Monday 29 May 2017

आम्हाला माफ करा, सत्यपाल महाराज

सत्यपाल महाराजांवरच्या हल्ल्याची बातमी लोकमतमध्ये वाचली आणि धक्काच बसला. महाराज मुलाचं नाव धर्मपाल ठेवण्याइतके धार्मिक आहेत. ते लोकांमध्ये राहतात. आधुनिक पुरोगाम्यांसारखे लोकांना तोडत नाहीत. जय गुरुदेव म्हणत परंपरेशी नातं घट्ट पकडून ठेवतात. ते देवाधर्माच्या नावाने शिव्या देत नाहीत, त्यामुळे सनातन्यांना त्यांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करताच येत नाही. राज्य सरकारने त्यांना प्रबोधनकार पुरस्कार दिलाय, इतके ते सगळ्यांना स्वीकारार्ह आहेत. प्रबोधनाचा खरा मार्ग त्यांना सापडला आहे. म्हणून त्यांच्यावर हल्ला होणं अधिक धक्कादायक आहे.

महाराजांवर हल्ला करणारा आता मोकाट आहे. त्याने हल्ला का केला, आपल्याला कळलेलं नाही. त्याचं बॅक्ग्राऊंड काय, कळलेलं नाही. ती शोधण्याइतकी तसदीही आपण घेत नाही. आमच्या संवेदना मेल्यात कधीच्याच. आमचे हात, पाय, डोकं, मन सगळं बधीर झालंय. सत्यपाल महाराज, हल्लेखोरापेक्षा जास्त आम्ही गुन्हेगार आहोत. आम्हाला माफ करा. इतर कुणाला नसेल तर निदान मला तरी माफ करा. मी काहीच कामाचा नाही हो. सॉरी.
गोवन वार्तामधे लिहिलेला लेख थोडे बदल करून पुढे कटपेस्ट करतोय.
...

Monday 22 May 2017

मनात पूजीन रायगडा

कालचा दिवस जोरदार होता. दिव्य मराठीच्या रसिक पुरवणीच्या कॉलमात छापून आलेल्या लेखावर फार प्रतिक्रिया येतील, असं वाटलं नव्हतं. दिवसभर सतत फोन वाजत होता. बहुतेकांना लेख खूपच आवडला होता. आम्ही इतिहासाकडे असं बघितलंच नव्हतं. असं त्यांचं म्हणणं होतं. लेख वाचताना गहिवरून आलं असं सांगता सांगता औरंगाबादचे पैठणे नावाचे एक निवृत्त इंजिनियर काका फोनवरच पुन्हा गहिवरले. आयपीएल टोकाला आलेली असताना साडेदहाच्या सुमारासही न राहवून एका प्राध्यापकाने फोन केला होता. वगैरे वगैरे. 

लेख न आवडल्याचे दोन फोन सकाळी आले होते. ते दोघेही राजपूत समाजाचे होते. पण मी त्यांच्याशी बोललो. माझी मतं सांगितली. त्यांना काही पटली, काही पटली नाहीत. चांगली चर्चा झाली. संध्याकाळी पाच नंतर अचानक फोन येऊ लागले. अरे तुरेची भाषा. लेखात नसलेले संदर्भ सांगणं. ठेवणीतल्या शिव्या. तुला मुंबईला येऊन बघतो. असं लिहायला पुन्हा जिवंत ठेवणार नाही. त्यांना कुणीतरी उचकवल्यामुळे एकामागून एक फोन येत होते, हे कळत होतं. त्या बिचाऱ्यांनी लेखही वाचला नव्हता. पण लेख आवडल्याचे फोन त्यांच्याहीपेक्षा कितीतरी पट जास्त होते. त्यामुळे तक्रारीला जागाच नव्हती. 

माझं अज्ञान होतं की राजपूत स्वतःला मराठ्यांपैकीच एक समजतात. महाराष्ट्रात शेकडो वर्षं राहिल्यामुळे त्यांनी राजस्थानच्या इतिहासाविषयी ममत्व बाळगण्याचं कारण नसेल, हाही माझा गैरसमज होता. अकबराला तुम्ही ग्रेट म्हणूच कसं काय शकता, हा आक्षेप प्रमुख होता. तो माझ्या दृष्टीने महत्त्वाचा नाही. कारण शिवाजी महाराजांनी औरंगजेबाला जिझिया कराविषयी लिहिलेल्या पत्रात आदर्श म्हणून अकबराचा दाखला दिलाय. तो माझ्यासाठी पुरेसा आहे. अर्थात या लेखाविषयी कुणी आक्षेप नोंदवणं अगदीच स्वाभाविक मानायला हवं. आपल्या अस्मितेविरोधात लिहिल्यामुळे राग येऊ शकतोही. काही कारण नसताना महाराणा प्रताप आणि अकबर यांच्यात शिवाजी महाराजांना आणल्यामुळे मी मराठा कार्ड चालवल्याचं कुणाला वाटलं असेल, तर ते समजून घ्यायला हवं. आजकाल कुणाच्याही हेतूंविषयी शंका घेण्याजोगी परिस्थिती आहे खरी. प्रामाणिकपणे केलेल्या लिखाणालाही खोडसाळपणा समजण्याची स्थिती आहे खरी. चूक ही परिस्थिती निर्माण करणाऱ्यांची आहे. 

Friday 12 May 2017

शाळेत न जाणाऱ्या समृद्धीचं पुस्तक

जवळपास एका वर्षाने गोव्याला गेलो. २२ एप्रिल शनिवारी समृद्धीच्या पुस्तकाचं प्रकाशन झालं. जायलाच हवं होतं. पौर्णिमा आणि राजेंद्र केरकरांचं आग्रहाचं निमंत्रण होतं. गोव्याच्या सत्त्व टिकवण्यात सामाजिक कार्यकर्ते आणि पर्यावरणवादी म्हणून राजेंद्रभाईंचं योगदान महत्त्वाचं आहे. लोकसाहित्याच्या अभ्यासक म्हणून पौर्णिमाताईंचाही त्यात हातभार आहे. त्यांची मुलगी समृद्धी आता १६ वर्षांची झालीय. ती कधीच शाळेत गेली नाही. निसर्गाच्या शाळेतच शिकली. कॉलेजलाही शिकायचं नाही म्हणते. पण शिकणं थांबलेलं नाही. मी संपादक म्हणून तिच्याकडून करून घेतलेल्या कॉलमचं पुस्तक झालंय. पुस्तकाची प्रस्तावना या साऱ्या प्रक्रियेविषयीच आहे प्रामुख्याने. गोव्यात जाऊन तू काय केलंस, असं कुणी विचारलं तर माझ्याकडे आता समृद्धीचं पुस्तक आहे.
सोबत प्रस्तावना जोडलीय. कुणाला हे पुस्तक हवं असेल तर संपर्कः तुळशीदास राऊळ – 9049912168,  8999421974
...

टिळकबाई, एनआरआय आणि आरक्षण

`टिळकबाई, काय हे!` नावानं या रविवारी दिव्य मराठीत लेख छापून आला. तीन दिवस तरी फोन खणखणत होता. मेल आणि एसेमेस आले ते वेगळेच. जास्त फोन अभिनंदन करणारे होते. कुणीतरी झोडून काढायला हवं होतंच. किती दिवस यांची गुलामगिरी सहन करायची? एवढं तिखट लिहू नका, अडचणीत याल. श्रीधरपंतांचा उल्लेख आवडला. छान मुद्देसूद लिहिलंत, तोल जाऊ न देता, असं लिहिण्याची गरज आहे. आम्ही ब्राह्मण नाही, पण आरक्षणाला आमचा विरोध होता, आता तुम्ही म्हणताय त्यावर विचार करू. असे प्रतिक्रियांमधले सूर होते.

चित्पावनी आडनाव असणारे चार पाच फोन आले. तुम्ही ब्राह्मणांना कितीही दाबलंत तरी काही बिघडत नाही, आम्ही पुढेच जाणार. छान लिहिलंत, मग मराठ्यांच्या आरक्षणाविरुद्ध बोलायची हिंमत आहे का? आणखी कुणाच्या वक्तव्यांविषयी का नाही लिहित? माझ्यापेक्षा कमी मार्क असलेल्याला आरक्षणामुळे अडमिशन मिळालं, मला नाही. मला जावंसं वाटतं परदेशात. काय चुकलं टिळकबाईंचं? तुम्ही ब्राह्मणांविषयी काहीही बोला, पण गणेशोत्सवाविषयी बोलायचं नाही. देवाधर्माला विरोध करता येणार नाही. मात्र ब्राह्मणांमधली अमरावतीहून आलेली एक प्रतिक्रिया लेख आवडल्याचीही होती.