Sunday 17 December 2017

गोवा, गुजरात आणि बरंच काही

ईटीमधलं कार्टून
गोवा विधानसभा निवडणुकीच्या निकालाने मला धक्का दिला होता. गलितगात्र काँग्रेससमोर भाजपच्या ४ कमी जागा निवडून येतील, यावर माझा विश्वास नव्हता. पण तसं झालं खरं. तिकडे झालं तर गुजरातमध्येही होऊ शकतं. दोन्ही राज्यांत खूप साम्य आहेत. आजच्या दिव्य मराठीत हा लेख छापून आलेला लेख.

कदाचित याच्या उलटंही होऊ शकतं. अनेक तर्क भाजपच्या बाजूनेही कौल देतात. पण हा लेख निकालापेक्षाही खूप काही सांगू पाहतोय. बघा काय वाटतंय ते. दुसरी एक गोष्ट शेवटच्या पॅरेग्राफमध्ये प्रेम द्वेष ही परिभाषा गुरुवारी सकाळीच लिहून पाठवलेली आहे. त्याचा राहुल गांधी काँग्रेस अध्यक्ष झाल्यानंतरच्या भाषणाशी काहीही संबंध नाही.
...

Friday 17 November 2017

शिवसेना@५०

शिवसेनेवर लिहायला नेहमीच मजा येते. शिवसेना हा मला माझी समकालीन गोष्ट वाटते. त्याचा वेगवेगळ्या अंगांनी विचार मांडायला हवा खरंतर. पण माझ्या आळसामुळे तो लिहून काढणं नेहमीच राहून जातं. नेत्यांपासून मित्रांपर्यंत अनेकजण माझ्याशी शिवसेनेवर बोलत असतात. सेनेच्या पन्नाशीनिमित्त ते लिहून काढावं आणि पुस्तक छापावं अशी सूचना काही मित्रांनी केली. पण ते काही जमण्यासारखं नव्हतं. आमचे मित्र राज्यशास्त्राचे अभ्यासक किशोर रक्ताटे शिवसेनेच्या संघटनात्मक बांधणीवर लिहिण्यासाठी सांगत होते. त्यामुळे माझ्या डोक्यात ते किडे वळवळायला लागले. पण ते माझ्यामुळेच मागे पडलं.

दिवाळीच्या आधी अचानक गिरीश अवघडेचा फोन आला. त्याला प्रभातच्या दिवाळी अंकासाठी शिवनेवर लेख हवा होता. लिहून व्हावं म्हणून मी हो म्हटलं. पण त्याला मी अट घातली होती की फॉलोअप घे. तो त्याने भक्कम घेतला. त्यामुळे हा लेख होण्यात त्याचं माझ्यापेक्षा जास्त योगदान आहे. खरं तर या लेखाला आमच्या दोघांची जॉइण्ट बायलाइन हवी होती.

Wednesday 8 November 2017

गूगलची डूडल दुनिया



चित्रलेखात लिहायला सुरुवात केली त्याला आता जवळपास वर्षं होत आलंय. गेले सहाएक महिने तर जवळपास दर अंकात लिहितोय. त्यातले लेख अजूनपर्यंत कधीच ब्लॉगवर टाकला नाही. अनेकदा अनेक लेख टाकावेसे वाटले. पण फॉण्ट कन्वर्टचा प्रॉब्लेम होता. इतक्यातच बेगम अख्तर आणि अब्दुल कवी दसनवी यांची डूडल पाहिल्यावर एक लेख ब्लॉगवर टाकायला हात सुरसुरले होते. आज नृत्यसम्राज्ञी कथ्थक नृत्यांगना सितारा देवी यांचं डूडल पाहिल्यावर राहावलंच नाही. थोडा वेळही मोकळा होता आणि प्रयोग करता करता श्रीलिपीच्या एक्स्चेंज युटिलिटीमध्ये लेख कन्वर्ट झालादेखील.

६ फेब्रुवारीच्या चित्रलेखाच्या अंकात मी गुगलच्या डूडलवर लेख लिहिला होता. त्याचा इण्ट्रो होता, `क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जन्मदिनानिमित्त दिवसभर गूगलने प्रकाशित केलेलं डूडल गाजलं. त्यादिवशी पंधरा लाखांहून अधिक जणांनी सावित्रीबाईंविषयी माहिती जाणून घेण्यासाठी सर्च केलं. फक्त भारतातच नाही तर जगभर ही डूडल चर्चेचा विषय बनली आहेत.`

Monday 6 November 2017

एका कॉम्रेडची धर्मांधांना भीती का वाटते?

कॉ. संपत देसाई संपर्क - ९९७५०९८५१४
कॉम्रेड संपत देसाईंविषयी लिहावं तितकं कमीच आहे. ते कॉम्रेड आहेत, विद्रोही आहेत, त्यांचा व्यासंगही दणकट आहे, तरीही ते दिलखुलास हसत असतात. कायम आपल्या माणसांमध्ये राहतात. गेल्या आठवड्यात त्यांना धमकी देणारं पत्र आलं. त्यात कॉम्रेडने आजरेकर फडाविषयी कृतज्ञता व्यक्त करणारा कार्यक्रम घेतला, त्याचा प्रामुख्याने उल्लेख आहे. एखादा कॉम्रेड विवेकाची मशाल घेऊन अध्यात्माच्या क्षेत्रात शिरतो, तेव्हा धर्मांध त्याला घाबरतात आणि घाणेरड्या शिव्या देणारी, धमक्या देणारी पत्रं लिहितात. म्हणून या धमक्या महत्त्वाच्या आहेत. धर्मांधांना विरोध करणाऱ्यांनी कोणत्या ट्रॅकवर काम करायला हवं, याची दिशा देणारी ही घटना आहे. मंगळवारी ७ नोव्हेंबरला आजऱ्यात निषेध रॅली आणि सभा आहे. राज्यभरातून मान्यवर येत आहेत. 

Thursday 19 October 2017

शूद्रसुक्ताची लढाई

गोव्यात असं कधी होईल, असं वाटलं नव्हतंच. एखाद्या कवितेसाठी कवीवर एफआयआर दाखल व्हावा, इतकं गोव्यातलं सांस्कृतिक वातावरण विषारलं कधी? गोवा वरून इंटरनॅशनल आणि मॉडर्न वाटत असलं तरी ते मनाने एक छोटंसं गाव आहे. खेड्याच्या लोभसपणा त्यात आहे. त्याचबरोबर आपापल्या जातीचे लोक धरून ठेवण्याचा टिपीकल गावठीपणाही त्यात आहे. धार्मिक रूढीपरंपरांमध्ये आणि राजकारणात ही जातीयता अनेकदा उग्र रूप धारण करते. मात्र गोव्याबाहेरच्या लोकांसाठी गोव्याची प्रतिमा कायम सुशेगाद अशीच असते. कवी म्हणून विष्णू सूर्या वाघ यांनी त्या प्रतिमेवर कायम घण घातले.

वाघ भाजपचे आमदार झाले तरी त्यांनी स्पष्ट बोलणं सोडलं नव्हतं. मी संपादक असलेल्या गोवादूत या पेपरात त्यांचा कॉलम काही दिवस चालला होता. त्यात त्यांनी एकदा सनातन संस्थेच्या विश्व हिंदू संमेलनाची हजामत केली होती. त्यामुळे तेव्हा गोवा भाजपच्या प्रभारी असणाऱ्या स्मृती इराणी यांनी अस्वस्थ होऊन फोन केले होते. त्यांनी शिवाजी अंडरग्राऊंड इन भीमनगर मोहल्लाचे प्रयोग सरकारी खर्चाने ठिकठिकाणी लावले होते. कला अकादमीत १४ एप्रिलला आशा भोसलेंच्या मैफिलीला जागा नाकारून तिथे आंबेडकर जयंतीचा कार्यक्रम करणाऱ्यांना जागा दिली होती. आपापल्या कॉलमांत, भाषणांत ते बहुजनवादी भूमिका ठामपणे मांडत राहिले.

Monday 16 October 2017

वेड्यांच्या बाजारातली टीवी नाईनची जगबुडी

माझे सध्या दोन पेपरांत कॉलम सुरू आहेत. एक आठवडा दिव्य मराठीत आणि दुसऱ्या आठवड्यात गोवन वार्ता. काही महत्त्वाचा विषय असला की दोन्हीकडे एकाच विषयावर लिहितो. दोन्हीकडचे वाचक वेगळे आहेत. त्यामुळे त्यानुसार बदल करावे लागतात. त्यामुळे विषय एकच असला तरी दोन वेगवेगळे लेख होतात. त्याच्या प्रेक्षकांचा प्रतिक्रियेचा पॅटर्नही वेगळा आहे. गोव्यातल्या लेखांवर व्हॉट्सअपवर चर्चा जास्त होते. तर दिव्य मराठीतल्या लेखावर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून दिवसभर फोन येतात.

दिव्य मराठीतल्या लेखावर फोन आले नाहीत, असं कधीच झालेलं नाही. किमान २० -२५ फोन तरी येतातच. ईमेल मेसेज वेगळे. ८ ऑक्टोबरचा रविवार मात्र त्याला अपवाद ठरला. टीवी नाइनने २३ सप्टेंबरला जगबुडीची जत्रा भरवली होती, त्यावर लिहिलं होतं. टीवी नाइनचं नाव लेखात दिव्य मराठीने काढल्यामुळे कदाचित त्याचा संदर्भ वाचकांना कळला नसावा. प्रेक्षकसंख्येची आकडेवारी येण्यासाठी एक आठवडा थांबावंच लांगणार होतं. त्यामुळे उशीरही झाला असावा. टीव्ही पत्रकारिता हा विषय लोकांना फार सिरियस घेणं सोडलं असावं. लेखही चांगला उतरला नसावा. पण कधीच फोन न करणाऱ्या पाच सहा जणांनी आवर्जून केला होता. त्यात स्वाभाविकपणे पत्रकार होते. माझा मित्र अविनाश दुधेही होता.

लोकांना प्रतिक्रिया द्यावीशी वाटो अथवा न वाटो, मला कायम वाटत आलंय की आपण पत्रकारितेविषयी लिहीत राहायला हवं. मी तसं लिहीत बोलत आलोयही. आम्ही पत्रकार जगाविषयी लिहितो, पण आपल्याविषयी लिहीत नाही. त्यामुळे संवादाच्या या धंद्याविषयी कोणताही संवाद होत नाही. आता सोशल मीडियामुळे थोडाफार संवाद होतो. पण तोही तुटकच.
अशा टीआरपीच्या खेळांचा खूप वाईट परिणाम चॅनलांमधे काम करणाऱ्या पत्रकारांवर होत असतो. वरवर त्याचं समर्थन करावंच लागतं. पण मुळात पत्रकार म्हणून घडलेल्या मनोभूमिकेच्या विरोधात असतं सगळं. मन खात राहतं. इतर अनेक स्ट्रेस असतातच. पण हा स्ट्रेसही कमी नाही. तरुण वयात अकाली निधन झालेल्या आमच्या अनेक मित्रांचा बळी या स्ट्रेसने घेतलाय. त्याची पत्रकारितेतल्या धुरिणांनी चर्चा करायला हवी.

Tuesday 10 October 2017

१२०८ बेस्ट सेलर


गुरुनाथ नाईकांच्या आजारपणाची चर्चा सुरू आहे. अनेक मान्यवरांनी सोशल मीडियातून त्यांना मदत करण्याची मागणी केलीय. महाराष्ट्र सरकारनेही त्यांना चांगली मदत केलीय. या मदतीमागे नाईकांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघात केलेल्या कामाचीही पार्श्वभूमी कारणीभूत असू शकते. या सगळ्याच्या बातम्या येत होत्या. ते सगळं वाचताना मला सारखी सारखी त्यांची `गाठभेट` आठवायची. गोव्यात `गोवादूत`ला असताना मी `गाठभेट` नावाचा कॉलम चालवायचो. एखाद्या मान्यवराला भेटून त्याचं व्यक्तिचित्र लिहायचो. मजा आली त्यात.

गुरुनाथ नाईकांचीही `गाठभेट` चांगली झाली. आमच्या पुष्पराज पोपकरांकडून मुद्दाम तो मजकूर मागवून घेतला. या कॉलमात फक्त पांढरी बाजू असायची. परिचय करून देण्यापलीकडे यात काही नसायचं. नाईकांच्या कौटुंबिक गुंतागुंतीविषयी मला नंतर अनेकांनी मुद्दामून माहिती दिली. मला त्यात रस नव्हता. मी त्यांच्या कादंबऱ्या फक्त पाहिल्यात. कधीच वाचल्या नाहीत. एक कादंबरीकार आणि पत्रकार म्हणून त्यांच्या जडणघडणीत मला इंटरेस्ट होता. तेच फक्त या लेखात आहे. गेल्या पिढीतल्या पत्रकारांची होणारी फरफट त्यात आलीय. या लेखानंतर गोवा आणि महाराष्ट्रातील काही पत्रकारांनी एकत्र येऊन त्यांचा सत्कार करून मदत दिली होती.

Wednesday 23 August 2017

मोरेसरांची ऐतिहासिक पाचर



सदानंद मोरे सरांविषयी मला नितांत आदर आहे. त्यांचा माझ्या लिखाणावर प्रभाव आहे. त्यामुळेच त्यांच्या विचारांची चिकित्सा करण्याचा मला अधिकार आहे, असं मी मानतो. त्यानुसार मी याआधीही त्यांच्यावर भरभरून लिहिलंय आणि मनापासून टीकाही केलीय. विशेषतः घुमानमधल्या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षीय भाषणात त्यांनी नरेंद्र दाभोलकर आणि गोविंदराव पानसरे यांच्या खुनाचा निषेध केला नाही, तेव्हा मला वाईट वाटलं होतं. संत नामदेवांनी असं केलं नसतं, असं माझं प्रामाणिक मत मी तेव्हा मांडलं होतं. 
 
मोरे सर भाजप सरकारच्या विविध कमिट्यांवर आहेत, यातही मला काही चुकीचं वाटत नाही. वस्तुस्थिती स्वीकारून त्यातल्या त्यात आपण काय करू शकतो, असा प्रयत्न ते करत असावेत. इतिहासाच्या पुस्तक निर्मिती मंडळाचे अध्यक्ष म्हणून त्यांनी यंदा साववी आणि नववीची नवी पुस्तकं आणली. नववीच्या पुस्तकात बोफोर्स घातलं आणि बाबरीविध्वंस टाळला, तेव्हा मला त्यांची बाजू घ्यावीशी वाटली नाही. एकतर मी पुस्तक वाचलं नव्हतं आणि विरोधकांचे मुद्दे मला फार अयोग्य वाटले नाहीत. सातवीच्या पुस्तकावरच्या टीकेविषयी मात्र माझं मत होतं. कारण मी ते पुस्तक वाचलं होतं. मोरे सर आजवर जी भूमिका वारंवार लिहित आलेत, त्यालाच अनुसरून यातल्या इतिहासाची मांडणी होती. त्यानुसार मी माझं म्हणणं माझ्या लेखांमध्ये मांडलं. ते सगळ्यांना पटायलाच पाहिजे, असं नाही. पण एकदा सातवीचं पुस्तक वाचायलाच हवं. 

दिव्य मराठीत लेखाचं हेडिंग मोरेसरांची ऐतिहासिक पाचर असं केलं होतं. ते ब्लॉगमध्ये कायम ठेवलंय. लेख नेहमीप्रमाणे कटपेस्ट.
........

माझा मुलगा सातवीत शिकतो. मराठी मीडियम. एसएससी बोर्ड. आजकाल शाळेची पुस्तकं दुकानात मिळत नाहीत. त्याला ती शाळेत मिळाली, त्याचदिवशी सर्वात आधी इतिहासाचं पुस्तक घेतलं. वाचून काढलं. एका बैठकीत त्याची साठ पानं वाचून होतात. याचं कारण, डॉ. सदानंद मोरे. 

महाराष्ट्राच्या इतिहासावर सदानंद मोरे लिहित असतील, ते वाचायलाच हवं. त्यांनी आपल्या आजवरच्या मांडणीतून महाराष्ट्राच्या इतिहासाकडे बघायचा नवा दृष्टिकोन दिलाय. तो साधार आहे आणि महत्त्वाचा आहे. त्यांच्या `तुकाराम दर्शन` या ग्रंथाआधी वारकरी परंपरेचा महाराष्ट्री संस्कृतीवरचा प्रभाव कधीच इतक्या जोरकसपणे मांडला गेला नव्हता. `लोकमान्य ते महात्मा` या दोन जाड्या खंडांमधल्या ग्रंथाचा अनुवाद दि. पु. चित्रेंनी इंग्रजीत करायला घेतला होता, इतका हा ग्रंथ मोलाचा आहे. महाराष्ट्रातल्या जातवर्चस्ववादी ब्राह्मणांच्या टोळक्याची मानसिकता गांधीहत्येसारख्या घृणास्पद दहशतवादी घटनेपर्यंत कशी ढासळत गेली, याचा तारतम्याने पुराव्यांसह लिहिलेला इतिहास त्यात येतो. बाबासाहेब पुरंदरेंचे आजोबा ठरावेत अशा इतिहासाचार्य राजवाडेंच्या आदर्श मानल्या गेलेल्या महाराष्ट्राच्या इतिहासाची चिरफाड आणि नवी पर्यायी मांडणी मोरेंच्या `गर्जा महाराष्ट्र`मध्ये येते. `जागृति`कार पाळेकरांविषयी त्यांनी केलेल्या संशोधनातून ब्राह्मणेतर चळवळीच्या इतिहासातलं लखलखतं पान समोर आलंय. त्यांनी एक विचारवंत म्हणून केलेली विद्रोही बहुजनवादाच्या जागी उदारमतवादी बहुजनवाद असणाऱ्या सर्वजनवादाची मांडणी सध्याच्या काळात उपयोगाची आहे. 

याचा अर्थ मोरे सरांचं सगळंच बरोबर असतं असंही नाही. नववीच्या इतिहासात त्यांनी राजकीय मुद्दा बनलेलं बोफोर्स आणलं असेल आणि देशाच्या एकतेला धक्का लावणाऱ्या बाबरी मशीद विध्वंसाचा उल्लेख टाळला असेल, तर त्यावर टीका व्हायलाच हवी. संशोधक असतानाही ते वारकरी असल्याचं ओझं बाळगतात, हा कुणाला त्यांच्यावरचा आरोप वाटेलही. बहुसंख्य पुरोगाम्यांना अपेक्षा असते तेव्हा आणि त्या विषयात ते भूमिका घेत नाहीत. घुमानच्या साहित्य संमेलनात अध्यक्षपदावरून त्यांनी डॉ. नरेंद्र दाभोलकर आणि कॉ. गोविंद पानसरे यांच्या खुनाचा निषेध करायलाच हवा होता. त्यांनी भांडारकर इन्स्टिट्यूटवर निवडून जाताना राजकीय पक्षाच्या पॅनेलमधून जायला नको होतं. अशी टीका सोशल मीडियावर होत होती. त्यावर चर्चाही व्हायलाच हवी. मोरे सरांची मांडणी तितकी महत्त्वाचीच आहे. त्यात आता सातवी इतिहासाच्या पुस्तकावरच्या आरोपाची भर पडलीय. भाजपच्या सरकारात सातवीच्या पुस्तकातून मुगलांचा इतिहास दीड दोन पानांत संपवण्यात आला, असा मुख्य आरोप आहे.

अर्थात सातवीचं पुस्तक काही सदानंद मोरेंनी लिहिलेलं नाही. ते इतिहास विषय समितीचे अध्यक्ष आहेत. त्यांच्यासोबत सदस्य म्हणून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पांडुरंग बलकवडे, सावरकरवादी अभिराम दीक्षित आणि इतरही चार पाच जण आहेत. बलकवडे, दीक्षितांची आजवरच्या भूमिका उघड आहेत आणि मोरेंच्याही. लाल महालात दादोजी कोंडदेवांचा आणि संभाजी उद्यानात राम गणेश गडकरींचा पुतळा असणं योग्य नाही, असं मोरेंनी जाहीरपणे सांगितलेलं आहेच. फॅसिझमपेक्षा भ्रष्टाचार परवडला, असं सांगत नरेंद्र मोदींना निवडणुकांच्या आधी टीव्हीवरच्या चर्चेत विरोध केल्यामुळे त्यांना जिवे मारण्याच्या धमक्या आल्या होत्या. मराठे शूद्र असल्याची भूमिका त्यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर घेतली होती. हे सारं उजव्या मंडळींना माहीत असणारच. त्यामुळे त्यांना असं काही पुस्तकात करू न देण्यासाठी बलकवडे, दीक्षितांसारख्या चाणाक्ष लोकांचा समावेश समितीत असणार. तरीही मोरे सरांनी सातवीच्या पुस्तकातून मुलांपर्यंत पोहोचवलंय ते भारीच आहे. 

आजवर सातवीत आलेला मध्ययुगीन इतिहास हा देशभरातला इतिहास सांगणारा होता. खरं तर तो फक्त दिल्लीकेंद्री होता. त्यामुळे त्यात मुगल सविस्तर होते. आता सातवीच्या पुस्तकात येणारा इतिहास हा महाराष्ट्रकेंद्री आणि त्यातही शिवरायकेंद्री आहे. त्यामुळे त्यात मुगल थोडक्यात आहेत. पुस्तकात `शिक्षकांविषयी` नावाची एकपानी प्रस्तावना आहे. त्यातला इतिहासविषयक भाग मोरेंनी लिहिला असावा, `आपला प्रांत भारतीय संघराज्याचा घटक असला तरी इतिहास समजून घेताना महाराष्ट्राच्या दृष्टीने म्हणजेच भारताच्या इतिहासात महाराष्ट्राचे स्थान, भूमिका आणि योगदान समोर ठेवून समजून घेतला तर विद्यार्थ्यांची राष्ट्रभावना अधिक परिपक्व होईल. त्यात आपल्या पूर्वजांनी राष्ट्रासाठी नेमके काय केले हे समजेल आणि त्यातूनच आपल्या आजच्या राष्ट्रीय जबाबदारीचे व कर्तव्याचे भानही विकसित होईल. पुढे ते म्हणतात,`ब्रिटिशांनी भारत जिंकला व त्याच्यावर राज्य केले हे सर्वांनाच ठावूक आहे. परंतु या प्रक्रियेत ब्रिटिशांना रोखण्यात महाराष्ट्र कसा आघाडीवर होता हे समजणेही तितकेच महत्त्वाचे आहे. ब्रिटिशांची स्पर्धा मराठ्यांशी होती आणि त्यांनी भारत जिंकून घेतला तो मराठ्यांशी मुकाबला करूनच. ही जाणीव आपल्या सामर्थ्याची व कर्तव्याची आहे. अध्ययन-अध्यापन करताना ही भावना विद्यार्थ्यांच्या मनात निर्माण होणे अपेक्षित आहे.` आपल्या मुलांना आपला इतिहास आधी कळायला हवा, ही भूमिका चुकीची ठरू नये. असं करताना मुगल किंवा अदिलशाहीचं योगदान आहे त्यापेक्षा अधिक सविस्तर आलं असतं, तरी काही बिघडत नव्हतं.

अटकेपासून कटकेपर्यंत मराठ्यांच्या पराक्रमाचा झेंडा फडकला, असं आपण नेहमीच सांगतो. ते अटक आणि कटक तसंच दक्षिण टोकावरचं महाराष्ट्राच्या पराक्रमाची गाथा सांगणारं जिंजी आणि तंजावर नेमकं कुठे आहे, हे सांगणारा नकाशाच सातवीच्या पुस्तकाचं कव्हर म्हणून आलाय. केवळ अभ्यास म्हणून नाही, तर इतिहास समजून घेण्यासाठी इतर कुणीही वाचावं असं हे पुस्तक आहे. परगणा, जहागीर, बारा मावळ या शेकडो वेळा इतिहासात येणाऱ्या शब्दांचे नेमके अर्थ काय आहेत? बुद्रुक आणि खुर्द यात काय फरक असतो? अशा प्रश्नांची उत्तरं यात सापडतात आणि आनंद देऊन जातात. इतिहासाच्या पाठ्यपुस्तकांत आजवर कधीच न आलेली अनेक माणसं, ठिकाणं आणि घटना पहिल्यांदाच इथे भेटतात.

या पुस्तकात संत नामदेवांना वारकरी परंपरेतले आद्यसंत म्हणून सन्मान मिळतो. शहाजीराजे स्वराज्यसंकल्पक म्हणून येतात. शिवाजी महाराज हे केवळ सत्ताधीश नव्हते, तर प्रजाहितदक्ष राज्यकर्ते होते, हे त्यात येतं. महात्मा फुले ते रवींद्रनाथ टागोरांनी त्यांच्याविषयी काढलेले गौरवोद्गार त्यात येतात. संभाजीराजेंच्या `बुधभूषण` ग्रंथातले उतारे येतात. `भारत हा एक देश असण्याची आणि त्याचा राजा धर्माने कुणीही असला तरी सर्वांनी त्याला पाठिंबा देण्याची जाणीव इतिहासात पहिल्यांदा मराठ्यांनी दाखवली`, असं पानिपताच्या निमित्ताने यात जाणीवपूर्वक येतं. नागपूरकर भोसल्यांना घाबरून कोलकत्ता शहराभोवती इंग्रजांनी खोदलेल्या खंदकाचा, `मराठा डिच`चा, उल्लेख इथे येतो. 

मुस्लिमद्वेष म्हणून मुगलांचा इतिहास गाळण्यात आला असा आरोप असला तरी पूर्ण पुस्तकात कुठेही मुस्लिमांनी महाराष्ट्रावर अत्याचार केले, अशी एक ओळही येत नाही. उलट संत एकनाथांच्या हिंदू मुसलमान संवादातल्या धार्मिक समन्वयाचं उदाहरण येतं. सुफी संप्रदायाचा सन्मानाने उल्लेख होतो. शिवाजी महाराजांच्या सैन्यातल्या मुस्लिम सरदारांचा आणि महाराजांच्या धर्मसहिष्णू धोरणाविषयीही नेमके उल्लेख येतात. यात अकबर येत नसेल पण महाराष्ट्रातला बहामनी राज्यकर्ता मोहम्मद गोवानने केलेल्या लोकोपयोगी कामांचा उल्लेख येतो. 

इतिहासाची साधने या पहिल्याच धड्यात नाण्यांविषयी दोन वाक्य मुद्दाम सांगावीत अशी आहेत, `सम्राट अकबराच्या नाण्यांवरील रामसीतेचे चित्र किंवा हैदरअलीच्या नाण्यांवरील शिवपार्वतीच्या प्रतिमा यावरून त्या काळातील धार्मिक समन्वयाची जाणीव होते. पेशव्यांच्या नाण्यांवर अरेबिक किंवा पर्शियन भाषेचा वापर होत असे. यावरून त्या काळातील भाषाव्यवहार समजतो.` धार्मिक सहिष्णुतेसंबंधात ही वाक्य येत नाहीत. येतात ती इतिहास साधनांच्या संदर्भात. त्यामुळे त्यात कुणी आक्षेप घेऊ शकत नाही. पण जे सांगायचंय ते मात्र नीट पोहोचतं. ही सदानंद मोरेंची खास शैली आहे. भाजपच्या सरकारने नेमलेल्या मंडळातील हिंदुत्ववादी मंडळींसोबत अध्यक्ष बनून मोरेंनी अशी पाचर सातवीच्या इतिहासाच्या पुस्तकात ठिकठिकाणी मारून ठेवलीय. आता ते महाराष्ट्रातल्या सहिष्णुतावादी म्हणवणाऱ्या मंडळींना कळत नसेल, तर ती चूक कोणाची?
 
मोरे सर अध्यक्ष नसते तर माझ्या मुलाला सातवीत कोणता इतिहास शिकावा लागला असता, याचा विचारही मला करवत नाही.
    

Saturday 10 June 2017

रॉक ऑन कबीर

यावर्षीच्या कॅलेंडरवर ९ जून तारखेवर कबीर जयंती लिहिलेली आहे. आमचा कबीर. त्यांच्या ना जन्माचा पत्ता  ना मृत्यूचा, ना धर्माचा जातीचा, ना कुळाचा ना वेळाचा. तो त्या सगळ्याच्या पलीकडचा. पलीकडे जाण्यासाठी बोट धरून रस्ता दाखवणारा. त्याच वाटेवर चालणारे पाच जण कबीराची गाणी गातात आजच्या सूरात. हर्षदा परबच्या आग्रहामुळे मी कबीर कॅफे प्रत्यक्षात ऐकले. मी त्यांच्यावर लेख लिहावा, हाही तिचाच आग्रह. लेखासाठी नाही, पण त्यांना यूट्यूबवर खूपच ऐकले. दिव्य मराठीच्या शेखर देशमुखांना सहज सांगितलं, त्यांच्याविषयी काहीतरी करायला पायजे. त्यांनी लेख करा म्हणून सांगितलं. कॅफेमधल्या रमणशी बोललो. ते लंडन आणि अमेरिकेला जायला बॅगा भरत होते. त्यांच्याशी मेल, व्हॉट्सअपवरून कॉण्टॅक्ट करत राहिलो.

त्यांना भेटूनच हा लेख करायचा होता. पण नाही जमलं. इथे तिथे त्यांच्या मुलाखती होत्या. त्या वाचून हा लेख केलाय. दिव्य मराठीच्या वर्धापनदिनाच्या रसिक पुरवणीत हा लेख आला होता. मन लागो मेरो यार फकिरी में, या शीर्षकाने. जबरा रिस्पॉन्स आला. बुलडाण्याहून एक वाचकमित्र फोन करून म्हणाला आता आम्ही जुने मित्र पुन्हा भेटणार, काहीतरी करून दाखवणार. रॉक ऑन. धुळ्याहून कबीर मठातल्या आजीचा फोन आला, त्यांना कबीर जयंतीला भजनाला बोलावयाचंय. मजा आली. कबीर कॅफेला भेटून लेख पुन्हा लिहायचाय सविस्तर. तोवर हाच गोड मानून घ्या.

Thursday 8 June 2017

सचिन... सचिन...


सचिनसोबत सेल्फी
काढताना रुद्र आणि मी
सचिन तेंडुलकर आपल्याला आवडतो. मनापासून आवडतो. त्याच्यावर आपण फिदा आहे. त्याच्या खेळावर तर आहेच. पण त्याच्या वागण्यावरही आहे. तो आपला होता, आहे आणि राहील. त्याच्याविषयी चिकित्सा, टीका करता येणार नाही का? नक्कीच करता येईल. करायलाच हवी आणि केलीयही. सचिन त्याच्या पलीकडे आहे. तो माझ्यासारख्या त्याच्या फॅनसाठी क्रिकेटच्याही पलीकडे आहे. सचिनवरचे दोनतीन तरी लेख मी वेळोवेळी भरभरून लिहिलेत. शिवाय विनोद कांबळीवरही लिहिलंय आणि धोनीवरही.

दिव्य मराठीतल्या माझ्या कॉलममध्ये मी वेगवेगळ्या विषयांवर लिहिण्याचा प्रयत्न केलाय.  त्यात हाही एक लेख. मला तो आवडला मनापासून. रुद्रसोबत सिनेमा बघताना जे डोक्यात येत होतं, ते या लेखात शेअर केलंय. चळवळील्या माझ्या अनेक मित्रांना सचिन भांडवलशाहीचा प्रतिनिधी वाटतो. त्यांना हा लेख आवडणार नाही. पण सचिन सचिन आहे. त्याच्यासाठी कायपण! याच विषयावर दिव्य मराठीत लिहिलं आणि पाठोपाठ गोवन वार्ताच्या कॉलमसाठीही. दोन्ही लेखांतलं थोडं थोडं एकत्र केलंय, ते ब्लॉगसाठी.

Monday 29 May 2017

आम्हाला माफ करा, सत्यपाल महाराज

सत्यपाल महाराजांवरच्या हल्ल्याची बातमी लोकमतमध्ये वाचली आणि धक्काच बसला. महाराज मुलाचं नाव धर्मपाल ठेवण्याइतके धार्मिक आहेत. ते लोकांमध्ये राहतात. आधुनिक पुरोगाम्यांसारखे लोकांना तोडत नाहीत. जय गुरुदेव म्हणत परंपरेशी नातं घट्ट पकडून ठेवतात. ते देवाधर्माच्या नावाने शिव्या देत नाहीत, त्यामुळे सनातन्यांना त्यांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करताच येत नाही. राज्य सरकारने त्यांना प्रबोधनकार पुरस्कार दिलाय, इतके ते सगळ्यांना स्वीकारार्ह आहेत. प्रबोधनाचा खरा मार्ग त्यांना सापडला आहे. म्हणून त्यांच्यावर हल्ला होणं अधिक धक्कादायक आहे.

महाराजांवर हल्ला करणारा आता मोकाट आहे. त्याने हल्ला का केला, आपल्याला कळलेलं नाही. त्याचं बॅक्ग्राऊंड काय, कळलेलं नाही. ती शोधण्याइतकी तसदीही आपण घेत नाही. आमच्या संवेदना मेल्यात कधीच्याच. आमचे हात, पाय, डोकं, मन सगळं बधीर झालंय. सत्यपाल महाराज, हल्लेखोरापेक्षा जास्त आम्ही गुन्हेगार आहोत. आम्हाला माफ करा. इतर कुणाला नसेल तर निदान मला तरी माफ करा. मी काहीच कामाचा नाही हो. सॉरी.
गोवन वार्तामधे लिहिलेला लेख थोडे बदल करून पुढे कटपेस्ट करतोय.
...

Monday 22 May 2017

मनात पूजीन रायगडा

कालचा दिवस जोरदार होता. दिव्य मराठीच्या रसिक पुरवणीच्या कॉलमात छापून आलेल्या लेखावर फार प्रतिक्रिया येतील, असं वाटलं नव्हतं. दिवसभर सतत फोन वाजत होता. बहुतेकांना लेख खूपच आवडला होता. आम्ही इतिहासाकडे असं बघितलंच नव्हतं. असं त्यांचं म्हणणं होतं. लेख वाचताना गहिवरून आलं असं सांगता सांगता औरंगाबादचे पैठणे नावाचे एक निवृत्त इंजिनियर काका फोनवरच पुन्हा गहिवरले. आयपीएल टोकाला आलेली असताना साडेदहाच्या सुमारासही न राहवून एका प्राध्यापकाने फोन केला होता. वगैरे वगैरे. 

लेख न आवडल्याचे दोन फोन सकाळी आले होते. ते दोघेही राजपूत समाजाचे होते. पण मी त्यांच्याशी बोललो. माझी मतं सांगितली. त्यांना काही पटली, काही पटली नाहीत. चांगली चर्चा झाली. संध्याकाळी पाच नंतर अचानक फोन येऊ लागले. अरे तुरेची भाषा. लेखात नसलेले संदर्भ सांगणं. ठेवणीतल्या शिव्या. तुला मुंबईला येऊन बघतो. असं लिहायला पुन्हा जिवंत ठेवणार नाही. त्यांना कुणीतरी उचकवल्यामुळे एकामागून एक फोन येत होते, हे कळत होतं. त्या बिचाऱ्यांनी लेखही वाचला नव्हता. पण लेख आवडल्याचे फोन त्यांच्याहीपेक्षा कितीतरी पट जास्त होते. त्यामुळे तक्रारीला जागाच नव्हती. 

माझं अज्ञान होतं की राजपूत स्वतःला मराठ्यांपैकीच एक समजतात. महाराष्ट्रात शेकडो वर्षं राहिल्यामुळे त्यांनी राजस्थानच्या इतिहासाविषयी ममत्व बाळगण्याचं कारण नसेल, हाही माझा गैरसमज होता. अकबराला तुम्ही ग्रेट म्हणूच कसं काय शकता, हा आक्षेप प्रमुख होता. तो माझ्या दृष्टीने महत्त्वाचा नाही. कारण शिवाजी महाराजांनी औरंगजेबाला जिझिया कराविषयी लिहिलेल्या पत्रात आदर्श म्हणून अकबराचा दाखला दिलाय. तो माझ्यासाठी पुरेसा आहे. अर्थात या लेखाविषयी कुणी आक्षेप नोंदवणं अगदीच स्वाभाविक मानायला हवं. आपल्या अस्मितेविरोधात लिहिल्यामुळे राग येऊ शकतोही. काही कारण नसताना महाराणा प्रताप आणि अकबर यांच्यात शिवाजी महाराजांना आणल्यामुळे मी मराठा कार्ड चालवल्याचं कुणाला वाटलं असेल, तर ते समजून घ्यायला हवं. आजकाल कुणाच्याही हेतूंविषयी शंका घेण्याजोगी परिस्थिती आहे खरी. प्रामाणिकपणे केलेल्या लिखाणालाही खोडसाळपणा समजण्याची स्थिती आहे खरी. चूक ही परिस्थिती निर्माण करणाऱ्यांची आहे. 

Friday 12 May 2017

शाळेत न जाणाऱ्या समृद्धीचं पुस्तक

जवळपास एका वर्षाने गोव्याला गेलो. २२ एप्रिल शनिवारी समृद्धीच्या पुस्तकाचं प्रकाशन झालं. जायलाच हवं होतं. पौर्णिमा आणि राजेंद्र केरकरांचं आग्रहाचं निमंत्रण होतं. गोव्याच्या सत्त्व टिकवण्यात सामाजिक कार्यकर्ते आणि पर्यावरणवादी म्हणून राजेंद्रभाईंचं योगदान महत्त्वाचं आहे. लोकसाहित्याच्या अभ्यासक म्हणून पौर्णिमाताईंचाही त्यात हातभार आहे. त्यांची मुलगी समृद्धी आता १६ वर्षांची झालीय. ती कधीच शाळेत गेली नाही. निसर्गाच्या शाळेतच शिकली. कॉलेजलाही शिकायचं नाही म्हणते. पण शिकणं थांबलेलं नाही. मी संपादक म्हणून तिच्याकडून करून घेतलेल्या कॉलमचं पुस्तक झालंय. पुस्तकाची प्रस्तावना या साऱ्या प्रक्रियेविषयीच आहे प्रामुख्याने. गोव्यात जाऊन तू काय केलंस, असं कुणी विचारलं तर माझ्याकडे आता समृद्धीचं पुस्तक आहे.
सोबत प्रस्तावना जोडलीय. कुणाला हे पुस्तक हवं असेल तर संपर्कः तुळशीदास राऊळ – 9049912168,  8999421974
...

टिळकबाई, एनआरआय आणि आरक्षण

`टिळकबाई, काय हे!` नावानं या रविवारी दिव्य मराठीत लेख छापून आला. तीन दिवस तरी फोन खणखणत होता. मेल आणि एसेमेस आले ते वेगळेच. जास्त फोन अभिनंदन करणारे होते. कुणीतरी झोडून काढायला हवं होतंच. किती दिवस यांची गुलामगिरी सहन करायची? एवढं तिखट लिहू नका, अडचणीत याल. श्रीधरपंतांचा उल्लेख आवडला. छान मुद्देसूद लिहिलंत, तोल जाऊ न देता, असं लिहिण्याची गरज आहे. आम्ही ब्राह्मण नाही, पण आरक्षणाला आमचा विरोध होता, आता तुम्ही म्हणताय त्यावर विचार करू. असे प्रतिक्रियांमधले सूर होते.

चित्पावनी आडनाव असणारे चार पाच फोन आले. तुम्ही ब्राह्मणांना कितीही दाबलंत तरी काही बिघडत नाही, आम्ही पुढेच जाणार. छान लिहिलंत, मग मराठ्यांच्या आरक्षणाविरुद्ध बोलायची हिंमत आहे का? आणखी कुणाच्या वक्तव्यांविषयी का नाही लिहित? माझ्यापेक्षा कमी मार्क असलेल्याला आरक्षणामुळे अडमिशन मिळालं, मला नाही. मला जावंसं वाटतं परदेशात. काय चुकलं टिळकबाईंचं? तुम्ही ब्राह्मणांविषयी काहीही बोला, पण गणेशोत्सवाविषयी बोलायचं नाही. देवाधर्माला विरोध करता येणार नाही. मात्र ब्राह्मणांमधली अमरावतीहून आलेली एक प्रतिक्रिया लेख आवडल्याचीही होती. 

Friday 28 April 2017

हॅपी बर्थडे एसपी

वी वी पी शर्मा सर भेटले की मजा येते. भय्या आडनावाचा तेलुगू माणूस. नखशिखांत पत्रकार. प्रचंड अनुभव. बारीक अभ्यास. खूप ओळखी. तरीही कायम जमिनीवर. प्रेमात पडावी अशी पत्रकाराला शोभेशी बेपर्वाई. हे कमी म्हणून भरदार मिशा आणि पोरासारखी माया करणारा स्वभाव. ईटीव्हीत असताना गुजरातचा भूकंप कवर करायला गेलो तेव्हा पहिल्यांदा भेटलो. ते होते म्हणून दिल्लीला गेलो. टीवीकडे, पत्रकारितेकडे बघायची नजर घडली.

सर दिल्लीत सीएनएन आयबीएनमध्ये कोणत्या तरी पदावर आहेत. ते मुंबईत येतात कारण त्यांच्या पत्नी `द हिंदू`च्या मुंबई एडिशनमधे आहेत. सर मुंबईत आले की फोन करतात. तिखटजाळ नॉनवेज कुठे मिळेल, हे मी शोधून ठेवलेलं असतं. तिथे आमचा मोर्चा वळतो. यावेळेस फॉर अ चेंज, आम्ही त्यांच्या घरी भेटलो. चर्चगेटला कस्तुरी बिल्डिंगमधे हिंदूचं ऑफिस आहे आणि गच्चीवर कंपनीने मॅडमना दिलेलं घर. सोबत सरांनी त्यांच्या स्पेशल मसाल्यांनी बनवलेलं चिकन आणि गप्पा. सर बोलत असतील की सगळं पटलं नाही तरी ऐकत राहावंसं वाटतं.

शर्मा सर सांगत होते. टाइम्सच्या जर्नालिझम स्कूलमधे ते पंचवीसेक जण शिकत होते. सगळ्या पोरांना टाइम्सने मौसम विहारमधे एक दोन मोठे फ्लॅट दिले होते. तिथे शेजारच्या कंपाऊंडमध्ये एक दाढीवाला बायको आणि भावासोबत राहायचा. पण या शिकाऊ पत्रकार पोरांबरोबर पोर बनून राहायचा. एकत्र दारू प्यायचा. मस्तमौला मजा करायचा.

कोर्स संपला. इंटरव्यू दिला की टाइम्समधे चिटकता येणार होतं. फ्लॅटमधे पाणी आलं नव्हतं. एरवी आंघोळ केली नसती तरी चाललं असतं. इंटरव्यूला तरी आंघोळ करून जाणं भाग होतं. शेजारचा दाढीवाला बादल्या भरून भिंतीपलीकडे देत होता. मुलाखती सुरू झाल्या. पहिली मुलगी मुलाखतीसाठी गेली. पुतळा बनून बाहेर आली. तेच एकामागून एक सगळ्यांचं होत गेलं. शर्मा सरांना नंबर आला. आत जाऊन बघतात. तर समीर जैनच्या बाजूला तोच शेजारच्या भिंतीपल्याडचा दाढीवाला सूटबुटात बसलेला. एस. पी. सिंग. सुरेंद्र प्रताप सिंग. नवभारत टाइम्सचे कार्यकारी संपादक.

एसपींचं नाव काढलं की जुनी माणसं असे अफलातून अनुभव सांगतात. `शिला पर आखिरी अभिलेख` या निर्मलेंदू यांनी संपादित केलेल्या पुस्तकात अशा अनुभवांची रेलचेल आहे. २००० वगैरे साली ईटीवीत असताना संजय निरुपम यांच्या मालाडमधल्या घरी बाइट घ्यायला गेलो होतो. त्यांच्या कपाटात या पुस्तकाच्या दोन प्रती होत्या. नेमकं आठवत नाही, काय झालं होतं. मी एसपींविषयी काही विचारलं होतं की इतर काही. निरुपमांनी पुस्तकाची एक प्रत दिली मला. त्या पुस्तकाने, एसपींनी मला वेड लावलं. कितीदातरी वाचलंय ते उल्टंसुल्टं. दिल्लीत आम्ही रूममेट असताना प्रमोद चुंचूवारने वाचलं ते पुस्तक. तो म्हणाला, या पुस्तकाचा खूप प्रभाव आहे तुझ्यावर. मी म्हटलं, अरे हो, खरंच!

थँक्यू एसपी. कॉलेजमधे असताना तुम्हाला आज तक वर पाहायचो.
आणि हॅपी बड्डे एसपी.
एसपी तुम्ही असता तर आज २८ एप्रिलला ७० वर्षांचे असता. तुम्ही असता तर तुम्हाला भेटलो नक्की असतो. आता तुम्ही नाही. तुमच्यावर गेल्या रविवारी दिव्य मराठीच्या रसिक पुरवणीत लेख लिहिलाय. तो सोबत जोडलाय थोडा बदल करून. 

शिवाय एसपींसोबत काम केलेल्या राजेश बादल यांनी राज्यसभा टीवीसाठी केलेला एका शोची लिंकदेखील लेखात आहे. बघा जमल्यास. 

Saturday 15 April 2017

दर्द मिल सके तो ले उधार

द हिंदू वाचणाऱ्या सगळ्यांना प्रकाश कामत हे नाव ओळखीचं आहे. हिंदूमध्ये गोव्यातल्या अभ्यासपूर्ण बातम्या वाचणं, हे गोव्याचं वर्तमान समजून घेण्याचा उत्तम रस्ता आहे. त्यांनी काल एका व्हॉट्सअप ग्रुपवर मेसेज शेअर केला. तो माझा एक मोठा सन्मान असल्याचं मला वाटलं. थँक्स प्रकाशजी. तो मेसेज असा होता...

`कालच्या (१३एप्रिल)च्या दै. गोवन वार्तातील सतीश वरील दैनिक गोवादूतचे माजी संपादक ह्यांचा लेख आपण सतीशच्या मार्गदर्शनाखाली घडलो अशं वाटणाऱ्या प्रत्येकाने काळजीपूर्वक वाचावा. पत्रकारिता करताना पत्रकाराची सामाजिक बांधिलकी जपणारे, आपल्या पत्रकारितेवर विश्वास असणारे आत्मविश्वासी तरुण संपादक सचिन हे नम्र व्यक्तिमत्त्व पण कमिटेड पत्रकार. सच्चा सामाजिक कार्यकर्ता आणि सामाजिक कार्याचा आव आणणारे प्रसिद्धीलोलूप माणसं हाडाचे पत्रकार/संपादक कशी ओळखतात, ते या लेखातून समजेल. सतीश मागे ठेऊन गेलेल्या फौजेमधील प्रत्येकाने हा लेख शब्दानशब्द वाचावा आणि मार्गदर्शक मानावा.
सचिन, एक गंमत उघड करतो. आपल्या त्या भाषणास मी खाली उपस्थित होतो. दुसऱ्या दिवशी सतीश नेहमीच्याच मॅच्युरिटीने हसत म्हणाला. `सचिन एवढा आक्रमक का बोलला?` `सिंपल, ही इज अ कमिटेड जर्नालिस्ट. हिज प्रोफेशन वॉज अटॅक्टड आक्रमकपणे. ही डिफेंडेड इट आक्रमकपणे.` सतीश दिलखुलास हसला. पण संवेदनशीलपणे म्हणाला. ताणे पर्सनल घेवना न्ही?... तो असो न्हीच, हाव म्हळे.

कन्स्ट्रक्टिव कमिटेड सोशल वर्क अन् कन्स्ट्रक्टिव कमिटेड पत्रकारितेतील ती एक छोटीशी नोंक झोंक. तुम्ही तुमचे काम करा. आम्ही आमचे करतो, असं समजावणारी. व्हेरी व्हेरी हेल्दी.`

Friday 14 April 2017

धर्म जागो कबीराचा

पंढरपूरच्या कबीर मठातली ही कबीरांची समाधी
आज १४ एप्रिल. बाबासाहेबांची जयंती. हा दिवस आमच्या वाडीत मोठ्या उत्साहात साजरा होताना लहानपणापासून बघतोय. घोषणा देत निघणारी प्रभातफेरी. कव्वाली आणि भीमगीतांचा जलसा. बुद्धविहारापासून मेन रोडपर्यंतची लायटिंग आणि कमानी. चौकात बाबासाहेबांचा मोठा फोटो. यंदाही आमची वाडी सजलीय. बाबासाहेबांच्या मोठ्या फोटोखाली आणखी चार फोटो आहेत. बुद्ध, कबीर, शिवराय आणि फुले. बाबासाहेबांना कबीर, शिवराय आणि फुले यांच्यापासून तोडण्याचं षडयंत्र एकीकडे सुरू असताना, आमच्या वाडीत समावेशकतेचे विचार अजून शाबूत असल्याचं बघून बरं वाटलं.

बाबासाहेब जन्मले कबीरपंथी घरात. संत कबीराच्या संप्रदायाचा आजही प्रभाव असलेल्या परिसरात त्यांचा जन्म झालाय. त्यांचे वडील कबीराचे दोहे गायचे. बाबासाहेबांनी कबीरांना आपलं गुरू मानलंय, हे सगळ्यांनाच माहीत आहे. कबीरांचा हा प्रभाव फक्त बाबासाहेबांवरचा नाही तर तुकोबा ते जोतिबा या महाराष्ट्रीय क्रांतिकारकांवरही त्यांचा तितकाच प्रभाव आहे. पण हे फक्त एकतर्फी नाही. तर कबीरांवरही महाराष्ट्राचा त्यातही संत नामदेवांचा पक्का प्रभाव असल्याचं सहज आढळून येतं.

Sunday 9 April 2017

कार्यकर्ता आहे तरी कुठे?

विषय चुकवून चालत नाही आणि तसा वेळ मात्र नसतो, असं सदराचे लेख लिहिताना अनेकदा होतं. मागेही असंच झालं महानगरपालिका आणि जिल्हापरिषदांचे निकाल गुरूवारी लागणार होते. रविवारच्या पुरवणीत छापून येणारा लेख बुधवारीच द्यायचा होता. लिहायचं तर निकालांवरच होतं, पण निकाल माहीत नव्हते. अगदीच काही सूचत नव्हतं. टीव्ही लावला. झी २४ तासवर चर्चा सुरू होती. त्यात औऱंगाबाद लोकसत्ताचे सुहास सरदेशमुख होते. ते उस्मानाबादमधे होते तेव्हापासूनच मित्र. छान बोलत होते कार्यकर्त्यांच्या फरफटीविषयी. लेखाला विषय मिळाला.

यावेळेस महानगरपालिका निवडणुकांत एका उमेदवाराला चार वॉर्डात निवडणूक लढवावी लागत होती. त्यामुळे एकेका वॉर्डपुरती निवडणूक लढवणारे छोटे कार्यकर्ते स्पर्धेतूनच बाद झाले. हे लक्षात आल्यावर लिंक लागली. पण हाच मुद्दा लेखात मांडायचा राहून गेला. रात्री उशिरा बसून लेख लिहिला. दुसऱ्या दिवशी सकाळी साम टीव्हीवर निवडणूक निकालांवर चर्चेसाठी होतो. चर्चा सुरू असतानाच दिव्य मराठीचे पुरवणी संपादक शेखर देशमखांचा मिस कॉल येऊन पडला होता. ब्रेकमध्ये त्यांना फोन केला. लेख त्यांना आवडला होता. जीव भांड्यात पडला. दिव्य मराठीत लेख छापून आल्यावर कुठच्या कुठच्या कार्यकर्त्यांचे फोन आले. आमच्या मनातलंच मांडलंत, असं ते सांगत होते.

निवडणुकांचा नवा फॉर्म्युला

ट्रॉम्बेतल्या दंग्याचा बळी ठरलेली पोलिस वॅन 
चुकत नसेन तर १६ मार्चच्या रविवारी हा लेख दिव्य मराठीच्या रसिक पुरवणीत छापून आला होता. त्याच्या आदल्याच रविवारी ट्रॉम्बेमध्ये छोटा दंगा झाला होता. फेसबूकवरच्या पोस्टमुळे दीडदोनशे जणांच्या जमावाने पोलिस स्टेशनावर हल्ला केला होता. मला एकदम धक्का बसला. हे छोटे दंगे मोठ्या दंगलींपेक्षाही भयानक असतात. त्यातले स्थानिक संदर्भ रुतून बसतात आणि जातीधर्मावरून दीर्घकाळ विष भिनत जातं. ही सारी निरीक्षणं सविस्तर नोंदवणारा हा लेख. बघा पटतोय का?
...

गाहे तव जय गाथा

लोकलमधे गर्दी असते. 
उभ्या असलेल्या एकाच्या मोबाइलवर `जन गण मन` वाजायला लागतं. 
जवळच बसलेला राष्ट्रगीताला मान द्यायचा म्हणून उभा राहतो. 
चटकन तो मोबाईलवाला त्याच्या जागेवर बसतो. 
जागा गेलेला म्हणतो. `अरे ये तो मोदी से भी चालू निकला`.
असा एक मस्त जोक वॉट्सअपवर फिरत होता. तो आठवायचं कारण माझा एक लेख. यावर्षी वॅलंटाइन डे ला सुप्रीम कोर्टाचा एक निकाल आला. त्यात त्यांनी सिनेमाचा भाग म्हणून राष्ट्रगीत आलं तर उभं राहणं बंधनकारक नसल्याचा निर्वाळा दिला होता. तेव्हा एक लेख `गोवन वार्ता` या गोव्यातल्या पेपरात लिहिला होता. उशीर झालाय. निमित्त हरवलंय. पण कालच एका मित्राशी बोलताना हा लेख आठवला. पुन्हा वाचला. मजा आली. म्हटलं तो ब्लॉगवर टाकायला हवा. म्हणून टाकतोय. नेहमीसारखा कटपेस्ट.
...

सुरेल संचित `पुरुषार्था`चं

द हिंदूचे कार्टूनिस्ट केशव यांनी चितारलेली ही किशोरीताईंची मैफल 
पाकिस्तानात सुफी दर्ग्यांवर होत असलेल्या हल्ल्यांविषयी लिहायचं होतं खरं तर. पण किशोरीताई गेल्या आणि म्हटलं लिहायचंच. त्यांच्या गाण्याबद्दल मी काही लिहू शकत नाही. या निमित्ताने एकेकाळी देवदासी समाज म्हणून ओळखला जाणाऱ्या गोमंतक मराठा समाजाच्या संघर्षाविषयी लिहायला घेतलं. वामन राधाकृष्ण यांनी या विषयावर लिहिलेलं पुरुषार्थ हे पुस्तक शोधत होतो. ते सापडलंच नाही. त्यामुळे लेख लिहायला उशीर लागला. अनेक हवे ते संदर्भ त्यात होते. त्यामुळे बहुतांशी स्मरणशक्तीवर अवलंबून राहावं लागलं. पराग परबांचं पुस्तक ऐनवेळेस हाताशी आलं. त्याचा फायदा झाला. बरेच दिवस लिहायचं होतं. लिहिलं, पण अजून समाधान नाही झालंय. खरं तर स्वतंत्र पुस्तक होईल, इतका मोठा हा संघर्ष आहे. कुणीतरी ते सविस्तर लिहायला हवं.

कलावंताची जात बघायची असते का? आणि किशोरीताईंसारख्या या सगळ्याच्या पलीकडे गेलेल्या कलाकाराच्या जातीविषयी चर्चा करणं कितपत योग्य आहे?  या प्रश्नांमागची भावना अभिनंदनीयच आहे. त्याचा सन्मान करायलाच हवा. पण दुर्दैवाने आपल्याकडे सामाजिक पार्श्वभूमी समजली तरच कलावंतांच्या साधनेचं मोल अधिक समजून घेता येतं. म्हणून ती पार्श्वभूमी सरळ मांडायला हवी. त्याचीही चर्चा व्हायला हवी. भारतरत्न एम एस सुब्बलक्ष्मी आणि लता मंगेशकर यांच्या संघर्षाकडेही या दृष्टीने पाहायला हवं.

गोव्यात `आप` का हरली?

गोवन वार्तामध्ये भाजपविषय़ी लेख लिहिला तेव्हाच खरं तर आपविषयी लिहायचं होतं. गोव्याच्या राजकारणाचा मूळ पिंड हा बहुजनवादाचा आहे. जमिनीसह सर्व समृद्धीची साधनं हातात असणारे उच्चवर्णीय आणि त्यामुळे गुलामीच्या गर्तेत पिळून निघणारे बहुजन हे गोव्याच्या ताज्या इतिहासाचा भाग असलेलं समाजवास्तव आता नाही. परिस्थिती बदलली, पिढ्या गेल्या तरी त्याचा पीळ अद्याप गेलेला नाही. फक्त हिंदूंमधेच नाही तर ख्रिश्चनांमधेही ही विभागणी आहे.

इंटरनॅशनल हायफाय रॅपरमधे गुंडाळलेल्या गोव्यात जात सहसा दिसत नाही. पर्यटकांना तर ती दिसण्याची शक्यताच नाही. माझं निरीक्षण आहे की महाराष्ट्रापेक्षाही गोव्याच्या राजकारण, समाजकारणात जात जास्त आहे. हे मी गोव्यात असताना अनेकदा गप्पांत मांडलंय. पण ते कुणाही गोंयकार मित्राला आवडत नाही. धर्माच्या झगड्यात जातीचे संघर्ष लपून राहतात. तसं काहीसं गोव्यात झालंय.

पर्रीकरांच्या पराभवाची प्रश्नचिन्ह

मी गोव्यात तीन वर्षं काम केलं. गोवेकर वाचक भेटल्यावर भरभरून बोलतो. पण फोन करून बोलणं त्याला फारसं रूचत नसावं, असा माझा अनुभव. पण १६ मार्चला माझ्या गोवन वार्ता पेपरातल्या पाक्षिक कॉलमाने माझा आजवरचा अनुभव खोटा ठरवला. तो मनोहर पर्रीकरांच्या शपथविधीचा दिवस होता. त्यांनी संरक्षणमंत्रीपद सोडून गोव्यासारख्या छोट्या राज्याचा मुख्यमंत्री बनणं, याचा मला खरंच राग आला होता. त्या रागाच्या तिडकीतच लेख उतरला.

तो राग माझ्या एकट्याचा नव्हता. सगळ्या गोव्याचाच राग होता तो. हा लेख सोशल मीडियावर प्रचंड फिरला. मी चार गोव्यातल्या चार ग्रुपचा मेंबर आहे. त्यातच तो पुन्हा पुन्हा शेअर होत राहिला. लोकांच्या मनातलं या लेखात होतं जणू. विशेषतः त्यातला भाजपवरच्या बहुजनांच्या रोषाचं विश्लेषण लोकांचा आवडलं असावं. केप्याच्या माजी सैनिकापासून मडगावच्या ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिकापर्यंत लोक फोन करत राहिले. व्हॉट्सअपवर व्यक्त होत राहिले. मजा आली.

Friday 24 March 2017

तळवलकर मला भेटले


मटात छापून आलेलं तळवलकरांचं देखणं ग्राफिक्स रेखाटन
गोव्यातलं एक आघाडीचं वर्तमानपत्र असलेल्या नवप्रभाचे संपादक परेश प्रभू यांच्यामुळे मी गोविंद तळवळकरांवर लेख लिहिला. त्या लेखात बरीच भर घालून ही पोस्ट तयार केलीय.
..........

छगन भुजबळ उपमुख्यमंत्री असताना महाराष्ट्र टाइम्समधल्या नव्या प्रथेप्रमाणे गेस्ट एडिटर होते. तेव्हा भारतकुमार राऊत मटाचे संपादक होते. एका दिवसाचं संपादकपद भूषवण्यामध्ये भुजबळांना खूपच रस होता. त्यांचं स्वागत झालं. ते संपादकांच्या केबिनमध्ये पोहोचले. खूप सन्मानाने त्यांना संपादकाच्या खुर्चीवर बसवण्यात आलं. तिथे बसताच नेहमीच्या खुशखुशीत शैलीत ते म्हणाले, ही महाराष्ट्राची नंबर दोनची खुर्ची आहे. पहिली मुख्यमंत्र्यांची. त्यावर तर मला बसता येणार नाही. या खुर्चीत तरी बसायला मिळालंय. सगळे हसले. त्याच केबिनमध्ये असणारा मीही हसलो. महाराष्ट्र राज्याचा दोन नंबरचा नेता असणारा उपमुख्यमंत्री असं म्हणत होता. गोविंदराव तळवळकरांना प्रत्यक्षात मी कधी भेटलो नाही. तसं पाहिलंही नाही. पण त्याक्षणी मला वाटलं, मला तळवळकर भेटले. या खुर्चीत ही ताकद आहे, कारण यावर सत्तावीस वर्षं तळवळकर बसले होते.

Friday 10 March 2017

दिल हैं हिंदुस्तानी


अविनाश दुधे माझा मित्र आहे, याचा मला अभिमान आहे. ताकदीने लिहिणारा. लिहिलंय त्यासाठी लढणारा. लढाईसाठी त्याग करून किंमत चुकवणारा असा आजघडीला माझ्या पिढीतला मला माहीत असणारा एकमेव संपादक. विचारांच्या बाबतीत टोक टाळणारा. तरीही स्वतःची भूमिका असणारा. त्यासाठी काहीही करायला तयार असणारा अविनाश मी जवळून बघितलाय. अनेकदा ही तात्त्विक वगैरे माणसं खूप कोरडी असतात. आमचा अविनाश तसा नाही. उलट तो आहे खूप हळवा आणि लाघवी. त्याने अफाट माणसं जोडलीत. त्याच्यावर जीव ओवाळून टाकायला तयार मित्रांचा गोतावळा खूप मोठा आहे.

टोकाच्या उजवेपणाकडून मध्याच्या डावीकडे पोहोचण्याचा त्याचा प्रवास अद्भूत आहे. तो त्याचा स्वतःचा संघर्ष आहे. पत्रकारितेत येताना विचारांच्या टोकांना असणाऱ्यांना विचारांच्या प्रवासाची संधी असते. कारण आमच्या या धंद्यात संवाद सगळ्यांशी करावाच लागतो. झापडं लावायचं निक्षून टाळायचं असेल तर विचारांचा प्रवास आनंदाने करता येतो. किंबहुना पत्रकारितेच्या मैदानात असेपर्यंत असा प्रवास सुरुच असतो. त्यासाठी स्वतःला तपासून घ्यावं लागतं सतत. बदलण्याची तयारी ठेवावी लागते. अविनाश या विचारांच्या प्रवासाचा आनंदयात्री आहे. त्याचा विचार त्याला बौद्धिकांमधून किंवा पुस्तकांमधून रेडिमेड मिळालेला नाही. तो त्याने स्वतः कमावलेला आहे. म्हणून त्याला त्याची किंमत माहीत आहे. तो त्याच्या विचारांसाठी बभ्रा न करता त्याग करू शकतो.

सुरुवात नागपूर तरुण भारत. नंतर चित्रलेखा. तिथून लोकमत. शेवटी पुण्यनगरी. हा अविनाशचा प्रवास नाही, तो त्याच्या करियरचा प्रवास आहे. पाचवीला पुजलेल्या आजारपणामुळे अमरावती सोडायची नव्हती म्हणून तो अडकून राहिला. नाहीतर आज मुंबई किंवा नागपूरला आणखी मोठ्या बॅनरमध्ये तो संपादक असता. आजवर प्रत्येक ठिकाणी त्याला लिखाणामुळे नोकरी सोडावी लागलीय. असं करावं लागणं हा एका पत्रकाराच्या लेखणीचा खूपच मोठा सन्मान असतो. अविनाशला घडवणारे संपादक ज्ञानेश महाराव यांच्यामुळे त्याचा चित्रलेखातला निरोप सुखद झाला. नियम सिद्ध करणारा हा एकमेव अपवाद सोडला तर प्रत्येक ठिकाणी तो हसत हसत सक्तीच्या राजीनाम्याचा सन्मान भोगून आलाय. आता त्याचा आणि त्याच्या करियरचा प्रवास `मीडिया वॉच`पर्यंत येऊन थांबलाय. मीडिया वॉच हे त्याचं गाजलेलं सदर. त्याच नावाचा त्याचा दिवाळी अंकही गाजला. आता गेल्याच महिन्यात त्याचं त्रैमासिक बनलंय. पहिल्याच अंकात त्याने मला विषय दिला होता, `आपण भारतीय कट्टर होत आहोत का?` मला त्यावर जे काही किडुकमिडुक वाटलं ते लिहिलंय.

Sunday 5 February 2017

आघाड्यांचा राजकारणाचा शेवट?

गोव्यात लिहिताना एक गडबड नेहमी व्हायची. विषय समजावून सांगण्याच्या नादात मांडायची मूळ गोष्ट राहूनच जायची. ते मग शेवटच्या पॅरेग्राफमधे उरायचं. आता `गोवन वार्ता`साठी लिहितानाही तसंच होतंय. पण लिहायलाच हवं. गोव्यातल्या वाचकांशी एक वेगळं नातं बनलंय. फोन करून प्रतिसाद देण्याचा त्यांचा फारसा स्वभाव नाही, तरीही.

उद्धव ठाकरेंनी मुंबई महानगरपालिकेतल्या निवडणुकीसाठी भाजपशी असलेली युती तोडली. त्याविषयी महाराष्ट्राबाहेरच्या वाचकांशी कसं बोलता येईल, याचा प्रयत्न केलाय. देशाच्या पातळीवर महापालिका आणि युतीचं महत्त्व सापडतंय का ते पाहिलंय. फारसं जमलेलं नाही. पण हात अगदीच काही रिकामा राहणार नाही. 

भाषाव्रती

यंदा जवळ असूनही साहित्य संमेलनाला गेलो नाही. जायला हवं होतं. निदान पुस्तकं विकत घ्यायला तरी. त्यातल्या त्यात साहित्य संमेलनाशी संबंध उरला तो एका लेखापुरता. ग्रंथालीचं रूची नावाचं मासिक आहे. प्रल्हाद जाधवांनी त्याचा मराठी भाषा विशेषांक संपादित केलाय. त्यात माझा छोटा लेख आहे, यास्मिन शेखांवरचा.

यास्मिन शेखांचा हिरव्या रंगाचा `मराठी शब्दलेखनकोश` मी भरपूर वापरलाय. कितीतरी जणांना विकत घ्यायला लावलाय. आता त्याच्या विस्तारित आवृत्त्याही येऊन संपल्यात. मराठी भाषा विकास संस्थेची `मराठी लेखन मार्गदर्शिका`ही तशीच मोलाची. लिहिणाऱ्या हातांनी ही दोन्ही पुस्तकं नेहमी हाताशी ठेवावीत अशीच. आजवर लिहिताना या दोन पुस्तकांनी खूप आधार दिला. हा लेख त्यासाठीचीच कृतज्ञता आहे.

कपड्यांची संस्कृती, संस्कृतीचे कपडे

आज रविवार ५ फेब्रुवारीच्या टाइम्स ऑफ इंडिया मधे मालिनी अय्यर यांचा लेख वाचला, व्हाय ब्रा पँटीज आर नॉट बॉम्ब्ज? महाराष्ट्र टाइम्समधे स्पृहा जोशीने फेसबूकवर अपलोड केलेल्या बोल्ड फोटोची बातमी वाचली. म्हटलं लिहिलेला लेख ब्लॉगवर टाकण्याचं सत्कृत्य आज करायलाच हवं. एसएनडीटी युनिवर्सिटीतल्या मुलींसाठी ड्रेस कोडचा फतवा निघाला. त्यावर लिहिलेला लेख गेल्या रविवारी दिव्य मराठीच्या अघळपघळ कॉलमात छापून आला होता. त्याचा मथळा होता, संकुचितांची बोंबाबोंब.

Friday 27 January 2017

मजबुरी का नाम नरेंद्र मोदी


गोव्यातली तीन वर्षं मजेतच गेली. नवे मित्र भेटले. खूप नवं समजून घेता आलं. खूप नवं शिकता आलं. तिथल्यासाठी लिहिताना शैलीही मुळातून बदलावी लागली होती. एकतर आक्रमकता आवरायला लागली. तसा गोव्याचा स्वभावच नाही. मी ज्या पेपरचा संपादक होतो, त्या गोवादूतचा स्वभावही माझ्या आजवरच्या लिखाणापेक्षा वेगळा होता. मुंबईत लिहिताना वाचक अगदी ओळखीचा होता. गोव्यात तसं नव्हतं. विषय समजावून सांगण्यातच लेखाची शब्दसंख्या संपून जायची. भूमिका कशीबशी शेवटच्या पॅराग्राफमधे मांडावी लागायची. शिवाय नियमित अग्रलेख लिहिणं थकवणारंच होतं. आमचे कार्यकारी संपादक सुनील डोळे यांनी त्याचा भार फार येऊ दिला नाही. तरीही अनेकदा माहीत नसलेल्या विषयांवरही लिहावं लागायचं. पर्याय नव्हता.

मोर्चा निघावा शूद्रत्वाच्या सन्मानासाठी


मला आलेला मेल. १५ जानेवारीची सकाळ.

परब,
तुमचा लेख वाचला आणि जाणवलं की तुमच्यासारख्या छुपा जातीयवादी माणसाचा जो तर-फडा होत आहे तोच ह्या मोर्चाच्या आयोजनाचा फायदा आहे.
अरे किती दिवस तुम्ही लोक मराठा समाजाला तुमचा गुलाम समजणार?
तो मोदी स्वतः गांधीची जागा घेत आहे तिथे लिहा ना लेख, गोडसेच्या औलादीकडून आम्हांला तत्वज्ञानांची आवश्यकता नाही.
आम्ही दिव्य मराठी पेपर विकत घेवून वाचतो. जरी आज ब्राह्मण पत्रकार 98 टक्के मीडियामध्ये आहे म्हणून आम्ही तुम्हाला फॉलो करणार नाही. जरा व्यावसायिकता जपा आणि लोकांना खोट्या भाकडकथा सांगून पोट भरायचे धंदे बंद करा.
एक मराठा लाख मराठा

Friday 6 January 2017

१ जानेवारी १८१८

श्रीरंगजी म्हणतात पत्रकारितेतले अनेकजण मधूनच कोमात जातात. म्हणजे ते मेन स्ट्रीममधे दिसत नाहीत. आर्थिक गणित बिघडलेलं असतं. समोर दिशा कळत नाही. कुछ जमता नही. सप्टेंबरच्या आसपास रिंगणचं काम संपल्यानंतर मीपण तसा कोमातच जमा होतो.

माझं श्रीरंगजींना म्हणणं असतं आपण अधूनमधून कोमात असणारच. तेव्हाही आपण नाचतच राहायला हवं, शुद्धीवर असताना नाचतो तसेच. सगळं सुरळीत असताना कोमा स्वतःहून ओढावून घ्यायची खाज असेल तर असं पॉझिटिव राहण्याशिवाय गत्यंतरही नसतं. तरीही कधीतरी निराशा येऊनच जाते. १६च्या शेवटचे चारपाच दिवस तसे होते. पण नव्या वर्षात सगळी जळमटं फेकली गेली. हॅपी न्यू इयर.