Thursday, 21 April 2011

वेलकम इडियट्स


गेल्या वीकेण्डला आंबाजोगाईला गेलो होतो. लातूरमधे महारुद्र मंगनाळेंच्या बातमीमागची बातमीया साप्ताहिकाच्या बाराव्या वर्धापनदिनाचा कार्यक्रम होता. तिथून अमरजींना म्हणजे अमर हबीबांना भेटण्यासाठी आंबाजोगाईला गेलो होतो. अमरजींबरोबर दोन तासदेखील घालवणं हा श्रीमंत करणारा अनुभव असतो. इथे तर अमरजी दोन दिवस सोबत होते. खूप मजा आली.

कसा काय आठवत नाही, पण चर्चेत थ्री इडियट्सचा संदर्भ आला. माझ्या डोक्यात विचार आला की समोर हा एक मोठा इडियटच उभा आहे. नोकरी न करता सामाजिक कामात आयुष्य घालवणारा हा माणूस. अनेक मोठमोठ्या लोकांसोबत मी फिरलोय. त्यांना लांबून जवळून बारकाईनं पाहणं हा कामाचाच भाग. पण अमरजींच्या तोलामोलाचा माणूस महाराष्ट्राभरात मला तरी आजघडीला माहीत नाही. यात अतिशयोक्ती बिलकूल नाही. त्यांना भेटलं की एक ओतप्रोत आनंद मिळतो. आपण स्वतःला मोठे मानणारे सगळ्याच बाबतीत किती छोटे आहोत, हे कळतं. पण त्यातून कोणताही इन्फिरॅरिटी कॉम्प्लेक्स येत नाही. उलट मोठं बनायची प्रेरणा मिळते.

अमरजींनी प्रस्थापित मोठेपणाचा वाराही चुकून लागू नये यासाठी डोळ्यात तेल टाकून दक्षता बाळगलीय. आपल्याला कुणी मोठं म्हणालं तर आभाळच कोसळेल की काय, असं ते साधेपणाने वागत राहिले. त्यांनी त्यांच्या सोबतच्या कितीतरी माणसांचं जगणं समृद्घ बनवलंय. अमरजींचं बोट पकडून विचार करायला शिकलेली माझ्यासारखी पत्रकार किंवा कार्यकर्त्यांची एक पिढीच महाराष्ट्रात आहे. त्यांना आज साठीच्या जवळ आलेलं असताना त्यांना आपण समाज म्हणून काय दिलं?  अनेक खुज्यांच्या वाटेला सहजपणे जातो तो मानमराताब तरी. पण कधी त्याची अपेक्षाही केली नाही आणि न मिळाल्याचं वैषम्यही जवळपासही कधी भरकटलं नाही. निस्वार्थपणे जोडलेली माणसं मात्र जिवाला जीव देण्यासाठी सोबत आहेत. आणखी काय हवं.

Thursday, 7 April 2011

पुलं आणि भीमराव पांचाळे


कधीतरी आपणच आपल्या नकळत लिहिलेलं एखादं वाक्य आपल्यालाच आवडून जातं. ‘भीमराव पांचाळे या चार नि तीन सात शब्दांत गझल मराठीत गाते,’ हे वाक्य त्यातलंच. भीमरावांच्या मुलाखतीच्या इण्ट्रोची सुरुवात अशी लिहिली होती. मुलाखत स्मरणिकेसाठी होती. स्मरणिका भीमरावांच्या साठीच्या कार्यक्रमासाठी.

कार्यक्रम छानच झाला. रवींद्र नाट्यमंदिर संपूर्ण भरून गेलं होतं. खाली आणि गॅलरी संपूर्ण. पासेस आधीच संपले होते. त्यामुळे लोकांनी आत शिरण्यासाठी रांगा लावल्या होत्या. खुर्च्या भरल्या होत्या. घरीही कधीच खाली बसली नसतील अशी माणसं बायकापोरांसकट जमिनीवर बसली होती. गर्दी जशी भरगच्च तशीच त्यांची दादही. भीमरावांची प्रत्येक जागा दाद घेत होती. अगदी त्यांचं सत्कार समारंभातलं हसणंही दाद घेत होतं. भीमरावांचं कौतूक सुरू झालं की ते अंग चोरून ऐकायचे. कुणी कौतूक केलं की ते कान पकडून तौबा करायचे. हे सारं छान होतं. अगदी सुगंधी.

Friday, 1 April 2011

आमदार झोपा काढत आहेत


पंधरा दिवस एक ईमेल सोडला तर इंटरनेटकडे बघितलंच नव्हतं. त्यामुळे जवळपास पंधरा दिवसांपूर्वी नवशक्तितल्या कॉलमात लिहिलेला कॉलम टाकायचा राहून गेला होता. लेखाचा विषय खरं तर आमदारांच्या झोपेवर होता. अनिल काकोडकरांच्या भाषणात अनेक आमदार डुलक्या काढताना टीव्हीवर बघितलं. त्याच्यावर लिहायला बसलो. हा कार्यक्रम वि. स. पागें अभ्यास केंद्राच्या उद्घाटनाचा होता म्हणून त्यांच्या भाषणांचा संग्रह वाचायला घेतला. रेफरन्ससाठी म्हणून पुस्तक हातात घेतलं पण बरंच पुस्तक वाचून काढलं. त्यातला बराचसा भाग आधीच वाचलेला होता. तो रिफ्रेश झाला. त्यानंतर लिहिलेल्या लेखावर वि. स. पागेच छा गये. मूळ विषय बाजूलाच राहिला. 

लेख नवशक्तित छापून आला. संध्याकाळी एका वयस्कर गृहस्थांचा फोन आला होता. बहुतेक कल्याणचे सामंत. ते पागेंचे दूरचे नातेवाईक. त्यांना पागेंवर कुणीतरी लिहिलं याचा खूप आनंद झाला. मलाही खूप आनंद झाला. पागेंसारखी सगळीच माणसं आपण आपली सगीसोयरीच मानतो.

Thursday, 17 March 2011

बडव्यांना बडवायलाच पायजे


इन्कम टॅक्सची धाड पडले की भलभले सरळ होतात. जयराज फाटकांसारख्यांचाही बुरखा टराटरा फाटतो. कलमाडी, ए. राजा, हसन अलीसारखे मोठे माशेही गळपटतात. पण या सगळ्यांपेक्षाही पंढरपूरच्या बडव्यांवर पडलेल्या इन्कम टॅक्सच्या धाडी धक्कादायक आहेत. या सगळ्या घपल्यांपेक्षा पंढरपूरच्या बडव्यांचा फ्रॉड मोठा आहे. आता या धाडींमुळे ते वठणीवर आलेत. त्यांनी म्हणजे बडवेसमाजानं मिटिंग घेऊन भाविकांकडून पैसे न मागण्याचा निर्णय घेतलाय. पण त्याचं काय खरं नाही.

माझं घर वारकरी स्वाध्यायी. देव्हा-यात विठ्ठल रखुमाईची फोल्डरची पितळी मूर्ती. आजीची कार्तिकी वारी. आजीनंतर ती आईपप्पांनी चालवली. त्यामुळे जातीचा, धर्माचा,  गावाचा, कुळाचा कुठलाच फारसा ठळक असा वारसा नसतानाही किमान सातआठशे वर्षांचा सलग धागा नाळेला चिटकून आलाय. आईच्या पोटात असल्यापासून याच्यावरच मन पोसलं गेलंय. कळत नसल्यापासून पंढरपूरला जातोय. जिथपासून पांडुरंगाला भेटतोय, तेव्हापासून बडवे माहित्येत.

बडवे कसे काठीने मारायचे. बडव्यांच्या घरी राहताना कसा त्रास सहन करावा लागयचा. अशा अनेक कहाण्या लहानपणापासून ऐकलेल्या. महाराष्ट्र टाइम्सने पहिला सांस्कृतिक विशेषांक काढला. बहुदा पाच वर्षांपूर्वीच्या गुढीपाडव्याला. जयंत पवारांनी त्याचं संपादन केलं होतं. आपण ज्यांच्यासोबत काम केलं असं अभिमानानं सांगावं इतका हा मोठा माणूस. त्यांनी काढलेला एक विषय बडव्यांवर होता. तो विषय माझ्याकडे आला. हायकोर्टाने बडव्यांना विठ्ठल मंदिरातून तडिपाराचा आदेश दिला होता. त्यासंदर्भात लिहायचं होतं.

दोन दिवस पंढरपूरला गेलो. सुनील दिवाण मटाचे पंढरपूरचे वार्ताहर. ते आणि त्यांचे मित्र डॉ. महेश कुलकर्णी हे दोन्ही दिवस सोबत होते. बरीच माहिती जमवली. सविस्तर लेख लिहिला. त्यातला बराच कापावा लागला. लेख छापून आला. अंकाची आधीपासून जोरदार हवा होती. अंक स्टॉलवर आल्या आल्या संपला. ब-याच मित्रांनी फोन करून कौतूक केलं. विशेषतः अभिजीत ताम्हणेंनी केलेलं कौतूक आठवतंय. ही डॉक्युमेंट्री फॉर्ममधे लिहिल्यासारखं वाटतंय, ते म्हणाले. मी बरीच वर्षं टीवीत काम केलेलं. त्याचा प्रभाव मलाच कळला. आजवर तशा बातम्याच प्रामुख्याने लिहिल्या होत्या. त्यामुळे लेखासाठी ओळख नव्हती. या लेखाने ती मिळाली.

Monday, 14 March 2011

या मारुतीचे बाप प्रबोधनकार!


प्रबोधनकारांवर लिहिण्यासाठी मी काहीना काही निमित्ताची वाटच बघत असतो. थोडा जरी चान्स मिळाला तरी सोडत नाही. कुठे कुठे भाषणाला बोलवतात, तेव्हा थोडीशी जरी जागा असेल तर प्रबोधनकार आपोआप घुसतातच. कारण एवढंच की हा डोंगराएवढा माणूस मला नेहमी आपला वाटत आलाय. कुठेच कुठल्या पठडीत अडकला नाही. प्रबोधनकारांच्या एकोणनव्वदाव्या वाढदिवसाला मोठा कार्यक्रम झाला होता. इतकी वर्षं झाली पण हा आंबा कधीच नसला नाही, धों. वि. देशपांडेंनी असं कौतूक केलं. बाळासाहेब कार्यक्रमाचं निवेदन करत होते. हा आंबा कधीच एकाच टोपलीत राहिला नाही, म्हणून नासला नाही, त्यांनी म्हटलं.

फक्त विचारधारेचंच नाही तर सगळं आयुष्यच ते विविध अंगांनी फुलून जगत राहिले. माडासारखं उंच वाढायचं की वटवृक्षासारखं बहरायचं, हे आपल्यालाच ठरवावं लागतं. प्रबोधनकारांसारखा शेकडो दिशांनी वाढलेला वटवृक्ष माझ्या परिचयाचा दुसरा नाही. प्रबोधनकारांवरची वेबसाईट prabodhankar.com बनवताना हा वटवृक्ष जवळून बघायची संधी मिळाली. त्याच्या पारंब्यांवर मनसोक्त हिंदकळलोही. पण तरीही हा माणूस फारसा काही कळलेला नाही. साईटचं अजून खूप काम उरलंय. सुरू आहे. लवकरच पूर्ण होईल. त्यानंतर प्रबोधनकारांविषयी आणखी नवे प्रोजेक्टही हाती घ्यायचेत.

Friday, 11 March 2011

जनगणना की उद्याच्या शोषणाची तयारी?


जनगणनेतून नवे आकडे समोर येणार आहेत. वाढलेली गरिबी, वाढलेली बेकारी पाहून सरकारी यंत्रणेच्या मनातल्या मनात गुदगुल्या होणार आहेत. त्यातून भ्रष्टाचारातल्या टक्केवारीचे वाढलेले आकडे त्यांच्या डोळ्यासमोर नाचणार आहेत. उद्याच्या नव्या शोषणाची तयारी मोठ्या उत्साहाने सुरू आहे. त्या उत्साहात भर घालण्यासाठी आपणही बेघरांच्या जनगणनेचे फोटो पाहून आपण खूश होणं अत्यावश्यक नाही का

हा इण्ट्रो होता, गेल्या शनिवारी नवशक्तितल्या माझ्या कॉलमात छापून आलेल्ला लेखाचा. बेघरांच्या फूटपाथांवर सुरु असलेल्या जनगणनेचे नाईट मोडमधले फोटो बघितले. या विषयावर लिहायचं ठरवलं. गुगलवर सर्च करून, ही जनगणना कऱणा-यांशी बोलून माहिती मिळवली. बरीच आकडेवारी जमा केली. पण प्रत्यक्षात लिहायला बसल्यावर त्यापैकी काहीच वापरलं नाही. जे जे वाटत होतं, ते सरळ लिहित गेलो. आकडे बाजूलाच राहिले. उगाच काहितरी मनातलं कागदावर उतरलं. सगळं मलाच अनपेक्षित होतं. चांगलं झालंय की वाईट मला माहीत नाही. उगाच खूप निगेटिव झालंय का, माहीत नाही.

Thursday, 10 March 2011

मनसे रे!


काल संध्याकाळपासून आपल्या या ब्लॉगचा टीआरपी तेजीत आहे. ठाकरे या नावाला ती क्रेझ आहेच. म्हणूनच राज ठाकरेंचा नवा पक्ष आला, येणार होता, नवा होता, राडा करत होता. तेव्हा आम्ही मीडियावाल्यांनी त्यात पोटभर हात धुवून घेतले. जणू आकाशातून कुणी देवदूत आलाय आणि तो जग बदलवून टाकणार आहे, अशा थाटात मोठमोठे विचारवंत म्हणवले जाणारे ज्येष्ठ पत्रकार लिहित, बोलत, वावरत होते.

मनसे घडत असताना या सगळ्यात काहीच दम नाहीय, हे माझ्यासाऱख्या छोट्या पत्रकारालाही कळत होतं. तर मोठमोठ्यांना नक्की कळत असणार. तरीही शिसारी येईपर्यंत राज यांचं गुणगाण सुरू होतं. राजसत्ता, राज माझा, राज काळ अशी पेपर आणि चॅनलांची नावं बदलल्यात जमा होती. विशेष म्हणजे मटाची सोनिया टाइम्स आणि जय महाराष्ट्र टाइम्स अशी यापूर्वी हेटाळणी करणारे त्याकाळात शांत होते. उलट लाळघोटेपणा करण्यात आघाडीवर होते. राज शब्दांच्या बुडबुड्यावर स्वप्न विकत आहेत, हे त्या सगळ्यांना निश्चित कळत असणारच. पण तरीही कुणी बोलत नव्हतं, लिहित नव्हतं.

Wednesday, 9 March 2011

टॅक्सी नंबर नौ दो ग्यारह


वसंत म्हणून माझा एक मित्र आहे. साधा इंजिनियर. त्याने माझं लिखाण वाचलं असेल असं मला कधी वाटलंही नव्हतं. आता तसा आमचा संपर्कही नव्हता. माझ्याकडे त्याचा नंबरही नव्हता. आजही नाही. पण गेल्या महिन्यात त्याचा फोन आला. म्हणाला आज तारिख काय आहे माहित्येय. मी कामात होतो. म्हटलं काहीतरी वात्रटपणा असणार. पण मित्र एवढ्या दिवसांनी बोलतोय म्हणून उत्तर दिलं. नऊ फेब्रुवारी. त्याने वाक्य पूर्ण केलं दोन हजार अकरा. आजची तारिख म्हणजे नौ दो ग्यारा. अशी तारिख हजार वर्षांनी पुन्हा येईल. मी फोनदेखलं हसून हो म्हटलं. ही तारिख वाचून मला तुझी आठवण झाली, तो म्हणाला माझी ट्यूब काही पेटली नाही. तू ती बातमी लिहिली होतीस ना नौ दो ग्यारा. राज उद्धववर.

इतका वेळ तो जे बोलत होता त्याचा मला आता साक्षात्कार झाला. बातमी नाही, माझा लेख होता तो विंडो सीट कॉलमातला, टॅक्सी नंबर नौ दो ग्यारह. उद्धव आणि राज वेगळे असले तरी त्यांना आज ना उद्या एकत्र यावं लागणार, असं माझं लॉजिक मी त्यात मांडलं होतं. हा निव्वळ हायपोथिसिस आहे. कुणाला मान्य होईल, कुणाला नाही. आपल्याला काय दोन्ही प्रतिक्रिया मान्य.

एका पाच वर्षं जुन्या बातमीची बातमी


आज त्याला पाच वर्षं झाली. तो नऊ मार्च मला चांगलाच आठवतोय. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानाच्या मोठ्या हॉलमधे राज ठाकरेंची प्रेस कॉन्फरन्स होती. त्यात मनसेचा झेंडा प्रकट झाला आणि नावही. तेव्हा शिवराजसेना वगैरे नाव चर्चेत होती. पण हे गृहनिर्माण सोसायटीसारखं वाटणारं नाव अजब वाटलं होतं. पण पुढे मनसे या त्याच्या तुकड्याने मजा आणली.  

राज ठाकरेंनी नऊचा मुहूर्त पुन्हा पाळला होता. ९ मार्च. त्याआधी आणि त्यानंतरची त्यांची प्रत्येक महत्त्वाची गोष्ट त्यांनी नऊचा मुहूर्त धरून केली. त्यावर मी नऊनिर्माण अशी बातमीही केली होती. ती गाजलीही. त्यातलं एक वाक्य कापण्यात आलं होतं, ते होतं, प्रबोधनकारांच्या नातवाने हे करावं हे आश्चर्यच!

Thursday, 3 March 2011

इम्प्लिमेण्टिंग मराठी बाणा


एक डिसेंबर हा जागतिक एड्स दिन. त्यादिवशी माझा मित्र शैलेश निपुणगेचा वाढदिवस असतो. कॉलेजात असताना त्याला जागतिक एड्स दिनाच्या शुभेच्छा असं लिहिलेलं ग्रिटिंग दिलं होतं. त्यामुळे हा एक दिवस सोडला, तर बाकीचे असे जागतिक वगैरे दिनही लक्षात नसतात आणि कुणाच्या वाढदिवसाच्या तारखाही.

आता लग्न झाल्यामुळे बायकोचा, मुलाचा आणि लग्नाचा वाढदिवस वगैरे लक्षात ठेवावा लागतो. बाकी स्वतःचा वाढदिवसही लक्षात नाही, अशीही वर्षं गेली. तारखा किंवा एकूणच आकड्यांशी आपला आकडा तसा छत्तीसचाच. त्यामुळे विशेष दिवसांचं वगैरे कौतूक असायचा प्रश्नच नाही. आता मराठी भाषा दिनाचंही तसंच. मला वाटतं मराठी बाणा जपण्यासाठी आपण कोणत्याही दिवशी थोडसं जरी पाऊल उचललं, तर तो आपल्यासाठी मराठी भाषा दिनच.