Tuesday 28 December 2010

दादोजी कोंडदेव आणि शिवसेना


जेम्स लेनच्या प्रकरणात शिवसेना आमच्याबरोबर येऊन हा मुद्दा जोरात उचलेल असं वाटलं होतं, मराठा संघटनांच्या राजकारणात आघाडीवर असलेले एक मोठे नेते एकदा सांगत होते. माझा त्यांचा चांगला परिचय आहे. त्यामुळे ते मोकळेपणानं बोलत होते. राष्ट्रवादीपेक्षा सेनेला हा मुद्दा फायद्याचा होता. आता आम्ही त्यांना संपवणार. वगैरे बरंच काही बोलले.

असं असलं तरी शिवसेनेने दादोजी कोंडदेव प्रकरणात पुतळा न पाडण्याची भूमिका घेतली. यावेळच्या दसरा मेळाव्यात दस्तुरखुद्द बाळासाहेब ठाकरेंनी ही भूमिका मांडली होती. मीडियात कुणीच त्याची दखल घेतली नाही. दसरा मेळाव्यानंतर मी नवशक्तित लेख लिहिला होता, दसरा, दादोजी आणि शिवसेनाप्रमुख. शिवसेनेची याविषयीची भूमिका फायद्याची ठरेल की नुकसानीची हे पहाणं महत्त्वाचं ठरणार आहे. कारण हा मुद्दा आता लवकर संपण्याची शक्यता नाही. तो धुमसत ठेवला जाणार. महाराष्ट्रात पुन्हा जात हा सगळ्यात मोठा अजेंडा बनणार. 

Sunday 26 December 2010

मॉडर्न महात्मा

ठाण्याच्या साहित्य संमेलनात पुन्हा एकदा त्यांचे किडे वळवळलेच. असे कुणाला नथुरामविषयी कढ आले की आपण गांधीजींविषयी बोलायला हवं. त्यांच्या शेपट्या वाकड्याच राहणार आहेत. ते सूर्यावर थुंकतच राहणार आहेत. आपण बापूंच्या मोठेपणाविषयी बोलू. परवाच्या गांधी जयंतीला नवशक्तिच्या कॉलमात लिहिलेला हा लेख. 

गांधी जयंती आली की आपल्या सगळ्यांना गांधीजींची आठवण होते. कारण बँक हॉलिडे आणि ड्राय डे. बाकी पाचशेची नोट वगळता तसे बापू आपल्याला आठवत नाहीत. फार तर ते कुठे सरकारी ऑफिसांतले फोटो नाहीतर काँग्रेसच्या प्रचारसभांमधे चुकून दिसतात. त्या वातारवणात सूट न होणारे. उगाच अंग चोरून भिंतीवर अडकलेले असतात ते. त्यामुळे तिथेही क्वचितच लक्षात येतात.

मुंबई महापालिकेत युती तुटणार का?

राज ठाकरेंचं भाजप प्रदेश कार्यालयात जाणं, हे काही चुकून आणि सहज येताजाता घडलेली घटना नाही. यामागे राजकारण निश्चितच आहे. त्यातून सेना आणि भाजप युती तोडून मुंबई महापालिका निवडणुकीत एकमेकांविरुद्ध लढणार का? हा प्रश्न आता ऐरणीवर आलाय.

या प्रश्नाचं उत्तर शोधताना शिवसेनेच्या नजरेतून याकडे पाहायचा प्रयत्न केलाय या लेखात. कारण यातली निर्णायक भूमिका सेनाच घेणार आहे. पण ते विश्लेषण मला काही नीट करता आलेलं नाही. लेख फसलाय. त्यापेक्षा सेना, भाजप आणि मनसे या तिघांचं एकूण विश्लेषण करायला हवं होतं. काहितरी हाती लागलं असतं.

श्याना कव्वा

शनिवारच्या लोकसत्ताबरोबर एक फाल्तू पुरवणी असते, वास्तुरंग नावाची. त्यात वास्तुशास्त्र वगैरे विनोदी विषयांवरचे चिरकूट लेख असतात. कालच्या अंकात अशाच एका लेखाखाली एक चांगला लेख आलाय. उमेश वाघेला यांचा चतुर कावळा नावाचा. त्याच्या मथळ्याची कॅलिग्राफीही छान आहे आणि कावळ्याविषयी चांगली माहितीही आहे.

कावळ्याविषयी फार कोणी लिहित नाही. मी लिहिलं होतं, गेल्या वर्षीच्या श्राद्धाच्या दिवसांत. कावळेपुराण नावानं. खूप लोकांना आवडलं होतं. प्रचंड वेगवेगळ्या क्षेत्रातल्या लोकांचे एसेमेस आले होते, त्या रविवारी. आता पुन्हा एकदा त्या कावळ्यांची आठवण. आपल्यासारख्यांचा पितृपंधरवडा वर्षभर सुरू असतो.

Thursday 23 December 2010

किरोडी सिंग बैंसलांविषयी

आदिवासी ठरवा या मागणीसाठी गु्ज्जरांचं आंदोलन पुन्हा सुरू झालंय. राजधानी दिल्ली वारंवार जाम करण्याची ताकद त्यांच्यात आहे. आधी २००८ साली यापेक्षाही भयंकर आंदोलन केलं होतं. तेव्हा गुज्जरांचे नेते किरोडी सिंग बैंसलांचं व्यक्तिचित्र मटाच्या रविवार पुरवणीसाठी लिहिलं होतं. आता बैंसलांना पुन्हा पाहिल्यावर त्याची आठवण आली. सर्च करून शोधून काढलं. दिल्लीत दिडेक वर्षं राहिल्यामुळे गु्ज्जर माहीत होते. त्याचा लिहिताना फायदा झाला होता. पण त्याहीपेक्षा गुरू गुगलच कामाला आला. पण हे कर्नलसाहेब कोणत्या विचारधारेने प्रभावित आहेत, हे मात्र कळलं नाही. 

Tuesday 21 December 2010

सनातन संस्था, भगवा दहशतवाद वगैरे

सध्या भगव्या दहशतवादाची चर्चा सुरूय. घोटाळ्यांवरची चर्चा झाकण्यासाठी काँग्रेसने टाकलेला डाव यशस्वी झालाय. तरीही इथे थोडीशी भगव्या दहशतवादाची चर्चा करुयाच. कारण माझा एक जुना लेख. सनातन संस्थेच्या लोकांनी गेल्या वर्षी दिवाळीत गोवा मडगाव इथं बॉम्बस्फोट घडवले होते, तेव्हा लिहिलेला.

खरं तर हा आणखी जुना लेख आहे. सनातन संस्थेच्याच लोकांनी पहिल्यांदा गडकरी रंगायतन वगैरे ठिकाणी बॉम्ब फोडले होते, तेव्हा मटा ऑनलाईनसाठी लेख लिहिला होता, तुम्ही सनातन्यांच्या बाजूचे की संतांच्या तोच लेख पुन्हा थोडी भर घालून मटातल्या माझ्या विंडो सीट या कॉलमात बॉम्ब आपल्या आसपासचे म्हणून लिहिला होता. दुस-यांदा लिहिताना त्यात काही चांगली भर मात्र घालता आली नाही. पण दोन्हीदा चांगलं कौतुक झालं. सडकून टीकाही झाली. नेटवरच्या प्रतिक्रियाही खूप तिखट होत्या. सनातनवाल्यांनी कोर्टात खेचण्याची धमकीही दिली होती.

Sunday 19 December 2010

फ्रॉड मार्गशीर्षातल्या गुरुवारांचा

सध्या मार्गशीर्ष सुरूय. दर गुरुवारी लक्ष्मीच्या व्रताची पूजा होते. गेले आठदहा वर्षं माझ्याही घरी पूजा होतेय. सहज म्हणून त्याचं पुस्तक बघितलं. लक्षात आलं, हे पुस्तक लिहून कशीबशी पन्नास वर्षच झालीत. पहिली आवृत्ती आलेल्याला तर पस्तीस वर्षंही झालेली नाहीत. हे व्रत प्रकाशकांनी आपले खिसे भरण्यासाठी आपल्या सगळ्यांच्या माथी मारलंय. हा घोटाळा आहे. टूजी स्पेक्ट्रमपेक्षाही मोठा फ्रॉड आहे. सोबत माझा लेख नेहमीप्रमाणे जोडलाय.कालच्या शनिवारी नवशक्तित माझ्या समकालीन कॉलमात छापून आला होता

वेगळ्या विदर्भ राज्याचा विजय असो!

नुकतंच नागपूरात हिवाळी अधिवेशन पार पडलं. नेहमीप्रमाणे यातही विदर्भाच्या हातात काहीच आलं नाही. वेगळं विदर्भ राज्य बनलं, तर यात काही फरक पडेल का? माहीत नाही. पण आता विदर्भाच्या विकासासाठी अन्य कोणताच मार्ग उरलेला नाही, हे ही तितकंच खरंय.

जानेवारीच्या शेवटी हा लेख नवशक्तित माझ्या समकालीन या कॉलमात लिहिला होता. लेख त्यांच्या ऑफिसात पोचताच, तेव्हा संपादक असणा-या महेश म्हात्रेंचा टाकोटाक फोन आला. त्यांनी लेख आवडल्याचं सांगितलं. ते स्वतः काही वर्षं नागपुरात तरुण भारतचे संपादक होते. त्यामुळे त्यांची दाद मला महत्त्वाची वाटली.

Tuesday 14 December 2010

एक होती वाडी

गेल्या पावसाळ्यात मटातल्या माझ्या विंडो सीट कॉलमात हा लेख लिहिला. पण गेल्या वर्षी आमच्या वाडीत पाणीच भरलं नाही. यंदा तर तुफान पाऊस झाला. तरीही पाणी भरलं नाही. महापालिका यंदा तयारीत होती. तिने मुंबईत फारसं पाणी भरू दिलं नाही. ट्रेन एकदाही बंद झाली नाही. पण त्यामुळे वाडीला थोडी मुदतवाढ मिळालीय. पण तरीही वाडीसंस्कृती संपतेय हे खरं.

एक होती वाडी याच नावानं छापून आलेल्या माझ्या लेखाचा इण्ट्रो असा होता, पुण्याच्या वाडा संस्कृतीच्या -हासाची खूप चर्चा होते. सार्वजनिक हळहळ व्यक्त होते. पण मुंबईच्या वाडीसंस्कृतीचं काय ?  आधीच संपत चाललेल्या वाड्यांवर एसआरएने वर्मी घाव घातला आणि आता दरवर्षी तुंबणा-या पाण्याने या मुलखावेगळ्या कल्चरची तिरडी बांधली जातेय. 

नव्या मुंबईकरांना हे वाडीकल्चर फारसं माहीत नाही. त्यांना या झोपडपट्टयाच वाटतात. जुन्यांची वाडीपब्लिककडे बघायची नजर फारशी चांगली नाही. त्यांना ते लोअर स्टँडर्ड वाटतात. मी परळ लालबागचा आहे, असं चारदोन नव्या मुंबईकरांनी मला सांगितलं. मला बरं वाटलं. कारण, आमची वाडीसंस्कृती चाळसंस्कृतीच्या जवळ जाणारी. आमच्या बापजाद्यांची मंबईतली पहिली पावलं तिकडचीच. पण वाड्या या चाळींपेक्षाही गावांतली आपली मूळं शोधत राहिल्यात.

Monday 13 December 2010

जाऊ दे गं, बरखा!


कालच्या रविवारी नवशक्तिच्या रविवार पुरवणीत माझा लेख छापून आला, मीडिया राडिया नावाचा. त्यासाठी दोन तीन दिवस नेटवर बसून बरंच वाचलं त्याविषयी. गरुडांची गिधाडं होताना बघतोय आपण, असं वाटलं. लेख फार चांगला नाही, बरा झालाय. वाचून बघा. जाने भी दो, बरखाचं भाषांतर केलंय जाऊ दे गं, बरखा म्हणून. 

Wednesday 8 December 2010

हगायचं नि जगायचं?

सालं तू मटाला बाटवलं होतंस, कालच माझा मित्र श्रीरंग गायकवाड म्हणाला. संदर्भ होता माझ्या शी!’ या लेखाचं. श्रीरंगच्याच गावच्या प्रगती बाणखेलेनं मुंबई टाइम्समधे मनातलं हा कॉलम सुरू केला होता. त्यात आम्ही मटातलीच माणसं काहीतरी नॉस्टॅल्जिक ललित लिहायचो. त्यातला हा दुसराच लेख होता. शी!

जागेत बसवण्यासाठी तो छोटा लिहिला होता. पण अजून बरंच आहे. लेख लिहिलेल्याला अडीचेक वर्षं उलटून गेलेत. त्यानंतर मी बरंच लिहिलं. पण अजूनही या एकाच लेखामुळे मला ओळखणारे काहीजण आहेत. बोरिवलीचे एकजण तर मी दिसलो की हसायलाच लागतात. मी लिहिलेला पहिला आणि शेवटचा चांगला लेख, असंही काहीजणांचं म्हणणं आहे. तुम्ही तुमचंही मत बनवायला हरकत नाही. नेहमीप्रमाणे कटपेस्ट केलेला हा लेख.

Monday 6 December 2010

व्यवस्थेचा जय भीम!

हा लेख गेल्या वर्षी सहा डिसेंबरला महाराष्ट्र टाइम्समधे छापून आला होता. रविवार असल्यामुळे विंडो सीटचा दिवस होता. नेहमीप्रमाणे पानात सर्वात तळाची जागा होती. तरीही दिवसभर फोन खणाणत होते. माझा सहा डिसेंबर पावन झाला. आजही चळवळीतले अनेक जण पहिल्यांदा भेटले की आवर्जून या लेखाची आठवण काढतात. हा लेख लिहिताना मी अनेक लोकांशी बोललो होतो. पण शुद्धोधन अहिरांशी बोलल्याचा खूप फायदा झाला होता. त्यांना धन्यवाद द्यायलाच हवेत. आज सहा डिसेंबरनिमित्त हा लेख इथे कटपेस्ट.

बाबासाहेबच बेस्टसेलर!

कालच देहू आळंदीला गेलो होतो. आज चैत्यभूमीवर जाणार आहे. आपल्यासाठी तिघेही माऊलीच. चैत्यभूमीवर जाऊन कधीही दर्शन घेत नाही मी. पण मैदानात भरलेल्या पुस्तकांच्या जत्रेत मात्र जातोच जातो. अखिल भारतीय साहित्य संमेलनानंतर हे राज्यातलं पुस्तकांचं सर्वात मोठं प्रदर्शन आहे, असा माझा एक दावा आहे. त्याचं रिपोर्टिंग मी गेल्या वर्षी केलं होतं. जागेअभावी बातमी खूप कापून लागली होती. ती इथे कट पेस्ट केलीय.

Saturday 4 December 2010

बाबासाहेब आणि प्रबोधनकार

गावागावात दलितांवर हल्ले होतात, दलित सवर्ण दंगे होतात, तेव्हा दलितांचा तो संघर्ष पूर्वीसारखा ब्राम्हणांशी किंवा देशमुख मराठ्यांशी नसतो. तो असतो मधल्या जातीसमूहांशी. उदाहरणार्थ खैरलांजी. हे टाळण्यासाठी दलित आणि ओबीसींनी एकत्र यायला हवं. आज रिपब्लिकन आंदोलन आणि शिवसेना त्यांचं प्रतिनिधित्व करतेय. म्हणून शिवशक्ती भीमशक्ती एकत्र यायची गरज आहे. त्याचं राजकारण यशस्वी होईल किंवा नाही, माहित नाही. पण त्यातून महाराष्ट्रात जातीय सलोखाही येऊ शकेल. शिवाय काही बलिष्ठ जातींच्या माजाचा नंगानाच वेगवेगळ्या क्षेत्रात सुरू आहे. त्याला वेसण बसू शकेन. कदाचित हे सारं केवळ विशफुल थिंकिंगही असू शकेल. आज नवशक्तित माझ्या आठवड्याच्या कॉलमात छापून आलेला हा लेख. 

Monday 29 November 2010

बंड पस्तिशीचं, जगन रेड्डीचंही !

आज जगन रेड्डीनं बंड केलं. त्याची एकूण स्टाईल बघितली की आपल्याला राज ठाकरेंच्या बंडाची आठवण होते. पण जगनचं बंड खूप मोठं आहे. वीस ते पंचवीस खासदार आजच त्याच्या खिशात आहे, असं म्हणतात. राज एकही खासदार निवडून आणू शकलेले नाहीत. पण त्यांच्यात एक महत्त्वाचं साम्य आहे, ते दोघांचंही वय ३८ आहे. फक्त हे दोघेच नाही, तर बाळासाहेब ठाकरे, शरद पवार, इंदिरा गांधी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, आणि अगदी महात्मा गांधीही... यांच्यात हाच एक समान दुवा आहे. पस्तिशीचा. ही यादी यशवंतरावांपासून कांशीरामांपर्यंत कितीही लांब खेचता येईल. या प्रत्येकाच्या बंडाची जातकुळी निराळी. त्यांच्यातला समान दुवा त्यांनी ज्या वयात बंड केलं त्याचाही आहे. ३५ ते ४० हे वय बंडखोरीचं, स्थित्यंतराचं. किमान भारतीय राजकारणात तरी ते वारंवार सिद्ध झालंय. राजच्या बंडाच्या वेळेस म्हणजे डिसेंबर २००५ ला मी लिहिलेला हा लेख. बंड पस्तिशीचं.

Saturday 20 November 2010

जुनी विटी, नवं राज्य

पृथ्वीराज चव्हाणांच्या पहिल्या प्रेस कॉन्फरन्सला मी मोठ्या उत्साहाने गेलो होतो. त्यात त्यांचा उत्साह दिसला होता. मंत्रिमंडळाची रचना करण्यात हा उत्साह मावळलेला दिसतोय. असं काहीसं माझं निरीक्षण आहे. नवशक्तिच्या माझ्या आठवड्याच्या कॉलमसाठी पाठवलेला हा लेख त्यावरचाच. लेखाचं नाव म्हणे स्वच्छ आणि समतोल मंत्रिमंडळ.

Wednesday 17 November 2010

गांधींजींना तुकोबाराया भेटले होते

आज कार्तिकी. एक जैतुनबीवरचा लेख टाकलाय. हा आणखी एक लेख. मटाने ३० जानेवारी २००९ ला एडिट पेजवर छापला होता. या गांधी पुण्यतिथीनंतर दुस-याच दिवशी तुकाराम महाराजांची चारशेवी जयंती होती. गांधी आणि तुकारामांचं अद्वैत मला सर्वात आधी अनुभवायला मिळालं ते तुकाराम डॉट कॉम मुळे. मला वाटतं २००८च्या आषाढीत मी त्यावरूनच वारीच्या काळात गांधीजींचा तुकाराम ही सोळा लेखांची लेखमाला महाराष्ट्र टाइम्स डॉट कॉमवर लिहिली होती. 

खुदा पंढरीचा

आज कार्तिकी एकादशी. आजच बकरी ईद. आज आम्ही मी मराठीवर एक स्पेशल केलंय, खुदा पंढरीचा. मुस्लिम मराठी संतकवींची परंपरा टीवीवर दाखवण्याचा एक प्रयत्न केला. थोडं वेगळं डॉक्यमेंटेशन झालंय ते, आजवर न झालेलं. कबीर, श्रीगोंद्याचे शेख महंमद, जैतुनबी, राजूबाबा शेख अशांवर पॅकेज आहेत त्यात. काम करताना मजा आली. एकादशी आणि उपवास साजरा झाला म्हणायचा. आणि ईदही. 

Friday 12 November 2010

चव्हाण ते चव्हाणः एका बंडाचा प्रवास


हा माझा एकदम ताजा फडफडीत लेख. उद्या नवशक्तीत छापून येईल. पृथ्वीराज चव्हाण मुख्यमत्री बनले. त्यांची मंत्रालयात झालेली पहिली पत्रकार परिषद ऐकायला मुद्दामून गेलो होतो. नारायण राणेंचं मंत्रिपद बहुदा कापलं जाणार, ही त्यात मिळालेली बातमी होती. पण त्याच्याही पुढेमागे पृथ्वीराज चव्हाणांना मुख्यमंत्री म्हणून बघताना खूप काही डोक्यात सुरू होतं. यशवंतराव चव्हाणांच्या विरोधात कराडमधे राहून राजकारण होऊ शकतं हे आनंदराव चव्हाणांनी दाखवून दिलं होतं. त्यांच्याविषयी थोडं मांडावसं वाटत होतं. महाराष्ट्राच्या राजकारणातल्या या धारेविषयी लिहिलंय. वाचून बघा जमल्यास. नवशक्तित छापून आलेला हा लेख  पुढे कटपेस्ट केलाय.

Sunday 7 November 2010

ओबामा मुंबईत आलेत का ?

भाऊ पाध्येंचं 'होमसिक ब्रिगेड' वाचलंय का? नसेल तर वाचाच. भाऊने लिहिलेलं कुठेही कसंही मिळालं तर वाचायलाच हवं. कारण त्याच्याएवढ्या ताकदीचा लेखक मराठीत मी तरी दुसरा वाचलेला नाही. होमसिक ब्रिगेडमधे त्याने हुमायू मकब-याचं छान वर्णन केलंय. त्यामुळे मी दिल्लीत असताना तो एक आकर्षणाचा विषय होता. मी ई टीवीतून दीडेक वर्षं दिल्ली प्रतिनिधी होतो. अनेकदा तिथे गेलोय मी. आज ओबामाही गेलेत तिकडे. त्यांच्या भारतभेटीतला तो एकच स्पॉट मला आवडला. बाकी बकवास. म्हणून एक आर्टिकल लिहून टाकलं. नवशक्तित छापून आलं होतं ते. 

Thursday 4 November 2010

भय्येः मुंबईतले आणि ऑस्ट्रेलियातले

नम्रता रंधवा म्हणजेच निकी हॅले. त्या साऊथ कॅरोलिना नावाच्या अमेरिकेतल्या प्रांताच्या गवर्नर बनल्या. आपल्याला आनंद झाला. एक भारतीय मुळाची बाई अमेरिकेत एवढ्या मोठ्या पदावर निवडून आली. मग संजय निरुपम खासदार झाल्याचं आपल्याला दुःख का होतं? लंडनमधले भारतीय इंग्लंड आणि भारताच्या क्रिकेट मॅच मधे तिरंगा कसा फडकवतात, मला कधीच कळलं नाही.

सचिन मला भेटला

जवळपास वर्षभरापूर्वी लिहिलेला हा लेख. सचिनवरचा. सचिन, आपला सचिन तेंडुलकर.आज कदाचित त्याची टेस्टमधली पन्नास शतकं पूर्ण होतील.  माझ्या अनेक मित्र खटपटी लटपटी करून सचिनला भेटलेत. पण मला नाही वाटलं कधी त्याला भेटावंसं. थोडा प्रयत्न केला असता तर अशक्य नव्हतंच. पण नाही तसं करावंसं वाटलं. 


कारण, माहीत नाय. कदाचित जेव्हा त्याला खेळताना टीवीवर बघितलं की त्याला भेटल्यासारखंच वाटतं. खरंच. त्याच्याविषयी बोलताना. गप्पा मारताना तो भेटत असतो. आतून भेटत असतो. सचिनचे रेकॉर्ड झाले. त्याला पुरस्कार मिळाला की एकमेकांना काँग्रॅट्स करणारी माझी पिढी त्याला स्वतःपेक्षा वेगळं मानतंच नाही. काहीतरी गेल्याजन्माची पुण्याई म्हणूनच सचिन खेळत असताना मी जिवंत आहे, असं वाटणारे माझ्यासारखे कितीतरी. मी नेहमी राजकारणावर लिहिणारा. त्यामुळे सचिनवर लिहिण्याचा फारसा प्रसंग आला नाही. पण एकदा आयपीएल टू मधे मुंबई इंडियन्स हरली तेव्हा सडकून मुंबई टाइम्सची लीड लिहिली होती. पण आयपीएल थ्री मधे त्याने नेहमीप्रमाणे असं लिहिणा-यांचे दात तोडले. आपले दात तुटले याचं खूप बरं वाटलं होतं. कारण आपला सचिननेच तोडले होते ते.  

हॅपी दिवाळी!

पाऊस येतोय हे इतरांना चातकामुळे कळत असेल, आम्हा मुंबईकरांना नालेसफाईमुळे कळतं. आणि दिवाळी आलीय ते  बोनसच्या मोर्च्यांनी. या वाक्यानं जवळपास तेरा चौदा वर्षांपूर्वी मी एका लेखाची सुरुवात केली होती. पण आता बोनसचे मोर्चे निघत नाहीत. पण दिवाळी आलीय हे सांगायला सेल असतात, पोस्त मागणारे असतात. पोस्त या विषयावर गेल्या वर्षीच्या दिवाळीत एक लेख लिहिला होता. मॉसची ती कवर स्टोरी होती. मुंबई टाईम्सच्या नेहमीच्या  पठडीपेक्षा वेगळी अशी मांडणी होती. पण त्यादिवशी खूप एसेमेस आले वाचकांचे. लेख आवडल्याचं खूप जणांनी आवर्जून सांगितलं. दिवाळीत आणखी काय पायजे. 

Friday 1 October 2010

उद्या बापूका बर्थडे

पुस्तकांत काहीही असो. शाळा असो की घर, मला तरी लहानपणी गांधीजींना शिव्या घालायच्या, नाहीतर उगाच टवाळकी करायलाच शिकवलं होतं. पण जसजसा हा माणूस भेटत गेला, तस तसं माझं मत बदलत गेलं. मला आज असं वाटतं, जगात दोनच प्रकारची माणसं आहेत. एक, गांधी ज्यांना पटलाय आणि दुसरा प्रकार गांधी ज्यांना समजलाच नाही.

गेल्या गांधी जयंतीला मी एक लेख लिहिला होता. खूप चांगला रिस्पॉन्स मिळाला होता त्याचा. अकाऊंटंट असणा-या रुपेश नावाच्या  एका मित्राने सांगितलं माझा गांधीजींकडे बघायचा दृष्टिकोनच बदललाय. माझ्यासाठी हे सगळ्यात मोठं सर्टिफिकेट होतं. 

Thursday 2 September 2010

प्रवीण भुवड अमर रहे

खूप महिने झाले हा ब्लाँग तयार करून. पण लिहिलं नव्हतं. आता पहिल्यांदाच लिहितोय कायतरी.


आज सकाळी एका कार्यक्रमाला गेलो होतो. परळ भोईवाड्याला. वर दहिहंडी बांधली होती. खाली छोटं स्टेज. स्टेजवर एक फोटो. शेजारी ट्रॉफी. त्यावर माझं नाव. माझ्या हस्ते फोटोला हार घालण्यात येतो. दोन मिण्टं शांतता पाळ्णं. सगळे पाकळ्या फोटोवर भिरकवतात. जय जागेवाला मित्र मंडळ हंडी फोडतं. माझ्या हस्ते ट्रॉफी देण्यात येते. फोटोची पोझ. शेजारची पोरं ओरडतात. प्रवीण भुवड अमर रहें! अमर रहे!


इथेच गेल्या वर्षी हंडी फोडताना पाचव्या थरावरून प्रवीण खाली पडला होता. आणि मेला होता. मी त्याच्यावर एक लेख लिहिला. तेव्हा मी मटात होतो. माझा कॉलमही होता, विंडो सीट. लेखाचं नाव, हुतात्मा.

लेख छापून आला तो रविवार होता. सकाळपासून फोन एसेमेस. आजपर्यंत खूप लिहिलं. पण कुणाला मदत व्हावी, असा अजेंडा ठेवून कधी लिहिलं नव्हतं. पहिलाच प्रयत्न यशस्वी झाला. लोक प्रवीणचं घऱ शोधत आले. मदत देऊन गेले. आम्ही त्याच्या भावाचा फोन नेटवर दिला होता. अमेरिका, इंग्लंड, दुबईवरून फोन. काही लाखांची मदत आली. त्यात बाळा नांदगावकरांचे एक लाख. दगडू सकपाळांनी भावासाठी नोकरी तयार ठेवली. अगदी परवापर्यंत हे सुरूच होतं. ठाण्याचे आमदार राजन विचारेंनी एक्कावन्न हजार दिले. त्यापेक्षा महत्त्वाचं हे की प्रवीणच्या आईचा साडीचोळी देऊन सत्कार केला.


पण काही जणांना हे उगाचचं उदात्तीकरण वाटलं. जानी दोस्त सुनील घुमे आणि नीलेश बने तर तुटून पडले. जोरदार वाद झाला. हे व्हायलाच हवं. पण माझा मुद्दा वेगळाच होता. संस्कृती सर्वसामान्य माणसं जगवतात, टिकवतात. कष्टक-यांच्या कष्टाच्या संस्कृतीला मान्यता मिळत नाही. ती द्यायला हवी. एवढंच. आपण ज्याला नेहमी संस्कृती म्हणतो त्याहीपेक्षा ही संस्कृती महत्त्वाची आहे.


पण सगळ्यात चागली प्रतिक्रिया होती आमच्या प्रवीण मुळ्येची. दहिहंडी हा एक बीट बनू शकतो, एवढ्या बातम्या मुळ्यानं वर्षानुवर्षं दिल्यात. फडके सरांनी त्याला दहिहंडीवर पुस्तक लिहायला सूचवलं होतं. तू माहिती आण, मी लिहून काढतो, असं मीही त्याला सांगितलं होतं. मुळ्या फारसा तयार नव्हता. पण लेख वाचून तो आला, म्हणाला, पुस्तक लिहायला पायजे रे!


मूळ लेखाचा इण्ट्रो असा होता,  'गणपती , गोविंदा आणि डबेवाले. या तीन गोष्टी सोडल्या , तर मुंबईवर सांस्कृतिक ठसा उमटवणारं अस्सल मराठी काहीही उरलेलं नाही. म्हणूनच दहिहंडीच्या पाचव्या थरावरून पडून मेलेला प्रवीण भुवड हा मराठी संस्कृती टिकवण्यासाठी धारातीर्थी पडलेला हुतात्मा ठरतो.' लेख खाली कॉपीपेस्ट करतोय. बघा वाचून...