Tuesday 28 June 2011

महाराष्ट्राला वळण लावणारा विचारवंत


परवाच राज्य सरकारचं मासिक लोकराज्य प्रकाशित झाला. तो वाचन विशेषांक आहे. मुळातून वाचण्याजोगा. सदानंद मोरे, हरी नरके, रा. रं. बोराडे, विजया राजाध्यक्ष, जयसिंगराव पवार, अरूण टिकेकर, सतीश काळसेकर, कुमार केतकर, अऱुण साधू अशा अनेक जाणकारांचे लेख आहेत. काय वाचावं, आवडती पुस्तकं असा छान आढावा आहे. तो एक संग्राह्य अंक झालाय. प्रल्हाद जाधवांना याचं श्रेय द्यायला हवं.

या थोरामोठ्यांबरोबर माझाही एक लेख त्यात आहे. त्याचा आनंद आहेच. पण त्याहीपेक्षा आनंद लेख प्रबोधनकार ठाकरेंवर आहे याचा आहे. प्रबोधनकारांना त्यांचं हक्काचं मानाचं स्थान मिळालंय, हे महत्त्वाचं. गेल्या सप्टेंबरात प्रबोधनकारांच्या सव्वाशेव्या जन्मदिनानिमित्त prabodhankar.com ची सुरुवात झाली. ती संकल्पना आणि संशोधन माझंच होतं. तरीही माझा मित्र राहुल शेवाळेची मदत नसती तर ती संकल्पना माझ्या डोक्यातच राहिली असती. वेबसाईट अद्याप पूर्ण झालेली नाही. अनेक चुका राहिल्यात. अनेक टाइप झालेली पुस्तक अपलोड व्हायचीत. त्यावर मी पुन्हा एकदा नव्याने कामाला लागलोय. एखाद्या वाचन विशेषांकात प्रबोधनकारांचा समावेश होतो, हे प्रबोधनकार डॉट कॉमच्या टीमच्या प्रयत्नांचं यश आहे, असं मला नम्रपणे नमूद करावंसं वाटतं. काल अंक आल्यापासून अनेक जण आवर्जून प्रतिक्रिया नोंदवत आहेत. प्रत्येक वेळेस प्रबोधनकार त्यांच्यापर्यंत पोहोचला, याचा वारंवार आनंद होतोय. लेख पुढे कटपेस्ट केलाय. तुम्ही वाचला तर मला पुन्हा पुन्हा आनंद होईल.

मेरिटचा गरबा



२००९च्या जूनमधे एकामागून एक परीक्षांचे निकाल समोर येत होते. त्यात गुजराती पोरांची संख्या खूप होती. यावर्षी परीक्षांचे निकाल वाचताना मला तेच आठवत होतं. गुजराती मुलांची नाव यंदाही मेरिट लिस्टमधे अधूनमधून दिसली. हे थोडं धक्कादायकच आहे. कारण गुजरात्यांची आपल्या लेखी ही ओळख नाही. आपल्याला गुज्जू माहीत ते असे स्कॉलर म्हणून नाहीच. तेव्हा लिहिलेल्या लेखाचा इण्ट्रो होता, एखाद -दुसरा अपवाद वगळला तर यंदाच्या झाडून सगळ्या परीक्षांमध्ये गुजराती मुलं टॉपर्स आहेत. या मेरिटच्या गरब्याचं थेट गणित ग्लोबलायझेशनशी जोडलेलं आहे.

मी राहतो तो कांदिवलीचा भाग गुजराती भाषकांचा गड आहे. माझे कित्येक शेजारी, लहानपणीचे खेळगडी, मित्रमंडळी गुजराती आहेत. आजूबाजूला जितकं मराठी ऐकलं, तितकंच गुजराती आणि हिंदीही. शेजारीपाजारी जितका नवाकाळ यायचा तितकाच गुजरात समाचार आणि मायापुरीही. त्यामुळे गुजराती भाषा कानाला डोळ्याला कधीच परकी वाटली नाही. आणि माणसंही. ती घरातलीच होती. गुजराती मित्र आमच्यासोबत दस-याचं सोनं वाटायला यायचे. आम्ही त्यांच्यासोबत दिवाळीत साल मुबारक करत फिरायचो. एकमेकांच्या बोलण्यावर, खाण्यापिण्यावर, जगण्यावर प्रभाव टाकतच आम्ही लहानाचे मोठे झालो. गुजराती म्हणजे गर्भश्रीमंत असतात, असं काही लोकांना वाटत असतं. पण आमच्या वाडीत गरीब आणि निम्नमध्यमवर्गीय गुजराती लॉटमधे बघितले. त्यात एक बदल समोर दिसत होता. इथले गुजराती पहिल्यांदाच इथक्या मोठ्या प्रमाणात शिक्षणावर भर देत होते. ते निरीक्षण या लेखात नोंदवलंय. आता दरवर्षी हा बदल अनुभवता येतो. जुना लेख कटपेस्ट.

Monday 27 June 2011

कृषीवलला माझा नवा कॉलम सुरू झालाय



संजय आवटे. त्यांचं गेली अनेक वर्ष वाचत होतो. आज आपल्या मराठी पेपरांमधे नवा थॉट देण्याची क्षमता असणारे हाताच्या बोटावर मोजण्याइतकेच भेटतात. आवटेंचं नाव त्यात खूप वर घ्यायला पाहिजे. त्यांची दोन पुस्तकं मराठीतून इंग्रजीत ट्रान्सलेट होतात आणि चांगली खपतात, यातच त्यांचं मोठेपण दिसतं. माझा त्यांचा परिचय तसा ते लेखक आणि मी वाचक असाच. पण ते कृषीवलचे संपादक झाल्यानंतर म्हणजे अगदी कालपरवाच त्यांची भेट झाली.

त्यांच्याविषयी असलेल्या आदरामुळेच कृषीवलमधे कॉलम लिहायला हो म्हणालो. पण खरंच नवशक्तिच्या एका कॉलमासाठीच वेळ काढणं शक्य होत नव्हतं. त्यामुळे मीच एक कॉलमचं वेगळं स्वरूप सांगितलं, ज्यात फार वेळ जाणार नाही. जे काही वाचतो, पाहतो त्यातली एखादी आवडलेली गोष्ट शेअर करणं, असं याचं स्वरूप असणार आहे. तीही अगदी थोडक्यात. कॉलमचा वार आणि नाव अजून फायनल होतंय. गेल्या आठवड्यात पहिला हफ्ता टाकलाय. तो असा होता. ज्याची शिफारस केलीय तो मूळ इंग्रजी लेख खाली कटपेस्ट केलाय आणि वर माझी शिफारस.माझ्या लेखाचं नाव होतं बेशर्मी मोर्चा. 

Saturday 25 June 2011

एका गावाची गोष्ट


नुकताच कोकणात जाऊन आलो. कोकणात मूळ गाव कोटकामते, तालुका देवगड, जिल्हा सिंधुदूर्ग. पण गाव तसं नावापुरतं. मी नवसाचा, म्हणून तीन वर्षांचा असताना कुलदेवी भगवतीला दर्शनाला नेण्यात आलं होतं. त्यानंतर गावी गेलो ते थेट लग्न झाल्यावर. त्यामुळे मी राहतो त्या कांदिवलीलाच आपला गाव मानत आलो. पुढे पत्रकारितेत आलो. कधी साहित्य संमेलनासाठी तर कधी निवडणुकांसाठी कोकणात फिरलो. कशामुळे माहीत नाही, पण आतून जाणवत राहिलं की आपली नाळ इथेच कुठेतरी लाल मातीत पुरलेली आहे.

कोकणाचं गारुड एकदा तुमच्यावर भारलं की मग इथल्या दगडमातीपासून भुताखेतांपर्यंत सगळं आपलं वाटायला लागतं. तोच आपलेपणा घेऊन मी नारायण राणे यांची मालवण मतदारसंघातली पोटनिवडणूक कव्हर करायला गेलो होतो. साल बहुदा २००५. राणेंनी नुकतंच सेनेविरुद्ध बंड केलं होतं. मुंबईपासून बांद्यापर्यंत सारा कोकणपट्टा राणेमय झाला होता. मी तिथे पोचल्यावर माझ्या डोक्यातल्या कोकणापेक्षा वेगळंच चित्र वेगळंच दिसत होतं. मी बिनधास्त राणेंच्या राड्यांच्या बातम्या द्यायला सुरुवात केली. अनेक लोक मला समजवायला येऊ लागले. मी काय करतो, कोणाला भेटतो, यावर नजर ठेवली जात होती. अगदी ज्योतिर्भास्कर जयंत साळगावकरांनीही मालवणात कोणतीही दादागिरी होत नसल्याचा लेख आमच्याच पेपरात लिहून मला जणू व्हिलन ठरवला होता. पण मला तिथे दहशत पावलापावलावर जाणवत होती. खासदारांनाही मारहाण होत होती. मी त्यावर बरंच लिहिलं. एक रोंबाट नावाचा कॉलमही लिहिला होता. हा सगळा अनुभव खूप मस्त होता.

साध्याच माणसांचा एल्गार येत आहे


आज डॉ. सदानंद मोरेंचा वाढदिवस आहे. पुणे विद्यापीठाच्या तुकाराम अध्यासनाचे प्रमुख, साहित्य अकादमी विजेते लेखक, इतिहास आणि संतसाहित्याचे अभ्यासक यापेक्षाही एक स्वतंत्र प्रतिभेचे महान विचारवंत म्हणून मोरे सरांचं योगदान मला फार मोठं वाटतं. तुकाराम दर्शन आणि लोकमान्य ते महात्मा या त्यांच्या दोन्ही महाग्रंथांनी जगाकडे बघायचा आपला दृष्टिकोन बदलून जातो. लिहिताना किंवा एकूणच विचार व्यक्त करताना जाती, भाषा, प्रदेश, पक्ष, संघटना, विचारधारांच्या अभिनिवेशाला बळी पडणं आज कठीण झालंय. अशावेळेस मोरेंचं लिखाण वेगळं उठून दिसतं. एकाच वेळेस सत्याचा आग्रह आणि विरोधी मताबद्दलची सहिष्णुता त्यांच्या लेखनातून सापडते. ती माझ्यासारख्या नवशिक्या पत्रकाराला महत्त्वाची वाटते.

आज नवशक्तित छापून आलेल्या लेखात वारीविषयी लिहिलंय. यातलं जे काही चांगलं आहे किंवा तुम्हाला जे काही आवडेल ते मोरे सरांच्या लिखाणातूनच पूर्वी वाचलं असेल असं खुश्शाल समजावं. लेख कटपेस्ट.

Friday 24 June 2011

अवघा रंग एक झाला


झक मारली आणि पत्रकारितेत आलो, असं सांगणारे मित्र जवळपास रोज भेटतात. पण मला तसं कधीच वाटलं नाही. पत्रकारितेत असण्याचा अभिमान आणि आनंद मी सतत अनुभवतो. पत्रकारितेत रोज नवं आणि नव्याने जगता येतं. त्यात असे काही अतीव समाधानाचे क्षण अनुभवता येतात की त्यांवर अख्खं आयुष्य आनंदात जाऊ शकतं. तसा एक अनुभव माझ्या गाठिशी आहे, तो वरळी नाक्यावरच्या भिमडीवाला बिल्डिंगमधला.

गोरेगावचे वारंग आजोबा. आमच्या कुटुंबाशी अनेक वर्षांचे परिचित. वारकरी आणि स्वाध्यायी. त्यांच्या मृत्यूनंतर त्यांच्याविषयीच्या बातम्या पेपरात आल्या इतके ते सामाजिक कामात होते. त्यांच्याकडे खूप पुस्तकं होती. त्यांचं काय करायचं, हा त्यांच्या घरातल्यांना मोठा प्रश्न होता. त्यांचे नातू राजू सावंत यांचे आमचे घरोब्याचे संबंध. त्यांनी मला पुस्तकं बघायला घरी यायला सांगितलं. पण मी तेव्हा नुकताच नव्या नोकरीत लागलो होतो. माझं जाणं झालं नाही. तसं त्यांनीच दोन पुस्तकांचे गठ्ठे आमच्या घरी आणले. हे गठ्ठे अनेक वर्षं शो केसच्या कपाटावर पडून होते.

सगळी पुस्तकं जुनी झाल्यामुळे थोडी फाटलेली पण नीट कव्हर घातलेली. जवळपास सगळी अध्यात्मिक. त्यात एक पुस्तक दिसलं, ‘श्रीसंत चोखामेळा महाराज याचे चरित्र व अभंग गाथा’. छान बाईंडिंग, पानं जवळपास अडीचशे. नवा खजिनाच सापडला होता. चोखोबांबद्दल थोडं फार ऐकलं होतं. पण माझ्यासाठी तो वारकरी परंपरेने घडवलेल्या क्रांतीचा दाखलाच होता. त्याहीपेक्षा मी हादरलो ते चोखोबांच्या पत्नी सोयराबाईंचे अभंग वाचताना. अवघा रंग एक झाला हा अभंग माझ्यालेखी तोवर फक्त किशोरी आमोणकरांचाच होता. आता तो माझ्यासाठी चोखियाच्या महारीचा, सोयराबाईंचा झाला होता. मला झालेला हा साक्षात्कार मी जमेल त्याला सांगत होतो. चोखोबांवरची इतर पुस्तकं जशी जमतील तशी वाचत होतो. तेव्हा मला या चोखोबांच्या गाथेचं महात्म्य आणखी कळत होतं.

Saturday 18 June 2011

मुंडे आता काय करणार?


गोपीनाथ मुंडे म्हटलं की आजही शरद पवारांच्या भ्रष्टाचाराविषयीची आंदोलनं आठवतात. त्यांना त्या काळात बघितलेली लोकं विशेषतः तेव्हाचे पत्रकार अजूनही त्या इमेजमधून बाहेर आलेले दिसत नाहीत. पण माझ्या वयाच्या पत्रकारांना ते मुंडे माहीत नाहीत. आम्ही बघितलेल्या मुंडेंच्या सभांना गर्दी जमत नाही. अगदी पाशा पटेलच्याही समोर त्यांचं भाषण फिकं पडतं. चार पत्रकारांच्या किंवा नेतेमंडळींच्या वर्तुळातून ते बाहेर पडत नाहीत. कधी पवारांशी, कधी भुजबळांशी, कधी विलासरावांशी त्यांचं मेतकूट सुरू असतं.

कार्यकर्त्यांशी त्यांचा संपर्क राहिलेला नाही. सहज संवाद साधता येतील अशापद्धतीने ते पदाधिका-यांशीही वागताना दिसत नाहीत. ते स्वतःही आपल्या त्याच लढाऊ इमेजच्या प्रेमात आहेत. पण आता कोणत्याही पद्धतीने लढण्याची तयारी दिसत नाही. कदाचित हे फक्त माझं वैयक्तिक निरीक्षण असेल. त्यात काही ग्रह पूर्वग्रहही असू शकतील. पण तरीही माझ्या इतर मित्रांशी चर्चा करताना इतरांच्याही डोळ्यासमोर त्यांच्याबद्दलची प्रतिमा बरीचशी अशीच आहे.

त्यामुळे मुंडेंच्या नाराजीचं विश्लेषण करताना सिनियर मंडळी आणि आमच्या बरोबरची किंवा नंतरची मंडळी यांच्यात बरंच अंतर पडतं. मुंडेंचा मासबेस गडकरी, तावडेंपेक्षा खूप मोठा आहे. त्यामुळे मुंडेंविरुद्ध बोलण्याची त्यांची औकात नेहमीच विचारात घ्यायला पाहिजे, हे खरंच. पण मुंडेंचा तो पूर्वीचा मासबेस खरंच उरलाय का, हा प्रश्न विचारात क्वचितच घेतला जातो. आता मराठवाड्यातून फक्त दोन आमदार निवडून आलेत, त्यात एक मुंडेंची लेक आहे, हे बघितल्यावर नव्या संदर्भात हे मासबेसचं गणित तपासून घ्यायला हवंय. मुळात महाराष्ट्रात भाजपची ताकद ती केवढी. अर्ध्यापेक्षाही कमी सीटांवर लढणारा हा पक्ष. त्यातही अनेक ठिकाणी ताकदीची बोंब. बाकीच्या अनेक राज्यांत म्हणजे उत्तर प्रदेशपासून कर्नाटकापर्यंत भाजपची स्वबळावर एकदा तरी सत्ता आलीय. तिथल्या नेत्यांना जननेता म्हणणं योग्य आहे. पण भाजपच्या एखाद्या नेत्याला असं कसं म्हणता येईल.

आता मुंडेंना शेटजी भटजींच्या पक्षातला बहुजन म्हणून झुकतं माप द्यावं, असंही नाही. खरं तर आता भाजपमधे अनेक नव्या पिढीत तावडेंपासून मुनगंटीवारांपर्यंत अनेक बहुजन चेहरे समोर आलेले आहेतच. संघाच्या एकूण स्ट्रॅटेजीत मुंडे फिट बसले म्हणून त्यांना मोठी स्पेस मिळाली. ते नसते तर त्यांच्याजागी आणखी कुणी असतं. त्यांनी अनेक बहुजन नेत्यांना भाजपमधे आणलं, तसंच अनेक बहुजनांना संपवलं हेदेखील विसरायला नको.

Wednesday 15 June 2011

‘मुंबई आमचीच’ क्यों कहते हैं मराठी ?


मुंबईत हम लोग नावाची एक संस्था आहे. मुंबई काँग्रेसचे एक पदाधिकारी विजय सिंग यांच्या नेतृत्वात उत्तर भारतीय त्यात प्रामुख्याने आघाडीवर आहेत. मुंबईच्या विविध समस्यांवर ती काम करते. शिवाय महत्त्वाचं म्हणजे महिन्यातून एकदा शहरातले हिंदी साहित्यिक एकत्र आणून त्यांच्यात परस्परसंवाद वाढवण्याचं कामही ही संस्था करते.

ते दरवर्षी हमलोग गौरव सन्मान नावाचा पुरस्कार देतात. यंदा त्यांच्या पुरस्कारांमधे माझं नाव होतं. एप्रिलमधे त्याचा कार्यक्रम पार्ल्यात झाला. पुरस्काराचा आनंद होताच. पण पुरस्कार पार्ल्यात दिल्याचा अधिक आनंद होता. J  दुसरा आनंद, माझ्यासोबत हा पुरस्कार मिळाला तुळशीदास भोईटेला. तुलसी माझा जवळचा मित्र. मोठा पत्रकार. सोबतच हिंदीवर प्रेम असणारे उत्तम लेखक अनंत श्रीमाली आणि सामनामधील ले आऊटचे जादूगार भालचंद्र मेहेर यांनाही पुरस्कार देण्यात आला.

तिथलं माझं हिंदीतलं भाषण बरं झालं. त्यातले महत्त्वाचे मुद्देः एका हिंदी भाषकांच्या संस्थेकडून पुरस्कार मिळतोय याचा आनंद आहे. हिंदी भाषा फक्त युपी बिहारवाल्यांच्या बापाची पेंड नाही. ती त्यांच्याइतकीच आमचीही आहे कारण ती राष्ट्रभाषा आहे. कुणी बिहारी पद्धतीने हिंदी बोलणार असेल, युपीच्या ढंगात हिंदी बोलणार असेल. तर मी मराठी हेलाची मराठी बोलणार. त्यात काही चुकीचं नाही. आणि खरी राष्ट्रभाषा ही आपली मुंबईचीच हिंदी आहे. तुपात तळलेली बनारसची हिंदी किंवा तंदूरीसोबत भाजलेली लखनौ हैद्राबादेची हिंदी ही राष्ट्रभाषा नाहीच नाही. कारण त्या काश्मीर ते कन्याकुमारी सगळ्यांना नाही कळत. तिथे सगळ्यांना सामावून घेणारी आपली मुंबईची हिंदीच कळते. आज गरज आहे ती पंढरपुरात जन्मून आजच्या पाकिस्तानापर्यंत पोहोचणा-या संत नामदेवांचा मराठी वारसा जपण्याची. नामदेवांनी एक दोन नाही सहा भाषांतून रचना केलीय. त्यांचा कबीर, नानकांपासून मीरा, नरसीपर्यंत थेट प्रभाव आहे. त्याचबरोबर हिंदीतले रईदास इथे भाषेचा कोणताही व्यत्यय न होता इथे रोहिदास बनतात आपले होतात. कवी भूषण इथे येऊन शिवरायांवर कवनं रचतो. ही सांझी विरासत आपल्याला हवीय. आज राजकारणासाठी काही लोक मराठी हिंदीत भांडणं लावत आहेत. अशावेळेस शेकडो वर्षं एकमेकांच्या गळ्यात गळे घालून चालणा-या या दोन संस्कृतींनी एकमेकांशी संवाद साधण्याची गरज आहे.

Tuesday 14 June 2011

माधुरी काय हे?



काही दिवस माधुरीची जाहिरात टीव्हीवर अधूनमधून दिसतेय. जितक्यांदा दिसते तेव्हा जीव जळतो. त्यावर लेख लिहिला. पण त्यात काहीतरी राहिलंय, असं वाटतं. काहीतरी अडलंय असं माझंच मला वाटतंय. काय झालंय ते कुणी सांगेल का?

टीव्हीवर जाहिराती सुरू असतात. अचानक तुतारी वाजते. तो तिच्या मोबाईलचा रिंगटोन असतो. ती टेच्यात फोन उचलते. गंगूबाई बोलत्येय.मोलकरणीच्या वेषात दीक्षित, नेन्यांची आणि तेवढीच आपल्या सगळ्यांची माधुरी गंगूबाई बनलेली असते. इनिसपेक्शन करत्येय. असं म्हणत ती घरातल्या भांड्यांची तपासणी करते. कथित मराठी वळणाचं हिंदी बोलते आणि एक्स्पर्ट नावाचा एक भांडी घासायचा साबण वापराचा सल्ला देते.

Monday 13 June 2011

रिपोर्टर की पोर्टर?


बरेच दिवस ब्लॉगवर आलो नाही. बरेच दिवस फेसबुकावरही नव्हतो. एका कामात अडकलो होतो. पण लिहिणं तसं सुरू होतं. त्याचदरम्यान एक लेख लिहिलाय. आमचे ज्येष्ठ मित्र संजय आवटे कृषीवलचे मुख्य संपादक झालेत. त्यांच्या रिलाँचिंगच्या अंकात पत्रकारितेवर मला लेख लिहायचा होता. तेव्हा म्हणजे सात तारखेला हा लेख लिहिला. रिपोर्टर की पोर्टर असं त्याचं नाव होतं. पण तो थोडा त्रोटक होता. त्यात भर घालून, काही मुद्दे सविस्तर लिहून हा लेख तयार झालाय. नवा लेख माझ्या नवशक्तितल्या समकालीन कॉलमात रिपोर्टर आहेत कुठे या नावाने शनिवारीच छापून आलाय.

साधारण सव्वा वर्षांपूर्वी मी पाच वर्षांच्या गॅपनंतर पुन्हा टीवीच्या बातम्यांत परतलो. तेव्हा खूप गोष्टी बदलल्या होत्या. आम्ही बूम घेऊन धावायचो तेव्हाचं आणि आताचं जग बदलल्याचं दिसत होतो. त्यातला सर्वात धक्कादायक बदल होता, तो रिपोर्टरचं कमी झालेलं महत्त्वं. तेव्हा आम्ही इथे मुंबईतून बसून दिल्लीतल्या चॅनलचेही अजेंडे बदलायचो. आता रिपोर्टरकडून रेम्याडोक्याने धावत राहण्याची अपेक्षा असते. त्यावर लिहिलंय. ९५ साली ऑक्टोबरमधे कॉलेजमधे असताना माझं पहिलं आर्टिकल आज दिनांकमधे छापून आलं होतं. तेव्हापासून आजपर्यंत मीडियाकडे शक्य तितक्या डोळे उघडे ठेवून बघतोय. प्रिंट, टीवी, नेट, मराठी, हिंदी, थोडंफार इंग्रजी असं फिरून आलोय. मी स्वतःला मुळातला डेस्कवाला मानतो. तरी जास्तीत जास्त काळ बातमीदारीच केलीय. तीही अगदी आनंदाने आणि मानाने. त्यामुळे सालं रिपोर्टरची किंमत कमी होताना बघताना खूप खुपत राहतं.