Monday 29 January 2018

भारत देशा, जय बसवेशा !



आज २९ जानेवारी. गौरी लंकेश यांचा जन्मदिवस. त्यांचा खून होईपर्यंत त्यांचं नाव माहीत नव्हतं. डॉ. नरेंद्र दाभोलकर किंवा कॉ. गोविंद पानसरे यांचंही नाव त्यांच्या खुनापर्यंत कर्नाटकात फार कुणाला माहीत असेल असं नाहीच. माझ्यासारख्याला माहीत नाही म्हणून यापैकी कुणाचंच काम कमी महत्त्वाचं ठरत नाही. 


गौरी लंकेश यांच्याविषयी वाचत गेलो. त्यांच्याबरोबर काम केलेल्या लोकांशी बोललो. हादरत राहिलो. मोदीविरोध हे त्यांच्या खुनाचं कारण नाहीच, हे कळत होतंच. मोदींवर टीका झाल्याने मोदीच मोठे होतात. कोणत्याही धर्मवादी नेत्याला पुरोगाम्यांकडून टीका हवीच असते. त्यामुळे त्याचं कारण वेगळं असणार होतंच. गौरी लंकेश यांचा खून लिंगायत धर्ममान्यता आंदोलनामुळे झालाय, हे माझ्यासाठी स्पष्ट होत गेलं. त्या स्वतः लिंगायत. एम. एम. कलबुर्गी सरांनी लिंगायत धर्माची अभ्यासपूर्ण संशोधनात्मक मांडणी केलीय. ती आता मराठीत पुस्तकरूपानेही आलीय. ती पाहिल्यावर त्यांचा खून कशासाठी झालाय, हे कळत जातं. 

Sunday 17 December 2017

गोवा, गुजरात आणि बरंच काही

ईटीमधलं कार्टून
गोवा विधानसभा निवडणुकीच्या निकालाने मला धक्का दिला होता. गलितगात्र काँग्रेससमोर भाजपच्या ४ कमी जागा निवडून येतील, यावर माझा विश्वास नव्हता. पण तसं झालं खरं. तिकडे झालं तर गुजरातमध्येही होऊ शकतं. दोन्ही राज्यांत खूप साम्य आहेत. आजच्या दिव्य मराठीत हा लेख छापून आलेला लेख.

कदाचित याच्या उलटंही होऊ शकतं. अनेक तर्क भाजपच्या बाजूनेही कौल देतात. पण हा लेख निकालापेक्षाही खूप काही सांगू पाहतोय. बघा काय वाटतंय ते. दुसरी एक गोष्ट शेवटच्या पॅरेग्राफमध्ये प्रेम द्वेष ही परिभाषा गुरुवारी सकाळीच लिहून पाठवलेली आहे. त्याचा राहुल गांधी काँग्रेस अध्यक्ष झाल्यानंतरच्या भाषणाशी काहीही संबंध नाही.
...

Friday 17 November 2017

शिवसेना@५०

शिवसेनेवर लिहायला नेहमीच मजा येते. शिवसेना हा मला माझी समकालीन गोष्ट वाटते. त्याचा वेगवेगळ्या अंगांनी विचार मांडायला हवा खरंतर. पण माझ्या आळसामुळे तो लिहून काढणं नेहमीच राहून जातं. नेत्यांपासून मित्रांपर्यंत अनेकजण माझ्याशी शिवसेनेवर बोलत असतात. सेनेच्या पन्नाशीनिमित्त ते लिहून काढावं आणि पुस्तक छापावं अशी सूचना काही मित्रांनी केली. पण ते काही जमण्यासारखं नव्हतं. आमचे मित्र राज्यशास्त्राचे अभ्यासक किशोर रक्ताटे शिवसेनेच्या संघटनात्मक बांधणीवर लिहिण्यासाठी सांगत होते. त्यामुळे माझ्या डोक्यात ते किडे वळवळायला लागले. पण ते माझ्यामुळेच मागे पडलं.

दिवाळीच्या आधी अचानक गिरीश अवघडेचा फोन आला. त्याला प्रभातच्या दिवाळी अंकासाठी शिवनेवर लेख हवा होता. लिहून व्हावं म्हणून मी हो म्हटलं. पण त्याला मी अट घातली होती की फॉलोअप घे. तो त्याने भक्कम घेतला. त्यामुळे हा लेख होण्यात त्याचं माझ्यापेक्षा जास्त योगदान आहे. खरं तर या लेखाला आमच्या दोघांची जॉइण्ट बायलाइन हवी होती.

Wednesday 8 November 2017

गूगलची डूडल दुनिया



चित्रलेखात लिहायला सुरुवात केली त्याला आता जवळपास वर्षं होत आलंय. गेले सहाएक महिने तर जवळपास दर अंकात लिहितोय. त्यातले लेख अजूनपर्यंत कधीच ब्लॉगवर टाकला नाही. अनेकदा अनेक लेख टाकावेसे वाटले. पण फॉण्ट कन्वर्टचा प्रॉब्लेम होता. इतक्यातच बेगम अख्तर आणि अब्दुल कवी दसनवी यांची डूडल पाहिल्यावर एक लेख ब्लॉगवर टाकायला हात सुरसुरले होते. आज नृत्यसम्राज्ञी कथ्थक नृत्यांगना सितारा देवी यांचं डूडल पाहिल्यावर राहावलंच नाही. थोडा वेळही मोकळा होता आणि प्रयोग करता करता श्रीलिपीच्या एक्स्चेंज युटिलिटीमध्ये लेख कन्वर्ट झालादेखील.

६ फेब्रुवारीच्या चित्रलेखाच्या अंकात मी गुगलच्या डूडलवर लेख लिहिला होता. त्याचा इण्ट्रो होता, `क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जन्मदिनानिमित्त दिवसभर गूगलने प्रकाशित केलेलं डूडल गाजलं. त्यादिवशी पंधरा लाखांहून अधिक जणांनी सावित्रीबाईंविषयी माहिती जाणून घेण्यासाठी सर्च केलं. फक्त भारतातच नाही तर जगभर ही डूडल चर्चेचा विषय बनली आहेत.`

Monday 6 November 2017

एका कॉम्रेडची धर्मांधांना भीती का वाटते?

कॉ. संपत देसाई संपर्क - ९९७५०९८५१४
कॉम्रेड संपत देसाईंविषयी लिहावं तितकं कमीच आहे. ते कॉम्रेड आहेत, विद्रोही आहेत, त्यांचा व्यासंगही दणकट आहे, तरीही ते दिलखुलास हसत असतात. कायम आपल्या माणसांमध्ये राहतात. गेल्या आठवड्यात त्यांना धमकी देणारं पत्र आलं. त्यात कॉम्रेडने आजरेकर फडाविषयी कृतज्ञता व्यक्त करणारा कार्यक्रम घेतला, त्याचा प्रामुख्याने उल्लेख आहे. एखादा कॉम्रेड विवेकाची मशाल घेऊन अध्यात्माच्या क्षेत्रात शिरतो, तेव्हा धर्मांध त्याला घाबरतात आणि घाणेरड्या शिव्या देणारी, धमक्या देणारी पत्रं लिहितात. म्हणून या धमक्या महत्त्वाच्या आहेत. धर्मांधांना विरोध करणाऱ्यांनी कोणत्या ट्रॅकवर काम करायला हवं, याची दिशा देणारी ही घटना आहे. मंगळवारी ७ नोव्हेंबरला आजऱ्यात निषेध रॅली आणि सभा आहे. राज्यभरातून मान्यवर येत आहेत. 

Thursday 19 October 2017

शूद्रसुक्ताची लढाई

गोव्यात असं कधी होईल, असं वाटलं नव्हतंच. एखाद्या कवितेसाठी कवीवर एफआयआर दाखल व्हावा, इतकं गोव्यातलं सांस्कृतिक वातावरण विषारलं कधी? गोवा वरून इंटरनॅशनल आणि मॉडर्न वाटत असलं तरी ते मनाने एक छोटंसं गाव आहे. खेड्याच्या लोभसपणा त्यात आहे. त्याचबरोबर आपापल्या जातीचे लोक धरून ठेवण्याचा टिपीकल गावठीपणाही त्यात आहे. धार्मिक रूढीपरंपरांमध्ये आणि राजकारणात ही जातीयता अनेकदा उग्र रूप धारण करते. मात्र गोव्याबाहेरच्या लोकांसाठी गोव्याची प्रतिमा कायम सुशेगाद अशीच असते. कवी म्हणून विष्णू सूर्या वाघ यांनी त्या प्रतिमेवर कायम घण घातले.

वाघ भाजपचे आमदार झाले तरी त्यांनी स्पष्ट बोलणं सोडलं नव्हतं. मी संपादक असलेल्या गोवादूत या पेपरात त्यांचा कॉलम काही दिवस चालला होता. त्यात त्यांनी एकदा सनातन संस्थेच्या विश्व हिंदू संमेलनाची हजामत केली होती. त्यामुळे तेव्हा गोवा भाजपच्या प्रभारी असणाऱ्या स्मृती इराणी यांनी अस्वस्थ होऊन फोन केले होते. त्यांनी शिवाजी अंडरग्राऊंड इन भीमनगर मोहल्लाचे प्रयोग सरकारी खर्चाने ठिकठिकाणी लावले होते. कला अकादमीत १४ एप्रिलला आशा भोसलेंच्या मैफिलीला जागा नाकारून तिथे आंबेडकर जयंतीचा कार्यक्रम करणाऱ्यांना जागा दिली होती. आपापल्या कॉलमांत, भाषणांत ते बहुजनवादी भूमिका ठामपणे मांडत राहिले.

Monday 16 October 2017

वेड्यांच्या बाजारातली टीवी नाईनची जगबुडी

माझे सध्या दोन पेपरांत कॉलम सुरू आहेत. एक आठवडा दिव्य मराठीत आणि दुसऱ्या आठवड्यात गोवन वार्ता. काही महत्त्वाचा विषय असला की दोन्हीकडे एकाच विषयावर लिहितो. दोन्हीकडचे वाचक वेगळे आहेत. त्यामुळे त्यानुसार बदल करावे लागतात. त्यामुळे विषय एकच असला तरी दोन वेगवेगळे लेख होतात. त्याच्या प्रेक्षकांचा प्रतिक्रियेचा पॅटर्नही वेगळा आहे. गोव्यातल्या लेखांवर व्हॉट्सअपवर चर्चा जास्त होते. तर दिव्य मराठीतल्या लेखावर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून दिवसभर फोन येतात.

दिव्य मराठीतल्या लेखावर फोन आले नाहीत, असं कधीच झालेलं नाही. किमान २० -२५ फोन तरी येतातच. ईमेल मेसेज वेगळे. ८ ऑक्टोबरचा रविवार मात्र त्याला अपवाद ठरला. टीवी नाइनने २३ सप्टेंबरला जगबुडीची जत्रा भरवली होती, त्यावर लिहिलं होतं. टीवी नाइनचं नाव लेखात दिव्य मराठीने काढल्यामुळे कदाचित त्याचा संदर्भ वाचकांना कळला नसावा. प्रेक्षकसंख्येची आकडेवारी येण्यासाठी एक आठवडा थांबावंच लांगणार होतं. त्यामुळे उशीरही झाला असावा. टीव्ही पत्रकारिता हा विषय लोकांना फार सिरियस घेणं सोडलं असावं. लेखही चांगला उतरला नसावा. पण कधीच फोन न करणाऱ्या पाच सहा जणांनी आवर्जून केला होता. त्यात स्वाभाविकपणे पत्रकार होते. माझा मित्र अविनाश दुधेही होता.

लोकांना प्रतिक्रिया द्यावीशी वाटो अथवा न वाटो, मला कायम वाटत आलंय की आपण पत्रकारितेविषयी लिहीत राहायला हवं. मी तसं लिहीत बोलत आलोयही. आम्ही पत्रकार जगाविषयी लिहितो, पण आपल्याविषयी लिहीत नाही. त्यामुळे संवादाच्या या धंद्याविषयी कोणताही संवाद होत नाही. आता सोशल मीडियामुळे थोडाफार संवाद होतो. पण तोही तुटकच.
अशा टीआरपीच्या खेळांचा खूप वाईट परिणाम चॅनलांमधे काम करणाऱ्या पत्रकारांवर होत असतो. वरवर त्याचं समर्थन करावंच लागतं. पण मुळात पत्रकार म्हणून घडलेल्या मनोभूमिकेच्या विरोधात असतं सगळं. मन खात राहतं. इतर अनेक स्ट्रेस असतातच. पण हा स्ट्रेसही कमी नाही. तरुण वयात अकाली निधन झालेल्या आमच्या अनेक मित्रांचा बळी या स्ट्रेसने घेतलाय. त्याची पत्रकारितेतल्या धुरिणांनी चर्चा करायला हवी.

Tuesday 10 October 2017

१२०८ बेस्ट सेलर


गुरुनाथ नाईकांच्या आजारपणाची चर्चा सुरू आहे. अनेक मान्यवरांनी सोशल मीडियातून त्यांना मदत करण्याची मागणी केलीय. महाराष्ट्र सरकारनेही त्यांना चांगली मदत केलीय. या मदतीमागे नाईकांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघात केलेल्या कामाचीही पार्श्वभूमी कारणीभूत असू शकते. या सगळ्याच्या बातम्या येत होत्या. ते सगळं वाचताना मला सारखी सारखी त्यांची `गाठभेट` आठवायची. गोव्यात `गोवादूत`ला असताना मी `गाठभेट` नावाचा कॉलम चालवायचो. एखाद्या मान्यवराला भेटून त्याचं व्यक्तिचित्र लिहायचो. मजा आली त्यात.

गुरुनाथ नाईकांचीही `गाठभेट` चांगली झाली. आमच्या पुष्पराज पोपकरांकडून मुद्दाम तो मजकूर मागवून घेतला. या कॉलमात फक्त पांढरी बाजू असायची. परिचय करून देण्यापलीकडे यात काही नसायचं. नाईकांच्या कौटुंबिक गुंतागुंतीविषयी मला नंतर अनेकांनी मुद्दामून माहिती दिली. मला त्यात रस नव्हता. मी त्यांच्या कादंबऱ्या फक्त पाहिल्यात. कधीच वाचल्या नाहीत. एक कादंबरीकार आणि पत्रकार म्हणून त्यांच्या जडणघडणीत मला इंटरेस्ट होता. तेच फक्त या लेखात आहे. गेल्या पिढीतल्या पत्रकारांची होणारी फरफट त्यात आलीय. या लेखानंतर गोवा आणि महाराष्ट्रातील काही पत्रकारांनी एकत्र येऊन त्यांचा सत्कार करून मदत दिली होती.

Wednesday 23 August 2017

मोरेसरांची ऐतिहासिक पाचर



सदानंद मोरे सरांविषयी मला नितांत आदर आहे. त्यांचा माझ्या लिखाणावर प्रभाव आहे. त्यामुळेच त्यांच्या विचारांची चिकित्सा करण्याचा मला अधिकार आहे, असं मी मानतो. त्यानुसार मी याआधीही त्यांच्यावर भरभरून लिहिलंय आणि मनापासून टीकाही केलीय. विशेषतः घुमानमधल्या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षीय भाषणात त्यांनी नरेंद्र दाभोलकर आणि गोविंदराव पानसरे यांच्या खुनाचा निषेध केला नाही, तेव्हा मला वाईट वाटलं होतं. संत नामदेवांनी असं केलं नसतं, असं माझं प्रामाणिक मत मी तेव्हा मांडलं होतं. 
 
मोरे सर भाजप सरकारच्या विविध कमिट्यांवर आहेत, यातही मला काही चुकीचं वाटत नाही. वस्तुस्थिती स्वीकारून त्यातल्या त्यात आपण काय करू शकतो, असा प्रयत्न ते करत असावेत. इतिहासाच्या पुस्तक निर्मिती मंडळाचे अध्यक्ष म्हणून त्यांनी यंदा साववी आणि नववीची नवी पुस्तकं आणली. नववीच्या पुस्तकात बोफोर्स घातलं आणि बाबरीविध्वंस टाळला, तेव्हा मला त्यांची बाजू घ्यावीशी वाटली नाही. एकतर मी पुस्तक वाचलं नव्हतं आणि विरोधकांचे मुद्दे मला फार अयोग्य वाटले नाहीत. सातवीच्या पुस्तकावरच्या टीकेविषयी मात्र माझं मत होतं. कारण मी ते पुस्तक वाचलं होतं. मोरे सर आजवर जी भूमिका वारंवार लिहित आलेत, त्यालाच अनुसरून यातल्या इतिहासाची मांडणी होती. त्यानुसार मी माझं म्हणणं माझ्या लेखांमध्ये मांडलं. ते सगळ्यांना पटायलाच पाहिजे, असं नाही. पण एकदा सातवीचं पुस्तक वाचायलाच हवं. 

दिव्य मराठीत लेखाचं हेडिंग मोरेसरांची ऐतिहासिक पाचर असं केलं होतं. ते ब्लॉगमध्ये कायम ठेवलंय. लेख नेहमीप्रमाणे कटपेस्ट.
........

माझा मुलगा सातवीत शिकतो. मराठी मीडियम. एसएससी बोर्ड. आजकाल शाळेची पुस्तकं दुकानात मिळत नाहीत. त्याला ती शाळेत मिळाली, त्याचदिवशी सर्वात आधी इतिहासाचं पुस्तक घेतलं. वाचून काढलं. एका बैठकीत त्याची साठ पानं वाचून होतात. याचं कारण, डॉ. सदानंद मोरे. 

महाराष्ट्राच्या इतिहासावर सदानंद मोरे लिहित असतील, ते वाचायलाच हवं. त्यांनी आपल्या आजवरच्या मांडणीतून महाराष्ट्राच्या इतिहासाकडे बघायचा नवा दृष्टिकोन दिलाय. तो साधार आहे आणि महत्त्वाचा आहे. त्यांच्या `तुकाराम दर्शन` या ग्रंथाआधी वारकरी परंपरेचा महाराष्ट्री संस्कृतीवरचा प्रभाव कधीच इतक्या जोरकसपणे मांडला गेला नव्हता. `लोकमान्य ते महात्मा` या दोन जाड्या खंडांमधल्या ग्रंथाचा अनुवाद दि. पु. चित्रेंनी इंग्रजीत करायला घेतला होता, इतका हा ग्रंथ मोलाचा आहे. महाराष्ट्रातल्या जातवर्चस्ववादी ब्राह्मणांच्या टोळक्याची मानसिकता गांधीहत्येसारख्या घृणास्पद दहशतवादी घटनेपर्यंत कशी ढासळत गेली, याचा तारतम्याने पुराव्यांसह लिहिलेला इतिहास त्यात येतो. बाबासाहेब पुरंदरेंचे आजोबा ठरावेत अशा इतिहासाचार्य राजवाडेंच्या आदर्श मानल्या गेलेल्या महाराष्ट्राच्या इतिहासाची चिरफाड आणि नवी पर्यायी मांडणी मोरेंच्या `गर्जा महाराष्ट्र`मध्ये येते. `जागृति`कार पाळेकरांविषयी त्यांनी केलेल्या संशोधनातून ब्राह्मणेतर चळवळीच्या इतिहासातलं लखलखतं पान समोर आलंय. त्यांनी एक विचारवंत म्हणून केलेली विद्रोही बहुजनवादाच्या जागी उदारमतवादी बहुजनवाद असणाऱ्या सर्वजनवादाची मांडणी सध्याच्या काळात उपयोगाची आहे. 

याचा अर्थ मोरे सरांचं सगळंच बरोबर असतं असंही नाही. नववीच्या इतिहासात त्यांनी राजकीय मुद्दा बनलेलं बोफोर्स आणलं असेल आणि देशाच्या एकतेला धक्का लावणाऱ्या बाबरी मशीद विध्वंसाचा उल्लेख टाळला असेल, तर त्यावर टीका व्हायलाच हवी. संशोधक असतानाही ते वारकरी असल्याचं ओझं बाळगतात, हा कुणाला त्यांच्यावरचा आरोप वाटेलही. बहुसंख्य पुरोगाम्यांना अपेक्षा असते तेव्हा आणि त्या विषयात ते भूमिका घेत नाहीत. घुमानच्या साहित्य संमेलनात अध्यक्षपदावरून त्यांनी डॉ. नरेंद्र दाभोलकर आणि कॉ. गोविंद पानसरे यांच्या खुनाचा निषेध करायलाच हवा होता. त्यांनी भांडारकर इन्स्टिट्यूटवर निवडून जाताना राजकीय पक्षाच्या पॅनेलमधून जायला नको होतं. अशी टीका सोशल मीडियावर होत होती. त्यावर चर्चाही व्हायलाच हवी. मोरे सरांची मांडणी तितकी महत्त्वाचीच आहे. त्यात आता सातवी इतिहासाच्या पुस्तकावरच्या आरोपाची भर पडलीय. भाजपच्या सरकारात सातवीच्या पुस्तकातून मुगलांचा इतिहास दीड दोन पानांत संपवण्यात आला, असा मुख्य आरोप आहे.

अर्थात सातवीचं पुस्तक काही सदानंद मोरेंनी लिहिलेलं नाही. ते इतिहास विषय समितीचे अध्यक्ष आहेत. त्यांच्यासोबत सदस्य म्हणून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पांडुरंग बलकवडे, सावरकरवादी अभिराम दीक्षित आणि इतरही चार पाच जण आहेत. बलकवडे, दीक्षितांची आजवरच्या भूमिका उघड आहेत आणि मोरेंच्याही. लाल महालात दादोजी कोंडदेवांचा आणि संभाजी उद्यानात राम गणेश गडकरींचा पुतळा असणं योग्य नाही, असं मोरेंनी जाहीरपणे सांगितलेलं आहेच. फॅसिझमपेक्षा भ्रष्टाचार परवडला, असं सांगत नरेंद्र मोदींना निवडणुकांच्या आधी टीव्हीवरच्या चर्चेत विरोध केल्यामुळे त्यांना जिवे मारण्याच्या धमक्या आल्या होत्या. मराठे शूद्र असल्याची भूमिका त्यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर घेतली होती. हे सारं उजव्या मंडळींना माहीत असणारच. त्यामुळे त्यांना असं काही पुस्तकात करू न देण्यासाठी बलकवडे, दीक्षितांसारख्या चाणाक्ष लोकांचा समावेश समितीत असणार. तरीही मोरे सरांनी सातवीच्या पुस्तकातून मुलांपर्यंत पोहोचवलंय ते भारीच आहे. 

आजवर सातवीत आलेला मध्ययुगीन इतिहास हा देशभरातला इतिहास सांगणारा होता. खरं तर तो फक्त दिल्लीकेंद्री होता. त्यामुळे त्यात मुगल सविस्तर होते. आता सातवीच्या पुस्तकात येणारा इतिहास हा महाराष्ट्रकेंद्री आणि त्यातही शिवरायकेंद्री आहे. त्यामुळे त्यात मुगल थोडक्यात आहेत. पुस्तकात `शिक्षकांविषयी` नावाची एकपानी प्रस्तावना आहे. त्यातला इतिहासविषयक भाग मोरेंनी लिहिला असावा, `आपला प्रांत भारतीय संघराज्याचा घटक असला तरी इतिहास समजून घेताना महाराष्ट्राच्या दृष्टीने म्हणजेच भारताच्या इतिहासात महाराष्ट्राचे स्थान, भूमिका आणि योगदान समोर ठेवून समजून घेतला तर विद्यार्थ्यांची राष्ट्रभावना अधिक परिपक्व होईल. त्यात आपल्या पूर्वजांनी राष्ट्रासाठी नेमके काय केले हे समजेल आणि त्यातूनच आपल्या आजच्या राष्ट्रीय जबाबदारीचे व कर्तव्याचे भानही विकसित होईल. पुढे ते म्हणतात,`ब्रिटिशांनी भारत जिंकला व त्याच्यावर राज्य केले हे सर्वांनाच ठावूक आहे. परंतु या प्रक्रियेत ब्रिटिशांना रोखण्यात महाराष्ट्र कसा आघाडीवर होता हे समजणेही तितकेच महत्त्वाचे आहे. ब्रिटिशांची स्पर्धा मराठ्यांशी होती आणि त्यांनी भारत जिंकून घेतला तो मराठ्यांशी मुकाबला करूनच. ही जाणीव आपल्या सामर्थ्याची व कर्तव्याची आहे. अध्ययन-अध्यापन करताना ही भावना विद्यार्थ्यांच्या मनात निर्माण होणे अपेक्षित आहे.` आपल्या मुलांना आपला इतिहास आधी कळायला हवा, ही भूमिका चुकीची ठरू नये. असं करताना मुगल किंवा अदिलशाहीचं योगदान आहे त्यापेक्षा अधिक सविस्तर आलं असतं, तरी काही बिघडत नव्हतं.

अटकेपासून कटकेपर्यंत मराठ्यांच्या पराक्रमाचा झेंडा फडकला, असं आपण नेहमीच सांगतो. ते अटक आणि कटक तसंच दक्षिण टोकावरचं महाराष्ट्राच्या पराक्रमाची गाथा सांगणारं जिंजी आणि तंजावर नेमकं कुठे आहे, हे सांगणारा नकाशाच सातवीच्या पुस्तकाचं कव्हर म्हणून आलाय. केवळ अभ्यास म्हणून नाही, तर इतिहास समजून घेण्यासाठी इतर कुणीही वाचावं असं हे पुस्तक आहे. परगणा, जहागीर, बारा मावळ या शेकडो वेळा इतिहासात येणाऱ्या शब्दांचे नेमके अर्थ काय आहेत? बुद्रुक आणि खुर्द यात काय फरक असतो? अशा प्रश्नांची उत्तरं यात सापडतात आणि आनंद देऊन जातात. इतिहासाच्या पाठ्यपुस्तकांत आजवर कधीच न आलेली अनेक माणसं, ठिकाणं आणि घटना पहिल्यांदाच इथे भेटतात.

या पुस्तकात संत नामदेवांना वारकरी परंपरेतले आद्यसंत म्हणून सन्मान मिळतो. शहाजीराजे स्वराज्यसंकल्पक म्हणून येतात. शिवाजी महाराज हे केवळ सत्ताधीश नव्हते, तर प्रजाहितदक्ष राज्यकर्ते होते, हे त्यात येतं. महात्मा फुले ते रवींद्रनाथ टागोरांनी त्यांच्याविषयी काढलेले गौरवोद्गार त्यात येतात. संभाजीराजेंच्या `बुधभूषण` ग्रंथातले उतारे येतात. `भारत हा एक देश असण्याची आणि त्याचा राजा धर्माने कुणीही असला तरी सर्वांनी त्याला पाठिंबा देण्याची जाणीव इतिहासात पहिल्यांदा मराठ्यांनी दाखवली`, असं पानिपताच्या निमित्ताने यात जाणीवपूर्वक येतं. नागपूरकर भोसल्यांना घाबरून कोलकत्ता शहराभोवती इंग्रजांनी खोदलेल्या खंदकाचा, `मराठा डिच`चा, उल्लेख इथे येतो. 

मुस्लिमद्वेष म्हणून मुगलांचा इतिहास गाळण्यात आला असा आरोप असला तरी पूर्ण पुस्तकात कुठेही मुस्लिमांनी महाराष्ट्रावर अत्याचार केले, अशी एक ओळही येत नाही. उलट संत एकनाथांच्या हिंदू मुसलमान संवादातल्या धार्मिक समन्वयाचं उदाहरण येतं. सुफी संप्रदायाचा सन्मानाने उल्लेख होतो. शिवाजी महाराजांच्या सैन्यातल्या मुस्लिम सरदारांचा आणि महाराजांच्या धर्मसहिष्णू धोरणाविषयीही नेमके उल्लेख येतात. यात अकबर येत नसेल पण महाराष्ट्रातला बहामनी राज्यकर्ता मोहम्मद गोवानने केलेल्या लोकोपयोगी कामांचा उल्लेख येतो. 

इतिहासाची साधने या पहिल्याच धड्यात नाण्यांविषयी दोन वाक्य मुद्दाम सांगावीत अशी आहेत, `सम्राट अकबराच्या नाण्यांवरील रामसीतेचे चित्र किंवा हैदरअलीच्या नाण्यांवरील शिवपार्वतीच्या प्रतिमा यावरून त्या काळातील धार्मिक समन्वयाची जाणीव होते. पेशव्यांच्या नाण्यांवर अरेबिक किंवा पर्शियन भाषेचा वापर होत असे. यावरून त्या काळातील भाषाव्यवहार समजतो.` धार्मिक सहिष्णुतेसंबंधात ही वाक्य येत नाहीत. येतात ती इतिहास साधनांच्या संदर्भात. त्यामुळे त्यात कुणी आक्षेप घेऊ शकत नाही. पण जे सांगायचंय ते मात्र नीट पोहोचतं. ही सदानंद मोरेंची खास शैली आहे. भाजपच्या सरकारने नेमलेल्या मंडळातील हिंदुत्ववादी मंडळींसोबत अध्यक्ष बनून मोरेंनी अशी पाचर सातवीच्या इतिहासाच्या पुस्तकात ठिकठिकाणी मारून ठेवलीय. आता ते महाराष्ट्रातल्या सहिष्णुतावादी म्हणवणाऱ्या मंडळींना कळत नसेल, तर ती चूक कोणाची?
 
मोरे सर अध्यक्ष नसते तर माझ्या मुलाला सातवीत कोणता इतिहास शिकावा लागला असता, याचा विचारही मला करवत नाही.
    

Saturday 10 June 2017

रॉक ऑन कबीर

यावर्षीच्या कॅलेंडरवर ९ जून तारखेवर कबीर जयंती लिहिलेली आहे. आमचा कबीर. त्यांच्या ना जन्माचा पत्ता  ना मृत्यूचा, ना धर्माचा जातीचा, ना कुळाचा ना वेळाचा. तो त्या सगळ्याच्या पलीकडचा. पलीकडे जाण्यासाठी बोट धरून रस्ता दाखवणारा. त्याच वाटेवर चालणारे पाच जण कबीराची गाणी गातात आजच्या सूरात. हर्षदा परबच्या आग्रहामुळे मी कबीर कॅफे प्रत्यक्षात ऐकले. मी त्यांच्यावर लेख लिहावा, हाही तिचाच आग्रह. लेखासाठी नाही, पण त्यांना यूट्यूबवर खूपच ऐकले. दिव्य मराठीच्या शेखर देशमुखांना सहज सांगितलं, त्यांच्याविषयी काहीतरी करायला पायजे. त्यांनी लेख करा म्हणून सांगितलं. कॅफेमधल्या रमणशी बोललो. ते लंडन आणि अमेरिकेला जायला बॅगा भरत होते. त्यांच्याशी मेल, व्हॉट्सअपवरून कॉण्टॅक्ट करत राहिलो.

त्यांना भेटूनच हा लेख करायचा होता. पण नाही जमलं. इथे तिथे त्यांच्या मुलाखती होत्या. त्या वाचून हा लेख केलाय. दिव्य मराठीच्या वर्धापनदिनाच्या रसिक पुरवणीत हा लेख आला होता. मन लागो मेरो यार फकिरी में, या शीर्षकाने. जबरा रिस्पॉन्स आला. बुलडाण्याहून एक वाचकमित्र फोन करून म्हणाला आता आम्ही जुने मित्र पुन्हा भेटणार, काहीतरी करून दाखवणार. रॉक ऑन. धुळ्याहून कबीर मठातल्या आजीचा फोन आला, त्यांना कबीर जयंतीला भजनाला बोलावयाचंय. मजा आली. कबीर कॅफेला भेटून लेख पुन्हा लिहायचाय सविस्तर. तोवर हाच गोड मानून घ्या.