नुकताच कोकणात जाऊन आलो. कोकणात मूळ गाव कोटकामते, तालुका देवगड, जिल्हा सिंधुदूर्ग. पण गाव तसं नावापुरतं. मी नवसाचा, म्हणून तीन वर्षांचा असताना कुलदेवी भगवतीला दर्शनाला नेण्यात आलं होतं. त्यानंतर गावी गेलो ते थेट लग्न झाल्यावर. त्यामुळे मी राहतो त्या कांदिवलीलाच आपला गाव मानत आलो. पुढे पत्रकारितेत आलो. कधी साहित्य संमेलनासाठी तर कधी निवडणुकांसाठी कोकणात फिरलो. कशामुळे माहीत नाही, पण आतून जाणवत राहिलं की आपली नाळ इथेच कुठेतरी लाल मातीत पुरलेली आहे.
कोकणाचं गारुड एकदा तुमच्यावर भारलं की मग इथल्या दगडमातीपासून भुताखेतांपर्यंत सगळं आपलं वाटायला लागतं. तोच आपलेपणा घेऊन मी नारायण राणे यांची मालवण मतदारसंघातली पोटनिवडणूक कव्हर करायला गेलो होतो. साल बहुदा २००५. राणेंनी नुकतंच सेनेविरुद्ध बंड केलं होतं. मुंबईपासून बांद्यापर्यंत सारा कोकणपट्टा राणेमय झाला होता. मी तिथे पोचल्यावर माझ्या डोक्यातल्या कोकणापेक्षा वेगळंच चित्र वेगळंच दिसत होतं. मी बिनधास्त राणेंच्या राड्यांच्या बातम्या द्यायला सुरुवात केली. अनेक लोक मला समजवायला येऊ लागले. मी काय करतो, कोणाला भेटतो, यावर नजर ठेवली जात होती. अगदी ज्योतिर्भास्कर जयंत साळगावकरांनीही मालवणात कोणतीही दादागिरी होत नसल्याचा लेख आमच्याच पेपरात लिहून मला जणू व्हिलन ठरवला होता. पण मला तिथे दहशत पावलापावलावर जाणवत होती. खासदारांनाही मारहाण होत होती. मी त्यावर बरंच लिहिलं. एक रोंबाट नावाचा कॉलमही लिहिला होता. हा सगळा अनुभव खूप मस्त होता.