Tuesday 19 July 2011

बहुजनवाद म्हणजे ब्राम्हणांना शिव्या देणं नाही

२० ते २२ मे रोजी पुणे शहराजवळ वाघोलीत बहुजन संत साहित्य संमेलन होतं. आश्चर्याची गोष्ट म्हणजे मला त्याचं वक्ता म्हणून निमंत्रण होतं. २१ तारखेला शनिवारी सकाळी प्रसारमाध्यमांतील बहुजन संत साहित्याची स्थिती या विषयावरच्या परिसंवादात मला बोलायचं होतं. विषय आवडीचा होताच. पण त्यावर बोलायचं म्हणून थोडा अभ्यास करावा म्हणून दुकानांत पुस्तकं बघायला गेलो. तर संत आणि बहुजनवाद या विषयावरची पुस्तकं मिळाली ती संभाजी ब्रिगेड, मराठा महासंघ, बामसेफ याचीच. त्यात एककल्लीपणा तर होताच पण द्वेष ठासून भरलेला होता. संत आणि द्वेष एकत्र? ते पटण्यासारखंच नव्हतं. टाळकंच फिरलं.

त्या फिरलेल्या टाळक्यानेच भाषणाला गेलो. जे पटतं ते बोलावं. मनात पाप नाही तर लपवाछपवी कशाला? म्हणून जे काही वाटत होतं ते थोडं स्पष्टच बोललो. मी काही पट्टीचा भाषण करणारा नाही. जसं आपण रोज बोलतो. तसंच लिहावं आणि सभेतही बोलावं असं मला वाटतं. भाषण चांगलं झालं म्हणे. तिथल्या श्रोत्यांनी जोरदार कौतूक केलं. व्यासपीठावर माझ्यासह हरी नरके, सांगलीचे डॉ. बाबूराव गुरव, गुजरातचे जयंतीभाई होते. सगळ्यांनी कौतूक केलं. नरके सरांचं भाषण माझ्यानंतर झालं. त्यात त्यांनी माझा उल्लेख तरुण विचारवंत असा केला. बरं वाटलं.

भाषण सुरू असताना एक गंमत होत होती. प्रेक्षकांमधले एक मान्यवर मला सतत थांबवून प्रश्न विचारत होते. मी ब्राम्हण आहे आणि ब्राम्हणांची बाजू घेतो आहे, असा त्यांच्या प्रश्नाचा रोख होता. ते विदर्भाकडचे होते. त्यामुळे परब म्हणजे मराठा हे मुंबई कोकणात स्पष्ट असणारं समीकरण त्यांना माहीत नव्हतंच. या सगळ्याची खूप गंमत वाटली. आपण मोठ्या शहरात जन्मलो आणि जातीचे संस्कार आपल्यावर झाले नाहीत, हे केवढं मोठं नशीब असं वाटलं.
 
हे भाषण लिहून काढायला हवं. त्यात खूप बेसिक आणि नवा विचार आलाय, असं माझा दोस्त प्रमोद चुंचूवारने सांगितलं. मला फारसं पटलं नव्हतं. पण प्रशंसा कोणाला आवडत नाही. आणि मी ज्यांचं ब-यापैकी ऐकतो, अशातला प्रमोद एक. पण मी काही सगळेच मुद्दे लिहिलेले नव्हते. सुदैवाने भाषणाचं रेकॉर्डिंग झालं होतं. सांगलीच्या शिवाजी कांबळेंच्या टीमकडे हे रेकॉर्डिंग होतं. सांगलीतले माझे सहकारी रॉबिन्सन डेविड यांनी त्याची सीडी मला कुरियर केली. पण माझ्या आळसामुळे त्यात थोडा उशीर झाला. मूळ भाषण जवळपास जसंच्या तसं लिहून काढलंय. फक्त पुनरुक्ती होती ती कापलीय. आणि काही ठिकाणी मुद्दे अधिक स्पष्ट केलेत. त्यामुळे आषाढी एकादशीला ते लिहून ब्लॉगवर टाकावं, असं ठरवलं होतं. पण तोही मुहूर्त चुकलाच.

आणखी थोडा कंटाळा नाही केला, तर भाषणाचा विडियो कापून तेही यू ट्यूब आणि ब्लॉगवर अपलोड करणार आहे. तोपर्यंत वाचायला हरकत नाही.

नमस्कार मित्रांनो,

आता सरांनी सांगितलं की मी मार्गदर्शन करावं. पण मी काही मार्गदर्शन वगैरे करायला इथे उभा नाही. तसं मुळात मार्गदर्शन करण्याची माझी लायकीच नाही. आजचा आपला विषय प्रसारमाध्यमांतील बहुजन संत साहित्याची स्थितीयावर मी मीडियात काम करत असतानाचे काही अनुभव आहेत. काही निरीक्षणं आहेत. ती आपल्याशी शेअर करण्यासाठी मी उभा आहे.

एक सत्यसाईबाबा नावाचा माणूस मेला. त्यादिवशी सिद्धेश सावंत नावाच्या मुलाने फेसबूकवर एक स्टेटस टाकलं. सत्यसाईबाबा गेले. वाईट वाटलं. आता आम्हाला जादू कोण दाखवणार?’ आपल्या सगळ्यांच्या मनातली भावनाच यात व्यक्त झाली होती. एक ढोंगी माणूस. चमत्कार करायचा आणि अध्यात्माच्या गोष्टी करायचा. चमत्कार ही जादूच होती. म्हणजे खोट्याच गोष्टी. आणि खोट्या गोष्टींच्या नावावर अध्यात्म कसं असू शकतं? चमत्काराला नमस्कार नाही, हे तुकाराम महाराजांनी आपल्याला सांगूनच ठेवलंय. त्यामुळे सत्यसाईबाबांच्या ढोंगीपणाच्या विरोधात भूमिका मांडणं आपल्याला आवडणं स्वाभाविक होतं. म्हणूनच २६ एप्रिलला लोकसत्तेत हीच भूमिका मांडणारा एक अग्रलेख छापून आला. त्याचंही बरं वाटलं.

अग्रलेखाचं हेडिंग होतं ऐसे गुरू अडक्याचे तीन’. सत्यसाईबाबांचं स्तोम कसं माजवण्यात आलंय हे यात खूप चांगलं मांडलं होतं. पण त्यातच एक पाचर मारलेली होती. त्यात राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आणि गाडगेबाबा यांचा संदर्भ आहे, तो असा राष्टसंत तुकडोजी महाराज किंवा संत गाडगे बाबा यांचा अधिकार कितीतरी मोठा होता, त्यांनी कधी आपले देव्हारे माजविले नाही आणि आपले ट्रस्ट स्थापन करून देणग्या गोळा केल्या नाहीत. गाडगे बाबा तर माणसाच्या कर्मातच त्याचा देव आहे म्हणून सांगत. पंढरपूरला जाऊन आलेल्या एका भक्ताला त्यांनी एकदा विचारले, ‘आला का जाऊन पंढरीले? मंग तुले इचारलं का इटोबानं का, बाबा भाकर खाल्ली का?  नाई इचारलं ना?  मंग कायले जातं पंढरपुराले?’ अशा राष्ट्रसंतांची आजच्या भारताला गरज उरलेली नाही असे दिसते.यात काहीही चुकीचं नाही. हा लेख संपता संपता ते म्हणतात, मग हे सगळे अध्यात्म जाते कुठे? समर्थ रामदासांनी चमत्कार दाखविणा-या गुरुच्याबाबतीत ऐसे गुरू अडक्याचे तीन, मिळाले तरी त्यजावे.., असा सल्ला देऊन ठेवला आहे. तो सल्ला पाळायची आता वेळ आली आहे.

वरवर यात काही चुकीचं वाटत नाही. पण थोडंसं खोलात जाऊन बघितलं की एक गोम दिसते. गाडगेबाबां किंवा तुकडोजी महाराज हे पंढरपूरच्या वारकरी संप्रदायाच्या विरोधात होते की काय, असं वाटायला लावणारं कोटेशन बरोबर तेथे येतं. हे सगळं झाल्यावर शेवट मात्र येतो, तिथे मात्र संत रामदासच आठवतात. या विरोधाभासात हळूच एक बुद्धिभेद करण्याचा प्रयत्न केलेला आहे. वारकरी परंपरेला सत्यसाईबाबांच्या बरोबर नेऊन बसवलेलं आहे आणि गाडगेबाबा, तुकडोजी महाराजांना समर्थ रामदासांच्या सोबत आणून बसवलेलं आहे. इतिहासाचार्य राजवाडेंपासून हे सतत सुरू आहे. ज्ञानेश्वर तुकारामादि समतावादी संतांचं महत्त्व कमी करण्यासाठी समर्थ रामदासांना वापरून घेतलं जातं. कधी हे जाणीवपूर्वक होतं तर कधी सहज.

हा विरोधाभास थोडा बारकाईने समजून घ्यायला हवा. समर्थ रामदासांचा विरोध करायची गरजच नाहीय. पण गाडगेबाबांच्या विचारांचा धागा थेट वारकरी संतांशीच जोडलेला आहे. तुकडोजी महाराजांना ग्रामगीता लिहिण्याची स्फूर्ती तर चंद्रभागेच्या वाळवंटात झालीय. त्यांची गुरूपरंपराही थेट वारकरी आहे. त्यांच्या परात्पर गुरू म्हणजे आडकोजी महाराजांच्या गुरू आर्वीच्या मायबाई या हैबतीबाबांच्या वारकरी परंपरेतल्या आहेत. तुकडोजी महाराजांचा अभ्यास करणारी मोठमोठी माणसं माझ्यासमोर आहेत, तरीही मी म्हणेन की त्यांच्या सामाजिक कामाचा प्रेरणास्रोत हा मायबाईंची म्हणजे वारकरी संप्रदायाची आहे. आणि नेमका हाच थेट संबंध मधे नीट तोडून मांडण्याचा प्रयत्न वारंवार होत असतो. तो इथेही झालाय असं मला वाटतं.

तर दुसरीकडे वेगळाच प्रकार होतो. उद्धव ठाकरे यांनी आकाशातून हेलिकॉप्टरमधे बसून वारी केलीय. त्यांच्या वारीच्या एरियल फोटोग्राफीचं पहावा विठ्ठल हे एक छान पुस्तक आलंय. त्यातले फोटो खूपच छान आहेत. एवढा मोठा दिवेघाट आणि त्यात प्रचंड पसरलेली लाखो वारक-यांची मांदियाळी. खूपच सुंदर. मन अगदी भरून जातं. मात्र त्या पुस्तकात वारीवर लिहिलेलं आहे ते डोक्यात जाणारं आहे. ते विद्यावाचस्पती शंकर अभ्यंकर यांनी लिहिलंय. आता या विद्यावाचस्पतींचा वारकरी संप्रदायाचा किती संबंध? वारकरी संप्रदायाचा इतिहास काय, वारकरी गळ्यात कसली माळ घालतात, कसा टिळा लावतात, कशी दिंडी काढली जाते, कोणते संत आहेत, अशी बारीक बारीक खूप माहिती दिलीय.

पण फोटोमधे दिसणारे लाखो वारकरी इथे नेमक्या कारणासाठी येतात. त्यांच्यातल्या अनेकांना विठ्ठलाचं दर्शनही होत नाही. कळस पाहूनच परतावं लागतं. वर हा विठोबा नवसालाही पावत नाही. मग त्यामागे नेमकी काय प्रेरणा असते. ही लाखो वारक-यांची परंपरा इतकी वर्षं का टिकलीय. अशी एकही जात नाही ज्यातून या मांदियाळीत संत नाही. असं का होतंय? वर्षानुवर्षं त्याची संख्या का वाढतेयत्या प्रेरणांबद्दल काही नाही. त्या तत्त्वज्ञानाबद्दल काही नाही. तिथे फक्त सांगितलंय माळ कशी घालायची, बुक्का कसा लावायचा. कुठला रामकृष्णहरी मंत्र की आणखी कुठला मंत्र. फक्त याच्याबद्दलच चर्चा. अरे, ज्याने बुक्का लावला नाही. माळ घातली नाही. तो काय वारकरी नाही. अशी कितीतरी उदाहरणं सांगता येतील की ज्याने बुक्का लावला नाही, माळ घातली नाही तरीही ते वर्षानुवर्षं वारी करतात. ते काय वारकरी नाहीत? ते शाकाहाराला वारकरी संप्रदायाची प्रमुख ओळख सांगतात. पण आमचा लतीफ. मंगळवेढ्याचा संत. तो मांसाचे तुकडे करून विठोबाला नैवेद्य ठेवायचा. तो विठोबा आनंदाने स्वीकारायचा. तो लतीफ काय वारकरी नाही? या सगळ्याच्या पलीकडे खूप मोठी वारकरी परंपरा आहे. त्याबद्दल नेमकेपणाने तुम्ही काही विचार करणार आहात की नाही? बोलणार आहात की नाही?

आता तुम्ही हे सांगणार नसाल तर नका सांगू, पण निदान आमची दिशाभूल तरी करू नका. शंकर अभ्यंकरांनी जिथे जिथे ज्ञानेश्वर, नामदेव, एकनाथ आणि तुकाराम यांची नावं घेतली आहेत. तिथे तिथे समर्थ रामदासांचं नाव आहेच आहे. समर्थ रामदासांबद्दल माझ्या मनात कुठेच अनादर नाही, हे मी वारंवार सांगतोय. पण जिथे या चार वारकरी संतांचे अभंग देणार तिथेच रामदासांचेही कोटेशन तुम्ही देताच देता. वारकरी संतांच्या उदाहरणाबरोबर रामदास स्वामींचं उदाहरण देताच देता. हे मात्र निश्चितच चुकीचे आहे. एकाच वर्षात जन्मलेले दोन महान संत, रामदास स्वामी आणि तुकाराम महाराज. त्या दोघांनी एकमेकांविषयी काहीही लिहिलेलं नाही. एकमेकांचं नावही कधी लिहिलेलं नाही. रामदासांनी तुकारामांबद्दल नाही लिहिलं तर नाही लिहिलं. काही अडचण नाही. पण निदान ज्ञानेश्वर माऊली, नामदेव महाराज आणि एकनाथ महाराजांविषयी तरी लिहायला हवं होतं ना. एकनाथ महाराज तर त्यांचे नातेवाईकच होते. यांच्याबद्दल काहीही लिहिलं नाही. इथे त्याविषयी काही तक्रार नाही. पण इतकंच सांगायचंय की या दोन वेगळ्या परंपरा होत्या. वारकरी परंपरा आणि रामदासी परंपरा. तुम्हाला जर रामदास स्वामींबद्दल लिहायचंय तर उद्धव ठाकरेंना सांगा चाफळचे फोटो काढा. अकरा मारुतींचे फोटो काढा. आणि त्यावर वेगळं पुस्तक काढा. पण वारकरी संप्रदायाबद्दल लिहिताना रामदास स्वामींचा जाणीवपूर्वक उल्लेख करणं हा बुद्धिभेद नाही का?

संत कबीराची दिंडी वर्षानुवर्षं वाराणशीहून पंढरपूरला यायची. आता फक्त वीसेक झाली ती बंद झाल्याला. मला आश्चर्याचा धक्का बसला, पंढरपुरात दत्त घाटाजवळ कमालची समाधी आहे. कमाल म्हणजे कबीरांचा लाडका मुलगा. कबीर आपल्या स्वतःच्या मुलाला पंढरपुरात पाठवतात, खरी भक्ती काय आहे ते पाहण्यासाठी पंढरपुरात जा. शेवटच्या क्षणापर्यंत वारी करणारा वारकरी असणारा कमाल आणि कबीरदेखील. तुकाराम महाराजांनी आपले चार पूर्वसुरी सांगितले आहेत. ज्ञानेश्वर माऊली, नामदेव महाराज, एकनाथ महाराज आणि संत कबीर. ज्ञानाचा एका, नामाचा तुका आणि कबीराचा शेखा. त्यात मग रामदास कुठे येतात? तिथे वाराणसीहून कबीराची दिंडी येते. तो आम्हाला वारकरी संप्रदायाचा वाटतो. पण इथे चाफळमधून कधी कोणती दिंडी पंढरपुरात आलेली तुम्ही ऐकलीय का? नाही ना. 

माझा सांगायचा मुद्दा एवढाच आहे. मला रामदासांबद्दल संपूर्णपणे आदर आहे. मनाचे श्लोकासारखं सुंदर काव्य करणा-या रामदासांबद्दल आदर असायलाच हवा, असं माझं वैयक्तिक मत आहे. त्यांच्याच कशाला सगळ्याच संतांच्या तत्त्वज्ञानाबद्दल चिकित्सा निश्चितपणे होऊ शकते. त्याचं हे ठिकाण नाही. हेच फक्त मला सांगायचंय की या दोन वेगवेगळ्या विचारधारा आहेत. हे वारंवार मोठमोठ्या लोकांनी सिद्धही करून ठेवलंय. तरीही कुणी असा बुद्धिभेद करत असेल तर ते थांबायलाच हवं. आजवर हेच होत आलं. कधी तुकाराम रामदासांची तुलना करत कोण छोटं कोण मोठं हे सांगायचं. कधी रामदासांना वारकरीच दाखवायचं. इतिहासाचार्य राजवाडेंनी वारकरी संतांना संताळे म्हटलं. त्यांनी महाराष्ट्राला नेभळट बनवलं असे दावे केले. त्याचवेळेस समर्थ रामदासांचं प्रस्थ चुकीच्या पद्धतीनं वाढवलं. अनेक मान्यवर अभ्यासकांनी त्याचा विरोध केला. त्यातल्या जातिअभिमानाविरुद्ध वर्षानुवर्षं लिहिलं. महाराष्ट्र सारस्वतकार वि. ल. भावेंनी संतांच्या विषयी कसं चुकीचं लिहिलं, याचा आपण विरोध केला. एवढंच नाही तर पांगारकर आणि महिपतीबुवा, जे वारकरी संप्रदायाला आदरस्थानी आहेत, त्यांच्या लेखनातल्याही चुका दाखवल्यात. याच अंगाने अलीकडच्या काळात लिहिणा-या पु. ग. सहस्रबुद्धेंचा विचारही आपण खोडून काढलंय. पण आज तेच आणि तसंच आपल्या नाकाखाली आजही लिहिलं जातंय. तीच राजवाड्यांची वृत्ती आजही लिखाणातून जाणवतेय. त्याची उदाहरणंच आपण पाहिलीत. ती थांबवायला नको का?

मग हे का चालवून घेतलं जातं? याचं एक कारण नेहमी सांगितलं जातं की ब्राम्हणवादी विचारांच्या लोकांच्या हातात मीडिया आहे. पण त्याहीपेक्षा महत्त्वाचं दुसरं कारण हेही आहेच की या वारकरी बहुजनवादी संतांचे अनुयायी किंवा विचारांचे वारसदार हे चालवून घेतो. माझ्या दृष्टीने असे विचार मांडणारे याला जबाबदार नाहीत. तर ज्यांच्याकडे वाचकाची किंवा प्रेक्षकांची शक्ती आहे, त्यांची ही अधिक जबाबदारी आहे. वारकरी संप्रदायात रामदास कसे आले, असं आपण का कधी उद्धव ठाकरेंना पत्र पाठवून विचारत नाही. मी पुन्हा पुन्हा सांगतोय की रामदासांबद्दल मला अनादर नाही. पण हे प्रश्न विचारायला नकोत का?  

या प्रेक्षक आणि वाचकांपेक्षाही यात आम्ही अधिक जबाबदार आहोत. आम्ही म्हणजे जे स्वतःला बहुजनवादी संताचे अनुयायी समजतो आणि मीडियात काम करतो ते. आमची पहिलीच पिढी शिक्षित होतेय. फार तर पहिल्याच पिढीचे ग्रॅज्युएट आहोत आम्ही. त्यामुळे या माध्यमात काम करताना आमच्या सगळ्यांच्या काही मर्यादा असणारच. तरीही याची सगळ्यात मोठी जबाबदारी आमचीच आहे, असं मी मानतो. आमच्या मर्यांदामधे मला सर्वात महत्त्वाची वाटते ती वैचारिक गुलामगिरीची मर्यादा. ही वैचारिक गुलामगिरी राजवाडेंपासून अनेकांनी वर्षानुवर्षं अनेकांनी आपल्या सगळ्यांवर थोपलीय. एका विशिष्ट जातीचे, एका विशिष्ट समाजाचे, एक विशिष्ट विचार मांडणारे जे संत आहेत, तेच तेवढे महान, असं ते सांगत आलेत. जे विशेषतः बहुजन संत आहेत, त्यांना त्यांनी संताळे म्हणून हिणवलं आहे. त्यांनी नेभळट लोकांची फौज तयार केली वगैरे सांगितलंय. त्यांचं कर्तृत्व संपवण्याचा प्रयत्न केलेला आहे. हे वर्षानुवर्ष अनेकानेक मार्गांनी सातत्याने आपल्यावर लादण्याचा प्रयत्न केलेला आहे. ही गुलामगिरी आपल्या डोक्यात आहे तोवर यातून मार्ग निघण्याची शक्यता नाही.

याचा अर्थ असा निश्चितच नाही की सर्वत्र फक्त निराशाच आहे. गेली अनेक वर्षं आषाढी वारीच्या निमित्ताने मराठी चॅनल्समधून खूप चांगल्या गोष्टी आपल्यासमोर येत आहेत. आजपर्यंत ज्या गोष्टी कधीच लोकांसमोर आल्या नाहीत ते या बातम्यांमधून लोकांसमोर येत आहे. आणि जेव्हा कधी या दृष्टीने चांगले प्रयत्न झालेले आहेत तेव्हा त्याला चांगली जागा मिळालेली आहे. हा माझा अनुभव आहे. म्हणूनच मी माझ्यापासूनच सुरुवात करतो. इथे काही माझा मोठेपणा सांगण्याचा भाग नाही. काही गोष्टी शेअर करण्याचा हा भाग आहे.

मी महाराष्ट्र टाइम्समधे काम करत असताना पहिलं सांस्कृतिक मॅगझीन काढण्यात आलं होतं. बडव्यांच्या विठ्ठलमंदिरातल्या अधिकारांविषयीच्या खटल्यात कोर्टाने मंदिर समितीच्या बाजूने निर्णय दिला होता. त्यानिमित्त मी बडव्यांवर लेख लिहिला होता. लहानपणापासून पंढरपुरात जे बघत आलो होतो. आजी, आईकडून जे ऐकत आलो होतो. त्याची चीड मनात साचलेली होती. त्यांच्या अनेक वाईट साईट गोष्टी चव्हाट्यावर आणून, ठोकता येत येईल तेवढं ठोकलं. श्रीरंग गायकवाड आता इथे आहेत. ते तेव्हा महाराष्ट्र टाइम्समधेच होते. असा लेख कसा मटामधे जाईल, असं त्यांनी मला विचारलं होतं. पण तो लेख मटामधे गेला. त्या सविस्तर छापल्या गेलेल्या लेखाचं खूप स्वागत झालं. त्या स्वागत करणा-यांमधे फक्त बहुजन नव्हते, तर अभिजन वर्गातले वाचक होते.

मी पुढे महाराष्ट्र टाइम्सच्या वेबसाईटचा प्रमुख झालो. पहिली वारी आली. आम्ही सगळी मुलं मुलंच होतो. आम्ही अनेक लेखमाला दिल्या होत्या. त्यात मी गांधीजींचा तुकाराम लिहिला होता. गांधीजींनी तुकारामांचे सोळा अभंग मराठीतून इंग्रजीत अनुवादित केले आहेत. हेच सोळा अभंग गांधीजींनी का निवडले असतील, अशा अर्थाने रोज मी त्यापैकी एकावर लिहित असे. त्यात महाराच्या सिवे कोपे तो ब्राम्हण तो नोहे असे बहुजनवादी म्हणावेत असे अभंगही आहेत. त्यालाही खूप चांगला प्रतिसाद मिळाला. वारकरी विचारधारा आणि गांधीवाद यात फार काही अंतर नाहीय. वारकरी संतांच्या ज्या विचारधारेवर नेभळट म्हणून टीका करण्यात आली. त्याचा शिवाजी महाराजांना स्वातंत्र्यलढ्यात काही उपयोग झाला नाही, अशी फालतू टीका करण्यात आली. गांधीजींनी तीच विचारधारा नव्या पद्धतीने मांडून देशाच्या स्वातंत्र्यलढ्याचं नेतृत्व केलं आणि स्वातंत्र्य मिळवलं. हे मी यात मांडलं होतं. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची जन्मशताब्दी आली तेव्हा ग्रामगीता डॉट कॉम या लेखमालेतून तरुणांपर्यंत राष्ट्रसंतांचं तत्त्वज्ञान पोहचवण्याचा प्रयत्न केला.

पुढच्या वारीत आम्ही बंडखोर विठोबा मांडला. त्यात वारकरी संप्रदायातल्या मुस्लिम संतांचं योगदान लिहिलं. आर्चबिशप फेलिक्स मच्याडो यांनी आपण ख्रिस्ती धर्म सांगताना ज्ञानेश्वरी कशी उपयोगी पडली ते सांगितलं. त्याचवेळेस विठ्ठल हे बौद्ध धर्मक्षेत्र कसंय हेदेखील मांडलं. तुकाराम महाराजांचा आंतरराष्ट्रीय प्रभाव आणि नामदेव महाराजांविषयी लिहिलं. नामदेव महाराजांचं कार्य तर अफलातून आहे. आजच्या अफगाणिस्तानापर्यंत ते जाऊन आले होते. आजच्या पाकिस्तानात त्याची देवळं आहेत. माझं एक आवडतं वाक्य आहे, महाराष्ट्राबाहेर विठ्ठलाची जेवढी देवळं नाही तितकी नामदेवांची आहेत. मी देशभर फिरलो त्या प्रत्येक ठिकाणी मला नामदेवांची मंदिरं आढळलं. आपल्या जयंतीभाईंच्या गुजराती भाषेतही त्यांनी रचना केलीय. त्यांनी सहा भाषांतून लिहिलंय. आज फक्त गुजरातचे नरसी मेहता नाहीत, तर मीराबाई, कबीर आणि नानकांवरही ज्यांचा प्रभाव आहे ते नामदेव. गुरुग्रंथसाहेबातही नामदेवांचे अभंग आहेत. आज महाराष्ट्राबाहेरही लाखो लोक आहेत जे आपलं आडनाव नामदेव लावतात. आपण नाही तर नामदेव महाराजांबद्दल आणखी कोण सांगणारतेव्हा आमच्या ठाण्यात नवी मुंबईत सनातन संस्था नावाच्या संस्थेने बॉम्बस्फोट केले होते. तेव्हा मीच एक लेख लिहिला होता, तुम्ही संतांच्या बाजूचे की सनातन्यांच्या. तोच लेख महाराष्ट्र टाइम्स प्रिंटमधे देखील व्यवस्थित छापून आला होता. हे सारं महाराष्ट्र टाइम्सच्या वेबसाईटवर उपलब्ध आहे. मी मराठीत आल्यानंतरही कार्तिकी एकादशीला ईद आली होती. म्हणून खुदा पंढरीचा नावाने मुस्लिम संतकवींविषयी एक पू्र्ण बुलेटिन केलं होतं. मी मराठीच्या बातम्यांसाठी काम करतो. जे कार्यक्रम दाखवतात त्यात माझं काही योगदान नसतं, हे कृपया लक्षात घ्या.

या गोष्टी काही मी माझं कौतुक की मोठेपणा म्हणून सांगायचं नाहीय. प्रयत्न केल्यास अशाप्रकारच्या विचारांनाही चांगली जागा मिळू शकते हा माझा अनुभव फक्त तुम्हाला सांगायचा होता. मी आजवर मोठमोठ्या ब्राण्डमधे काम केलं. तिथे मला चांगलाच प्रतिसाद लाभलाय. हे होऊ शकलं, कारण हे करताना आपली भूमिका अतिशय स्पष्ट असायला हवी. आपल्या मानसिकतेचा आपण विचार करायला पायजे. आपली वैचारिक गुलामगिरी आणि सांस्कृतिक दहशतवाद आपण आधी दूर करायला हवा. जैतुनबी, जिला वारकरी संप्रदाय जयदास महाराज म्हणतो. जैतुनबी, जिच्या पाठीवर महात्मा गांधींनी आणि क्रांतिसिंह नाना पाटलांनी शाबासकीची थाप दिली होती. जैतुनबी, जी धर्माने मुस्लिम असूनही जन्मभर वारकरी होती. ती जैतुनबी महाराष्ट्राच्या व्यापक महान परंपरेचं प्रतिनिधित्व करत नव्हती का? ती वारकरी म्हणून मुसलमानांनी दुर्लक्ष केलं आणि ती मुस्लिम म्हणून हिंदूंनी दुर्लक्ष केलं. एवढं मोठं उदाहरण फार लांबचं नाही तर इथे जवळच्या माळेगाव - बारामतीचं. बारामती, जी महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व देशाच्या पातळीवर करते. महाराष्ट्राच्या व्यापक परंपरेचं मोठेपण जर कोणाच्या द्वारे जगभर मांडता आलं असतं, तर ती जैतुनबीच नव्हती का?  आता वर्षही नाही झालं तिला जाऊन. इतकी वर्षं इतकं दुर्लक्ष? बारामतीच्या इतक्या जवळ, म्हणजे माहीत नाही असंही नाही. कोणकोण फालतू लोकांना भारतरत्न, पद्मश्रीपासून महाराष्ट्रभूषणपर्यंत वेगवेगळे पुरस्कार मिळाले. पण त्यातला एखादा तरी पुरस्कार जैतुनबीला नाही देता आला. पण या दुर्लक्षाला आपणही सगळेजणही तितकेच कारणीभूत आहोत.

अवघा रंग एक झाला, रंगी रंगला श्रीरंग, हा अभंग आपण किशोरी आमोणकरांचा म्हणून ओळखतो. तो किशोरी आमोणकरांनी जबरदस्तच गायलंय. परकायाप्रवेश केल्याशिवाय इतकं चांगलं गाताच येण्याची शक्यता नाही. त्यासाठी त्यांना कितीही नमस्कार केले, तरी कमीच आहेत. पण हा अभंग जितका किशोरी आमोणकरांचा आहे. त्याहीपेक्षा जास्त तो चोखियाच्या महारीचा म्हणजे संत सोयराबाईंचा. हा अभंग संत चोखामेळ्याच्या बायकोचा आहे. आज आपण कसल्या कसल्या तक्रारी करत असतो. पण त्या सा-या कमतरता शेकडोपट जास्त त्यांच्याकडे होत्या. सातशे आठशे वर्षांपूर्वीची ती बाई, आधीच बाई, त्यात दलित, महार जातीची, अस्पृश्य, गावकुसाबाहेर राहणारी. तिच्यापर्यंत कोणतेच विचार पोहचू शकत नव्हते. अशी बाई अवघा रंग एक झाला, रंगी रंगला श्रीरंग सारखं तत्त्वज्ञान सांगते. हा अभंग एका बाजूला काढा आणि जगातलं कुठलंही तत्त्वज्ञान त्याच्यासमोर आणा. ते मग वेद आणि उपनिषदांनी सांगितलेलं असो, भगवान बुद्धांनी सांगितलेलं असो, येशू ख्रिस्तांनी सांगितलेलं असो, महंमद पैगंबरांनी सांगितलेलं असो, हे कोणतंही तत्त्वज्ञान या अभंगाच्या बाजूला ठेवा, हा अभंग तेवढ्याच ताकदीचा ठरेल. तरीही हा अभंग किशोरी आमोणकरांचा म्हणून किती वर्षं सांगत राहायचं. तो त्या चोख्याच्या महारीचा आहे, हे सांगणार कोण? जर तुम्ही आणि आम्हीच सांगितलं नाही, तर कोण सांगणार.

जैतुनबीला न्याय मिळाला नाही. पण त्या जैतुनबीला त्याची कधीच अपेक्षा नव्हती. तुकाराम महाराजांना कसलीच अपेक्षा नव्हती. आपण त्यात किती कमी पडतो आहोत. मी, तुम्ही, ज्यांना कळलंय की हा अभंग चोख्याच्या महारीचा आहे, ते आपण सगळेच कमी पडतो आहोत. सर्वसामान्य माणसांपर्यंत हे मोठेपण पोहोचत नाही, तोवर आपला दोष राहणारच आहे. चोख्याची महारी, तिची व्यापक परंपरा, त्या परंपरेची विचारधारा जर माध्यमांमधून सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचत नसेल, तर ती आपली आणि आपलीच चूक आहे. त्याच्यामागे सांस्कृतिक दहशतवादातून आपण आपल्यामधे तयार करून घेतलेला न्यूनगंड आहे. या देवाच्या नावानं चाललेल्या गोष्टी आहेत. या धार्मिक गोष्टी आहेत, म्हणून आपण या सगळ्या गोष्टी मांडण्यापासून दूर राहिलो, तर चूक आहे. या देवाच्या धर्माच्या गोष्टींच्या पलीकडेदेखील खूप मोठी वारकरी विचारधारा आणि तिची बंडखोरी आहे. आपण त्यातल्या थोड्याशा धार्मिक गोष्टींपायी त्यामागचा मोठा क्रांतिकारक वारकरी विचार मांडणार नसू, तर चूक आपली आहे.

याचा अर्थ असा निश्चितच नाही की आपण आपला अजेंडा माध्यमांमधे राबवावा. आपले विचार आरपार पारदर्शक असायला पाहिजेत. जेव्हा अजेंडा राबवायचा असतो तेव्हा एकांगी विचाराला सुरुवात होते. आणि एकांगी विचारातून एककल्लीपणा निश्चितपणे येतोच येतो. त्यातून एका नव्याच सांस्कृतिक दहशतवादाकडे आपली वाटचाल निश्चित सुरू होते. एक सांस्कृतिक दहशतवाद राजवाडेंपासूनचा असेल, तर त्याचंच अनुकरण आपण दुस-या जातींच्या नावाने करणंही तितकंच चुकीचं आहे.

सध्या इंटरनेटवर मराठा महासंघाचे प्रमुख पुरुषोत्तम खेडेकरांचं एक पुस्तक सर्वत्र फिरतंय. शिवरायांच्या बदनामीची केंद्रे’ .या पुस्तकात त्यांनी एका विशिष्ट जातीचे पुरुष असे असतात आणि विशिष्ट जातीच्या बायका अशा असतात. मग त्यांची स्वतःचीच जात कशी श्रेष्ठ आहे. दंगे घडवा आणि ब्राम्हणांना मारा. मग ते पुरुष, बायका, म्हातारे, मुलं सगळ्यांना कापून काढा. पृथ्वी निर्ब्राम्हण करा, अशी मुक्ताफळं उधळलीत. हा अत्यंत खालच्या थराचा नीचपणाच आहे. सडक्या डोक्याची माणसंच असा घाण विचार करू शकतात. असं एखाद्या जातीचे लोक चांगले किंवा वाईट म्हणणं म्हणजेच ब्राम्हणवाद आहे. म्हणजे आज बहुजनवादाचं नाव घेणारे हे महान विचारवंतच खरे ब्राम्हणवादी नाहीत का? त्यांचा जिथे मिळेल तिथे आणि जसा होईल तसा विरोध करणं हाच खरा बहुजनवाद आहे, असं मला तरी वाटतं.

हे तथाकथित बहुजनवादी बहुजनवादाच्या नावाने अनेक फायदे ओऱपतात. फक्त मी ज्यांचं नाव घेतलं, त्यांचीच गोष्ट नाही. असे लोक सगळीकडेच आहेत. बहुजनवादाचं नाव घ्यायचं आणि स्वतःच्या बायकोला आमदारकी मिळवून द्यायची. बहुजनवादाचं नाव घ्यायचं आणि स्वतःच्या मुलांना खासदारकी मिळवून द्यायची. हा कसला बहुजनवाद? आणि हे आम्हाला आठवण करून देणार की एकनाथ महाराज हे ब्राम्हण होते. बहुजनांच्या कळवळ्यासाठी एकनाथ महाराजांनी स्वतःच्या पोटच्या पोराशी वैर पत्करलं. ते एकनाथ महाराज ब्राम्हण असल्याचं आम्हाला सांगणार. आणि ज्ञानेश्वर माऊली. जेव्हा संस्कृत ऐकलं तर बहुजनांच्या कानात गरम शिसं ओतलं जायचं, त्या काळात त्यांनी श्रीमद्भगवद्गीतेचं तत्त्वज्ञान मराठीत आणून सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहोचवलं. म्हणूनच ज्ञानेश्वर फक्त साध्याभोळ्या वारक-याचेच माऊली बनले नाहीत. तर ज्यांना आपण बुद्धीप्रामाण्यासाठी शतशः प्रणाम करतो त्या तुकाराम महाराजांसाठीही माऊलीच आहेत. त्या माऊलीची, आईची जात आम्ही काढणार आहोत का?

वारकरी संतांची परंपरा सांगितली जाते ती निवृत्तीपासून निळोबापासून. निवृत्तीनाथ आणि निळोबाराय हे दोघेही जातीने ब्राम्हणच. त्याच्याही पुढे जाऊन विचारायचं तर बहिणाबाई सिऊरकरांना आपण काय म्हणाल? बहिणाबाई जातीनं ब्राम्हण. पण तुकारामांच्या शिष्या. ब्राम्हण असून एका शूद्राची शिष्या बनल्या म्हणून नव-यापासून सनातन्यांपर्यंत सगळ्यांनीच खूप त्रास दिला. बौद्ध तत्ववेत्ते अश्वघोषाचा वज्रसूची म्हणून ग्रंथ आहे. बाम्हण्यविध्वंसक म्हणून या ग्रंथाची ख्याती आहे. तरीही बहिणाबाईंनी या ग्रंथावर अभंगात्मक टीका लिहिली. तेही आजपासून चारशे वर्षांपूर्वी. त्या जर बहुजनवादी नसतील, तर जगातलं कुणीच बहुजनवादी नाही.

केवळ ब्राम्हणांना शिव्या देणं म्हणजे बहुजनवाद का? मला जेवढे संतांचे विचार कळतात, त्या परंपरेनुसार ब्राम्हणांना शिव्या देणं म्हणजे बहुजनवाद निश्चित आणि निश्चितपणे नाही. ब्राम्हण्याचा विरोध व्हायलाच हवा. हा फक्त जातीचा प्रश्न नाहीय. कोणत्याही जातीत हा ब्राम्हणवाद असू शकतो. आमचीच जात कशी श्रेष्ठ आहे. एखाद्याच जातीचे लोक कसे प्रामाणिक आहेत. एकाच विशिष्ट जातीत विशिष्ट गुणवत्ता आहे, असं मानणं हा ब्राम्हणवाद आहे. एकाच विशिष्ट जातीच्या किंवा एका विशिष्ट धर्माच्या माणसांमधे काही विशिष्ट गुणधर्म कसे असू शकतात? माणसाचं मोठेपण जन्मानुसार मानतात तो ब्राम्हणवाद आणि माणसाचं मूल्य माणूस म्हणून मानलं जातो तो बहुजनवाद. इतकं हे सोपं आहे. बहुजनवाद ही कोणाच्या विरोधातली विचारधारा नाही. ही एक स्वयंस्पष्ट विचारधारा आहे.

हो, हे सगळं आजच्या विषयाशी संबंध आहे. कारण संतांच्या याच कमिटमेंटच्या मार्गाने जाऊन सर्व प्रकारच्या मीडियावर आणि त्यातील कौशल्यांवर आपलं प्रभुत्व निर्माण करता येईल. संतांनी हेच तर केलंय. त्याकाळातला मीडिया काय होता? कीर्तन, भजन, प्रवचन, भारूड वगैरे. त्या मीडियातले त्या काळातले सगळ्यात प्रभावी लोक कोण होते. नामदेव, तुकाराम हीच तर ती माणसं होती. त्यांनीच तर वर्चस्व गाजवलं त्या काळच्या मीडियावर. आज आपण त्यांचा वारसा सांगतो आणि त्याच संतांची अवलाद असणारे आपण हताश होऊन बसलोय. तक्रारी करतो, आम्हाला प्रसारमाध्यमांमधे जागा नाही. आम्हाला कुणी विचारत नाही. अरे काय हे? आपण एकतर तक्रारी कराव्यात किंवा संतांचं नाव घ्यावं.

भले तो देऊ गांडीची लंगोटी या तुकाराम महाराजांच्या अभंगात गांडीचीच लंगोटी आहे, कासेची नाही. गांडीची लंगोटी या ओळी महाराष्ट्र टाइम्स सारख्या पेपरात तुकारामांच्या चारशेव्या जयंतीनिमित्त पानभर लेखात छापून आल्या होत्या. हे होऊ शकतं. काही प्रॉब्लेम झालेला नाही. तक्रारी किती दिवस करत राहणार. प्रॉब्लेम आपल्यात आहेत. माझ्यासकट सगळ्यांच्यात. आपण ती मानसिकता जर सोडून देणार नसू, तर हे असंच राहणार. सोल्यूशन आणि तक्रार एकमेकांसह येत नाहीत. आपल्याला आपल्या डोक्यातली जळमटं आधी काढून टाकावी लागणार आहेत.

बहिणाबाईंना ज्याने त्रास दिला त्या रामेश्वर भटाच्या वाघोलीत आपण आता आहोत. पण त्याच रामेश्वर भटाला तुकाराम महाराजांना शरण जावं लागलं. त्याच्याविषयी अनेक वाद विवाद चर्चा असू शकतात. मला अभंग लक्षात राहत नाहीत. पण रामेश्वर भटाचा एक अभंग आहे, त्यात तो ब्राम्हणांना उद्देशून म्हणतो, रामेश्वर भट म्हणे द्विजा देव कुठे असेल तर तो तुकारामांमधेच आहे. आज आपण ज्या वाघोलीत उभे आहोत. त्याच वाघोलीत रामेश्वरभटाला तुकाराम महाराजांच्या पायाशी लोळण घ्यावं लागलं. त्या रामेश्वर भटाला नाही तर त्याच्यातल्या ब्राम्हण्याला ज्या पद्धतीने तुकाराम महाराजांनी संपवलं तसंच ब्राम्हणवादाला संपवण्यासाठी आपण इथे एकत्र आलो आहोत, असं मला वाटतं. तीच प्रेरणा देण्यासाठी संत आणि बहुजन हे शब्द एकत्र आणणारं संमेलन होत आहे.

बहुजन हा शब्द माझ्या दृष्टीने इथे जातवाचक नाही. कारण आभाळाएवढं तत्त्वज्ञान सांगणा-या भगवान गौतम बुद्धांनी बहुजन हा शब्द पहिल्यांदा वापरला, बहुजन हिताय बहुजन सुखाय. आधुनिक काळात सामाजिक आणि राजकीय अंगाने विठ्ठल रामजी शिंदेंनी बहुजन ही संज्ञा पहिल्यांदा वापरलीय. दोन्ही माणसं इतकी मोठी होती की ते फक्त जातीच्या कोत्या भूमिकेत अडकून बसणारे नाहीत. आपल्या संत साहित्य संमेलनाने संत आणि बहुजन या दोन्ही एकरूप असणा-या दोन परंपरा पुन्हा एकत्र आणल्यात. ब्राम्हण्य आज ना उद्या संपणारच आहे. तुकाराम महाराजांची त्याचा मार्ग इथे वाघोलीतच दाखवलेला आहे. थांबतो. धन्यवाद. चूकभूल द्यावी घ्यावी. 

28 comments:

  1. भाषण ऎकताना आवडले होते.वाचताना पुन:प्रत्ययाचा आनंद मिळाला.मुद्देसुद,चौफ़ेर,संयमी तरिही निर्भीड विवेचन आहे.वैचारिक स्पष्टता,टोकदारआणि साधार मांडणीमुळे लेख/भाषणाची भट्टी जमुन आली आहे.काही लोक चांगले बोलतात,पण भुमिका घ्यायचे टाळतात,तुम्ही भुमिका घेतली.धारदारपणे मांडली.समर्पक विश्लेषनासह विशद केली.तुमच्यात मला उद्याचा एक मोठा विचारवंत दिसतोय.सर्व शुभेच्छा!

    ReplyDelete
  2. छान झालेय भाषण. बरेच मुद्दे पटले आणि आवडले.

    "ब्राम्हण्य" फ़क्त ब्राम्हणातच नसते. ते सर्वामध्येच असते, बहूजन समाजामध्येही घाऊक प्रमाणात असते पण संधी नसल्यामुळे ते "सुप्त" असते मात्र संधी मिळताच ते उचल खाते.

    त्याच्यामुळे "ब्राम्हण्य" कधीच संपणार नाहीये.

    काल "ब्राम्हण्य" ब्राम्हणामध्ये दिसत होते, उद्या बहूजनामध्ये दिसेल.

    कुरघोड्या करत बसण्यापेक्षा आणि इतिहास गोंजारत बसण्यापेक्षा भविष्याकडे नजर ठेवून वाटचाल करणेच जास्त फ़ायदेशीर ठरेल.

    ---------------------------------------
    पिढ्यापिढ्याच्या अबोलतेला बोलते करण्याचा एक इवलासा प्रयत्न.
    बळीराजा डॉट कॉम

    ReplyDelete
  3. वैचारिक आहे. विचारांबद्दल वाद असू शकतात..असो. काही नव्या गोष्टी समजल्या. व्हीडीयो ची वाट पाहतोय..

    ReplyDelete
  4. @ नरके सर, धन्यवाद. पण एवढी मोठी जबाबदारी आणि शुभेच्छा स्वीकारण्याची माझी लायकी आहे, असं मला वाटत नाही.

    ReplyDelete
  5. @ गंगाधरजी आणि सुहास, धन्यवाद

    ReplyDelete
  6. सचिन भाऊ एक नंबर ....
    सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे नरके सरांनी दिलेली दाद..
    मला या ठिकाणी एक गोष्ट नमुद करावीशी वाटते ती अशी
    आपण लिहीले आहे की,
    "हा फक्त जातीचा प्रश्न नाहीय. कोणत्याही जातीत हा ब्राम्हणवाद असू शकतो. आमचीच जात कशी श्रेष्ठ आहे. एखाद्याच जातीचे लोक कसे प्रामाणिक आहेत. एकाच विशिष्ट जातीत विशिष्ट गुणवत्ता आहे, असं मानणं हा ब्राम्हणवाद आहे."

    या ठिकाणी आपण ब्राम्हणवादाऐवजी ब्राम्हण्यवाद हा शब्द वापरला तर ? आणि ब्राम्हण्यवाद लिहीताना आपण त्याचा सरळ उल्लेख अमानवी वृत्ती म्हणून केला तर चालणार नाही का?

    Because, In Each Nation or in sophisticated Culture a group of people in small number always tries to keep their top status in their self created Slavery system.

    Any kind of 'ism should be tested first ..

    What is your opinion ?

    ReplyDelete
  7. Outspoken speech.Every journalist should think like this. Shubhecchha.

    ReplyDelete
  8. सचिन, खूप छान भाषण. मुद्देसूद आणि परखड. आणखी वाचायला आवडेल.- स्मिता पाटील.

    ReplyDelete
  9. सचिन, खूप छान भाषण. मुद्देसूद आणि परखड. आणखी वाचायला आवडेल.- स्मिता पाटील.

    ReplyDelete
  10. Khup Chan bhashan kele ahes sachin! Samyak vichar mandle ahes. Ya bhashnachi prat kadhun thevavi ase te ahe. Kahi varshanpurvi com. Dange yannihi santana Talkute ase mhatle hote. ya sglyancha tu samachar tar ghetla ahes pan bahujanvadachya navane babnvavbanvi karnaryanahi sodle nahis. Asha santulit lekhnachi maharashtrala khup garaj aahe.

    ReplyDelete
  11. LEKHAN AANI BHASHAN YACHI BHATTI JAMLI KA VICHAR APOAAP SUCHU LAGTAT ! AABHYASUVRUTTIMULE DONHI PRAKAR AAPNAS CHHAN JAMLET !

    ReplyDelete
  12. सचिन, भाषण छानच झालं आहे. आवडले. हे कुठे छापून यायला हवे. साधना साठी पाठव. ता.क. यातील ब्राह्मण असा खरा शब्द आहे, पण म्हशीतला म्ह मुद्दामहून लिहिलाय का? की आता तीच परिस्थिती आहे?
    हरीजी,जरा सबुरीने, हे इंजिन जरा धावूद्या. नाही तर ट्रॅक बदलून यार्डात ते पाठवयला लोक टपलेलेच असतात....

    ReplyDelete
  13. भाषण छानच आहे...सर्वानिच जर असा logical विचार केला तर समाजातील विषमता दूर होण्यास निश्चितच मदत होईल...

    ReplyDelete
  14. सगळ्यांना धन्यवाद!

    ReplyDelete
  15. सचिन भाऊ , आपला लेख अभ्यासपूर्ण आणि डोळ्यात अंजन घालणारा आहे ..! साध्या सोप्या भाषेत आपण प्रभावीपणे बहुजन काय ते समजावून सांगितला ..

    ReplyDelete
  16. Sundar Lekh. Tarkshuddha Mandani.!

    ReplyDelete
  17. This comment has been removed by the author.

    ReplyDelete
  18. सचिन भाऊ,
    बहुजन वादाची संयमित मांडणी आवडली.
    लेख वाचून मनात उमटलेले तरंग येथे व्यक्त करीत आहे.
    १. मी काही संत साहित्याचा अभ्यासक नाही परंतु समर्थ रामदासांनी विठ्ठलावर लिहिलेला अभंग/ श्लोक वाचल्याचे मला चांगले आठवते. परकीय आक्रमक देशावर चाल करून येताहेत. अन्यायाने कळस गाठला आहे. अशा वेळी रामराया तू कटावर हात ठेवून का थांबलास, तुझे धनुष्य कुठे आहे... असा आशय त्या रचनेचा आहे. अर्थातच हा विचार अन्य संतांपेक्षा वेगळ्या वळणाचा आहे. रामदासांनी विठ्ठलावर रचना केली म्हणजे ते वारकरी संप्रदायाचे असे म्हनयाचे का यावर मतभेत असू शकतील. असो. मुद्दा असा कि रामदासांनी विठ्ठलावर रचना केली आहे. ती रचना मी आपल्याला लवकरच शोधून लिंक करेन.
    २. अन्य जातींना हीन लेखणे, हा ब्राम्हणावाद. ही व्याख्याही छान आहे. परंतु संतांची विभागणी बहुजनवादी आणि इतर असे करणे तेवढे पटले नाही. कारण संतांची अशी विभागणी चुकीची वाटते... मध्यंतरी या विषयावर मी एक विस्तृत लेख लिहिलंय... त्यात हा मुद्दा उदाहरणांनी, संदर्भांनी मांडण्याचा प्रयत्न केला आहे. अर्थातच माझ्या क्षमतेनुसार मी प्रयत्न केला आहे. त्या लेखाची लिंक देतोय पाहा.
    http://psiddharam.blogspot.com/2008/11/blog-post_21.html
    मला माहित नसलेल्या अनेक बाबी तुमच्या लेखाने समजल्या. माझा लेख वाचून मार्गदर्शन करावे ही विनंती. आपल्याशी चर्चा करण्याची ब्लोगच्या माध्यमातून संधी मिळत आहे, याचा आनंद वाटतोय. (मी कन्नड भाषी परंतु मराठीतून शिक्षण घेतलेला एक होतकरू पत्रकार आहे. ४/५ वर्षांपासून पत्रकारितेत धडपड करीत आहे. )
    ..........सिद्धराम पाटील

    ReplyDelete
  19. सचिन जी, नमस्कार.
    मी नेहमी आपला ब्लॉग वाचत असतो. आपली तर्कशुद्ध मांडणी, विषयातील स्पष्टता आणि परखडपणा अतिशय आवडतो. नुकताच लोकराज्य च्या 'वाचक विशेषांका'मध्ये आपला लेख वाचला. तोही अतिशय छान जमलाय.
    केवळ ब्राम्हणांना शिव्या देवून चालणार नाही हीच भूमिका मीही नेहमी घेतली आहे. आपण स्वतः आत्मपरीक्षण करायला पाहिजे. स्वतःमधील दोष ओळखून दूर करायला पाहिजे. ब्राम्हणांना नाही तर ब्राह्मणवादी प्रवृत्तींना विरोध व्हायला हवा. परंतु आजही ब्राम्हणी मानसिकता समाजात मजबूत आहे. आजही नथूरामचे पोवाडे गाणारे लोक इथे आहेत. आजही संकुचित प्रवृत्तीने छ. शिवराय, तुकाराम, फुले-शाहू-आंबेडकर यांची बदनामी केली जाते. आणि खेदाने सांगावेसे वाटते कि ही बदनामी करणारे विशिष्ट लोक असतात कि जे पूर्वीपासून हेच धंदे कार्त आले आहेत. तरीही आपला लढा हा व्यक्तीविरोधात नसून प्रवृत्ती विरोधात असायला हवा.
    मेडिया सनातनी प्रवृत्तींच्या ताब्यात आहे याची जाणीव टीवी पाहताना नेहमी होते. परंतु आपण म्हणता त्याप्रमाणे प्रयत्न केले तर काही प्रमाणात का होईना यश मिळेल. आपणाला मिळणारा प्रतिसाद सकारात्मक आहे. परंतु बऱ्याच वेळा वाईट अनुभव येतात. असो. भाषण मात्र एकदम झकास झाले. विडीओ ची वाट पाहतोय.
    काही चुकत असल्यास मार्गदर्शन करावे.
    माझा ब्लॉग- सह्याद्री बाणा www.sahyadribana.com

    ReplyDelete
  20. काही मुद्दे नाही पटले, पण एकूण भाषण छान आहे. मी तुमचे लेखन फार पूर्वीपासून वाचते. जे मुद्दे पटले नाहीत, त्याबद्दल लिहीन कधी तरी, माझ्या ब्लॉगवर.

    ReplyDelete
  21. बहुजनवाद म्हणजे ब्राम्हणांना शिव्या देणं नाही!!!पहिले वाक्य आपले लेखाचे शीर्षक पण साम्य राज ठाकरे यांच्या पहिल्या सभेतील या वाक्यासोबत.... मराठीचा हुंकार म्हणजे गुजराथ्याच्या कानाखाली आवाज काढण नव्हे!

    ReplyDelete
  22. लेख (भाषण) छान आहे, विचार मुद्देसूद रित्या मांडले आहेतच. पूर्वग्रह दुषित वगैरे लेखन अजिबात वाटत नाही.
    जात-धर्म न बघता जे चुकीचे आहे ते चुकीचेच आणि जे बरोबर ते बरोबर मानले पाहिजे, सांगितले पाहिजे, हा मांडलेला विचार सर्वांनीच करायची गरज आहे.
    फक्त एक शंका: ब्राह्मणवाद/ब्राम्हण्यवाद वगैरे जे शब्द वापरले आहेत, त्याबद्दल.
    या शब्दांची नक्की व्याख्या काय गृहीत धरता आपण, आणि का?

    @सिद्धाराम भै. पाटील,
    "संतांची विभागणी बहुजनवादी आणि इतर असे करणे तेवढे पटले नाही." सहमत!!!
    "अन्य जातींना हीन लेखणे, हा ब्राम्हणावाद." हा मात्र का ते समजले नाही.
    कोणत्याही जातीला हीन लेखणे हे चूकच आहे. पण याला "ब्राम्हणावाद" का म्हणायचे?
    "अन्य जातींना हीन लेखणे" याला "जातीभेद" किंवा तत्सम काहीतरी म्हटले तर ठीक वाटते. पण याला "ब्राम्हणावाद" का म्हणायचे? हाच प्रश्न मी लेखकालाही विचारला आहे.

    "रामराया तू कटावर हात ठेवून का थांबलास, तुझे धनुष्य कुठे आहे... असा आशय त्या रचनेचा आहे." अश्या आशयाची समर्थांची रचना मलाही आत्ता जशीच्या तशी आठवत नाही.
    पण तसे लिहिण्याचे कारण सांगतो.
    रामदास स्वामींच्या आधी विठ्ठल हे आपले आराध्य दैवत होते. विठ्ठल हे परमेश्वराचे रूप, नेहमी भक्ताच्या बाजूने उभे राहणारे आहे. भक्ताची नेहमी मदत करणारे आहे..
    पण तो काळ असा होता, कि अन्याय झालेल्या भक्ताला मदत करण्याबरोबर, ज्याने अन्याय केला आहे, अश्या गुन्हेगाराला शासन होणे हे गरजेचे होते.
    "राम" हे परमेश्वराचे रूप, गुन्हेगाराला शासन करणारे रूप आहे.

    अन्याय सहन न करता त्याविरुद्ध एकत्र यावे यासाठी त्यांनी लोकांचे दैवत बदलण्याचा प्रयत्न केला. त्याला खूप यशही मिळाले. असो.

    ReplyDelete
  23. vandaniya ... anukaraniya... --^--^--^-- :-)

    ReplyDelete
  24. sir kayam lihit raha ....mudde sagle patale

    ReplyDelete
  25. This comment has been removed by the author.

    ReplyDelete
  26. tarihi jar aabhyas kartana tumchya likhanat kahi khtkle tar nkki sangen...

    ReplyDelete
  27. खुप संदर्भ आणि खुपच उघडपणे मांडले आहेत. कासाची आणि गांडीची ह्यागोष्टी लेखामध्ये वाचताना जरा चरकलोच. पण लेख थेट मनाला भिडणारा आहे.
    आपला विद्यार्थी
    रत्नाकर पवार

    ReplyDelete
  28. हा ब्लॉग अतिशय आवडला. ब्राह्मण या शब्दाबद्दल जेवढे चर्वितचर्वण होईल तेवढे कमीच आहे. याचा मूळ अर्थ लक्षात घेतला तर सर्व संत, ( खरेखुरे) संन्यासी किंवा अलिकडच्या काळातील महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज, वा डॉ. बाबासाहेब आंबेडकर या मंडळींनाही ब्राह्मण म्हणायला हवे, कारण त्यांनी समाजाला दिशा दाखविण्याचे कार्य केले. पण सध्या ब्राह्मण हा शब्द म्हणजे एका शिवी झाली आहे. तेव्हा हा प्रमाद तर काही करणार नाही. तथापि या सर्वांचे नांव घेऊन आततायीपणा करणारे बहुजनसमाजाची चळवळ मागे घेऊन जाणार हे निश्चित !!!!

    ReplyDelete