Sunday 24 April 2011

गुढीपाडवा हे हिंदू नव वर्षं नाही

गुगल सर्चवर सापडलेला गिरगावच्या शोभायात्रेतला एक यूट्यूब ग्रॅब. 
आज सकाळी नुकतेच दात घासून झाले होते. मोबाईल वाजला.

मी सामंत सर बोलतोय कल्याणहून. तुमचा लेख खूप आवडला हो. अगदी बरोबर आहे, तुम्ही लिहिलंय ते. तुम्ही लिहिलेलं सगळं पटलं. अगदी मनापासून.

थँक्यू थँक्यू.

मी आमच्या कल्याणमधल्या नव वर्ष शोभायात्रा समितीचा गेली बारा वर्षं पदाधिकारी आहे. तरीही सांगतो, पटलं तुमचं. हो, ते हेडगेवारांसकट सगळं पटलं. मुलं थर्टी फर्स्टला दारू पिऊन धिंगाणा घालतात. ते नको म्हणून आमच्यासारख्यांना गुढीपाडवा साजरा व्हायला हवा असं वाटतं. म्हणून आम्ही शोभायात्रेबरोबर.

आपला गुढीपाडवा साजरा व्हायलाच हवा. पण गुढीपाडवा म्हणून.

मी बिर्ला कॉलेजचा वॉइस प्रिंसिपल होतो. आता रिटायर्ड झालोय. मी पाहिलंय ना मुलं गुढी पाडव्याला वेज न्यू इयर साजरं करतात आणि थर्टी फर्स्टला नॉन वेज न्यू इयर.

मी हसतो.


तुम्ही म्हणता ते खरंच आहे. हे फक्त मराठी माणसांचंचं नवीन वर्षं आहे. आमच्या सोबतचे फक्त संघवालेच याला युगाब्द सांगत असतात.

मग पुढे हेच मुद्दे थोडे सविस्तर सांगत थोडा वेळ चर्चा चालली. नवशक्तित आज माझा लेख हे हिंदू नव वर्ष नाही छापून आलाय. त्याखाली ते त्यांच्या पद्धतीप्रमाणे माझा मोबाईल नंबरही टाकतात. सामंत सरांनी आधीही एकदा फोन केला होता. आज पुन्हा त्यांचा फोन आला. सकाळीच झालेल्या कौतुकामुळे मजा आली. आपल्या लिखाणामुळे कुणाची तरी मतं बदलतात. आनंदाने जगायला आणखी काय हवं सालं?

काल लेख लिहून झाल्यानंतर असंच बरं वाटलं होतं. बरेच दिवस हा विषय डोक्यात अडकलेला होता. गुढीपाडव्याला मारून मुटकून हिंदू नव वर्ष बनवण्याच्या कारवाया आपल्या डोळ्यासमोर घडत असताना त्यावर शांत राहावंसं वाटत नव्हतं. सुरुवातीला गुढीपाडव्याच्या शोभायात्रा बघून गंमत वाटली. एकदा गिरगावात ती कव्हरही केली होती. नथ, नऊवारी लेवून बाईकवर बसलेल्या मराठी मुली बघून कुणाला बरं वाटणार नाही. भगवे फेटे, गुढ्या, देखावे बघायला चांगलेच वाटतात. हे सगळं गुढीपाडव्यासाठी असेल तर केव्हाही आनंदच आहे.

पण हिंदू नव वर्षं ही संकल्पनाच न पटणारी आहे. हिंदूंचं एकच नवीन वर्षं कसं काय असेल. आमचे देवही तेहतीस कोटी, कालगणनेच्या पद्धतीही प्रांतवार बदलणा-या, मग एक नव वर्षं कसं असेल. आणि ते हवं तरी कशाला? हिंदूंमधे विविधता असणारच. ही व्यापकताच आपल्या संस्कृतीचं मोठेपण आहे. तरीही त्याला चापून चोपून अन्य धर्मांप्रमाणे एकाच साच्यात बसवायचं काम हे तथाकथित हिंदुत्ववादी करत असतात. ते या गोष्टी धर्माच्या नावाने करतात. त्यामुळे त्यावर डोकं लावलं जात नाही आणि डोळे झाकून स्वीकारलं जातं. हे भारतीय संस्कृतीसाठी घातक आहे. म्हणून हिंदू नव वर्षाला विरोध व्हायला पाहिजे.

गुढीपाडवा गुढीपाडवा म्हणूनच साजरा व्हायला पाहिजे. कारण हिंदू नव वर्ष ही संकल्पना असूच शकत नाही. गुढीपाडव्याव्यतिरिक्त नवं वर्षं साजरा करणारे काय हिंदू नाहीत? डॉ. हेडगेवाराचा जन्मदिवस म्हणून काय गुढीपाडव्याचं नवं वर्षं बाकीच्यांच्या डोक्यावर थोपायचं? मराठी माणसाचं नवीन वर्षं देशभर पसरतंय म्हणून आनंद व्यक्त करण्यातही काही अर्थ नाही. कारण प्रत्येकाची आपापली नवीन वर्षं आहेतच. जवळपास गेली नव्वद वर्षं मराठीभाषी हिंदुत्ववादी अनेक मराठी संकल्पना हिंदू म्हणून देशभरातल्या हिंदुत्ववाद्यांच्या डोक्यावर थापत आहेत. पण त्यामुळे ना मराठी संस्कृतीचा विकास झालाय, ना मराठी भाषेचा. उलट त्यातून महाराष्ट्राचं राष्ट्रीय स्तरावर स्वीकारार्हतेत खूपच मोठं नुकसान झालंय.

हिंदुत्वावाद्यांच्या नेतेमंडळींमधे मराठी माणसं सातत्याने आहेत. न. चिं. केळकरांपासून खापर्डे, मुंजे, सावरकर, हेडगेवार, गोडसे, गोळवलकर, देवरस आणि आता भागवत, गडकरी. हिंदुत्ववाद्यांमधे स्वामी श्रद्धानंद, कन्हय्यालाल मुन्शी, श्यामाप्रसाद मुखर्जी, दीनदयाळ उपाध्याय, रज्जूभय्या, वाजपेयी, अडवाणी अशी एक अमराठी नेतृत्वाची फळी समांतर आहे, हे मान्यच. पण त्यांच्या विशेषतः वैचारिक मांडणीत मराठी माणसांचा बोलबाला मोठा आहे. यात नेतृत्वावकडून मराठी अस्मितेचं राजकारण करणा-यांच्या प्रेरणाही मिळालेल्या आहेत. लोकमान्यांनंतर राष्ट्रीय राजकारण करण्याऐवजी काँग्रेसमधे महाराष्ट्र पक्षाचं कुडमुडं राजकारण करणारे न. चिं. केळकर पुढे हिंदू महासभेचे अध्यक्ष बनतात ते उगाच नव्हे. महाराष्ट्रात मराठी अस्मिता आणि हिंदुत्व कायम हातात हात घालून चाललेलं आहे. बाळासाहेब ठाकरेंनी शिवसेनेच्या निमित्ताने त्याला मूर्त रूप दिलं.

मराठी अस्मितेला थोडं खरवडलं की हिंदुत्ववाद निघतो आणि हिंदुत्वाला खरवडलं की ब्राम्हणत्त्व, अशा आशयाचं सदानंद मोरेंनी एका ठिकाणी म्हटलंय. ते मला फार महत्त्वाचं वाटतं. आजही डोंबिवलीसारखा संघाचा गड मनसे सहजपणे काबीज करतं, ते उगाच नव्हे. पार्ले, दादर, पुणे, नाशिक इथे हा डोंबिवली पॅटर्न कुणीही सहजपणे पाहू शकतो. ज्या जातींकडे राजकारण आणि समाजकारणात संख्येची ताकद नाही, अशा लोकसंख्या कमी असलेल्या जाती नेहमी हिंदुत्व किंवा मराठी अशा अस्मितांच्या शोधात जाताना दिसतात, असं माझं एक निरीक्षण आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर मराठी नव वर्षाचं हिंदू नव वर्षं असं जाणीवपूर्वक केलं जाणारं ट्रान्सफॉर्मेशन समजून घ्यायला हवं.

हा बदल समजून घेण्याचा प्रयत्न मी या लेखात केलाय. त्यात कुठे चुकलं असेलही. तुम्ही सगळ्यांनी यावर थोडं बोलावं. आपल्या कमेंट लिहाव्यात, अशी विनंती. पहिल्यांदाच अशी विनंती करतोय. काऱण यातून हा विषय वेगवेगळ्या दिशांनी समजून घ्यायला मदत होऊ शकेल. कारण फक्त हा प्रश्न फक्त हिंदू नव वर्षांचा नाहीय. लेख नेहमीप्रमाणे कटपेस्ट.

गेल्याच आठवड्यात गुढीपाडवा साजरा झाला. गुढीपाडवा म्हटल्यावर आपल्याला डोळ्यासमोर श्रीखंड पुरी, घरासमोर उभी असलेली गुढी आठवतेच. पण आता त्याही आधी आपल्या डोळ्यासमोर गुढीपाडव्याच्या शोभायात्रा येऊ लागल्या आहेत. आजही गुढीपाडव्याचं प्रतीक म्हणजे गुढीच आहे. पण हळूहळू त्याची जागा नथ आणि नऊवारी लेवून सजलेल्या बाईकस्वार महिला घेत आहेत. कारण गुढीपाडवा आता मराठी नववर्षं म्हणून साजरा होत नसून हिंदू नव वर्ष म्हणून साजरा होऊ लागलाय.

हिंदू नव वर्ष ही संकल्पना तशी एकदम नवी आहे. पहिली शोभायात्रा डोंबिवली किंवा गिरगावात सुरू झाली त्याला फार तर बारा पंधरा वर्षं झाली असतील. बाबरी मशीद पाडण्याच्या आधी देशभर एक सांस्कृतिक उन्माद साजरा करण्यात आला होता. त्यात हिंदुत्वाच्या नावाने अनेक नव्याजुन्या संकल्पना नव्याने कलम करण्यात आल्या. हिंदू नव वर्ष त्यातलीच एक. हिंदू नव वर्ष असं मुळात काही असूच शकत नाही. कारण हिंदू म्हटल्यावर असं काही एक एका साच्यातलं काहीच नाही ठरवता येत. इथे एक भाषा नाही, एक देव नाही, एक धर्मग्रंथ नाही आणि खरं तर एक धर्मही नाही. त्यामुळे एक पंचांग आणि एक नवं वर्ष असण्याची दूरदूरवर शक्यताही नाही. त्यामुळे सगळ्या हिंदूंचा नव्या वर्षाचा एकच एक दिवस असणंही शक्य नाही. पण सेमेटिक धर्मांपासून घाबरलेल्यांनी इथे प्रत्येक गोष्ट एकसाची करण्याचा प्रयत्न केला. त्यात हे हिंदूंचं तथाकथित नवं वर्षंही होतं.

हिंदू नव वर्षाला नाकारणं म्हणजे गुढीपाडव्याला नाकारणं बिल्कूल नाही. गुढीपाडवा साजरा व्हायलाच हवा, पण तो फक्त गुढीपाडवा म्हणून. गुढीपाडवा आपल्याला शालिवाहन शकाची आठवण करून देतं. परकीय शकांची सत्ता उलथवून लावत महाराष्ट्रात राहणा-या सातवाहनांनी स्वराज्य उभं केलं, त्यांना कसं विसरायचं? पुराणांमधला अर्थ शोधला तर ज्यांनी पुतळ्यांसारख्या बनलेल्या माणसांमधे प्राण फुंकले. शांत बसलेल्यांना देशासाठी लढायला शिकवलं. त्या सातवाहनांना कसं विसरायचं? पण आज आपल्याला सातवाहनांचा इतिहासही नीट ठाऊक नाही. हा खरा मराठी वारसा समजून घेण्यासाठी संशोधन करण्याची आपली तयारीही नाही. आज मराठी अस्मितेच्या नावाने राजकाऱण करणारे भरपूर आहेत. पण कुणीच कधी देशभर पसरलेलं साम्राज्य उभं केलेल्या या मराठी राजांची आठवण का काढत नाही?  त्यांनी उभारलेली लेणी, गुंफा आज अत्यंत दूरावस्थेत आहेत. तरीही आम्ही स्कूटरवर मिरवून फक्त मिरवणुका काढण्यात धन्यता मानतो. नाणेघाट हे सातवाहनांचं आपल्याला सर्वाधिक माहीत असलेलं स्मृतिस्थळ आहे. गुढीपाडव्याला तरुणांचं गॅदरिंग जर कुठे व्हायला हवं तर ते तिथेच व्हायला हवं. डोंबिवलीच्या फडके रोडवर किंवा पार्ल्याच्या हनुमान रोडवर नक्कीच नाही.

गुढीपाडवा हा आपला मराठी नववर्षदिन. एकाच दखनी सांस्कृतिकतेचा भाग असणा-या महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक आणि आंध्र या राज्यांमधेच गुढीपाडव्याच्या दिवशी नववर्षं साजरं होतं. देशभर बाकी कुठेच नाही. फक्त एक मणिपूर त्याला अपवाद आहे. सिंधमधेही चेटीचांद म्हणून हा दिवस साजरा होतो. महान सिंधी संत झुलेलाल यांचा जन्मदिवस या दिवशी आला म्हणून हा दिवस त्यांच्यासाठी नवीन वर्षं बनला. नाहीतर त्यांनीही उत्तरेतल्या परंपरेनुसार बैसाखीला नवीन वर्षं साजरं केलं असतं.

सर्वसाधारणपणे असं म्हटलं जातं, की नर्मदेच्या उत्तरेला विक्रम संवत मानलं जातं तर दक्षिणेला शालिवाहन शक. काहीजण ही सीमा तापी नदी सांगतात. पण हे विभाजन तितकंसं खरं नाही. दक्षिणेत तमिळींचं स्वतःचं वेगळं कॅलेंडर आहे. ते जगभर आपलंच कॅलेंडर घेऊन जातात. मल्याळींचंही स्वतःचं कोल्लावर्षम नावाची कालगणना आहे. त्यात आणि आपल्या शालिवाहन शकात जवळपास ४५ वर्षांचं अंतर आहे. शककर्ते शिवरायांनी त्यांच्या राज्यभिषेकानंतर शिवशकाची घोषणा केली. अनेक शिवप्रेमी आवर्जून ही कालगणना वापरतात.

तिथे उत्तरेतही विक्रम संवत वापरलं जातं, असं आपण सर्रास म्हणतो. आजच्या मध्यप्रदेशातल्या माळव्याचा राजा विक्रमादित्याच्या नावाने सुरु झालेली ही कालगणना देशात सर्वात जास्त वापरली जाते. बंगाल्यांचं स्वतःचं वेगळं कॅलेंडर आहे. राजा भास्करवर्मनाची आठवण म्हणून ओऱिसा, त्रिपुरा, बंगाल आणि बांगलादेशात हे वर्षं वापरलं जातं. शिवाय गौतम बुद्धांच्या निर्माणानंतर सुरू झालेलं बुद्धनिर्वाण पंचांगही आहे. पारशांचं वेगळी कालगणना तर आहेच. मुस्लिमांची वेगवेगळी पंचांगं तर शेकडो वर्षं सगळ्या भारताने सरकारी कॅलेंडर म्हणून वापरलीत. एवढंच कशाला स्वतंत्र भारताचं एक सरकारी कॅलेंडरही आहे. ज्येष्ठ वैज्ञानिक मेघनाद साहा यांनी हे राष्ट्रीय पंचांग तयार केलंय. पण ते कागदावरच राहिलंय. आकाशवाणीवर आजही तारिख सांगताना या कॅलेंडरचा उपयोग केला जातो. त्याचं नवं वर्षं २१ मार्चला सुरू होतं. शिखांनी आपलं वेगळं अस्तित्व दाखवण्यासाठी नानकशाही कॅलेंडर सुरू केलंय. ते तर आता १९९८ साली सुरू झालंय आणि जगभरातल्या ९० टक्के गुरुद्वारांनी ते स्वीकारलंयदेखील. इस्कॉनने देखील चैतन्य महाप्रभूंच्या नावाने गौराब्द नावाची कालगणना सुरू केलीय. आणि याशिवाय या सगळ्यांना पुरून उरलेलं ख्रिस्ताब्द, म्हणजे आपण नेहमी वापरतो, ते जानेवारीपासून सुरू होणारं कॅलेंडर तर आहेच आहे.

आता एवढ्या कालगणना असल्या अनेकांची नवीन वर्षं सारखी आहेत. तर अनेक ठिकाणी एकच कालगणना वापरत असूनही वेगवेगळ्या प्रांतानुसार नवं वर्षं वेगवेगळ्या दिवशी येतं. उदाहरणार्थ विक्रम संवत. वैशाखाच्या पहिल्या दिवसाला म्हणजे बैसाखीला विक्रम संवताचं नवं वर्षं सर्वसाधारणपणे सुरू होतं. संक्रांतीची तारिख ख्रिस्ती कॅलेंडरनुसार १४ जानेवारी येते. तशीच याची तारिखही नक्की आहे. ती म्हणजे १४ एप्रिल. पंजाब, काश्मीर, राजस्थानसह जवळपास सर्व उत्तर भारत या दिवशी नववर्षं साजरा करतं. त्यातल्या काही ठिकाणी या दिवसापासून चक्क चैत्र सुरू होतो. म्हणजे त्यांच्या आणि आपल्या मराठी चैत्रात पंधरा वीस दिवसांचा फरक असतो. आता हेच विक्रम संवत मानणा-या गुजरातेत मात्र कार्तिक महिन्यात म्हणजे दिवाळीच्या पाडव्याला साल मुबारक होतं. आणि यात वरताण म्हणून गुजरातेतल्याच कच्छमधे हीच कालगणना असूनही आषाढात मिच्छामि दुक्कडम होतं. दुसरीकडे विक्रम संवतापेक्षा वेगळी कालगणना असूनही बंगाल, आसाम, ओरिसा, तामिळनाडू, केरळ इथलं नवं वर्ष बैसाखीच्याच दिवशी येतं. म्हणजे खरं तर कुणाला बहुसंख्य हिंदूंचं नव वर्षं शोधायचं झालं तर बैसाखी शोधावी लागेल. गुढीपाडवा नाही.

नवीन वर्षं म्हटल्यावर आपल्याला आठवते ती एक जानेवारीच. कारण ही आपण रोज वापरत असलेली ही कालगणना आहे. ती कदाचित भारतीय कालगणनेपेक्षा वैज्ञानिकदृष्ट्या कमी अचूक असेलही. पण ती खूपच सोपी आहे. जगभरातल्या विविध कालगणनांमधलं चागलं स्वीकारत ही मोकळीढाकळी कालगणना आकाराला आलीय. म्हणूनच स्वीकारली गेलीय. पण ही कालगणना येशू ख्रिस्तांशी जोडलेली आहे. त्यांचं नवं वर्षं येशूंच्या जन्मदिनाशी म्हणजे नाताळाच्या सेलिब्रेशनशी जोडलेलं आहे. एक जानेवारीला नवं वर्षं साजरं करणा-यांपैकी कितीजणांच्या हे डोक्यात असतं. पण अशा प्रत्येक सेलिब्रेशनला भारतीय संस्कृतीवरचं आक्रमण समजणा-यांना हे खटकणं स्वाभाविक होतं. त्यांना भारतीय संस्कृती तकलादू वाटते. ते ती संपेल म्हणून घाबरतात. पण प्राचीन भारतीय संस्कृतीने जगभरातले असे कित्येक सोहळे आपले बनवले आहेत. आता त्यापैकी कित्येकांचं मूळ आज कुणाला माहितही नाही. भारतीय संस्कृतीनुसार चालायचं तर न्यू इयरचा विरोध करण्याऐवजी त्याला आपलं वळण देऊन कधीच आपलंसं करून टाकायला हवं. प्राचीन भारतीयांचा स्वतःवर विश्वास होता. जगातलं जे काही चांगलं आहे ते स्वीकारण्याची त्यांची तयारी होती. म्हणून ते हे करू शकले. आता स्वतःला हिंदुत्ववादी म्हणून घेणा-या भेदरटांना ते कसं शक्य आहे? त्यामुळे ते एक जानेवारीला स्वीकारू शकलेले नाहीत आणि गुढीपाडव्याला हिंदू नववर्षं बनवण्याचा त्यांचा खटाटोपही यशस्वी झालेला नाही. शोभायात्रांमधे फिरणारे तरुण थर्टी फर्स्ट अधिक उत्साहाने साजरा करत आहेत, हे वास्तव कुणालाच नाकारता येणारं नाही.

एक जानेवारीच्या न्यू इयरला घाबरलेल्यांनी त्याला उत्तर देण्यासाठी युगाब्द शोधून काढलाय. हे सत्ययुग, द्वापारयुग, त्रेतायुग आणि कलियुगाचं गणित आहे. या दिवसापासून म्हणे कलियुग सुरू झालं. महाभारतातल्या युधिष्ठिराचा राज्याभिषेक गुढीपाडव्याला झाला त्या दिवसापासून आता म्हणजे ५११२ वर्षांपासून ही कालगणना सुरू झाल्याचं सांगितलं जातं. पुराणात शोधायला गेल्यास ही कालगणना मिळतेही. पण हे गणित केलेल्याला शंभरच्या वर वर्षं निश्चितच झालेली नाहीत. कारण पुराणांच्या या दृष्टीने झालेला अभ्यासच यापेक्षा जुना नाहीय. आणि ही कालगणना वापरात तर नक्कीच नव्हती. संवत किंवा शकच आपण सर्रास वापरत होतो आणि आहोत. अगदी धार्मिक विधीतही संकल्प घेताना कलियुगाचा संदर्भ येतो पण तो बुद्धावतारे प्रमाणेच. कालगणना म्हणून संवत आणि शकेच येतात. पण गेल्या पंचवीस वर्षात जाणूनबुजून युगाब्द थोपण्यात आलंय. आणि आपणही त्याला डोळे झाकून हिंदू नव वर्षं म्हणून स्वीकारू लागलोय.

आता जे आपापल्या परंपरेप्रमाणे गुढीपाडवा सोडून इतर कोणत्याही दिवसांत नवीन वर्षं साजरे करतात ते काय हिंदू नाहीत? मग हिंदूंचा एकच दिवस असायला तरी कशाला हवा? आणि समजा असलाच तर बहुमताच्या जोरावर बैसाखी असायला हवा. तरीही फक्त राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक डॉ. केशव बळीराम हेडगेवार यांची जयंती असल्यामुळे गुढीपाडवा इतरांवर लादला गेला, असं कोणी म्हटलं तर त्यात काय चुकलं

32 comments:

  1. MAST SACHIN..
    SAMANYA JANTA JO PARYANT SUSHIKSHIT HOT NAHI TO PARYANT HE ASECH CHALNAAR.
    LEKH MAST AAHE

    ReplyDelete
  2. लेख पुन्हा पुन्हा वाचला, वास्तवाचं भान आल्यासारखं वाटत आहे, यामुळं सुरु झालेलं विचारचक्र थांबत नाहीये.खूप छान लेख आहे.

    ReplyDelete
  3. Sachin Sir Khup Chan Ahe Lekh.
    I Proud Of You.

    ReplyDelete
  4. Not at all agree with you, Sachin. This is a very LIGHT MOOD writeup. There is no depth in your content.
    - Datta Joshi
    09225309010

    ReplyDelete
    Replies
    1. This comment has been removed by the author.

      Delete
  5. मुकेश माचकर10 April 2011 at 16:30

    मस्त रे मित्रा!

    ReplyDelete
  6. @ मित्रा अमित, तुझी प्रतिक्रिया वाचली आणि त्यामुळे फेसबुकवर चाललेला वादविवाद क्षुल्लक वाटू लागला.

    ReplyDelete
  7. @ दत्ताजी, I am very much agree to disagree. 9004317989

    ReplyDelete
  8. लेख अप्रतिम. गेल्या 45, 50 वर्षांमध्ये गुडीपाडव्याचे बदलते रूप बघून वैतागलेल्या माझ्यासारखीला लेखातील विचार न पटते तर नवलच!

    ReplyDelete
  9. sachinji lekh kharokharach vaachniya aahe tumche vichar khare aahet parantu kaahi baabtit ase mhanave vaatate ki ekhadi sanskruti jar ghadali jaat asel tar kay harkat aahe tyala protsahan dyayala tumhi mhanata te sarva manya ,parantu mala tar ase vaatate ki hya sarva sohala saajara karnaryamadhe keeman 60% lokana tari kalpana nasel ki hea divas docor hedgevar yancha janmadivas aahe, naahi tar aamachi hindu sanaskruti barya paiki lavachik asalyamule barech badal aani dusaryache changle te sweekarnyachi manasikta aslyamule aamhi nischitach aanandi aahot, aani he tumhi dekhil manya kelele aahe, any way lekh apratim aani vaachaniya aahe dhanyawad! ANIL KUTE

    ReplyDelete
  10. लेख नेहमीप्रमाणेच उत्तम आहे. पण माझ्यामते गुढीपाडवा आणि रा.स्व.संघ आणि के. ब. हेडगेवारांचा जन्मदिवस हा मुद्दा आणखी विस्तृत मांडायला हवा होता. पण सचिन परबच्या वेगळ्या चष्म्यातून दिसलेली गुढी विचार करण्यास ( अगदी खाटी स्वयंसेवकांनाही ) प्रवृत्त करणारी आहे. 09582035348

    ReplyDelete
  11. तुमच्या लेखात तुम्ही म्हणले 'हिंदुत्वाचे उदात्तिकरण' तसंच मला ही एक शब्द सुचतो 'बहुजनवादी उदात्तिकरण.' संपूर्ण माहिती नसतानाही हिंदू धर्माविरुद्ध काहीही लिहिले की त्याला 'आधुनिक' आणि 'बहुजनवादी'म्हणण्याचा'प्रघात आलाय. शिवाय त्यातून मिळणारे 'पुढारी' पण, राजकारण प्रवेशाचा मार्ग, संधीसाधू राजकारण्यांशी मैत्री थोडक्यात 'प्रगती!' आपला लेखही याच प्रकारचा वाटला.

    आपण दिलेल्या संदर्भाप्रमाणेच दक्षीणेतील बहुसंख्य राज्यात गुढी पाडवा साजरा होतो. कर्नाटकात त्याला 'युगादी' म्हणतात. शालिवाहन हे जर मुळ महाराष्ट्रातील मानले, तर आपल्या विजयाची पताका आभाळी धरायला काय हरकत आहे? नाही हरकत आहे... नक्कीच हरकत आहे. कारण हे सगळे संदर्भ ब्राम्हणेतर मंडळींनी शोधले नाहीत, मग जे ब्राम्हणेतर मंडळींनी म्हणलंय, ते चांगलं असूच कसं शकेल नाही का? आणि समजा आपल्याला तसं वाटलं, तरी आपण ते कबूल कसं करू शकतो??????? आपली राजकीय वाटचाल, लोकप्रियता वगैरे वगैरे त्यामुळे धोक्यात नाही येणार? मग न. चिं केळकरांसारख्या विद्वान माणसावरही आपण तोंडसुख घेउ शकतो!

    लेख वाचल्यावर आपली शैली आणि रिसर्च विषयी आदर वाटूनही एवढच लिहू शकतो.

    टीपः मी संघ, शिवसेना, मनसे वगैरे वगैरे संघटनांचा साधा सदस्य देखील नाही. त्यांची बडबड देखील मला पटते असे नाही. पण तरी ही माझ्या धर्माचा मला अभिमान आहे, भले मग कोणी मला धर्मवादी म्हणले तरी मला पर्वा नाही.

    ReplyDelete
  12. @ सौरभ, प्लीज हे समजून घ्या. माझा लेख हिंदू धर्माविरुद्ध नाहीच मुळी. उलट तो हिंदू धर्माच्या बाजूने आहे.

    ReplyDelete
  13. परब महाशय, हिंदू हा शब्द कुणालाही माहीत नव्हता अशा कोणा एके काळी भगवान
    श्रीराम १४ वरशांचा वनवास संपवून अयोध्या नागरीत आले त्या आनंदोत्सवा निमित्त
    सामान्य जनता कडू लिंबाची पाने खाऊन ह्या दिवसाची सुरूवात करते एवढेच लक्षात घ्या.
    बाकी आपला लेख म्हणजे आकाशात उडविलेल्या शोभेच्या फटाक्या प्रमाणेच वाटला
    -सुहास चौक

    ReplyDelete
    Replies
    1. मित्रा अगदी बरोबर बोल्लास !

      Delete
  14. @ सुहासजी धन्यवाद. शोभेच्या फटाक्याची उपमा आवडली. आपलं बरोबर आहे. म्हणूनच गुढीपाडवा प्रभू रामचंद्रांची आठवण काढत साजरा करुया. हिंदूंची नव वर्षं अनेक आहेत. ती त्या त्या प्रांतात साजरी होऊ द्यावीत. सगळ्यांवर एकच नवं वर्ष लादण्याची गरज नाही, एवढंच मला म्हणायचं होतं. त्याविषयी लिहावं, ही विनंती.

    ReplyDelete
    Replies
    1. आपल्या लादणे ह्या शब्दलाच माझा आक्षेप आहे जो बलवान असेल तोच एखादा विचार लादू शकतो. आणि पहा हिंदू नव वर्ष ही संकल्पना आपण आपल्या घरात [महाराष्ट्रात तीही मोजक्या शहरात]प्रकट करीत आहोत उंबरत्याबाहेर आपल्याला कुणीही थारा देत नाही हे सर्वदण्यात आहे ,आम्ही दिल्लीत
      जाऊन तर हिंदू नव वर्ष दिन असे म्हणत नाही ना? मग ह्या दिवासपुरते का होईना, आमची मने आमच्याच घरात विशाल झाली तर आपली काय हरकत आहे?
      आणि हिंदू नॅव वर्ष ह्या संकल्पनेला कुणी पर प्रांतीय आक्षेप घेत नसेल तर त्यांचा मक्ता तुम्ही घ्यावा हे एक कोडेच वाटते

      Delete
  15. मा. सचिन परब, आपला लेख वाचला, आपला अभ्यास चांगला असल्याचा दाखला आहे तो हे देखील कळले.....नव वर्ष एकच कसं असू शकेल आपणा हिंदूंचं हे सुद्धा पटलं....मी कोणत्याच राजकीय पक्षाचा सदस्य नाही कि सामाजिक चळवळीचा कार्यकर्ता देखील नाही....चांगल्याला चांगले आणि वाईटाला वाईट मानण्याची आपली पद्धत.....तुमचं सर्व म्हणणं पटूनही माझ्या एका शंकेच आपण समाधान करावं ही विनंती......हेडगेवारांच्या बद्दल बोलायचं तर दर वर्षी त्यांची जयंती गुढीपाडव्याच्या दिवशीच येते कां ? जर असेल तर तुमचं बोलणं बरोबर आहे आणि नसेल तर मग संघवाले त्यामुळेच गुढीपाडवा नव वर्ष म्हणून साजरा करतात हे बोलणे किती रास्त आहे हे आपण सांगावे......महत्वाचं म्हणजे मी संघाच्या साच्यातला सुद्धा नाही याचीही आपण नोंद घ्यावी.....फक्त एक उत्सुकता म्हणून मी हे विचारतोय तेव्हा आपण योग्य उत्तर द्याल हि अपेक्षा......

    ReplyDelete
    Replies
    1. तुमच्या प्रश्नासाठी थँक्स. मला जितकं माहिताय तितकं, डॉ. हेडगेवार यांची जयंती तिथिनुसारच म्हणजे गुढीपाडव्यालाच साजरी होते. एकदा कालनिर्णयवर कोणत्याही वर्षाचा गुढीपाडव्याचा दिवस बघितला तरी हे सहज कळून येतं. कालनिर्णयमधे हेडगेवारांची जयंती दर गुढीपाडव्यालाच लिहिलेली असते. त्यांच्या जन्मतारखेनुसार म्हणजे एक एप्रिल या एप्रिल फुल्लच्या दिवशी नाही. त्यांची जन्मतारिख पाहण्यासाठी मी आता सहजच विकिपीडिया पाहिला. त्यात लिहिलंय... Dr. Hedgewar was born in 1889 on Gudi Padwa day, the New Year for people from Maharashtra, Andhra Pradesh and Karnataka. गंमत आहे ना! म्हणजे विकिपीडियावर डॉक्टरसाहेबांविषयी नोंद करणा-या त्यांच्या अनुयायालाही हे माहीत आहे की हे नवं वर्षं देशभरातल्या सगळ्या हिंदूंचं नाही.
      बाकी एक सहज की मीदेखील कोणत्या राजकीय पक्षाचा किंवा चळवळीचा कार्यकर्ता नाही. तुमच्यासारखाच आहे.

      Delete
    2. Sachin Parabaji, Tumacha lekh v tyavaril anel pratikriya aaj mazya vachanaaat aalya. Ekandar vlekh v pratikriya pahata tumacha rokh Hindu Nav Varsh kevha sajare karave ya vishayi kami ani Dr. Hedgewar, Sangh yavar jast rokhanara vatala. Ya deshat ase mat swatantrya fakt Hindu Samajatach aahe, jyache tumhi pan ek ghatak aahat. Ekhadi changali parampara navyane suru hot asel tar tyala aapla virodh anakalniy aahe. Ghatkabhar tumacha tark sweekarala tari asech mhanavese vatate ki jar ya prayatnatun jagojagi hindu samaj ek hot asel tar aapan tyache tika n karata swagat kele pahije ase mala vatate. Punha tumhi dolasapane ya gavogavi nighanarya shobha yatra pahilya asatil tar tethe phakt "RAM" asato Dr. Hedgewar nastat he lakshat aale aste.

      Delete
  16. namaskar parab saheb nutan varshachi suruwat vagaire sagli bhampakgiri ahe satta pratistha jyanche kade hoti tya tya paristhiti pramane prateekache nutan varsha weg wegle suru hote dusra kahi nahi. samja chattrapati ajun 10 varshe rahile aste ani maratha samrajyach kayam rahile aste udaharanadakhal pudhe 100 varshe tar kadachit aj ha vishya zala nasta ani tumhi asa kahi vishya pan mandla nasta. yawarun evadhech spasht hote ki prateek shaktiwan mansane/buddhiwan manasane tyala awadel tya paddhatine nutan varsha tharwale . udya me majhe warsha 4 july la suru hote ase mhanun navin shakachi suruwat karto tar tyacha kaya upyog kunala upyog far tar majhya pudhil 4th 5th pidhila tewadach amhi suddha shakkarte ahot evadha garwa karayala moklik

    ReplyDelete
  17. gudhipaadvyaala naveen varsha suru karnyacha praghat assal shetkari maharashtracha aahe. pan aatta tyachaa vaapar vyapaarii karat aahet. roodhi aani prathaamaageel vidnyan samajuun ghetale tar yaat dharma kivaa jaatipeksha bhuugol ani arthashaastraachaa sambandh jaast aahe he samajel. arthaat he jya divashee samajel to ya bhaaratvarshaatala sudiin.:)
    brahmankanya.

    ReplyDelete
  18. आपल्या लादणे ह्या शब्दलाच माझा आक्षेप आहे जो बलवान असेल तोच एखादा विचार लादू शकतो. आणि पहा हिंदू नव वर्ष ही संकल्पना आपण आपल्या घरात [महाराष्ट्रात तीही मोजक्या शहरात]प्रकट करीत आहोत उंबरत्याबाहेर आपल्याला कुणीही थारा देत नाही हे सर्वदण्यात आहे ,आम्ही दिल्लीत
    जाऊन तर हिंदू नव वर्ष दिन असे म्हणत नाही ना? मग ह्या दिवासपुरते का होईना, आमची मने आमच्याच घरात विशाल झाली तर आपली काय हरकत आहे?
    आणि हिंदू नॅव वर्ष ह्या संकल्पनेला कुणी पर प्रांतीय आक्षेप घेत नसेल तर त्यांचा मक्ता तुम्ही घ्यावा हे एक कोडेच वाटते
    please do not take this issue seriously yaar !!!

    ReplyDelete
  19. Apaan je lihta tyabadaal mala hech saangayche ahe ki hindu mansech hindu hya dharmaabada hindunmadhech asthirta nirmaan karat ahet..kharatar tumhi hindu dharmaa badal jagruktaa nirmaan kelli pahije..maag ase asel na taar bakichya dharmanbadal tumhala sahaan bhuti ahe asech mala disun et ahe..

    ReplyDelete
  20. हे आपण चॅनलवाल्यांना दाखवायला हवं. जे डोंबिवलीकरांना नाचताना दाखवतात.

    ReplyDelete
  21. ��������ॐ��������
    ����जननी जन्मभूमिश्च स्वर्गादपि गरीयसी����
    ����दुर्लभं भारते जन्म मानुष्यं तत्र दुर्लभम्����

    ��वेद ��

    ��वेदांच्या निर्मितीचा काळ हा सृष्टिच्या आरंभकाळातील मानला जातो.या हिशोबाने वेदांना ह्या गुढीपाडव्याला (8 एप्रिल 2016,चैत्र शुक्ल 1) 1,96,08,53,117 वर्ष होतील.

    ��वेद हे भारतीय संस्कृतीतील आणि जगातीलही प्राचीनतम साहित्य आहे. वेद हे लिखित साहित्य नव्हते. गुरू-शिष्य परंपरेने ते मागील पिढीकडून पुढच्या पिढीकडे सोपविले जाई.

    ��वेद हा संस्कृत शब्द असून तो 'विद्' या संस्कृत धातूपासून तयार झाला आहे. वेद म्हणजे ज्ञान होय.वेद संस्कृत(वैदिक)भाषेत आहेत.लौकिक संस्कृत आणि वैदिक संस्कृत मध्ये थोडाफार फरक आहे.
    श्लोकांमध्ये असलेल्या अनेक शब्दांच्या अर्थांबाबत आज भारतीय तसेच पाश्चात्य विद्वानांमध्येही असहमती आहे.

    ��वर्तमानकाळात वेद चार मानले जातात.परंतु प्राचीनकाळात सर्व मिळून एकच "वेद ग्रंथ" मानला जात असे.कालांतराने वेद समजून घेणे कठीण होवू लागल्यावर त्यांचे तीन/चार विभाग केले गेले त्यांना वेदत्रयी/चतुर्वेद म्हणतात.

    ������वेदत्रयी������

    1] पद्य भाग - ऋग्वेद, अथर्ववेद
    2] गद्य भाग - यजुर्वेद
    3] गायन भाग - सामवेद

    ����चतुर्वेद����

    1] ऋग्वेद
    2] यजुर्वेद
    3] सामवेद
    4] अथर्ववेद

    ��वेद श्रुति(स्मृति नव्हे) म्हणूनही ओळखले जातात ज्याचा अर्थ होतो 'ऐकलेले' (गुरु-शिष्य परंपरेने).इतर सर्व हिंदू ग्रंथांना स्मृति (मानव बुद्धी/स्मृती वर आधारीत)म्हणतात.

    ��UNESCO ने ७ नोव्हेंबर २००३ रोजी 'वेदपाठ' ला(संपूर्ण वेद तोंडपाठ/कंठस्थ करणे) Masterpiece of the Oral and Intangible Heritage of Humanity म्हणून जाहीर केले आहे.

    ��वेदांना अपौरूषेय मानले जाते आणि निर्माता ब्रह्मा समजला जातो.

    ⏱ब्रह्माची कालगणना⏱

    एक ॠतु = 2 महिने

    एक अयन = 3 ॠतु

    एक वर्ष = 2 अयन

    2 अयन(सहा महिने) = 360 मानव वर्ष = एक दिव्य वर्ष

    4,000 + 400 + 400 = 4,800 दिव्य वर्ष = 1 सत युग

    3,000 + 300 + 300 = 3,600 दिव्य वर्ष = 1 त्रेता युग

    2,000 + 200 + 200 = 2,400 दिव्य वर्ष = 1 द्वापर युग

    1,000 + 100 + 100 = 1,200 दिव्य वर्ष = 1 कलि युग

    12,000 दिव्य वर्ष = 4 युग = 1 महायुग (दिव्य युग असेही म्हणतात)

    1000 महायुग = 1 कल्प = ब्रह्मा चा 1 दिवस = चार खरब बत्तीस अरब मानव वर्ष आणि हेच सुर्याचे खगोलीय वैज्ञानिक वय आहे.

    ��ब्रह्माचा 1 दिवस म्हणजे फक्त दिवस रात्र नाही.2 कल्प ब्रह्माचा एक दिवस आणि एक रात्र पुर्ण करतात.

    ।।ॐ भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्।।

    ReplyDelete
  22. This comment has been removed by the author.

    ReplyDelete
  23. Sir Sachin..your views are correct... Please clarify..
    How much I can believe Wikipedia..
    RSS never celebrated birthday of hedgewar..
    How you can directly linked Mohan with gudi padva?
    Your first para were right but u failed to give exact reason

    ReplyDelete
  24. //आमचे देवही तेहतीस कोटी, कालगणनेच्या पद्धतीही प्रांतवार बदलणा-या, मग एक नव वर्षं कसं असेल. आणि ते हवं तरी कशाला? हिंदूंमधे विविधता असणारच. ही व्यापकताच आपल्या संस्कृतीचं मोठेपण आहे.//

    हे वाक्य पटले.

    पण //तरीही त्याला चापून चोपून अन्य धर्मांप्रमाणे एकाच साच्यात बसवायचं काम हे तथाकथित हिंदुत्ववादी करत असतात. ते या गोष्टी धर्माच्या नावाने करतात. //

    हा काढलेला अर्थ चुकीच्या दृष्टीकोनातून याकडे बघितल्यामुळे काढला आहे असे मला वाटते. ज्यांनी नववर्ष स्वागत यात्रा सुरु केल्या त्यांचे भारतात असलेल्या विविध कालगणना बाबत अध्ययन नसावे ज्यामुळे येथील विविधता त्यांना माहित नसावी. जी विविधता आहे ती काळाच्या ओघात निर्माण झालेली आहे जाणूनबुजून केलेली नाही असे मत असावे आणि सर्व भारतभर एकत्व निर्माण करण्याचा ही उद्देश असू शकतो.

    ReplyDelete
  25. सचिनजी आपल्या लेखातून आपले संशोधन व त्याबद्दलचे प्रयत्न दिसून येतात. छान लेख आहे. आपण यामध्ये कुणा व्यक्ती, धर्म , संघटनेविरोधात लिखाण न करता त्यांच्या वागणुकीबद्दल आणि मानसिकतेबद्दल भाष्य केलं आहे.
    भारतात अन्य विविधतेप्रमाणे नववर्ष दिनाची विविधता आहे हा तुमचा मुद्दा पटला
    पण माझी अशी शंका आहे.
    असेतुहिमाचल साजरे होणारे हिंदू सण हे एकाच दिवशी कसे साजरे होतात? त्यांची ग्रेगरिअन कॅलेंडर मधली तारीख सगळ्या भारतात एक कशी? त्यात विविधता का नाही?
    यांवर एक सविस्तर पणे प्रकाश टाकावा.
    -श्रीराम करंजवडेकर

    ReplyDelete
  26. खरं इतिहास काय आहे हे सर्व बहूजनांना समजायला हवं
    चांगली सत्य माहिती लोकांना समजायला हवी .
    धन्यवाद

    ReplyDelete