Wednesday 21 September 2011

महिलांच्या प्रगतीसाठी झटणारे प्रबोधनकार


आपल्या सगळ्यांची वेबसाईट prabodhankar.com च्या उद्घाटनाला या शनिवारी प्रबोधनकारांच्या जयंतीनिमित्त एक वर्ष पूर्ण झालं. आपल्या सगळ्यांच्या मदतीशिवाय डॉक्युमेंटेशनचं हे मोठं काम पूर्ण झालं नसतं. त्यामुळे आता एक वर्ष पूर्ण होताना आपल्याविषयी कृतज्ञता करायला हवीय.

गेल्या वर्षभरात आपल्या वेबसाईटला ५३ देशांमधून जवळपास अडीच लाख लोकांनी भेट दिली. त्यात साठ टक्के लोक पहिल्या महिनाभरात आले होते. इतक्या लोकांपर्यंत प्रबोधनकारांची झलक पोहचवू शकलो, यात खूपच आनंद आहे. गेल्या वर्षी विशेषतः हर्षल प्रधान यांच्यामुळे प्रबोधनकारांविषयी विविध वृत्तपत्रांत छापून आले आणि टीव्हीनेदेखील त्याची सविस्तर दखल घेतली. यातून प्रबोधनकारांची किंवा त्यांच्याविषयी पुस्तक आहे का, अशी विचारणा आता मुंबई आणि पुण्यातील पुस्तकांच्या दुकानात नव्याने होऊ लागली आहे.गांधर्ववेद प्रकाशनाने महाराष्ट्र निर्मितीच्या सुवर्णमहोत्सवानिमित्त अरूण टिकेकर यांच्या संपादकत्वाखाली महाराष्ट्राचे निर्माते अशी पुस्तकांची सिरीज काढायची घोषणा केली होती. तेव्हा त्यात प्रबोधनकारांवरील पुस्तकाचा समावेश नव्हता. पण आपल्या वेबसाईटच्या उद्घाटनानंतर त्यांनी घाईगडबडीने महावीर मुळे (काकडवाडी, सांगली) यांच्याकडून पुस्तक लिहून घेतले आहे. राज्य सरकारच्यालोकराज्यया मासिकाच्या वाचन विशेषांकात आवर्जून प्रबोधनकारांवर लेख समाविष्ट करण्यात आला होता. मनसेने प्रबोधनकारांच्या नावाने बोरिवलीत ग्रंथालयाचं काम सुरू केलंय.

Saturday 10 September 2011

हे लालबागच्या राजा, आवर तुझ्या भक्तांना?


आम्ही अस्सल मुंबईकर. पण शहरातले सार्वजनिक गणपती बघायला फिरायची पद्धत आमच्या घरात नाही. कारण घरातच गणपती. घरचा गणपती गेला तरी वाडीतला सार्वजनिक गणपती असायचा. त्याची रोजची पूजा, नैवेद्य, आरती हे आमच्या घरातून व्हायचं. त्यामुळे अकरा दिवस घरातच लगबग असायची. आम्ही घरातले सगळे मुंबईभर फिरायचो ते देवी बघायला. आजही जातो. 

त्यामुळे लालबागचा राजा, गणेशगल्ली याविषयी ऐकलं भरपूर होतं. पण प्रत्यक्षात दर्शनाला गेलो ते टीव्हीत पत्रकारिता सुरू केल्यावर. ईटीव्हीत असताना गणपतीत दिवसभर घरी राहता यावं म्हणून मुद्दामून नाईट शिफ्ट मागून घ्यायचो. तेव्हाच म्हणजे मला वाटतं २००० किंवा २००१ साली पहिल्यांदा राजा आणि गणेशगल्लीच्या दर्शनाला कामाचा भाग म्हणून गेलो. मी पहिल्यांदा राजाकडे गेलो तेव्हा दर्शनासाठी रांग नव्हतीच. जी होती ती नवसाचीच रांग. गणेशगल्लीत मात्र देखावा बघण्यासाठी तुडुंब गर्दी होती. पण हळूहळू सगळंच बदलत गेलं. लालबागचा राजा गर्दीचा राजा बनला. साधारण २००५ आणि ०६ ला गर्दीत चेंगरत दर्शनाला जावं लागलं होतं. त्यानंतर विसर्जनाच्या मिरवणुकीत लांबून दर्शन घेण्याचा सोपा मार्ग निवडला. दोनेक वर्षांपूर्वी दर्शनाला गेलो आणि दर्शन न करताच परत आलो होतो. हे सगळे बदल डोळ्यासमोर घडताना बघत होते. माझे मीडियातले मित्रच हे बदल घडवण्यात महत्त्वाचा हातभार लावत होते. तेही जवळून बघत होतो.

Saturday 3 September 2011

बाप्पा बदलले, आपण कधी बदलणार?


आठवड्याचा कॉलम गणपतीबाप्पावर लिहायचं हे नक्कीच होतं. कारण आसपासच्या वातावरणाला टाळून काही लिहावं असं मला नाही वाटत. गणपती हा आदर्श नेत्याचं प्रतीक कसा आहे, हे लोकपालच्या पार्श्वभूमीवर लिहायला बसलो होतो. पण लिहिता लिहिता भलतच लिहिलं. सार्वजनिक गणेशोत्सवाविषयी थोडा सामाजिक अंगाने मांडणी करायचा प्रयत्न केलाय. पण तो तोकडा आहे. कारण ती फक्त वरवरची निरीक्षणं आहेत. त्याहीपेक्षा अधिक अभ्यासाने याकडे पाहायला हवंय. रा. चिं. ढेरे यांच्यासारख्या ऋषितुल्य विद्वानाने देवतांमधले बदल कसे घडले हे सर्वसामान्य मराठी माणसाला समजावून सांगितलं. ते इतिहासात जसं शोधता येतं. तसं काही वर्तमानात शोध करता येऊ शकेल का, या अंगाने हा प्रयत्न झालाय. मला वाटतं बाप्पा बदलताहेत. पण त्याचे भक्त आपण बदलतोय का, हा प्रश्न महत्त्वाचा आहे.