Friday 28 April 2017

हॅपी बर्थडे एसपी

वी वी पी शर्मा सर भेटले की मजा येते. भय्या आडनावाचा तेलुगू माणूस. नखशिखांत पत्रकार. प्रचंड अनुभव. बारीक अभ्यास. खूप ओळखी. तरीही कायम जमिनीवर. प्रेमात पडावी अशी पत्रकाराला शोभेशी बेपर्वाई. हे कमी म्हणून भरदार मिशा आणि पोरासारखी माया करणारा स्वभाव. ईटीव्हीत असताना गुजरातचा भूकंप कवर करायला गेलो तेव्हा पहिल्यांदा भेटलो. ते होते म्हणून दिल्लीला गेलो. टीवीकडे, पत्रकारितेकडे बघायची नजर घडली.

सर दिल्लीत सीएनएन आयबीएनमध्ये कोणत्या तरी पदावर आहेत. ते मुंबईत येतात कारण त्यांच्या पत्नी `द हिंदू`च्या मुंबई एडिशनमधे आहेत. सर मुंबईत आले की फोन करतात. तिखटजाळ नॉनवेज कुठे मिळेल, हे मी शोधून ठेवलेलं असतं. तिथे आमचा मोर्चा वळतो. यावेळेस फॉर अ चेंज, आम्ही त्यांच्या घरी भेटलो. चर्चगेटला कस्तुरी बिल्डिंगमधे हिंदूचं ऑफिस आहे आणि गच्चीवर कंपनीने मॅडमना दिलेलं घर. सोबत सरांनी त्यांच्या स्पेशल मसाल्यांनी बनवलेलं चिकन आणि गप्पा. सर बोलत असतील की सगळं पटलं नाही तरी ऐकत राहावंसं वाटतं.

शर्मा सर सांगत होते. टाइम्सच्या जर्नालिझम स्कूलमधे ते पंचवीसेक जण शिकत होते. सगळ्या पोरांना टाइम्सने मौसम विहारमधे एक दोन मोठे फ्लॅट दिले होते. तिथे शेजारच्या कंपाऊंडमध्ये एक दाढीवाला बायको आणि भावासोबत राहायचा. पण या शिकाऊ पत्रकार पोरांबरोबर पोर बनून राहायचा. एकत्र दारू प्यायचा. मस्तमौला मजा करायचा.

कोर्स संपला. इंटरव्यू दिला की टाइम्समधे चिटकता येणार होतं. फ्लॅटमधे पाणी आलं नव्हतं. एरवी आंघोळ केली नसती तरी चाललं असतं. इंटरव्यूला तरी आंघोळ करून जाणं भाग होतं. शेजारचा दाढीवाला बादल्या भरून भिंतीपलीकडे देत होता. मुलाखती सुरू झाल्या. पहिली मुलगी मुलाखतीसाठी गेली. पुतळा बनून बाहेर आली. तेच एकामागून एक सगळ्यांचं होत गेलं. शर्मा सरांना नंबर आला. आत जाऊन बघतात. तर समीर जैनच्या बाजूला तोच शेजारच्या भिंतीपल्याडचा दाढीवाला सूटबुटात बसलेला. एस. पी. सिंग. सुरेंद्र प्रताप सिंग. नवभारत टाइम्सचे कार्यकारी संपादक.

एसपींचं नाव काढलं की जुनी माणसं असे अफलातून अनुभव सांगतात. `शिला पर आखिरी अभिलेख` या निर्मलेंदू यांनी संपादित केलेल्या पुस्तकात अशा अनुभवांची रेलचेल आहे. २००० वगैरे साली ईटीवीत असताना संजय निरुपम यांच्या मालाडमधल्या घरी बाइट घ्यायला गेलो होतो. त्यांच्या कपाटात या पुस्तकाच्या दोन प्रती होत्या. नेमकं आठवत नाही, काय झालं होतं. मी एसपींविषयी काही विचारलं होतं की इतर काही. निरुपमांनी पुस्तकाची एक प्रत दिली मला. त्या पुस्तकाने, एसपींनी मला वेड लावलं. कितीदातरी वाचलंय ते उल्टंसुल्टं. दिल्लीत आम्ही रूममेट असताना प्रमोद चुंचूवारने वाचलं ते पुस्तक. तो म्हणाला, या पुस्तकाचा खूप प्रभाव आहे तुझ्यावर. मी म्हटलं, अरे हो, खरंच!

थँक्यू एसपी. कॉलेजमधे असताना तुम्हाला आज तक वर पाहायचो.
आणि हॅपी बड्डे एसपी.
एसपी तुम्ही असता तर आज २८ एप्रिलला ७० वर्षांचे असता. तुम्ही असता तर तुम्हाला भेटलो नक्की असतो. आता तुम्ही नाही. तुमच्यावर गेल्या रविवारी दिव्य मराठीच्या रसिक पुरवणीत लेख लिहिलाय. तो सोबत जोडलाय थोडा बदल करून. 

शिवाय एसपींसोबत काम केलेल्या राजेश बादल यांनी राज्यसभा टीवीसाठी केलेला एका शोची लिंकदेखील लेखात आहे. बघा जमल्यास. 

Saturday 15 April 2017

दर्द मिल सके तो ले उधार

द हिंदू वाचणाऱ्या सगळ्यांना प्रकाश कामत हे नाव ओळखीचं आहे. हिंदूमध्ये गोव्यातल्या अभ्यासपूर्ण बातम्या वाचणं, हे गोव्याचं वर्तमान समजून घेण्याचा उत्तम रस्ता आहे. त्यांनी काल एका व्हॉट्सअप ग्रुपवर मेसेज शेअर केला. तो माझा एक मोठा सन्मान असल्याचं मला वाटलं. थँक्स प्रकाशजी. तो मेसेज असा होता...

`कालच्या (१३एप्रिल)च्या दै. गोवन वार्तातील सतीश वरील दैनिक गोवादूतचे माजी संपादक ह्यांचा लेख आपण सतीशच्या मार्गदर्शनाखाली घडलो अशं वाटणाऱ्या प्रत्येकाने काळजीपूर्वक वाचावा. पत्रकारिता करताना पत्रकाराची सामाजिक बांधिलकी जपणारे, आपल्या पत्रकारितेवर विश्वास असणारे आत्मविश्वासी तरुण संपादक सचिन हे नम्र व्यक्तिमत्त्व पण कमिटेड पत्रकार. सच्चा सामाजिक कार्यकर्ता आणि सामाजिक कार्याचा आव आणणारे प्रसिद्धीलोलूप माणसं हाडाचे पत्रकार/संपादक कशी ओळखतात, ते या लेखातून समजेल. सतीश मागे ठेऊन गेलेल्या फौजेमधील प्रत्येकाने हा लेख शब्दानशब्द वाचावा आणि मार्गदर्शक मानावा.
सचिन, एक गंमत उघड करतो. आपल्या त्या भाषणास मी खाली उपस्थित होतो. दुसऱ्या दिवशी सतीश नेहमीच्याच मॅच्युरिटीने हसत म्हणाला. `सचिन एवढा आक्रमक का बोलला?` `सिंपल, ही इज अ कमिटेड जर्नालिस्ट. हिज प्रोफेशन वॉज अटॅक्टड आक्रमकपणे. ही डिफेंडेड इट आक्रमकपणे.` सतीश दिलखुलास हसला. पण संवेदनशीलपणे म्हणाला. ताणे पर्सनल घेवना न्ही?... तो असो न्हीच, हाव म्हळे.

कन्स्ट्रक्टिव कमिटेड सोशल वर्क अन् कन्स्ट्रक्टिव कमिटेड पत्रकारितेतील ती एक छोटीशी नोंक झोंक. तुम्ही तुमचे काम करा. आम्ही आमचे करतो, असं समजावणारी. व्हेरी व्हेरी हेल्दी.`

Friday 14 April 2017

धर्म जागो कबीराचा

पंढरपूरच्या कबीर मठातली ही कबीरांची समाधी
आज १४ एप्रिल. बाबासाहेबांची जयंती. हा दिवस आमच्या वाडीत मोठ्या उत्साहात साजरा होताना लहानपणापासून बघतोय. घोषणा देत निघणारी प्रभातफेरी. कव्वाली आणि भीमगीतांचा जलसा. बुद्धविहारापासून मेन रोडपर्यंतची लायटिंग आणि कमानी. चौकात बाबासाहेबांचा मोठा फोटो. यंदाही आमची वाडी सजलीय. बाबासाहेबांच्या मोठ्या फोटोखाली आणखी चार फोटो आहेत. बुद्ध, कबीर, शिवराय आणि फुले. बाबासाहेबांना कबीर, शिवराय आणि फुले यांच्यापासून तोडण्याचं षडयंत्र एकीकडे सुरू असताना, आमच्या वाडीत समावेशकतेचे विचार अजून शाबूत असल्याचं बघून बरं वाटलं.

बाबासाहेब जन्मले कबीरपंथी घरात. संत कबीराच्या संप्रदायाचा आजही प्रभाव असलेल्या परिसरात त्यांचा जन्म झालाय. त्यांचे वडील कबीराचे दोहे गायचे. बाबासाहेबांनी कबीरांना आपलं गुरू मानलंय, हे सगळ्यांनाच माहीत आहे. कबीरांचा हा प्रभाव फक्त बाबासाहेबांवरचा नाही तर तुकोबा ते जोतिबा या महाराष्ट्रीय क्रांतिकारकांवरही त्यांचा तितकाच प्रभाव आहे. पण हे फक्त एकतर्फी नाही. तर कबीरांवरही महाराष्ट्राचा त्यातही संत नामदेवांचा पक्का प्रभाव असल्याचं सहज आढळून येतं.

Sunday 9 April 2017

कार्यकर्ता आहे तरी कुठे?

विषय चुकवून चालत नाही आणि तसा वेळ मात्र नसतो, असं सदराचे लेख लिहिताना अनेकदा होतं. मागेही असंच झालं महानगरपालिका आणि जिल्हापरिषदांचे निकाल गुरूवारी लागणार होते. रविवारच्या पुरवणीत छापून येणारा लेख बुधवारीच द्यायचा होता. लिहायचं तर निकालांवरच होतं, पण निकाल माहीत नव्हते. अगदीच काही सूचत नव्हतं. टीव्ही लावला. झी २४ तासवर चर्चा सुरू होती. त्यात औऱंगाबाद लोकसत्ताचे सुहास सरदेशमुख होते. ते उस्मानाबादमधे होते तेव्हापासूनच मित्र. छान बोलत होते कार्यकर्त्यांच्या फरफटीविषयी. लेखाला विषय मिळाला.

यावेळेस महानगरपालिका निवडणुकांत एका उमेदवाराला चार वॉर्डात निवडणूक लढवावी लागत होती. त्यामुळे एकेका वॉर्डपुरती निवडणूक लढवणारे छोटे कार्यकर्ते स्पर्धेतूनच बाद झाले. हे लक्षात आल्यावर लिंक लागली. पण हाच मुद्दा लेखात मांडायचा राहून गेला. रात्री उशिरा बसून लेख लिहिला. दुसऱ्या दिवशी सकाळी साम टीव्हीवर निवडणूक निकालांवर चर्चेसाठी होतो. चर्चा सुरू असतानाच दिव्य मराठीचे पुरवणी संपादक शेखर देशमखांचा मिस कॉल येऊन पडला होता. ब्रेकमध्ये त्यांना फोन केला. लेख त्यांना आवडला होता. जीव भांड्यात पडला. दिव्य मराठीत लेख छापून आल्यावर कुठच्या कुठच्या कार्यकर्त्यांचे फोन आले. आमच्या मनातलंच मांडलंत, असं ते सांगत होते.

निवडणुकांचा नवा फॉर्म्युला

ट्रॉम्बेतल्या दंग्याचा बळी ठरलेली पोलिस वॅन 
चुकत नसेन तर १६ मार्चच्या रविवारी हा लेख दिव्य मराठीच्या रसिक पुरवणीत छापून आला होता. त्याच्या आदल्याच रविवारी ट्रॉम्बेमध्ये छोटा दंगा झाला होता. फेसबूकवरच्या पोस्टमुळे दीडदोनशे जणांच्या जमावाने पोलिस स्टेशनावर हल्ला केला होता. मला एकदम धक्का बसला. हे छोटे दंगे मोठ्या दंगलींपेक्षाही भयानक असतात. त्यातले स्थानिक संदर्भ रुतून बसतात आणि जातीधर्मावरून दीर्घकाळ विष भिनत जातं. ही सारी निरीक्षणं सविस्तर नोंदवणारा हा लेख. बघा पटतोय का?
...

गाहे तव जय गाथा

लोकलमधे गर्दी असते. 
उभ्या असलेल्या एकाच्या मोबाइलवर `जन गण मन` वाजायला लागतं. 
जवळच बसलेला राष्ट्रगीताला मान द्यायचा म्हणून उभा राहतो. 
चटकन तो मोबाईलवाला त्याच्या जागेवर बसतो. 
जागा गेलेला म्हणतो. `अरे ये तो मोदी से भी चालू निकला`.
असा एक मस्त जोक वॉट्सअपवर फिरत होता. तो आठवायचं कारण माझा एक लेख. यावर्षी वॅलंटाइन डे ला सुप्रीम कोर्टाचा एक निकाल आला. त्यात त्यांनी सिनेमाचा भाग म्हणून राष्ट्रगीत आलं तर उभं राहणं बंधनकारक नसल्याचा निर्वाळा दिला होता. तेव्हा एक लेख `गोवन वार्ता` या गोव्यातल्या पेपरात लिहिला होता. उशीर झालाय. निमित्त हरवलंय. पण कालच एका मित्राशी बोलताना हा लेख आठवला. पुन्हा वाचला. मजा आली. म्हटलं तो ब्लॉगवर टाकायला हवा. म्हणून टाकतोय. नेहमीसारखा कटपेस्ट.
...

सुरेल संचित `पुरुषार्था`चं

द हिंदूचे कार्टूनिस्ट केशव यांनी चितारलेली ही किशोरीताईंची मैफल 
पाकिस्तानात सुफी दर्ग्यांवर होत असलेल्या हल्ल्यांविषयी लिहायचं होतं खरं तर. पण किशोरीताई गेल्या आणि म्हटलं लिहायचंच. त्यांच्या गाण्याबद्दल मी काही लिहू शकत नाही. या निमित्ताने एकेकाळी देवदासी समाज म्हणून ओळखला जाणाऱ्या गोमंतक मराठा समाजाच्या संघर्षाविषयी लिहायला घेतलं. वामन राधाकृष्ण यांनी या विषयावर लिहिलेलं पुरुषार्थ हे पुस्तक शोधत होतो. ते सापडलंच नाही. त्यामुळे लेख लिहायला उशीर लागला. अनेक हवे ते संदर्भ त्यात होते. त्यामुळे बहुतांशी स्मरणशक्तीवर अवलंबून राहावं लागलं. पराग परबांचं पुस्तक ऐनवेळेस हाताशी आलं. त्याचा फायदा झाला. बरेच दिवस लिहायचं होतं. लिहिलं, पण अजून समाधान नाही झालंय. खरं तर स्वतंत्र पुस्तक होईल, इतका मोठा हा संघर्ष आहे. कुणीतरी ते सविस्तर लिहायला हवं.

कलावंताची जात बघायची असते का? आणि किशोरीताईंसारख्या या सगळ्याच्या पलीकडे गेलेल्या कलाकाराच्या जातीविषयी चर्चा करणं कितपत योग्य आहे?  या प्रश्नांमागची भावना अभिनंदनीयच आहे. त्याचा सन्मान करायलाच हवा. पण दुर्दैवाने आपल्याकडे सामाजिक पार्श्वभूमी समजली तरच कलावंतांच्या साधनेचं मोल अधिक समजून घेता येतं. म्हणून ती पार्श्वभूमी सरळ मांडायला हवी. त्याचीही चर्चा व्हायला हवी. भारतरत्न एम एस सुब्बलक्ष्मी आणि लता मंगेशकर यांच्या संघर्षाकडेही या दृष्टीने पाहायला हवं.

गोव्यात `आप` का हरली?

गोवन वार्तामध्ये भाजपविषय़ी लेख लिहिला तेव्हाच खरं तर आपविषयी लिहायचं होतं. गोव्याच्या राजकारणाचा मूळ पिंड हा बहुजनवादाचा आहे. जमिनीसह सर्व समृद्धीची साधनं हातात असणारे उच्चवर्णीय आणि त्यामुळे गुलामीच्या गर्तेत पिळून निघणारे बहुजन हे गोव्याच्या ताज्या इतिहासाचा भाग असलेलं समाजवास्तव आता नाही. परिस्थिती बदलली, पिढ्या गेल्या तरी त्याचा पीळ अद्याप गेलेला नाही. फक्त हिंदूंमधेच नाही तर ख्रिश्चनांमधेही ही विभागणी आहे.

इंटरनॅशनल हायफाय रॅपरमधे गुंडाळलेल्या गोव्यात जात सहसा दिसत नाही. पर्यटकांना तर ती दिसण्याची शक्यताच नाही. माझं निरीक्षण आहे की महाराष्ट्रापेक्षाही गोव्याच्या राजकारण, समाजकारणात जात जास्त आहे. हे मी गोव्यात असताना अनेकदा गप्पांत मांडलंय. पण ते कुणाही गोंयकार मित्राला आवडत नाही. धर्माच्या झगड्यात जातीचे संघर्ष लपून राहतात. तसं काहीसं गोव्यात झालंय.

पर्रीकरांच्या पराभवाची प्रश्नचिन्ह

मी गोव्यात तीन वर्षं काम केलं. गोवेकर वाचक भेटल्यावर भरभरून बोलतो. पण फोन करून बोलणं त्याला फारसं रूचत नसावं, असा माझा अनुभव. पण १६ मार्चला माझ्या गोवन वार्ता पेपरातल्या पाक्षिक कॉलमाने माझा आजवरचा अनुभव खोटा ठरवला. तो मनोहर पर्रीकरांच्या शपथविधीचा दिवस होता. त्यांनी संरक्षणमंत्रीपद सोडून गोव्यासारख्या छोट्या राज्याचा मुख्यमंत्री बनणं, याचा मला खरंच राग आला होता. त्या रागाच्या तिडकीतच लेख उतरला.

तो राग माझ्या एकट्याचा नव्हता. सगळ्या गोव्याचाच राग होता तो. हा लेख सोशल मीडियावर प्रचंड फिरला. मी चार गोव्यातल्या चार ग्रुपचा मेंबर आहे. त्यातच तो पुन्हा पुन्हा शेअर होत राहिला. लोकांच्या मनातलं या लेखात होतं जणू. विशेषतः त्यातला भाजपवरच्या बहुजनांच्या रोषाचं विश्लेषण लोकांचा आवडलं असावं. केप्याच्या माजी सैनिकापासून मडगावच्या ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिकापर्यंत लोक फोन करत राहिले. व्हॉट्सअपवर व्यक्त होत राहिले. मजा आली.