलं थर्टी फर्स्टला दारू पिऊन धिंगाणा घालतात. ते नको म्हणून आमच्यासारख्यांना गुढीपाडवा साजरा व्हायला हवा असं वाटतं. म्हणून आम्ही शोभायात्रेबरोबर.

आपला गुढीपाडवा साजरा व्हायलाच हवा. पण गुढीपाडवा म्हणून.

मी बिर्ला कॉलेजचा वॉइस प्रिंसिपल होतो. आता रिटायर्ड झालोय. मी पाहिलंय ना मुलं गुढी पाडव्याला वेज न्यू इयर साजरं करतात आणि थर्टी फर्स्टला नॉन वेज न्यू इयर.

मी हसतो.

Thursday 21 April 2011

वेलकम इडियट्स


गेल्या वीकेण्डला आंबाजोगाईला गेलो होतो. लातूरमधे महारुद्र मंगनाळेंच्या बातमीमागची बातमीया साप्ताहिकाच्या बाराव्या वर्धापनदिनाचा कार्यक्रम होता. तिथून अमरजींना म्हणजे अमर हबीबांना भेटण्यासाठी आंबाजोगाईला गेलो होतो. अमरजींबरोबर दोन तासदेखील घालवणं हा श्रीमंत करणारा अनुभव असतो. इथे तर अमरजी दोन दिवस सोबत होते. खूप मजा आली.

कसा काय आठवत नाही, पण चर्चेत थ्री इडियट्सचा संदर्भ आला. माझ्या डोक्यात विचार आला की समोर हा एक मोठा इडियटच उभा आहे. नोकरी न करता सामाजिक कामात आयुष्य घालवणारा हा माणूस. अनेक मोठमोठ्या लोकांसोबत मी फिरलोय. त्यांना लांबून जवळून बारकाईनं पाहणं हा कामाचाच भाग. पण अमरजींच्या तोलामोलाचा माणूस महाराष्ट्राभरात मला तरी आजघडीला माहीत नाही. यात अतिशयोक्ती बिलकूल नाही. त्यांना भेटलं की एक ओतप्रोत आनंद मिळतो. आपण स्वतःला मोठे मानणारे सगळ्याच बाबतीत किती छोटे आहोत, हे कळतं. पण त्यातून कोणताही इन्फिरॅरिटी कॉम्प्लेक्स येत नाही. उलट मोठं बनायची प्रेरणा मिळते.

अमरजींनी प्रस्थापित मोठेपणाचा वाराही चुकून लागू नये यासाठी डोळ्यात तेल टाकून दक्षता बाळगलीय. आपल्याला कुणी मोठं म्हणालं तर आभाळच कोसळेल की काय, असं ते साधेपणाने वागत राहिले. त्यांनी त्यांच्या सोबतच्या कितीतरी माणसांचं जगणं समृद्घ बनवलंय. अमरजींचं बोट पकडून विचार करायला शिकलेली माझ्यासारखी पत्रकार किंवा कार्यकर्त्यांची एक पिढीच महाराष्ट्रात आहे. त्यांना आज साठीच्या जवळ आलेलं असताना त्यांना आपण समाज म्हणून काय दिलं?  अनेक खुज्यांच्या वाटेला सहजपणे जातो तो मानमराताब तरी. पण कधी त्याची अपेक्षाही केली नाही आणि न मिळाल्याचं वैषम्यही जवळपासही कधी भरकटलं नाही. निस्वार्थपणे जोडलेली माणसं मात्र जिवाला जीव देण्यासाठी सोबत आहेत. आणखी काय हवं.

Thursday 7 April 2011

पुलं आणि भीमराव पांचाळे


कधीतरी आपणच आपल्या नकळत लिहिलेलं एखादं वाक्य आपल्यालाच आवडून जातं. ‘भीमराव पांचाळे या चार नि तीन सात शब्दांत गझल मराठीत गाते,’ हे वाक्य त्यातलंच. भीमरावांच्या मुलाखतीच्या इण्ट्रोची सुरुवात अशी लिहिली होती. मुलाखत स्मरणिकेसाठी होती. स्मरणिका भीमरावांच्या साठीच्या कार्यक्रमासाठी.

कार्यक्रम छानच झाला. रवींद्र नाट्यमंदिर संपूर्ण भरून गेलं होतं. खाली आणि गॅलरी संपूर्ण. पासेस आधीच संपले होते. त्यामुळे लोकांनी आत शिरण्यासाठी रांगा लावल्या होत्या. खुर्च्या भरल्या होत्या. घरीही कधीच खाली बसली नसतील अशी माणसं बायकापोरांसकट जमिनीवर बसली होती. गर्दी जशी भरगच्च तशीच त्यांची दादही. भीमरावांची प्रत्येक जागा दाद घेत होती. अगदी त्यांचं सत्कार समारंभातलं हसणंही दाद घेत होतं. भीमरावांचं कौतूक सुरू झालं की ते अंग चोरून ऐकायचे. कुणी कौतूक केलं की ते कान पकडून तौबा करायचे. हे सारं छान होतं. अगदी सुगंधी.

Friday 1 April 2011

आमदार झोपा काढत आहेत


पंधरा दिवस एक ईमेल सोडला तर इंटरनेटकडे बघितलंच नव्हतं. त्यामुळे जवळपास पंधरा दिवसांपूर्वी नवशक्तितल्या कॉलमात लिहिलेला कॉलम टाकायचा राहून गेला होता. लेखाचा विषय खरं तर आमदारांच्या झोपेवर होता. अनिल काकोडकरांच्या भाषणात अनेक आमदार डुलक्या काढताना टीव्हीवर बघितलं. त्याच्यावर लिहायला बसलो. हा कार्यक्रम वि. स. पागें अभ्यास केंद्राच्या उद्घाटनाचा होता म्हणून त्यांच्या भाषणांचा संग्रह वाचायला घेतला. रेफरन्ससाठी म्हणून पुस्तक हातात घेतलं पण बरंच पुस्तक वाचून काढलं. त्यातला बराचसा भाग आधीच वाचलेला होता. तो रिफ्रेश झाला. त्यानंतर लिहिलेल्या लेखावर वि. स. पागेच छा गये. मूळ विषय बाजूलाच राहिला. 

लेख नवशक्तित छापून आला. संध्याकाळी एका वयस्कर गृहस्थांचा फोन आला होता. बहुतेक कल्याणचे सामंत. ते पागेंचे दूरचे नातेवाईक. त्यांना पागेंवर कुणीतरी लिहिलं याचा खूप आनंद झाला. मलाही खूप आनंद झाला. पागेंसारखी सगळीच माणसं आपण आपली सगीसोयरीच मानतो.