Showing posts with label महाराष्ट्र टाइम्स. Show all posts
Showing posts with label महाराष्ट्र टाइम्स. Show all posts

Saturday, 25 June 2011

एका गावाची गोष्ट


नुकताच कोकणात जाऊन आलो. कोकणात मूळ गाव कोटकामते, तालुका देवगड, जिल्हा सिंधुदूर्ग. पण गाव तसं नावापुरतं. मी नवसाचा, म्हणून तीन वर्षांचा असताना कुलदेवी भगवतीला दर्शनाला नेण्यात आलं होतं. त्यानंतर गावी गेलो ते थेट लग्न झाल्यावर. त्यामुळे मी राहतो त्या कांदिवलीलाच आपला गाव मानत आलो. पुढे पत्रकारितेत आलो. कधी साहित्य संमेलनासाठी तर कधी निवडणुकांसाठी कोकणात फिरलो. कशामुळे माहीत नाही, पण आतून जाणवत राहिलं की आपली नाळ इथेच कुठेतरी लाल मातीत पुरलेली आहे.

कोकणाचं गारुड एकदा तुमच्यावर भारलं की मग इथल्या दगडमातीपासून भुताखेतांपर्यंत सगळं आपलं वाटायला लागतं. तोच आपलेपणा घेऊन मी नारायण राणे यांची मालवण मतदारसंघातली पोटनिवडणूक कव्हर करायला गेलो होतो. साल बहुदा २००५. राणेंनी नुकतंच सेनेविरुद्ध बंड केलं होतं. मुंबईपासून बांद्यापर्यंत सारा कोकणपट्टा राणेमय झाला होता. मी तिथे पोचल्यावर माझ्या डोक्यातल्या कोकणापेक्षा वेगळंच चित्र वेगळंच दिसत होतं. मी बिनधास्त राणेंच्या राड्यांच्या बातम्या द्यायला सुरुवात केली. अनेक लोक मला समजवायला येऊ लागले. मी काय करतो, कोणाला भेटतो, यावर नजर ठेवली जात होती. अगदी ज्योतिर्भास्कर जयंत साळगावकरांनीही मालवणात कोणतीही दादागिरी होत नसल्याचा लेख आमच्याच पेपरात लिहून मला जणू व्हिलन ठरवला होता. पण मला तिथे दहशत पावलापावलावर जाणवत होती. खासदारांनाही मारहाण होत होती. मी त्यावर बरंच लिहिलं. एक रोंबाट नावाचा कॉलमही लिहिला होता. हा सगळा अनुभव खूप मस्त होता.

Friday, 24 June 2011

अवघा रंग एक झाला


झक मारली आणि पत्रकारितेत आलो, असं सांगणारे मित्र जवळपास रोज भेटतात. पण मला तसं कधीच वाटलं नाही. पत्रकारितेत असण्याचा अभिमान आणि आनंद मी सतत अनुभवतो. पत्रकारितेत रोज नवं आणि नव्याने जगता येतं. त्यात असे काही अतीव समाधानाचे क्षण अनुभवता येतात की त्यांवर अख्खं आयुष्य आनंदात जाऊ शकतं. तसा एक अनुभव माझ्या गाठिशी आहे, तो वरळी नाक्यावरच्या भिमडीवाला बिल्डिंगमधला.

गोरेगावचे वारंग आजोबा. आमच्या कुटुंबाशी अनेक वर्षांचे परिचित. वारकरी आणि स्वाध्यायी. त्यांच्या मृत्यूनंतर त्यांच्याविषयीच्या बातम्या पेपरात आल्या इतके ते सामाजिक कामात होते. त्यांच्याकडे खूप पुस्तकं होती. त्यांचं काय करायचं, हा त्यांच्या घरातल्यांना मोठा प्रश्न होता. त्यांचे नातू राजू सावंत यांचे आमचे घरोब्याचे संबंध. त्यांनी मला पुस्तकं बघायला घरी यायला सांगितलं. पण मी तेव्हा नुकताच नव्या नोकरीत लागलो होतो. माझं जाणं झालं नाही. तसं त्यांनीच दोन पुस्तकांचे गठ्ठे आमच्या घरी आणले. हे गठ्ठे अनेक वर्षं शो केसच्या कपाटावर पडून होते.

सगळी पुस्तकं जुनी झाल्यामुळे थोडी फाटलेली पण नीट कव्हर घातलेली. जवळपास सगळी अध्यात्मिक. त्यात एक पुस्तक दिसलं, ‘श्रीसंत चोखामेळा महाराज याचे चरित्र व अभंग गाथा’. छान बाईंडिंग, पानं जवळपास अडीचशे. नवा खजिनाच सापडला होता. चोखोबांबद्दल थोडं फार ऐकलं होतं. पण माझ्यासाठी तो वारकरी परंपरेने घडवलेल्या क्रांतीचा दाखलाच होता. त्याहीपेक्षा मी हादरलो ते चोखोबांच्या पत्नी सोयराबाईंचे अभंग वाचताना. अवघा रंग एक झाला हा अभंग माझ्यालेखी तोवर फक्त किशोरी आमोणकरांचाच होता. आता तो माझ्यासाठी चोखियाच्या महारीचा, सोयराबाईंचा झाला होता. मला झालेला हा साक्षात्कार मी जमेल त्याला सांगत होतो. चोखोबांवरची इतर पुस्तकं जशी जमतील तशी वाचत होतो. तेव्हा मला या चोखोबांच्या गाथेचं महात्म्य आणखी कळत होतं.

Thursday, 17 March 2011

बडव्यांना बडवायलाच पायजे


इन्कम टॅक्सची धाड पडले की भलभले सरळ होतात. जयराज फाटकांसारख्यांचाही बुरखा टराटरा फाटतो. कलमाडी, ए. राजा, हसन अलीसारखे मोठे माशेही गळपटतात. पण या सगळ्यांपेक्षाही पंढरपूरच्या बडव्यांवर पडलेल्या इन्कम टॅक्सच्या धाडी धक्कादायक आहेत. या सगळ्या घपल्यांपेक्षा पंढरपूरच्या बडव्यांचा फ्रॉड मोठा आहे. आता या धाडींमुळे ते वठणीवर आलेत. त्यांनी म्हणजे बडवेसमाजानं मिटिंग घेऊन भाविकांकडून पैसे न मागण्याचा निर्णय घेतलाय. पण त्याचं काय खरं नाही.

माझं घर वारकरी स्वाध्यायी. देव्हा-यात विठ्ठल रखुमाईची फोल्डरची पितळी मूर्ती. आजीची कार्तिकी वारी. आजीनंतर ती आईपप्पांनी चालवली. त्यामुळे जातीचा, धर्माचा,  गावाचा, कुळाचा कुठलाच फारसा ठळक असा वारसा नसतानाही किमान सातआठशे वर्षांचा सलग धागा नाळेला चिटकून आलाय. आईच्या पोटात असल्यापासून याच्यावरच मन पोसलं गेलंय. कळत नसल्यापासून पंढरपूरला जातोय. जिथपासून पांडुरंगाला भेटतोय, तेव्हापासून बडवे माहित्येत.

बडवे कसे काठीने मारायचे. बडव्यांच्या घरी राहताना कसा त्रास सहन करावा लागयचा. अशा अनेक कहाण्या लहानपणापासून ऐकलेल्या. महाराष्ट्र टाइम्सने पहिला सांस्कृतिक विशेषांक काढला. बहुदा पाच वर्षांपूर्वीच्या गुढीपाडव्याला. जयंत पवारांनी त्याचं संपादन केलं होतं. आपण ज्यांच्यासोबत काम केलं असं अभिमानानं सांगावं इतका हा मोठा माणूस. त्यांनी काढलेला एक विषय बडव्यांवर होता. तो विषय माझ्याकडे आला. हायकोर्टाने बडव्यांना विठ्ठल मंदिरातून तडिपाराचा आदेश दिला होता. त्यासंदर्भात लिहायचं होतं.

दोन दिवस पंढरपूरला गेलो. सुनील दिवाण मटाचे पंढरपूरचे वार्ताहर. ते आणि त्यांचे मित्र डॉ. महेश कुलकर्णी हे दोन्ही दिवस सोबत होते. बरीच माहिती जमवली. सविस्तर लेख लिहिला. त्यातला बराच कापावा लागला. लेख छापून आला. अंकाची आधीपासून जोरदार हवा होती. अंक स्टॉलवर आल्या आल्या संपला. ब-याच मित्रांनी फोन करून कौतूक केलं. विशेषतः अभिजीत ताम्हणेंनी केलेलं कौतूक आठवतंय. ही डॉक्युमेंट्री फॉर्ममधे लिहिल्यासारखं वाटतंय, ते म्हणाले. मी बरीच वर्षं टीवीत काम केलेलं. त्याचा प्रभाव मलाच कळला. आजवर तशा बातम्याच प्रामुख्याने लिहिल्या होत्या. त्यामुळे लेखासाठी ओळख नव्हती. या लेखाने ती मिळाली.

Wednesday, 9 March 2011

एका पाच वर्षं जुन्या बातमीची बातमी


आज त्याला पाच वर्षं झाली. तो नऊ मार्च मला चांगलाच आठवतोय. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानाच्या मोठ्या हॉलमधे राज ठाकरेंची प्रेस कॉन्फरन्स होती. त्यात मनसेचा झेंडा प्रकट झाला आणि नावही. तेव्हा शिवराजसेना वगैरे नाव चर्चेत होती. पण हे गृहनिर्माण सोसायटीसारखं वाटणारं नाव अजब वाटलं होतं. पण पुढे मनसे या त्याच्या तुकड्याने मजा आणली.  

राज ठाकरेंनी नऊचा मुहूर्त पुन्हा पाळला होता. ९ मार्च. त्याआधी आणि त्यानंतरची त्यांची प्रत्येक महत्त्वाची गोष्ट त्यांनी नऊचा मुहूर्त धरून केली. त्यावर मी नऊनिर्माण अशी बातमीही केली होती. ती गाजलीही. त्यातलं एक वाक्य कापण्यात आलं होतं, ते होतं, प्रबोधनकारांच्या नातवाने हे करावं हे आश्चर्यच!

Saturday, 26 February 2011

चंदूभाऊंच्या एका साध्या सत्यासाठी!


मुंबईत रवींद्र नाट्यमंदिराच्या मिनी थिएटरमधे चंदूभाऊंची मुलाखत आहे. प्रतिमाताई जोशी मुलाखत घेणार आहेत. डॉ. रवी बापट पुस्तकावर बोलणार आहेत. २८ फेब्रुवारी संध्याकाळी ६.३० वाजता हा कार्यक्रम आहे. चंदूभाऊंना ऐकणं ही खरंच पर्वणी आहे. तुम्हा सगळ्यांना या कार्यक्रमाचं माझ्याकडून निमंत्रण. या, आम्ही आपली वाट बघतोय.

Monday, 31 January 2011

मुंबईचे भय्ये


परवा घरी हळदीकुंकू होतं. मोग-याचे गजरे आणायचे होते. त्यासाठी ऑफिस सुटल्यावर दादर गाठलं. श्रीरंगच्या बाईकची सोबत होती. गजरे बनत होते. श्रीरंग म्हणाला आईस्क्रीम खाऊया. मला सर्दी होती. तेवढ्यातच मला समोरून एक नत्थुलालसारख्या मिशांचा माणूस दिसला. मला आठवलं. तू मुछवाला महादेव बघितलायस, मी श्रीरंगला विचारलं. चल, गरम दूध पिऊया, मी त्याला कबुतरखान्याच्या कोप-यावर घेऊन आलो.

दुकानाचं नाव नाही लक्षात राहत. पण लहानपणापासून मी ते दुकान बघतोय. मध्यंतरी चहाशिवाय करमायचं नाही, म्हणून चहा कॉफी सोडली होती. तेव्हा दादरमधे आल्यावर दूध आणि जिलेबी खायला प्यायला तिथेच जायचो. तेव्हा गल्ल्यावर बसणारे काका आता हारवाल्या फोटोफ्रेममधे गेलेत. त्यांच्याच शेजारी जुन्या जमान्यातला शंकर महादेवाचा फोटो आहे. चेह-यावर फार काही तेज नसलेल्या साध्या माणसाच्या चेह-यातला आपला वाटणारा महादेव आहे त्यात. त्याला छान मिशापण आहेत. बाजुलाच रविवर्मा, मुळगावकर यांच्या प्रभावातला शंकर पार्वतीचाही फोटो आहे. त्यातले शंकर अगदी क्लिन शेव्ड आणि मस्त डोले शोले बिल्टवाले आहेत. महादेव ते शंकर असं ट्रान्झिशन तिथं अगदी समोर दिसतं.

Thursday, 23 December 2010

किरोडी सिंग बैंसलांविषयी

आदिवासी ठरवा या मागणीसाठी गु्ज्जरांचं आंदोलन पुन्हा सुरू झालंय. राजधानी दिल्ली वारंवार जाम करण्याची ताकद त्यांच्यात आहे. आधी २००८ साली यापेक्षाही भयंकर आंदोलन केलं होतं. तेव्हा गुज्जरांचे नेते किरोडी सिंग बैंसलांचं व्यक्तिचित्र मटाच्या रविवार पुरवणीसाठी लिहिलं होतं. आता बैंसलांना पुन्हा पाहिल्यावर त्याची आठवण आली. सर्च करून शोधून काढलं. दिल्लीत दिडेक वर्षं राहिल्यामुळे गु्ज्जर माहीत होते. त्याचा लिहिताना फायदा झाला होता. पण त्याहीपेक्षा गुरू गुगलच कामाला आला. पण हे कर्नलसाहेब कोणत्या विचारधारेने प्रभावित आहेत, हे मात्र कळलं नाही. 

Monday, 6 December 2010

बाबासाहेबच बेस्टसेलर!

कालच देहू आळंदीला गेलो होतो. आज चैत्यभूमीवर जाणार आहे. आपल्यासाठी तिघेही माऊलीच. चैत्यभूमीवर जाऊन कधीही दर्शन घेत नाही मी. पण मैदानात भरलेल्या पुस्तकांच्या जत्रेत मात्र जातोच जातो. अखिल भारतीय साहित्य संमेलनानंतर हे राज्यातलं पुस्तकांचं सर्वात मोठं प्रदर्शन आहे, असा माझा एक दावा आहे. त्याचं रिपोर्टिंग मी गेल्या वर्षी केलं होतं. जागेअभावी बातमी खूप कापून लागली होती. ती इथे कट पेस्ट केलीय.

Monday, 29 November 2010

बंड पस्तिशीचं, जगन रेड्डीचंही !

आज जगन रेड्डीनं बंड केलं. त्याची एकूण स्टाईल बघितली की आपल्याला राज ठाकरेंच्या बंडाची आठवण होते. पण जगनचं बंड खूप मोठं आहे. वीस ते पंचवीस खासदार आजच त्याच्या खिशात आहे, असं म्हणतात. राज एकही खासदार निवडून आणू शकलेले नाहीत. पण त्यांच्यात एक महत्त्वाचं साम्य आहे, ते दोघांचंही वय ३८ आहे. फक्त हे दोघेच नाही, तर बाळासाहेब ठाकरे, शरद पवार, इंदिरा गांधी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, आणि अगदी महात्मा गांधीही... यांच्यात हाच एक समान दुवा आहे. पस्तिशीचा. ही यादी यशवंतरावांपासून कांशीरामांपर्यंत कितीही लांब खेचता येईल. या प्रत्येकाच्या बंडाची जातकुळी निराळी. त्यांच्यातला समान दुवा त्यांनी ज्या वयात बंड केलं त्याचाही आहे. ३५ ते ४० हे वय बंडखोरीचं, स्थित्यंतराचं. किमान भारतीय राजकारणात तरी ते वारंवार सिद्ध झालंय. राजच्या बंडाच्या वेळेस म्हणजे डिसेंबर २००५ ला मी लिहिलेला हा लेख. बंड पस्तिशीचं.

Wednesday, 17 November 2010

गांधींजींना तुकोबाराया भेटले होते

आज कार्तिकी. एक जैतुनबीवरचा लेख टाकलाय. हा आणखी एक लेख. मटाने ३० जानेवारी २००९ ला एडिट पेजवर छापला होता. या गांधी पुण्यतिथीनंतर दुस-याच दिवशी तुकाराम महाराजांची चारशेवी जयंती होती. गांधी आणि तुकारामांचं अद्वैत मला सर्वात आधी अनुभवायला मिळालं ते तुकाराम डॉट कॉम मुळे. मला वाटतं २००८च्या आषाढीत मी त्यावरूनच वारीच्या काळात गांधीजींचा तुकाराम ही सोळा लेखांची लेखमाला महाराष्ट्र टाइम्स डॉट कॉमवर लिहिली होती.