सचिन आज लवकर आऊट झाला. पण आता चिंता नाही. आठव्या नंबरपर्यंत आपली बॅटिंग ऑर्डर तगडी आहे. अशावेळेस पाकिस्तानविरोद्धची टेस्ट आठवते. समोर एकामागून एक विकेट पडत होत्या. सचिन एकटा उभा होता. त्याने सेंच्युरीही केली. पण तो आऊट झाला. आणि जिंकण्यासाठी हवे असलेले वीस पंचवीस रनही पुढचे बॅट्समन करू शकले नव्हते.
आपल्या टीममधे किलर इन्स्टिंक्ट का नाही, असं तेव्हा आपण विचारायचो. कारण तो एकटाच टिच्चून खेळायचा. पण आता त्याचा खेळ बघत वाढलेली पिढी जन्माला आलीय. ती त्याच्यासोबत खेळतेय. म्हणून आज टीम इंडिया जे काही आहे, त्यात सचिनचा वाटा मोठा आहे.
फक्त त्याच्या टीममेंबरच कशाला सगळा भारत त्याच्यासोबत मोठा झालाय. तीनेक पिढ्यांनी तरी त्याला आपल्या घरातलाच एक मानलाय. त्याच्या आनंदात सगळा भारत खुष असतो. त्याच्या दुःखात सगळा भारत सुतकात असतो. इतकं प्रेम मिळेल असं कर्तृत्व बाकी कुणाचं आहे का? नाही आठवत नाव. म्हणूनच सचिनला भारतरत्न मिळो अथवा नाही, आपल्याला फारसं काही घेणंदेणं नाही. तो या सगळ्याच्या खूप पुढे पोहोचलाय. आणि त्याच्याबरोबर आपल्यासारखे त्याचे चाहतेही.