Showing posts with label इतर. Show all posts
Showing posts with label इतर. Show all posts

Sunday, 24 July 2011

आयडियल इंटरनॅशनल २०११


शिकागो बीएमएम कन्वेंशन विशेषांक

भारताबाहेर पसरलेली मराठी माणसं सध्या शिकागोत जमलीत. २१ ते २३ जुलैदरम्यान तिथे बृहन्महाराष्ट्र मंडळाचं अधिवेशन म्हणजे बीएमएम कन्वेंशन सुरू आहे. जगभरातल्या मराठी कर्तृत्वाचे आजच्या बदलणा-या महाराष्ट्राशी सूर जुळावेत या हेतूने दादरच्या आयडियल पुस्तक त्रिवेणीच्या मंदार नेरूरकर यांनी आयडियल इंटरनॅशनल २०११ या विशेषांकाची निर्मिती केलीय. मी त्याची सगळी संपादकीय जबाबदारी घेतली होती.

भारताबाहेरच्या मराठी माणसांपर्यंत शक्यतो न पोहोचणारे विषय,  माणसं आणि लेखक यात आहेत. अंक खूप चांगला झालाय. तुम्हाला सगळ्यांना आवडेल अशी अपेक्षा आहे. शिकागो कन्वेशनमधे ग्रंथालीच्या स्टॉलवर हा अंक विनामूल्य उपलब्ध आहे. त्यातल्या लेखांची ही यादी.

Tuesday, 19 July 2011

बहुजनवाद म्हणजे ब्राम्हणांना शिव्या देणं नाही

२० ते २२ मे रोजी पुणे शहराजवळ वाघोलीत बहुजन संत साहित्य संमेलन होतं. आश्चर्याची गोष्ट म्हणजे मला त्याचं वक्ता म्हणून निमंत्रण होतं. २१ तारखेला शनिवारी सकाळी प्रसारमाध्यमांतील बहुजन संत साहित्याची स्थिती या विषयावरच्या परिसंवादात मला बोलायचं होतं. विषय आवडीचा होताच. पण त्यावर बोलायचं म्हणून थोडा अभ्यास करावा म्हणून दुकानांत पुस्तकं बघायला गेलो. तर संत आणि बहुजनवाद या विषयावरची पुस्तकं मिळाली ती संभाजी ब्रिगेड, मराठा महासंघ, बामसेफ याचीच. त्यात एककल्लीपणा तर होताच पण द्वेष ठासून भरलेला होता. संत आणि द्वेष एकत्र? ते पटण्यासारखंच नव्हतं. टाळकंच फिरलं.

त्या फिरलेल्या टाळक्यानेच भाषणाला गेलो. जे पटतं ते बोलावं. मनात पाप नाही तर लपवाछपवी कशाला? म्हणून जे काही वाटत होतं ते थोडं स्पष्टच बोललो. मी काही पट्टीचा भाषण करणारा नाही. जसं आपण रोज बोलतो. तसंच लिहावं आणि सभेतही बोलावं असं मला वाटतं. भाषण चांगलं झालं म्हणे. तिथल्या श्रोत्यांनी जोरदार कौतूक केलं. व्यासपीठावर माझ्यासह हरी नरके, सांगलीचे डॉ. बाबूराव गुरव, गुजरातचे जयंतीभाई होते. सगळ्यांनी कौतूक केलं. नरके सरांचं भाषण माझ्यानंतर झालं. त्यात त्यांनी माझा उल्लेख तरुण विचारवंत असा केला. बरं वाटलं.

भाषण सुरू असताना एक गंमत होत होती. प्रेक्षकांमधले एक मान्यवर मला सतत थांबवून प्रश्न विचारत होते. मी ब्राम्हण आहे आणि ब्राम्हणांची बाजू घेतो आहे, असा त्यांच्या प्रश्नाचा रोख होता. ते विदर्भाकडचे होते. त्यामुळे परब म्हणजे मराठा हे मुंबई कोकणात स्पष्ट असणारं समीकरण त्यांना माहीत नव्हतंच. या सगळ्याची खूप गंमत वाटली. आपण मोठ्या शहरात जन्मलो आणि जातीचे संस्कार आपल्यावर झाले नाहीत, हे केवढं मोठं नशीब असं वाटलं.

Monday, 4 July 2011

उद्धवस्त ढिगा-याखाली


परवा सुनील पवार भेटायला ऑफिसात आला होता. आम्ही एकमेकांना ओळखतो त्याला बारा तरी वर्षं झाली. तेव्हा तो सी न्यूजमधे आमच्या बरोबर कॅमेरा अटेण्डण्ट होता. पुढे ई टीव्हीतही एकत्र होतो. आता तो आयबीएन लोकमतमधे कॅमेरामन बनलाय. सुनील एवढुसा. त्यात बारीक. आवाजही तसाच बारका. पण जीवाला जीव लावणारा जिवाभावाचा दोस्त. वर्ष वर्ष भेटत नसू पण जिव्हाळा तसाच.

सुनीलशी भरपूर गप्पा झाल्या. सी न्यूजमधे व्हीएचएस म्हणजे लग्नाचा कॅमेरा घेऊन लोकल ट्रेनमधून केलेलं अपडाऊन आठवलं. इतक्या वर्षातले कुठले कुठले मित्र आठवले आणि गुजरातचा भूकंप आठवला. तिथे आम्ही एकत्र होतो. भूकंप होऊन गेला होता. पण भूकंपाचे धक्के अधूनमधून सुरूच असायचे. विध्वंसाच्या भयानक कथा, प्रेतं, उद्धस्त शहरं यातून आमच्या सगळ्यांच्या नकळत भीती मनाच्या कोप-यात जाऊन बसली होती.

सुनील आमच्यात सगळ्यात लहान आणि थोडा घाबराही. मी, मारुती मालेप किंवा भरतभाई चौहान यापैकी कुणीतीरी त्याला सोबत लागायचंच. रात्री झोपतानाही दोन जणांच्या मधे येऊन झोपायचा. त्याच्यामुळेच त्या दिवशी हॉटेलातल्या कॉटवर चौघे झालो होतो. मी, सुनील, मारुती आणि आणखी उदय म्हणून एक कॅमेरामन. गर्दी झाली म्हणून सुनील झोपल्यावर मी वरच्या मजल्यावर दुस-या रूममधे झोपायला गेलो. तिथे रणधीर कांबळे आणि भरतभाई होते. रणधीर आणि मारुती पहाटे उठून लांब शूटला जाणार होते.

रणधीर भल्या पहाटे उठला. मारुतीच्या रूमवर जाऊन दरवाजा वाजवला. आत जाग नव्हती म्हणून बराच वेळ दरवाजा वाजवावा लागला. तरीही जाग नाही. दरवाजा जोरजोरात वाजवला. कंटाळून परत निघाला. बहुतेक दारावरच्या शेवटच्या ठोक्याने  मारुतीला जाग आली. त्याची झोप अचानक उघडली. धावतच तो दरवाजा उघडायला गेला. नेमका तेव्हाच सुनील उठला. मी शेजारी नाही. मारुती धावत दरवाजा उघडायला जातोय. हे बघून त्याला वाटलं, भूकंपच आलाय. तो जोरजोरात बोंबटतच उठला. मारूतीने थोड्याश्या उघडलेल्या दरवाजातूनच तो तसाच ओरडत सुसाट धावत सुटला. अरे, काय झालं, असं विचारत मारुती त्याच्यामागे धावतोय. इथे रूममधला तिसरा माणूस म्हणजे उदयही उठला. हा अंगापिंडाने भरदार हा साऊथ इंडियन माणूस सिनेमात शोभणाराही हबकलेलाच होता. काय करावं ते त्याला कळतच नव्हतं. तो तसाच बेडवर उभा राहून बोंबा मारू लागला.

Tuesday, 28 June 2011

महाराष्ट्राला वळण लावणारा विचारवंत


परवाच राज्य सरकारचं मासिक लोकराज्य प्रकाशित झाला. तो वाचन विशेषांक आहे. मुळातून वाचण्याजोगा. सदानंद मोरे, हरी नरके, रा. रं. बोराडे, विजया राजाध्यक्ष, जयसिंगराव पवार, अरूण टिकेकर, सतीश काळसेकर, कुमार केतकर, अऱुण साधू अशा अनेक जाणकारांचे लेख आहेत. काय वाचावं, आवडती पुस्तकं असा छान आढावा आहे. तो एक संग्राह्य अंक झालाय. प्रल्हाद जाधवांना याचं श्रेय द्यायला हवं.

या थोरामोठ्यांबरोबर माझाही एक लेख त्यात आहे. त्याचा आनंद आहेच. पण त्याहीपेक्षा आनंद लेख प्रबोधनकार ठाकरेंवर आहे याचा आहे. प्रबोधनकारांना त्यांचं हक्काचं मानाचं स्थान मिळालंय, हे महत्त्वाचं. गेल्या सप्टेंबरात प्रबोधनकारांच्या सव्वाशेव्या जन्मदिनानिमित्त prabodhankar.com ची सुरुवात झाली. ती संकल्पना आणि संशोधन माझंच होतं. तरीही माझा मित्र राहुल शेवाळेची मदत नसती तर ती संकल्पना माझ्या डोक्यातच राहिली असती. वेबसाईट अद्याप पूर्ण झालेली नाही. अनेक चुका राहिल्यात. अनेक टाइप झालेली पुस्तक अपलोड व्हायचीत. त्यावर मी पुन्हा एकदा नव्याने कामाला लागलोय. एखाद्या वाचन विशेषांकात प्रबोधनकारांचा समावेश होतो, हे प्रबोधनकार डॉट कॉमच्या टीमच्या प्रयत्नांचं यश आहे, असं मला नम्रपणे नमूद करावंसं वाटतं. काल अंक आल्यापासून अनेक जण आवर्जून प्रतिक्रिया नोंदवत आहेत. प्रत्येक वेळेस प्रबोधनकार त्यांच्यापर्यंत पोहोचला, याचा वारंवार आनंद होतोय. लेख पुढे कटपेस्ट केलाय. तुम्ही वाचला तर मला पुन्हा पुन्हा आनंद होईल.

Wednesday, 15 June 2011

‘मुंबई आमचीच’ क्यों कहते हैं मराठी ?


मुंबईत हम लोग नावाची एक संस्था आहे. मुंबई काँग्रेसचे एक पदाधिकारी विजय सिंग यांच्या नेतृत्वात उत्तर भारतीय त्यात प्रामुख्याने आघाडीवर आहेत. मुंबईच्या विविध समस्यांवर ती काम करते. शिवाय महत्त्वाचं म्हणजे महिन्यातून एकदा शहरातले हिंदी साहित्यिक एकत्र आणून त्यांच्यात परस्परसंवाद वाढवण्याचं कामही ही संस्था करते.

ते दरवर्षी हमलोग गौरव सन्मान नावाचा पुरस्कार देतात. यंदा त्यांच्या पुरस्कारांमधे माझं नाव होतं. एप्रिलमधे त्याचा कार्यक्रम पार्ल्यात झाला. पुरस्काराचा आनंद होताच. पण पुरस्कार पार्ल्यात दिल्याचा अधिक आनंद होता. J  दुसरा आनंद, माझ्यासोबत हा पुरस्कार मिळाला तुळशीदास भोईटेला. तुलसी माझा जवळचा मित्र. मोठा पत्रकार. सोबतच हिंदीवर प्रेम असणारे उत्तम लेखक अनंत श्रीमाली आणि सामनामधील ले आऊटचे जादूगार भालचंद्र मेहेर यांनाही पुरस्कार देण्यात आला.

तिथलं माझं हिंदीतलं भाषण बरं झालं. त्यातले महत्त्वाचे मुद्देः एका हिंदी भाषकांच्या संस्थेकडून पुरस्कार मिळतोय याचा आनंद आहे. हिंदी भाषा फक्त युपी बिहारवाल्यांच्या बापाची पेंड नाही. ती त्यांच्याइतकीच आमचीही आहे कारण ती राष्ट्रभाषा आहे. कुणी बिहारी पद्धतीने हिंदी बोलणार असेल, युपीच्या ढंगात हिंदी बोलणार असेल. तर मी मराठी हेलाची मराठी बोलणार. त्यात काही चुकीचं नाही. आणि खरी राष्ट्रभाषा ही आपली मुंबईचीच हिंदी आहे. तुपात तळलेली बनारसची हिंदी किंवा तंदूरीसोबत भाजलेली लखनौ हैद्राबादेची हिंदी ही राष्ट्रभाषा नाहीच नाही. कारण त्या काश्मीर ते कन्याकुमारी सगळ्यांना नाही कळत. तिथे सगळ्यांना सामावून घेणारी आपली मुंबईची हिंदीच कळते. आज गरज आहे ती पंढरपुरात जन्मून आजच्या पाकिस्तानापर्यंत पोहोचणा-या संत नामदेवांचा मराठी वारसा जपण्याची. नामदेवांनी एक दोन नाही सहा भाषांतून रचना केलीय. त्यांचा कबीर, नानकांपासून मीरा, नरसीपर्यंत थेट प्रभाव आहे. त्याचबरोबर हिंदीतले रईदास इथे भाषेचा कोणताही व्यत्यय न होता इथे रोहिदास बनतात आपले होतात. कवी भूषण इथे येऊन शिवरायांवर कवनं रचतो. ही सांझी विरासत आपल्याला हवीय. आज राजकारणासाठी काही लोक मराठी हिंदीत भांडणं लावत आहेत. अशावेळेस शेकडो वर्षं एकमेकांच्या गळ्यात गळे घालून चालणा-या या दोन संस्कृतींनी एकमेकांशी संवाद साधण्याची गरज आहे.