Saturday 21 May 2011

शिवशक्ती भीमशक्तीः राजकारण की समाजकारण?


पुरुषोत्तम खेडेकर नावाच्या माणसाचं ब्राम्हणांबद्दलचं एक अत्यंत विकृत लेखन सध्या सगळीकडे इंटरनेटवर फिरतंय. हे अशापद्धतीचं नीच आणि घाणेरडं डोकं असलेला हा माणूस परिवर्तनवादी आणि बहुजनवादी संघटनांच्या गोष्टी वर्षानुवर्षं करत होता, हे धक्कादायक आहे. मराठा संघटना अशाच प्रकराचं खालच्या पातळीवरच्या गोष्टी करणार असतील, तर मराठेतरांमधे त्याचे प्रतिसाद उमटणारच आहेत. मला वाटत त्या पार्श्वभूमीवर शिवशक्ती भीमशक्ती महत्त्वाची आहे. पण त्यासाठी या राजकीय समीकरणाकडे सामाजिक अंगाने पाहिलं जातंय. पण राजकीय पक्षांकडून तशा फारशा अपेक्षा नाही करता येत.

त्याहीपेक्षा आजघडीला महत्त्वाचा मुद्दा हा की यातून राजकीय फायदा फारसा नाही. फार तर मुंबई, ठाणे, नाशिक आणि पुणे या मोठ्या शहरांमधे शिवसेनेला थोडाफार फायदा होईल. कारण आजवर दलित मतं सेनेला हरवण्यासाठी एकत्र यायची, ते थांबू शकेल. त्यातली किती मतं युतीला मिळतील, हे आता सांगणं कुणालाच शक्य नाही. पण विरोधातलं ध्रुवीकरण जरी थांबवलं तरी सेना भाजपच्या पदरात मुंबई ठाणे महापालिकेसाठी खूप काही पडणार आहे. तरीही याचा राजकीय अंगाने विचार करता कामा नये, ते राजकीय दृष्टीनेही फारसं फायद्याचं ठरणारं नाही.

दहा बारा दिवसांआधी उद्धव, मुंडे आणि आठवले यांच्या पत्रकार परिषदेत गेले होतो. तिथे त्यांचा सगळा अजेंडा राजकीयच असल्याचं दिसलं. काँग्रेसविरोध हा काही शिवशक्ती भीमशक्तीचं वैचारिक अधिष्ठान असू शकत नाही. ते यशस्वीही होऊ शकत नाही. उलट याकडे सामाजिक अंगाने पाहिल्यावर एक पक्ष म्हणून शिवसेनेचं स्वीकारमूल्य वाढणार आहे. हे बेरजेचं राजकारण यातून फायदा होणारच पण लांबवर. तोवर वाट बघण्याची यांची तयारी आहे का, हे मात्र माहीत नाही. या विषयावर नवं लिहिण्यासारखं काही नाही. त्यामुळे लेख कटपेस्ट करतोय.

Friday 20 May 2011

दशावतारी

माझ्या आधीच्या आणि माझ्या पिढीच्या पोरांमधे कमल हासनबद्दल एक वेगळा कोपरा आहेच. सन्नीपासून अमीरपर्यंत आणि हृतिकपासून सलमानपर्यंत कुणाचेही फॅन असले तरी कमल हासनची गोष्ट वेगळी आहे. मुंबई टाइम्समधे असताना मी थोडंफार सिनेमावर लिहिलं. तेव्हा कमलचा 'दशावतार' हिंदीत डब होऊन मुंबईत रिलीज झाला होता. त्याच्या हासनच्या यात दहा भूमिका होत्या. मुखवट्यांच्या या खेळात तो 'अप्पू राजा'पासून रमलाय. त्यात त्याचा खरा चेहराच हरवलाय का, असा माझा प्रश्न होता. त्याचा सिनेमा कितीही बकवास असला तरी कुठूनतरी आपल्याला समृद्ध करून जातो, असा माझा अनुभव आहे. 

Wednesday 18 May 2011

तरुणांचा तुकाराम


या शनिवार रविवारी म्हणजे २१ आणि २२ तारखेला पुण्यात पहिलं बहुजन संत साहित्य संमेलन होतंय. देशभरातून वक्ते त्यात बोलत आहेत. त्याच्या आयोजकांशी माझा तसा थेट परिचय नाही. तरीही त्यांनी मला बोलवलंय, याचा आनंद आहे. त्यात २२ तारखेला सकाळीच सकाळी संतसाहित्य आणि प्रसारमाध्यमं असा एक परिसंवाद आहे. हरी नरके, बबन नाखले अशा जाणकार माणसांबरोबरच मीही त्यात बोलणार आहे. बोलायचा प्रयत्न करणाराय.

आता बोलायचं म्हटल्यावर तयारी हवी म्हणून आता थोड्या वेळापूर्वीच मावलींची ज्ञानेश्वरी काढलीय, तुकाराम महाराजांची गाथा काढलीय. सदानंद मोरेंचं तुकाराम दर्शन तर मास्टरपीसच आहे. सोबतीला आ. ह. साळुंखेंचं विद्रोही तुकारामही आहे. सोबत नामदेव आणि चोखामेळ्यांवरचीही दोनदोन पुस्तकं काढलीत.

पुस्तकं उघडण्याआधी थोडं आपल्याच दामन में झाकून बघणं गरजेचं वाटलं. कारण विषय थेट आपल्याशी जोडलेला आहे. मीडियात आहोत तर आपण संतसाहित्यावर काय काय काम केलंय ते तपासायला हव, असं वाटलं. फार काही हाताला लागलं नाही. आणखी करायला हवं होतं असं वाटलं. महाराष्ट्र टाइम्सने सांस्कृतिक विशेषांक काढले. त्याच्या पहिल्या अंकात बडव्यांवर लिहिल्याचं लगेच आठवतंय. त्याचं श्रेय जयंत पवारांना. त्यांनीच आषाढी विशेषांकांत वारीचं मॅनेजमेण्ट या विषयावर डब्बेवाल्यांशी बोलून लेख करायला लावला होता.

Thursday 5 May 2011

छोट्या शहरातला मोठा पोरगा


गेल्या शुक्रवारी नवशक्तित माझा कॉलम छापून आला. लेखाचा विषय महेंद्रसिंग धोनी आहे. आज त्याला पेप्सीच्या नव्या गटक गटक ऍडमधे पाहिलं. तो आला तेव्हाच काहीतरी वेगळं रसायन होतं हे कळलं होतं. आता तर त्याने आपली छाप कायमस्वरूपी सोडली आहे. आता तो जगातल्या शंभर सर्वात प्रभावशाली माणसांपैकी एक आहे. ओसामाला मारणारे ओबामाही त्याच्याइतके प्रभावी नाहीत, असं टाईम मॅगझिन म्हणतंय.

लेख कटपेस्ट केलाय.

टाईम मॅगझिन जगभरातल्या शंभर सर्वात प्रभावशाली व्यक्तीची यादी प्रकाशित करत असते. परवा ती यादी आली. ही यादी खूप इंटरेस्टिंग आहे. फेसबुकवरच्या एका स्टेटसमुळे इजिप्तमधे क्रांती घडवणारा गुगलमधे काम करणारा साधा नोकरदार वेल घोनीम या यादीत पहिल्या नंबरवर आहे. फेसबुकचा संस्थापक मार्क झुकेरबर्ग सातव्या नंबरवर आहे. तर विकिलिक्सचा संस्थापक ज्युलियन असांगी नवव्या स्थानावर आहे. आणि अमेरिकेचे अध्यक्ष बराक शेवटच्या रांगेत म्हणजे ८६ व्या स्थानावर आहेत.

मी शिवाजीराव गायकवाड बोलतोय

रजनीकांत हगायला बसला... मी एसेमेस वाचायला लागलो. खाली खाली स्क्रोल केलं. बराच वेळानंतर शब्द दिसले... आता त्याला आणखी किती छळणार, सुखाने हगू तरी द्या!

रोबोट हीट झाला तेव्हापासून रजनीकांतच्या नावाने असे ज्योकवर ज्योक सुरूच आहेत. पडद्यावर सुपरहीरो पण प्रत्यक्षात टक्कल आणि दाढीचे पांढरे खुंट त्याने कधी लपवले नाहीत. रोबोट रिलिज झाला, त्या काळातच तो मुंबईत आला होता. बाळासाहेब ठाकरेंना भेटलाही होता. तेव्हा त्याच्यावर लिहिलं होतं.

आता रजनीकांत आजारी आहे. हॉस्पिटलमधे दाखल आहे. आपलं कुणी आजारी झालं की त्याला भेटायला जावसं वाटतं. तसंच वाटलं. म्हणून त्याच्यावरचा हा लेख टाकतोय. सध्या ब्लॉगवर मराठी अस्मितेची चर्चा सुरू आहे. तीदेखील यानिमित्ताने सुरू राहू शकेल.

मराठी बाण्याचा असाही इतिहास

मी पेपरात लिहायला सुरुवात केली ती बॉलीवूडच्या रिपोर्टिंगनेच. सांस्कृतिक वगैरेच करायची इच्छा होती. राजकारण समाजकारणावर लिहिन असं कधी वाटलं नव्हतं तेव्हा. आता राजकारण समाजकारणावर नेहमी लिहिताना क्वचित कधीतरी फॉर अ चेंज नाटक सिनेमावर लिहिलंय अधूनमधून.

मी शिवाजीराजे भोसले बोलतोयरिलिज झाला तेव्हा हा लेख लिहिलाय. मला तो सिनेमा बिलकूल आवडला नाही. क्वचित काही डायलॉग सोडले तर त्यात काही घेण्यासारखं नव्हतं. त्यातल्या शिवाजी महाराजांना शिवाजी महाराज कळलेच नव्हते. त्यातले चमत्कार करणारे, झिंगलेल्या डोळ्यांचे शिवराय बघणं म्हणजे शिवरायांचा अपमानच होता. तरीही हा सिनेमा धो धो चालला. कारण एकच त्याने मराठी माणसाच्या दुख-या नसेवर बोट ठेवलं होतं. ही नस ज्याला सापडली तो जिंकला. राजकारणातल्या राड्यांमधेही आपल्या सगळ्यांचा हाच अनुभव आहे.

मुंबई टाइम्सची कव्हर स्टोरी म्हणून मी मराठी बाण्याचा एक वेगळा इतिहास मांडायचा प्रयत्न केला होता. नाटक सिनेमातून मराठी बाणा कसाकसा व्यक्त झालाय, त्यावर हा लेख होता. त्याचा इण्ट्रो असा होता, मराठी माणूस खरं तर जगभर विविध क्षेत्रांत आघाडीवर आहे. पण मुंबईत होणा-या ख-या खोट्या कुचंबणेने तो असुरक्षिततेच्या कोषातही अडकलाय. त्याचा हा विविधरंगी मराठी बाणा सिनेमा नाटकांतून अनेकदा व्यक्त झालाय. 'मी शिवाजीराजे भोसले बोलतोय' हा त्याचा लेटेस्ट अविष्कार. पण शिवाजीराजेनेही मराठी बाण्याचा ट्रेण्ड काही उभा राहिला नाही.

बर्लिनच्या भिंती पाडण्यासाठीच असतात


परवा एक मेच्या दिवशी आम्ही मी मराठीवर विशेष बुलेटिन केलं होतं. शाहिरांच्या देशा नावाचं. आमचे मित्र श्रीरंग गायकवाड यांनी आमच्या सगळ्या सहका-यांच्या मदतीने हे जमवून आणलं होतं. त्यात अमरशेख, अण्णाभाऊ, गवाणकर, चंदू भरडकर, आत्माराम पाटील, विठ्ठल उमप, शाहीर साबळे, लीलाधर हेगडे असे दिग्गज शाहीर दिसले. काहीजणांचा आवाजही ऐकता आला. विशेष म्हणजे लीलाधर हेगडे, आत्माराम पाटील यांच्या पत्नी इंद्रायणीताई, मधुकर नेराळे, संभाजी भगत, सुबल सरकार, सोलापूरचे अजिज नदाफ, सांगलीचे आदिनाथ विभूते, नंदेश उमप, अमर शेखांच्या थोरल्या कन्या प्रेरणा बर्वे, धाकटे जावई नामदेव ढसाळ, जीएल आणि तारा रेड्डींचे सुपुत्र प्रकाश रेड्डी, प्रकाश खांडगे इतक्या जणांना शाहिरांविषयी बोलतं केलं होतं. इतकं डॉक्युमेंटेशन टीव्हीवर कुठे एकत्र आल्याचं माझ्यातरी ऐकिवात नाही. तांत्रिकदृष्ट्या आमच्या काही मर्यादा नक्कीच आहेत. पण निदान आम्ही सगळ्यांची कृतज्ञतेने आठवण काढली. बरं वाटलं.

त्यात बेळगावचे एक वयस्कर शाहीर होते, गणपती तंगणकर. हाफपँट, सदरा आणि डोक्यावर फेटा अशा साध्या वेशातले हे शाहीर थकलेल्या आवाजात पोवाडा गाताना दिसले. त्यांच्या आवाजातली आणि नजरेतली खंत आताही डोळ्यासमोरून जात नाही. सीमाभागाचा मुद्दा हृदय कुरतडणाराच आहे. संयुक्त महाराष्ट्राचा लढा अजून पूर्ण झालेला नाही, अशीच यातल्या कार्यकर्त्यांची - नेत्यांची भूमिका होती. कारण बेळगाव, बिदर, भालकी, निपाणी, कारवार महाराष्ट्रात आलेला नाहीय. संयुक्त महाराष्ट्राची लढाई जितकी मुंबईत लढली गेली. तितक्याच त्वेषाने बेळगावातही लढली गेली. मुंबई मिळाल्यावर महाराष्ट्राने ढेकर दिला. पण बेळगाव दूरच राहिला, त्याचं फक्त वाईट वाटून घेतलं. मुंबईसारखं प्राणापणाने लढणारे सीमाभागासाठी तोंडदेखली आंदोलनं करत राहिले. मुंबई हातची गेली असती तर महाराष्ट्राच्या खिशावर आघात झाला असता. बेळगावात मन अडकलं होतं. मनाला काय किंमत द्यायची गरज नसते.

ही माती तुला कधीचीच विसरलीय

हुतात्म्यांच्या नावानं चांगभलं हा लेख ब्लॉगवर टाकला. त्याला तुम्ही नेहमीसारखं उचलून धरलंत. थँक्स. याच विषयावरचा आणखी एक लेख आठवला. विंदा गेले तेव्हा नवशक्तिच्या कॉलमात लिहिलेला. एखादा कवी लेखक गेला की आतून गलबलायला क्वचितच होतं. विंदा गेले तेव्हा झालं तसं. इतका मोठा, डोंगरापेक्षा मोठा माणूस. पण आपला वाटायचा साला. बालकवितांपासून अमृतानुभवाच्या मराठी भाषांतरापर्यंत त्याचं वाचलेलं सगळंच नितळ होतं. त्यांना मी ऐकलंही होतं दोनचारदा.

सगळ्यात आधी ९६ साली. कॉलेजात असताना आज दिनांकमधे लिहायचो. सावंतवाडीला कोकण मराठी साहित्य संमेलन होतं. अंबरीषजी मिश्रंनी आवर्जून पाठवलं होतं तिथं. वय होतं एकोणीस. आजही आहे असं नाही पण तेव्हा फारशी अक्कल नव्हती. फारसं काही आठवत नाही. पण विंदांचा कविता म्हणताना आकाश भारून उरणारा आवाज आठवतोय फक्त. तेव्हा त्यांनी हे श्रेय तुझेच आहेही कविता ऐकली होती.

Tuesday 3 May 2011

हुतात्म्यांच्या नावानं चांगभलं


साधारण गेल्या नोव्हेंबर २००९ ची गोष्ट आहे. माझ्या एका मित्राने मला निरोप दिला. उद्धव ठाकरेंना मला भेटायचं होतं. भेटीचे दोन संदर्भ होते. एक मटात असताना हल्ला आणि पराभव  नावाचं आर्टिकल लिहिलं होतं. शिवसेनेनं वागळेंसाठी आयबीएन लोकमतच्या ऑफिसावर हल्ला केला होता. त्यावर मी टीका केली होती. त्याविषयी आमची चांगली चर्चा झाली. त्यापूर्वी अनेक वर्षं कार्यक्रम आणि प्रेस कॉन्फरन्सेसमधून आम्ही भेटलो असू. पण वन टू वन पहिल्यांदाच भेटलो होतो.

दुसरा संदर्भ हा की मी तेव्हा मटाचा राजीनामा दिला होता. नोटीस पीरियड चालला होता. पुढे मी मराठीत नोकरी धरली, पण तेव्हा पुन्हा नोकरी करायची इच्छा नव्हती. मी प्रबोधनकारांवर काम करायची इच्छा बोलून दाखवली. मी प्रबोधनकारांवर खूप खूप बोलत होतो. काय करता येईल, ते सांगत गेलो. त्यांनी पॉझिटिव रिस्पॉन्स दिला. त्यातून पुढे प्रबोधनकार डॉट कॉमचं काम उभं राहिलं.