Tuesday 26 July 2011

दिवस वाढदिवसांचे


वसुंधराराजे शिंदे राजस्थानच्या मुख्यमंत्री असताना एका देवीच्या चेह-यात त्यांचा चेहरा टाकून पूजा झाली होती. त्यावरून मोठं वादळ उठलं होतं. त्याला टाइम्स ऑफ इंडियाने एक मस्त शब्द वापरला होता. फोटोशॉप पॉलिटिक्स. हे फोटोशॉप पॉलिटिक्स खरं तर आपल्या नाक्यानाक्यावर आहे. होर्डिंग आणि पोस्टरच्या रुपानं. सध्या मुंबईत महापालिका निवडणुका जवळ आल्या आहेत. पोस्टर बघून कोणत्या वॉर्डात कोण इच्छुक आहेत, याचा अंदाज मिळू शकतो. 

तसंच वाढदिवसांचंही. वाढदिवसांचा धुरळा बघून कोणत्या नेत्याची चलती आहे, याचा अंदाज येतो. उद्या उद्धव ठाकरेंचा वाढदिवस आहे आणि चार दिवसांपूर्वी. यावर्षी बॉम्बस्फोटांमुळे होर्डिंग पोस्टर लागले नाहीत. पण गेल्यावर्षी अजितदादांच्या वाढदिवसाचा मोठा दणका उडाला होता. तेव्हा ही उपमुख्यमंत्रीपदाची तयारी असल्याचा लेख मी नवशक्तीत लिहिला होता. ते काही महिन्यांतच खरं ठरलं. आदर्श प्रकरणी अशोक चव्हाणांची विकेट पडली. पृथ्वीराज आले आणि त्यांच्याबरोबर अजितदादाही. जवळपास वर्षापूर्वी लिहिलेला लेख इथे कटपेस्ट करतोय. 

Sunday 24 July 2011

आयडियल इंटरनॅशनल २०११


शिकागो बीएमएम कन्वेंशन विशेषांक

भारताबाहेर पसरलेली मराठी माणसं सध्या शिकागोत जमलीत. २१ ते २३ जुलैदरम्यान तिथे बृहन्महाराष्ट्र मंडळाचं अधिवेशन म्हणजे बीएमएम कन्वेंशन सुरू आहे. जगभरातल्या मराठी कर्तृत्वाचे आजच्या बदलणा-या महाराष्ट्राशी सूर जुळावेत या हेतूने दादरच्या आयडियल पुस्तक त्रिवेणीच्या मंदार नेरूरकर यांनी आयडियल इंटरनॅशनल २०११ या विशेषांकाची निर्मिती केलीय. मी त्याची सगळी संपादकीय जबाबदारी घेतली होती.

भारताबाहेरच्या मराठी माणसांपर्यंत शक्यतो न पोहोचणारे विषय,  माणसं आणि लेखक यात आहेत. अंक खूप चांगला झालाय. तुम्हाला सगळ्यांना आवडेल अशी अपेक्षा आहे. शिकागो कन्वेशनमधे ग्रंथालीच्या स्टॉलवर हा अंक विनामूल्य उपलब्ध आहे. त्यातल्या लेखांची ही यादी.

Saturday 23 July 2011

टिळक, माय फादर


माझी जीवनगाथा या आत्मचरित्रातून मला प्रबोधनकार भेटले. मला एक खजिनाच भेटला. त्यात प्रबोधनकारांनी आपल्या अनेक दोस्तांचीही गाठ घालून दिलीय. श्रीधरपंत टिळकही त्यातलेच एक. लोकमान्यांचा हा बंडखोर मुलगा अवघ्या वयाच्या बत्तिसाव्या वर्षी ट्रेनखाली आत्महत्या करतो, हे वाचून धक्का बसला. यात वैचारिक, भावनिक मोठाच संघर्ष. पण कधी त्यावर कुणी कादंबरी लिहिली नाही, कधी कुणी नाटक लिहिलं नाही. का?

मटाच्या वेबसाईटमधे आम्ही सगळ्यांनी बहुदा १ ऑगस्ट २००७ ग्लोबल टिळक हे सेग्मेंट केलं होतं. तेव्हा हरिलाल गांधींवरच्या गांधी, माय फादर नावाचा सिनेमा येऊ घातला होता. त्या धर्तीवर आम्ही श्रीधरपंतांविषयी टिळक, माय फादर या नावाने काही लेख मांडले होते. त्याला जोरदार रिस्पॉन्स मिळाला. त्यात मी श्रीधरपंतांची ओळख करून देणारा लेख लिहिला होता. 'ओळख सिंहाच्या छाव्याची'. तो कटपेस्ट करतोय. आज टिळकांची जयंती आहे. त्यानिमित्त.

Thursday 21 July 2011

विनोद कांबळीची जात


कुठे कार्यक्रमाला गेलं की ओळखीचे भेटतात. मग ते ओळखीचे त्यांच्या ओळखीच्यांशी ओळख करून देतात. मग समोरचे सांगतात, मी वाचलंय तुमचं. आता ब्लॉग, फेसबुकामुळे सगळ्यांची आठवण लगेच जुळते. त्यांना आठवणा-या लेखात गुढीपाडव्यावरचा आणि माधुरीवरचा लेख असतात. आता नेटवर आणि पेपरात सगळीकडेच फोटो असतो. पण आधी तुम्ही तर खूपच तरुण आहात, ही प्रतिक्रिया नेहमी असायची. अशा भेटणा-यात पत्रकारिता, समाजकारणाशी संबंध नसलेल्या नोकरपेशा माणसं आजही अँड्यात्म या कॉलमाची आठवण काढतात. त्यासोबत हगण्यावरचा लेख हसत हसत सांगितला जातो. त्यात कुणी पत्रकारितेतलं असेल तर मग कणकवलीतलं रिपोर्टिंग नाहीतर राज ठाकरेंवरचं लिखाण आठवतं. आणि चळवळीतल असेल तर मग एक लेख वारंवार आठवणीने सांगितला जातो, तो विनोद कांबळीवरचा.

सच का सामना या वादग्रस्त टीव्ही रिऍलिटी शो मधे तेव्हा विनोद कांबळी आला होता. आपल्यावर जातीमुळे अन्याय झालाय, असं त्याने म्हटलं होतं. माझ्या विंडो सीट नावाच्या कॉलमात मी त्यावर लेख लिहिला होता, जेंटलमेन्स गेम नावाचा. कांबळी हे आडनाव भंडा-यांमधलं, मग त्यासाठी विनोद नक्की दलित ना, याचा शोध सर्वात आधी घ्यावा लागला. ज्येष्ठ क्रीडापत्रकार शरद कद्रेकरांनी ते कन्फर्म केलं. मग आतापर्यंत कोण कोण दलित भारतीय संघातून कसोटीपटू झालेत त्याचा शोध घ्यायचा होता. या अंगाने बोरिया मुजुमदारांचं थोडं फार वाचलं होतं. म्हणून त्यांचा ईमेल आयडी शोधून काढला. मेल केला. त्यांचा लगेच रिस्पॉन्स आला. आजवर विनोद आणि डो़डा गणेश हे दोनच दलित कसोटीपटू झालेत, हे त्यांनी सांगितलं. त्यांची मेलमधे हिंदू दलित अशा शब्द वापरला होता. त्याचा अर्थ नंतर कळला कारण ख्रिश्चन दलितांपैकी चंदू बोर्डे आणि विजय हजारे यांनी भारतीय क्रिकेटवर आपला ठसा उमटवलाय. आमदार कपिल पाटील यांनी ही माहिती नंतर दिली.

Tuesday 19 July 2011

बहुजनवाद म्हणजे ब्राम्हणांना शिव्या देणं नाही

२० ते २२ मे रोजी पुणे शहराजवळ वाघोलीत बहुजन संत साहित्य संमेलन होतं. आश्चर्याची गोष्ट म्हणजे मला त्याचं वक्ता म्हणून निमंत्रण होतं. २१ तारखेला शनिवारी सकाळी प्रसारमाध्यमांतील बहुजन संत साहित्याची स्थिती या विषयावरच्या परिसंवादात मला बोलायचं होतं. विषय आवडीचा होताच. पण त्यावर बोलायचं म्हणून थोडा अभ्यास करावा म्हणून दुकानांत पुस्तकं बघायला गेलो. तर संत आणि बहुजनवाद या विषयावरची पुस्तकं मिळाली ती संभाजी ब्रिगेड, मराठा महासंघ, बामसेफ याचीच. त्यात एककल्लीपणा तर होताच पण द्वेष ठासून भरलेला होता. संत आणि द्वेष एकत्र? ते पटण्यासारखंच नव्हतं. टाळकंच फिरलं.

त्या फिरलेल्या टाळक्यानेच भाषणाला गेलो. जे पटतं ते बोलावं. मनात पाप नाही तर लपवाछपवी कशाला? म्हणून जे काही वाटत होतं ते थोडं स्पष्टच बोललो. मी काही पट्टीचा भाषण करणारा नाही. जसं आपण रोज बोलतो. तसंच लिहावं आणि सभेतही बोलावं असं मला वाटतं. भाषण चांगलं झालं म्हणे. तिथल्या श्रोत्यांनी जोरदार कौतूक केलं. व्यासपीठावर माझ्यासह हरी नरके, सांगलीचे डॉ. बाबूराव गुरव, गुजरातचे जयंतीभाई होते. सगळ्यांनी कौतूक केलं. नरके सरांचं भाषण माझ्यानंतर झालं. त्यात त्यांनी माझा उल्लेख तरुण विचारवंत असा केला. बरं वाटलं.

भाषण सुरू असताना एक गंमत होत होती. प्रेक्षकांमधले एक मान्यवर मला सतत थांबवून प्रश्न विचारत होते. मी ब्राम्हण आहे आणि ब्राम्हणांची बाजू घेतो आहे, असा त्यांच्या प्रश्नाचा रोख होता. ते विदर्भाकडचे होते. त्यामुळे परब म्हणजे मराठा हे मुंबई कोकणात स्पष्ट असणारं समीकरण त्यांना माहीत नव्हतंच. या सगळ्याची खूप गंमत वाटली. आपण मोठ्या शहरात जन्मलो आणि जातीचे संस्कार आपल्यावर झाले नाहीत, हे केवढं मोठं नशीब असं वाटलं.

Monday 18 July 2011

गुरुदक्षिणा ऑनलाईन

मलाही आजकाल गुरुपौर्णिमेचे एसेमेस येतात. काहीजण फोन करतात. मी काही वर्ष पत्रकारिता शिकवतोय. त्याचे विद्यार्थी त्यात बहुसंख्येने असतात. पण इतरही काही माझे थोडे ज्युनियर मित्रही असतात. आश्चर्यच वाटतं. थोडा इगो सुखावलाही जातो. पण ते मनावर घेण्याचा काही प्रश्नच नसतो. कारण कोणी आपल्याला गुरू म्हणावं इतके आपण मोठे नाही, हे मला माझ्यासाठी सूर्यप्रकाशाहून क्लिअर आहे.

गुरूकडे बघायचे दोन दृष्टिकोन मला वाटतात. एक जीवनाला दिशा देणारा तो गुरू. उगाच सगळ्यांना गुरू म्हणून नये. पण दुसरीकडे दत्तात्रेयांसारखे चोवीस गुरू असण्याचा उदार दृष्टिकोनही आहेच. मी ज्यांच्याकडून काहीन्काही शिकतो. ते कृतज्ञतापूर्वक माझे गुरूच असतात. कृतज्ञतेत कृपणता कशाला. मला वाटतं दोन्ही दृष्टिकोन महत्त्वाचे वाटतात. वाटल्यास त्यांना मोठे गुरू आणि छोटे गुरू म्हणू. पण ते सगळे गुरूच.

याच गुरुपौर्णिमेच्या दिवशी भगवान गौतम बुद्धांनी ज्ञानप्राप्ती झाल्यानंतर पंचवर्गीय भिक्खूंना पहिलं प्रवचन दिलं होतं. तोच धम्मचक्रप्रवर्तनदिन आपण हजारो वर्ष गुरुपौर्णिमा म्हणून साजरी करतोय. आद्य शंकराचार्यांच्या प्रभावामुळे अनेक बौद्ध परंपरांना वैदिक रूप मिळालं. त्यात ही व्यासपौर्णिमाही होती. आता यावर अनेक मतं मतांतरं असू शकतील. पण मला इथे भांडावसं वाटत नाही. कोळणीच्या घरी जन्माला येऊन वेदांना शिस्त लावणारे महर्षि वेदव्यासही मला पूज्यच. भगवान बुद्धही आणि आद्य शंकराचार्यही. अशा जगाला वळण लावणा-यांची आठवण काढण्याचा दिवस म्हणून गुरुपौर्णिमा साजरी करायला हवी. त्याच भूमिकेतून या गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने साने गुरुजी आणि त्यांच्यावरच्या वेबसाईटवर लिहिलंय. मूळ लेख इथे कटपेस्ट.

Thursday 7 July 2011

वाचायलाच हवं असं ‘आकलन’

माझे ज्येष्ठ मित्र अमर हबीब यांचं नवं पुस्तक आलंय. आकलन हा त्यांचा लेखसंग्रह आहे. त्याच्याविषयी नवशक्ति तसंच कृषीवल इथल्या दोन्ही कॉलमांमधे लिहिलंय. हे पुस्तक तुमच्यापर्यंत सहज पोहचू शकतं. अमरजींनी त्यांच्या पुस्तकांसाठी एक अफलातून विक्रीतंत्र विकसित केलंय. आपण ९४२२९३१९८६ या मोबाईलवर किंवा habib.amar@gmail.com या ईमेलवर स्वतःचा पत्ता कळवायचा. पुस्तक त्या पत्त्यावर कुरियर केलं जातं. आणि पुस्तक आवडलं तरच पैसे पाठवायचे. असं करणा-यांना डिस्काऊंटही आहे. दीडशे रुपयांचं पुस्तक फक्त शंभर रुपयांत. कृषीवलमधल्या प्रीझम या कॉलमातला लेख इथे कटपेस्ट.

Monday 4 July 2011

उद्धवस्त ढिगा-याखाली


परवा सुनील पवार भेटायला ऑफिसात आला होता. आम्ही एकमेकांना ओळखतो त्याला बारा तरी वर्षं झाली. तेव्हा तो सी न्यूजमधे आमच्या बरोबर कॅमेरा अटेण्डण्ट होता. पुढे ई टीव्हीतही एकत्र होतो. आता तो आयबीएन लोकमतमधे कॅमेरामन बनलाय. सुनील एवढुसा. त्यात बारीक. आवाजही तसाच बारका. पण जीवाला जीव लावणारा जिवाभावाचा दोस्त. वर्ष वर्ष भेटत नसू पण जिव्हाळा तसाच.

सुनीलशी भरपूर गप्पा झाल्या. सी न्यूजमधे व्हीएचएस म्हणजे लग्नाचा कॅमेरा घेऊन लोकल ट्रेनमधून केलेलं अपडाऊन आठवलं. इतक्या वर्षातले कुठले कुठले मित्र आठवले आणि गुजरातचा भूकंप आठवला. तिथे आम्ही एकत्र होतो. भूकंप होऊन गेला होता. पण भूकंपाचे धक्के अधूनमधून सुरूच असायचे. विध्वंसाच्या भयानक कथा, प्रेतं, उद्धस्त शहरं यातून आमच्या सगळ्यांच्या नकळत भीती मनाच्या कोप-यात जाऊन बसली होती.

सुनील आमच्यात सगळ्यात लहान आणि थोडा घाबराही. मी, मारुती मालेप किंवा भरतभाई चौहान यापैकी कुणीतीरी त्याला सोबत लागायचंच. रात्री झोपतानाही दोन जणांच्या मधे येऊन झोपायचा. त्याच्यामुळेच त्या दिवशी हॉटेलातल्या कॉटवर चौघे झालो होतो. मी, सुनील, मारुती आणि आणखी उदय म्हणून एक कॅमेरामन. गर्दी झाली म्हणून सुनील झोपल्यावर मी वरच्या मजल्यावर दुस-या रूममधे झोपायला गेलो. तिथे रणधीर कांबळे आणि भरतभाई होते. रणधीर आणि मारुती पहाटे उठून लांब शूटला जाणार होते.

रणधीर भल्या पहाटे उठला. मारुतीच्या रूमवर जाऊन दरवाजा वाजवला. आत जाग नव्हती म्हणून बराच वेळ दरवाजा वाजवावा लागला. तरीही जाग नाही. दरवाजा जोरजोरात वाजवला. कंटाळून परत निघाला. बहुतेक दारावरच्या शेवटच्या ठोक्याने  मारुतीला जाग आली. त्याची झोप अचानक उघडली. धावतच तो दरवाजा उघडायला गेला. नेमका तेव्हाच सुनील उठला. मी शेजारी नाही. मारुती धावत दरवाजा उघडायला जातोय. हे बघून त्याला वाटलं, भूकंपच आलाय. तो जोरजोरात बोंबटतच उठला. मारूतीने थोड्याश्या उघडलेल्या दरवाजातूनच तो तसाच ओरडत सुसाट धावत सुटला. अरे, काय झालं, असं विचारत मारुती त्याच्यामागे धावतोय. इथे रूममधला तिसरा माणूस म्हणजे उदयही उठला. हा अंगापिंडाने भरदार हा साऊथ इंडियन माणूस सिनेमात शोभणाराही हबकलेलाच होता. काय करावं ते त्याला कळतच नव्हतं. तो तसाच बेडवर उभा राहून बोंबा मारू लागला.