मी पत्रकार. स्वतःला क्रिएटिव म्हणवणारा. पण सगळी क्रिएटिविटी धावपळीची.
त्यावर विचार करायला वेळ कुठे असतो?
म्हणून स्वतःच्याच लिहिण्याविषयी हे लिहिणं. थोडा विचार करता यावा म्हणून हा ब्ल़ॉगोटोप.

Friday, 30 March 2012

आयक्यू कायकू..?


या लेखालाही आता बरेच दिवस झालेत. फेब्रुवारी महिन्यातला हा लेख. निवडणुका नुकत्याच आटोपल्या होत्या, तेव्हा हा लेख लिहिला होता. विषय माझा नेहमीचा आवडीचा, राज ठाकरे, मनसे. ज्येष्ठ पत्रकार अभिजीत घोरपडे यांची एक फेसबूकवरची पोस्ट वाचली आणि धक्का बसला. त्यांना राज यांच्या पत्रकार परिषदेत आलेला अनुभव त्यात लिहिलाय. असला अनुभव काही नवीन नाही, पण त्याला अभिजीतने तोंड फोडलं. मला वाटलं अभिजीतचा पेपर लोकसत्ता त्याची दखल घेईलच. पण तसं काही दिसलं नाही. म्हणून म्हटलं आपण लिहुयाच.

या लेखाचा इण्ट्रो होता, या लेखात माझं काहीच नाही. ज्येष्ठ पत्रकार अभिजीत घोरपडे यांनी फेसबूकवर लिहिलेली एक पोस्ट आणि त्यावरच्या प्रतिक्रिया. आपलं राजकारण, लोकशाही, पत्रकारिता आणि एकूणच मराठी समाज याविषयी खूप काही सांगणारं हे सगळं.’ लेखाच्या शैलीविषयी मला खूपच कौतुकाचे फोन आले.

लेख छापून आल्यावर पुढच्याच आठवड्यात भाजपच्या एका नेत्याशी मी फोनवर बोलत होतो. कशाला नेहमी राजसाहेबांच्या विरोधात लिहिता, तो म्हणाला. यात जाब विचारणं नव्हतं तर एक जवळचा मित्र म्हणून सहज प्रेमाने केलेली चौकशी होती. काही चुकीचं लिहिलंय का, मी माझ्यापरीनं उत्तर दिलं. एखाद्या समाजाविरुद्ध द्वेष निर्माण करण्याला इतर कुणी विरोध करत नाही, म्हणून मी करतो, वगैरे वगैरे. उत्तर देताना मला मजा आली. गंमत वाटली. लेख पुढे कटपेस्ट.

Thursday, 29 March 2012

आपला अखिलेश कुठेय?


हा लेख लिहून तसे बरेच दिवस झाले. आता अखिलेश यादव यूपीचे सीएम बनून स्थिरस्थावर झालाही असेल. जेव्हा तो सीएम बनलाही नव्हता तेव्हा लिहिलेला हा लेख. म्हणजे नुकताच यूपीचा निकाल लागला होता. मुलायम स्वतः मुख्यमंत्री बनणार की अखिलेशला बनवणार, यावर चर्चा सुरू होत्या. लेखाचा इण्ट्रो होता, अखिलेश यादवांना अवाढव्य यूपीने खणखणीत बहुमत दिलं. पण सगळा महाराष्ट्र विश्वास ठेवू शकेल, असा एकही अखिलेश आपल्याकडे मात्र नाही. बुटकबैगणांनाच आपण दिग्गज मानत आले, त्याचा तर हा परिणाम नाही?’

लेखाला अपेक्षेपेक्षा खूप चांगला रिस्पॉन्स आला. तीनेक दिवस वाचक कुठून कुठून फोन करत होते. मजा आली. लेखातलं नेमकं काय अपिल होतंय, ते कळत नव्हतं. काहींना महाराष्ट्र आणि यूपीची तुलना आवडली असावी. कुणाला ठाकरे आणि पवारांची केलेलं मूल्यमापन आवडलं असावं. धारणांना थोडा धक्का बसला की लेख आवडतात बहुतेक. मलाही आपल्या धारणा तपासून घ्यावात असं वाटतं नेहमी. पण ते क्वचितच जमतं. यूपी, पवार, ठाकरे, मराठी माणूस या सगळ्यांच्याविषयी असलेल्या माझ्या धारणाही या निमित्ताने थोड्या साफसूफ झाल्या. लेख पुढे आहेच.

Thursday, 23 February 2012

शिवाजी आमुचा बाणा


रविवारी शिवजयंतीच्या दिवशी हा लेख आमच्या नवशक्तित छापून आला. मला दिवसभर लेख आवडल्याचे एसेमेस येत होते. दुस-या दिवशी आमच्या ऑफिसात कुणा पुरोहित नावाच्या माणसाच्या फोन आला होता. तो काहितरी ब्राम्हण जातीच्यांची संघटना चालवतो म्हणे. माझा मोबाइल नंबर लेखाखाली असूनही त्याने मला फोन केला नाही. काही पत्रंही पाठवलं नाही. तो मला भेटायलाही येणार होता. पण आला मात्र नाही. त्याचं म्हणणं असं की हा लेख ब्राम्हणविरोधी आहे. तसंच संत नामदेवांवर लिहिलेला लेखही ब्राम्हणविरोधी आहे. त्या लेखाचं पेपरात छापून आलेलं हेडिंग तर 'नामा म्हणे' होतं. मला हसूच आलं. मी अस्वस्थही झालो. तुम्हीच सांगा हे लेख ब्राम्हणविरोधी आहेत का. लेख जशाच्या तशा कटपेस्ट केलाय. 

Thursday, 16 February 2012

एल्गार येत आहे

आज महापालिका निवडणुकांचा दिवस. निवडणुका कव्हर करणं हा माझ्यासाठी आनंदाचा भाग होता आणि आहे. आपल्या आसपासचे लोक नेमका काय आणि कसा विचार करतात, ते आपल्याला कळू शकतं का, हे समजून घ्यायला मिळतं. आपण किती जमिनीवर आहोत, त्याचाही ताळा लागतो. याच संदर्भात मी महिनाभरापूर्वी लेख लिहिला होता. तो कटपेस्ट करतोय.

Wednesday, 15 February 2012

गझलनवाझ


गेल्या महिन्यात गोव्यात अखिल भारतीय गझल संमेलन पार पडलं. हे सहावं संमेलन. याआधीची पाचही माझी चुकली होती. त्यामुळे काही झालं तरी हे चुकवायचं नाही ठरलं होतं. म्हणून गेलोच. समृद्ध होण्याचे अनेक क्षण अनुभवले. त्या रविवारची आमची नवशक्तिची पुरवणी आम्ही गझल संमेलन विशेषांकच केला होता. त्यात माझ्या कॉलमात मी गझलनवाज भीमराव पांचाळेंवर लेख लिहिला होता. तो कटपेस्ट करतोय.

तुम कहां के बम्मन


संत नामदेव. माझा फार काही अभ्यास नाही. तरीपण नामदेवांविषयी लिहायचा चान्स मिळाला की मी सोडत नाही. यावेळा साहित्य संमेलनाच्या उद्घाटनातले प्रमुख पाहुणे डॉ. महीप सिंगांनी हा चान्स मिळवून दिला. मी वारंवार इथेतिथे नामदेवांविषयी लिहिलंय. पण संपूर्ण एक लेख लिहिण्याचा प्रसंग आला नव्हता. तो इथे मिळाला.


लोकप्रभाचा दासनवमी विशेषांक वाचून हा लेख लिहायचं नक्की केलं. समर्थ रामदासांविषयी मला आदर आहे. पण समर्थांना मोठं ठरवण्यासाठी इतर संतांना छोटं का ठरवायचं. लोकसत्ता लोकप्रभाचे संपादक गिरीश कुबेर यांनी हा उपद्व्याप या अंकातल्या लेखात केला आहे. त्याची पार्श्वभूमीही या लेखाला आहे. या लेखाच्या शेवटच्या पॅरेग्राफमधला उल्लेख गिरीश कुबेरांच्याच लेखाचा आहे. 

Wednesday, 8 February 2012

संपादक वाचतात...

कोण काय वाचतंय, असं सांगणारे कॉलम छापून येतात कुठे कुठे. रविवार पुरवण्यांत, मासिकांत वगैरे. ते मी आवर्जून वाचतो. आता मलाच तसं लिहायला सांगेल असं कधी वाटलं नव्हतं. युनिक फीचर्सने एक ऑनलाईन संमेलन भरवलंय. त्यात संपादक काय वाचतात असा एक कॉलम आहे. त्यात कुमार केतकर, अरुण खोरे अशा दिग्गजांबरोबर माझंही नाव. बरं वाटलं.

मजा येते आपलंच वाचून. तुम्हीही http://uniquefeatures.in/e-sammelan-12/%E0%A4%B8%E0%A4%9A%E0%A4%BF%E0%A4%A8-%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A4%AC इथे क्लिक करून मी काय वाचत होतो ते वाचू शकता.

युनिक फीचरवाल्यांनी माझ्यासारख्या नव्या संपादकाला सांगितलं याचा अर्थ अनेक मोठमोठ्या संपादकांनाही सांगितलं असणार. त्यांनी का लिहिलं नसावं, मला कळत नाही.


पुन्हा पुन्हा 'राडा'


मनोविकास प्रकाशनाचे अरविंद पाटकर. त्यांचा अचानक फोन आला. सोबत शब्द प्रकाशनचे येशू पाटील होते. शब्द समग्र भाऊ पाध्ये काढताहेत. मी येशू पाटलांना सांगितलं याचा सगळ्यात जास्त आनंद सचिनला होईल. म्हणून फोन लावून दिल. बोला त्यांच्याशी... मी बोललो. मला खूप आनंद झाला. पार्टी करावी. पेढे वाटावेत. आनंद साजरा करावा असं वाटलं.

समग्रमधलं पहिलं पुस्तक राडा आल्याचं कळलं. एका रविवार पुरवणीत राडाच्या दुस-या आवृत्तीतली नेमाडेंची प्रस्तावना छापून आली होती. पुस्तक विकत घेतलं. पुन्हा वाचून काढलं. दोन बैठकीत अधाशासारखं वाचून काढलं. याआधीही कितीदातरी असंच अधाशासारखं वाचून काढलंय. त्यावर लिहिलं. माझ्या आठव़ड्याच्या कॉलमात.

एक राजकीय बातमीदार म्हणून शिवसेना हा माझ्या आवडीचा विषय. मी त्यावरचं बरंच वाचून काढलंय. मराठी, इंग्लिश, हिंदीतली सेनेवरची जवळपास सगळीच पुस्तकं वाचलीत. त्यात राडा मला सरस वाटते. त्याचा विषय शिवसेना नाही तरीही. ती एक राजकीय कादंबरी आहे, असं मला वाटतं. त्यादृष्टीने एक त्याकाळाचा दस्तावेज म्हणून राडा खूपच मोठी आहे. सगळ्यांनी वाचायलाच पायजे.

एक साधीशी समस्या


जवळपास तीन महिने झाले याआधीचा ब्लॉग लिहून. काम नवीन आहे. त्यात नेहमीप्रमाणे बुडालोय. काय काय नवीन प्रयोग सुरू आहेत. मजा येतेय. त्यात ब्लॉग लिहिणं राहून गेलंय. गेले दोनेक महिने तरी सतत कुणा ओळखी अनोळखी मित्रांचे मेल, मॅसेज सुरू आहेत. बरेच दिवस काही लिहिलं नाही. काही मित्र भेटल्यावरही सांगतात. गेल्या चारपाच दिवसात हे अतीच झालं. रोज दिवसातून तीनचारदा कुणी ना कुणी ब्लॉगची आठवण करून देतोय. म्हटलं आता आळस खूप झाला. ब्लॉग टाकायलाच हवा.


२८ जानेवारीच्या संध्याकाळी माहीमला एक घटना घडली. सार्वजनिक संडासातून बाहेर यायला वेळ लागला म्हणून एकाचा खून झाला. २९ला बातम्याही छापून आल्या. मी हादरलो. सार्वजनिक संडास काय असतात हे मुंबईतल्या साठ सत्तर टक्के लोकांनी अनुभवलेली गोष्ट आहे. मीही त्यातलाच एक. यापूर्वीही याच विषयावर शी या नावाने मटात मी लेख लिहिला होता. त्याचा पूनर्जन्म हगायचं आणि जगायचं या ब्लॉगच्या रूपाने झालेला आहे.

Monday, 7 November 2011

आणखी सालं काय हवं?


काल कार्तिकी एकादशी झाली. कोकणातले वारकरी पाऊस आणि भाताच्या शेतीमुळे परंपरेने आषाढीपेक्षा कार्तिकीला पंढरीला जातात. मला माहीत आहे तोवर माझी आजी नियमित कार्तिकी करायची. ती थकल्यावर आई वडील नेमाने कार्तिकी करू लागले. पण एकादशीच्या जत्रेची गर्दी झेपत नाही म्हणून दिवाळीच्या आगेमागे त्यांची कार्तिकी साजरी होऊ लागली. चारेक वर्षांपूर्वी पप्पांना पंढरपूरलाच माइल्ड हार्ट अटॅक आला. तेव्हापासून गेली तीन वर्षं आम्ही, म्हणजे मी आणि मुक्ता, दोघे कार्तिकीला जातोय.

दोन वर्षांपूर्वी आमची पहिली कार्तिकी होती. रिझर्वेशन होतं, पण ठाण्याला रेल्वेरुळांवर पाण्याच्या पायपांचा पूल पडल्याने अचानक सगळ्या ट्रेन रद्द झाल्या होत्या. म्हणून सकाळच एस्टीने जायचं ठरवलं. त्यामुळे थेट पंढरपूरला न जाता देहू आळंदी करायची ठरवली. आमचा रूद्र सोबत होताच. पहिल्यांदाच असं ओळीने देहू आळंदी आणि पंढरी करणार होतो. चार दिवस खूप आनंदात गेले. काय ठरवलं काहीच माहीत नाही. पण या चार दिवसांत नोकरी सोडायचा निर्णय झाला आपोआप. महाराष्ट्र टाइम्समधे मानाच्या मेट्रो एडिटर पदावर काम करत होतो. कॉलम सुरू होता. तसं काहीच कमी नव्हतं. पण मनासारखं काम करता येत नव्हतं. परतून घरी आलो. सकाळी नाश्त्याला बसल्यावर बायकोला हळूच सांगितलं. आज नोकरीचा राजीनामा देतोय. कंटाळा आलाय. ती लगेच हो म्हणाली. ऑफिसात आलो. रोजची कामं केली. संपादकांशी बोललो. राजीनामा लिहून दिला. खांद्यावरचं वजन कमी झाल्यासारखं वाटलं.

आजही त्या निर्णयाचा खूप आनंद आहे. नोकरी सोडली तेव्हा पुन्हा नोकरी करायची नाही असं ठरवलं होतं. काय करायचं याची मोठी यादी बनवली होती. पण ती कामं करता येतील अशी नोकरी मिळाली तर चांगलंच होतं. अशावेळेस माझा जुना दोस्त रवी तिवारी देवासारखा धावून आला. मी मराठीच्या बातम्यांचा कार्यकारी संपादक म्हणून जॉइन झालो. त्याला पावणेदोन वर्षं झाली. आजवरच्या करियरमधली आणि वेगवेगळ्या नोक-यांतली ही सगळ्यात आनंदाची वर्षं होती. खूप उपद्व्याप करता आले. त्यातला प्रबोधनकार डॉट कॉमचा उपद्व्याप यशस्वी झाला. मी मराठीच्या बातम्यांसाठी काही चांगलं करता आलं. नवशक्तितला कॉलम आणि ब्लॉग नियमित लिहिला गेला. पण त्याशिवायचे जवळपास सगळे उपद्व्याप आतबट्ट्याचे ठरले. पण या सगळ्या उपद्व्यापांनी खूप काही दिलं. खूप खूप अनुभव दिले. अनेक नवे मित्र भेटले. जुने मित्रं रिफ्रेश झाले. घराला खूप वेळ देता आला. आई वडिलांची इच्छा म्हणून गावी एक छोटं घर बांधलं. अनेक अंगांनी विकसित करणारा अनुभव होता ही दोन वर्षं. मी मराठी ऑफिसात गीता, संतोष, दीपक, भाग्यश्री, नीतिन, शिल्पा, शशी, नेहा अशी कितीतरी आपली माणसं भेटली. रवी तिवारी, श्रीरंग गायकवाड, अजय कुमार, नरेंद्र बंडबे, प्रेम शुक्ला, इम्तियाज खलिल अशा जीवाभावाच्या सोबत्यांसोबत घालवलेले तास्नंतास समृद्ध करून गेले. या सगळ्याचं श्रेय रवी तिवारीलाच द्यायला हवं. तो नसता तर काहीच झालं नसतं.

सगळं छानच सुरू होतं. कंपनीत थोड्या आर्थिक अडचणी होत्या. पण ते माझ्यासाठी फारसं काही चिंतेचं नव्हतं. अशावेळेस अचानक नवशक्तिचे संपादक विनायक पात्रुडकर यांचा फोन आला. मी ट्रेनमधे बसलो होतो. मी पुढारीत चाललोय, तुम्हाला माहीत असेलच, त्यांनी विचारलं. मला खरंच माहीत नव्हतं. तुम्ही माझ्याजागी नवशक्तित यायला इच्छुक आहात का. असेल तर आपण प्रयत्न करूया. मी एक दिवस मागून घेतला. ऑफिसात थोड्या अडचणी सुरू असल्यामुळे रवीशी बोलणं आवश्यक होतं. त्यानंतर मी पात्रुडकरांना फोन करून हो कळवलं. भेटीगाठी झाल्या. मधे महिनाभर तरी निघून गेला. त्या काळात अचानक माझ्याकडे आणखी दोन ऑफर आल्या होत्या. पुन्हा अचानकच नवशक्तितून फोन आला. आमचं फायनल झालंय. पैशांचं बोलण्यासाठी या. चांगला पगार दिला. मला ऑफर लेटर मिळालं. मी इथला राजीनामा दिला.

आज संध्याकाळपासून मी नवशक्तिचा संपादक म्हणून रुजू होतोय. ७७ वर्षं जुना पेपर. महाराष्ट्राच्या विशेषतः मुंबईच्या जडणघडणीवर स्वतःचं योगदान देणारा पेपर. तिथे माझ्यासारखा अवघ्या ३४ वर्षांचा पोरगा संपादक बनणार आहे. हे अद्भूत आहे. अनेक मोठमोठे लोक या खुर्चीवर बसले होते. मोठी जबाबदारी आहे. माझे खांदे तेवढे मजबूत नाहीत. पण यापैकी कशाचाही विचार न करता नवं आव्हान स्वीकारण्यासाठी चाललो आहे. सगळा पेपर हातात मिळणार आणि नवी माणसं भेटणार याचाच आनंद आहे. आजवर खूप नोक-यांची धावपळ केली. पण आता इथे काही वर्षं थांबायचंय. मनासारखं काम करायचंय. लोक वर्षानुवर्षं लक्षात ठेवतील असं काहीतरी करून दाखवायचंय. त्यासाठी तुमच्या सगळ्या मित्रांचं पाठबळ हवंय. त्याशिवाय हे शक्य नाही.

नवशक्तित चाललोय म्हटल्यावर माझ्या डोळ्यासमोर भाऊ पाध्ये येतोय. त्याच्यावरच्या ब्लॉगवर त्याचा एक फोटो आहे. पाय टेबलावर टाकून नवशक्तिच्या ऑफिसात बसलेला भाऊ. भाऊ आपला खूप सगळ्यात आवडता लेखक. त्याने जगायचं नवं भान दिलं. लिहायचा नवा हात दिला. तो जिथे अकरा वर्षं काम करत होतो. तिथे संपादक बनून चाललोय. आणखी सालं काय हवं?