Friday 30 March 2012

आयक्यू कायकू..?


या लेखालाही आता बरेच दिवस झालेत. फेब्रुवारी महिन्यातला हा लेख. निवडणुका नुकत्याच आटोपल्या होत्या, तेव्हा हा लेख लिहिला होता. विषय माझा नेहमीचा आवडीचा, राज ठाकरे, मनसे. ज्येष्ठ पत्रकार अभिजीत घोरपडे यांची एक फेसबूकवरची पोस्ट वाचली आणि धक्का बसला. त्यांना राज यांच्या पत्रकार परिषदेत आलेला अनुभव त्यात लिहिलाय. असला अनुभव काही नवीन नाही, पण त्याला अभिजीतने तोंड फोडलं. मला वाटलं अभिजीतचा पेपर लोकसत्ता त्याची दखल घेईलच. पण तसं काही दिसलं नाही. म्हणून म्हटलं आपण लिहुयाच.

या लेखाचा इण्ट्रो होता, या लेखात माझं काहीच नाही. ज्येष्ठ पत्रकार अभिजीत घोरपडे यांनी फेसबूकवर लिहिलेली एक पोस्ट आणि त्यावरच्या प्रतिक्रिया. आपलं राजकारण, लोकशाही, पत्रकारिता आणि एकूणच मराठी समाज याविषयी खूप काही सांगणारं हे सगळं.’ लेखाच्या शैलीविषयी मला खूपच कौतुकाचे फोन आले.

लेख छापून आल्यावर पुढच्याच आठवड्यात भाजपच्या एका नेत्याशी मी फोनवर बोलत होतो. कशाला नेहमी राजसाहेबांच्या विरोधात लिहिता, तो म्हणाला. यात जाब विचारणं नव्हतं तर एक जवळचा मित्र म्हणून सहज प्रेमाने केलेली चौकशी होती. काही चुकीचं लिहिलंय का, मी माझ्यापरीनं उत्तर दिलं. एखाद्या समाजाविरुद्ध द्वेष निर्माण करण्याला इतर कुणी विरोध करत नाही, म्हणून मी करतो, वगैरे वगैरे. उत्तर देताना मला मजा आली. गंमत वाटली. लेख पुढे कटपेस्ट.

Thursday 29 March 2012

आपला अखिलेश कुठेय?


हा लेख लिहून तसे बरेच दिवस झाले. आता अखिलेश यादव यूपीचे सीएम बनून स्थिरस्थावर झालाही असेल. जेव्हा तो सीएम बनलाही नव्हता तेव्हा लिहिलेला हा लेख. म्हणजे नुकताच यूपीचा निकाल लागला होता. मुलायम स्वतः मुख्यमंत्री बनणार की अखिलेशला बनवणार, यावर चर्चा सुरू होत्या. लेखाचा इण्ट्रो होता, अखिलेश यादवांना अवाढव्य यूपीने खणखणीत बहुमत दिलं. पण सगळा महाराष्ट्र विश्वास ठेवू शकेल, असा एकही अखिलेश आपल्याकडे मात्र नाही. बुटकबैगणांनाच आपण दिग्गज मानत आले, त्याचा तर हा परिणाम नाही?’

लेखाला अपेक्षेपेक्षा खूप चांगला रिस्पॉन्स आला. तीनेक दिवस वाचक कुठून कुठून फोन करत होते. मजा आली. लेखातलं नेमकं काय अपिल होतंय, ते कळत नव्हतं. काहींना महाराष्ट्र आणि यूपीची तुलना आवडली असावी. कुणाला ठाकरे आणि पवारांची केलेलं मूल्यमापन आवडलं असावं. धारणांना थोडा धक्का बसला की लेख आवडतात बहुतेक. मलाही आपल्या धारणा तपासून घ्यावात असं वाटतं नेहमी. पण ते क्वचितच जमतं. यूपी, पवार, ठाकरे, मराठी माणूस या सगळ्यांच्याविषयी असलेल्या माझ्या धारणाही या निमित्ताने थोड्या साफसूफ झाल्या. लेख पुढे आहेच.