Thursday 17 March 2011

बडव्यांना बडवायलाच पायजे


इन्कम टॅक्सची धाड पडले की भलभले सरळ होतात. जयराज फाटकांसारख्यांचाही बुरखा टराटरा फाटतो. कलमाडी, ए. राजा, हसन अलीसारखे मोठे माशेही गळपटतात. पण या सगळ्यांपेक्षाही पंढरपूरच्या बडव्यांवर पडलेल्या इन्कम टॅक्सच्या धाडी धक्कादायक आहेत. या सगळ्या घपल्यांपेक्षा पंढरपूरच्या बडव्यांचा फ्रॉड मोठा आहे. आता या धाडींमुळे ते वठणीवर आलेत. त्यांनी म्हणजे बडवेसमाजानं मिटिंग घेऊन भाविकांकडून पैसे न मागण्याचा निर्णय घेतलाय. पण त्याचं काय खरं नाही.

माझं घर वारकरी स्वाध्यायी. देव्हा-यात विठ्ठल रखुमाईची फोल्डरची पितळी मूर्ती. आजीची कार्तिकी वारी. आजीनंतर ती आईपप्पांनी चालवली. त्यामुळे जातीचा, धर्माचा,  गावाचा, कुळाचा कुठलाच फारसा ठळक असा वारसा नसतानाही किमान सातआठशे वर्षांचा सलग धागा नाळेला चिटकून आलाय. आईच्या पोटात असल्यापासून याच्यावरच मन पोसलं गेलंय. कळत नसल्यापासून पंढरपूरला जातोय. जिथपासून पांडुरंगाला भेटतोय, तेव्हापासून बडवे माहित्येत.

बडवे कसे काठीने मारायचे. बडव्यांच्या घरी राहताना कसा त्रास सहन करावा लागयचा. अशा अनेक कहाण्या लहानपणापासून ऐकलेल्या. महाराष्ट्र टाइम्सने पहिला सांस्कृतिक विशेषांक काढला. बहुदा पाच वर्षांपूर्वीच्या गुढीपाडव्याला. जयंत पवारांनी त्याचं संपादन केलं होतं. आपण ज्यांच्यासोबत काम केलं असं अभिमानानं सांगावं इतका हा मोठा माणूस. त्यांनी काढलेला एक विषय बडव्यांवर होता. तो विषय माझ्याकडे आला. हायकोर्टाने बडव्यांना विठ्ठल मंदिरातून तडिपाराचा आदेश दिला होता. त्यासंदर्भात लिहायचं होतं.

दोन दिवस पंढरपूरला गेलो. सुनील दिवाण मटाचे पंढरपूरचे वार्ताहर. ते आणि त्यांचे मित्र डॉ. महेश कुलकर्णी हे दोन्ही दिवस सोबत होते. बरीच माहिती जमवली. सविस्तर लेख लिहिला. त्यातला बराच कापावा लागला. लेख छापून आला. अंकाची आधीपासून जोरदार हवा होती. अंक स्टॉलवर आल्या आल्या संपला. ब-याच मित्रांनी फोन करून कौतूक केलं. विशेषतः अभिजीत ताम्हणेंनी केलेलं कौतूक आठवतंय. ही डॉक्युमेंट्री फॉर्ममधे लिहिल्यासारखं वाटतंय, ते म्हणाले. मी बरीच वर्षं टीवीत काम केलेलं. त्याचा प्रभाव मलाच कळला. आजवर तशा बातम्याच प्रामुख्याने लिहिल्या होत्या. त्यामुळे लेखासाठी ओळख नव्हती. या लेखाने ती मिळाली.


अंक पंढरपुरात पोचल्यावर मोठाच गहजब झाला. बडवे वैतागले. अंक विकू दिले नाहीत. पेटवण्याची धमकी दिली. माझ्याबरोबर फिरणा-या कुलकर्णींनाही दटावणी झाली. एकूण लेख गाजला. त्याचा इण्ट्रो होता, धाव घाली विठू आता चालू नको मंद , अशी सातशे वर्षांपूर्वी आर्त हाक घालणा-या चोखोबांची वेदना आजही तशीच आहे , हे चंदभागेच्या तिरी गेल्यावर लख्खपणे जाणवतं...’ नेहमीप्रमाणे लेख कटपेस्ट.

घरातली भांडी गोणीत भरून गुहेत नेऊन एका लयीत गदागदा हलवावीत... ट्रेन पुलावरून जाताना तसाच आवाज येतो . पंढरपूर येण्याआधी चंदभागेवरून ट्रेन जाताना यात टणटण किणकिण अशी भर पडते . प्रत्येक डब्यात बायाबापड्या , पोरंटोरं खिडक्यांतून गंगेला दान करायला धावतात . व्हिडिओ गेममधला बाहुला टणाटण आवाज करत गडगडत जावा, तशी नाणी लोखंडी पुलावरून ठेचकाळत गंगेला जातात . काही जीवदान मिळाल्यासारखी पुलावरच अडकतात . तेवढ्यात सामानाची बांधाबांध करतच कुणीतरी आवाज देतो , पुंडलिका वरदे ... मोठ्या श्रद्धेने डब्यातून सूर उमटतो... हारी विठ्ठल !

गाडी पुढे जाताना खिडकीतून पाहिल्यावर बरोबर पुलाखाली पाच सहा माणसं उभी दिसतात . सगळ्यांच्या हातात भोकं पाडलेल्या लोखंडी सुपाच्या चाळण्या असतात . ढोपरभर कमरेभर पाण्यात उभे राहून नदीचा तळ खरवडायचा . पाणी निघून गेल्यावर चाळणीतल्या दगडमातीतले शिक्के कनवटीला लावायचे . प्रत्येक गाडीगणिक ही खरवड वेग घेते . पैशासाठी खरवड पंढरपुरात पावलापावलावर . त्याची ही सुरुवात .

बोला, पुंडलिका वरदे हारि विठ्ठल...

०००

बारी . पांडुरंगाच्या देवळातल्या रांगेसाठी वारक-यांचा स्वत:चा शब्द . सध्याचा हंगाम कमी र्दीचा. मुलांच्या परीक्षा आणि शेतीच्या कामांमुळे माघी वारीनंतर महिनाभर गर्दी कमीच असते. कमी म्हणजे दहाएक हजार . सकाळ - दुपार दोनेक तासांची बारी कुठेच जात नाही.

दर्शनमंडप . बारीच्या बॅरिकेडमधून सोळा खांबांमधली लगबग दिसत असते. दर्शन घेऊन येणारे देवाचं रुप डोळ्यात साठवण्यासाठी गाभा-या पुन्हा वाकून डोकावत असतात . पाच - सातजण कान पकडून उड्या मारत असतात. चारपाच गरुडखांबाला मिठी मारत असतात. तेवढेच त्यासाठी थांबलेले असतात. मंडपात तीन घोळके जमिनीवर बसलेले. एकेक बडवा त्यांच्याजवळ बसून पुजेसारखं काहीतरी करत असतो.

गाभारा. चांदीचा दरवाजा. त्यामधल्या ग्रॅनाइटच्या चकाकत्या भिंती. त्यातून दिसणारं विठुरायाचं सावळं रूप. एकजण मध्यम वयाचा. जीन्स आणि इन केलेला टीशर्ट. त्याचा नंबर येतो. आपलं उच्चमध्यमवर्गीय टक्कल देवाच्या पायावर टेकवतो. पुढे सरकताच तुळशीचे पाच सात हार त्याच्या गळ्यात टाकले जातात. सावज फसलेलं असतं. भांबावलेल्या चेह-याने तो थबकतो. समोरचा बडवा त्याच्याशी बोलताना दिसतो. तो खिशातलं पाकीट बाहेर काढतो. पैसे काढतो. बडवा पुन्हा काहीतरी बोलतो. पुन्हा पैसे काढतो. गळ्यात हार मिरवणा-या सभेतल्या नवख्या सत्कारमुर्तीसारखा तो दिसत असतो.

दर्शनमंडपातात तीन घोळकी अजूनही असतात. त्यांच्यातही दोघाचौघांच्या गळ्यात तुळशीचे हार. हा ' तुळशी ' चा विधी. कोणत्याही ग्रंथात नसणारा. एक बडवा मंत्र पुटपुटत घोळक्यातल्या एका जोडप्याकडून काहीतरी विधी करून घेत असतो. बाकी सगळे हात जोडून बसलेले. एका उठणा-या घोळक्याला विचारलं , दक्षिणा किती दिली? उत्तर, पाचशे एक मागितले, सव्वादोनशे दिले. हे सारं फॅशन स्ट्रीटमधलं बार्गेनिंची आठवण करून देणारं.

बोला, पुंडलिका वरदे हारि विठ्ठल...

०००

' बडव्यांच्या फे-यातून विठुराया मुक्त ' झाल्याचे मथळे पेपरांत झळकले ते गेल्या नोव्हेंबरच्या चौदा तारखेला. अजूनही तसं पंढरपुरात घडलेलं नाही. हायकोर्टाने बडवे मंडळींचे सर्व वंशपरंपरागत धार्मिक अधिकार रद्दबातल ठरवण्यावर शिक्कामोर्तब केलं. या ऐतिहासिक निकालाच्या विरोधात बडवे मंडळी सुप्रीम कोर्टात गेलीत. सुप्रीम कोर्टाने त्यावर आता स्टे दिलाय . बडव्यांची पुन्हा किमान पाचेक वर्षांची बेगमी झालीय.

आधीच हा खटला नको तितका लांबलाय. त्याचा इतिहास चार दशकं जुना. साठीच्या उत्तरार्धातला. राज्यात बहुजनी चेह-याचं नेतृत्व स्थिरावलं होतं . वारं अँटिएस्टॅब्लिशमेंटचं होतं . वारक-यांमध्येही हळुहळू जागृती येत होती. पण बडवे स्वत:ला अपवाद मानत होते . देवाच्या मालकांसाठी कसला आलाय बदल? ४७ साली दलित मंदिरप्रवेशासाठी झुकल्यानंतरही ते बदलत नव्हते .

बडवेशाही विरोधात पहिला उठाव ७० - ७२ सालातला . गेल्यावषीर् सप्टेंबर महिन्यात १०५ व्या वषीर् कालवश झालेले स्वातंत्र्यसैनिक कीर्तनकार शेलारमामांनी हुतात्मा चौकात उपोषण केलं. रामदासबुवा मनसुख, गो . . राहीरकर, बाळासाहेब भारदे यांनी हा विषय लावून धरला. सरकारला दखल घेणं भाग होतं. बी . डी . नाडकर्णींचा एकसदस्यीय आयोग नेमला. साक्षी - पुरावे - जबान्या अशी चिरफाड करत नाडकर्णींनी बडव्यांचे कोणतेही अधिकार नसल्याचा निर्वाळा दिला. बडव्यांच्या स्वत:बद्दलच्या सगळ्या धारणा मुळापासून हादरल्या.

तेव्हाचे कायदामंत्री . आर. अंतुलेंनी पुढाकार घेतल. विधिमंडळाने ' पंढरपूर मंदिरे अधिनियम , १९७३ ' मंजूर केला. या कायद्याने बडव्यांना तडिपार करून मंदिरावर सरकारचा संपूर्ण अधिकार निर्माण केला. त्यावर राष्ट्रपतींच्या मंजुरीत आणखी तीन वर्षं गेली. पण कायदा अमलात आणणारा वटहुकूम राजपत्रात येण्याच्या आत बडवे - उत्पातांनी थेट सुप्रीम कोर्टात धाव घेतली आणि शंभर दिवसांचा स्टे मिळवला. पुढे सोलापूर दिवाणी कोर्टात नऊ वर्षं टाइमपास करण्यात बडवे यशस्वी झाले. दिवाणी कोर्टानेही बडव्यांच्या विरोधात निर्णय दिला.

नंतर हायकोर्टाची पायरी. हायकोर्टाचाही स्टे. पण फक्त धार्मिक अधिकारांसाठी. त्यामुळे राज्यसरकारने धार्मिक अधिकार वगळता बाकी सगळ्या व्यवस्थांसाठी ' विठ्ठल रुक्मिणी मंदिर व्यवस्थापन समिती ' स्थापन केली. तो दिवस होता, २६ फेब्रुवारी ८५. हायकोर्टातला खटला सुरूच होता. बडव्यांचे वकील बाळ आपटे यांनी कायदेशीर खाचाखोचा काढत बारा वर्षं खटला रखडवला. बाळ आपटे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ नेते, भाजपचे राष्ट्रीय उपाध्यक्ष आणि राज्यसभेतले खासदार.

व्यवस्था सरकारकडे, पण गाभा-यात राज्य बडव्यांचंच होतं. चारेक वर्षांपूर्वी' बडवे हटाव ' आंदोलन गाजलं. भांडारकर इन्स्टिट्युटवरच्या हल्ल्यानंतर सगळी हवाच बदलली होती. जेम्स लेनच्या विरोधात हवा तापवून मतं मागणारे पुन्हा सत्तेत आले होते. विद्रोहींचं आंदोलन पुढे चालू देणं सरकारच्या हिताचं नव्हतं. खटला फास्ट ट्रॅकवर आला. न्यायमूर्ती अजय खानविलकरांनी सुटीतही कोर्ट सुनावणी घेऊन एकतीस वर्षं रखडलेल्या खटल्याचा चार महिन्यात निकाल लावला. कोर्टाच्या पायरीवरून बडवे पुन्हा गडगडले.

पुन्हा मोठमोठे वकील आणून सुप्रीम कोर्टात नव्याने लढण्यासाठी बडवे मंडळी कंबर कसून उभी राहिली आहेत. बडव्यांच्या तडीपारीचा कायदा ७३ सालचा. त्याला यंदा ३४ वर्षं झाली. खटला युगे अठ्ठावीस चालेल काय, ठाऊक नाही.

बोला, पुंडलिका वरदे हारि विठ्ठल...

०००

पंढरपुरातल्या सगळ्याच पुजा-याना आपण सरधोपट बडवे म्हणतो. पण पंढरपुरात गेल्यावर कळतं की त्यांच्यात बरेच प्रकार आहेत. विठोबाची पूजा करणारे ते बडवे. रखुमाईचे ते उत्पात . त्यातले बडवे स्वत: पूजा करत नाहीत. त्यासाठी सेवेधारी असतात आणि बडवे त्यांचे इनचार्ज, मुकाद . सेवेधा-यामध्ये सात प्रकार . पुजारी विठोबाला स्नान घालतात, कपडे नेसवतात आणि गंध - अत्तर लावत प्रत्यक्ष पूजा करतात. पहाटेच्या पुजेला त्यांचं कसब बघण्यासारखं असतं. बेणारे पुजेचे मंत्र म्हणतात. हरिदास भजन म्हणतात. डिंगरेंचं काम सजलेल्या देवाला चांदीचा आरसा दाखवणं. दिवटे शेजारतीच्या वेळी दिवटी पेटवून धरतात. पूजा होताना डांगे चांदीचा दंड धरून उभे असतात. परिचारक स्नानासाठी पाणी गरम करून आणतात आणि आरती तयार करतात. रखुमाईकडे हे सगळं एकटे उत्पात करतात. फक्त एक गुरू मंत्र म्हणायला असतात. अर्थातच ही सगळी मंडळी जातीने ब्राम्हण आहेत.

विठ्ठलमंदिराची सगळी व्यवस्था बघणं, हे बडव्यांचं परंपरागत काम होतं. त्यात महत्त्व मूर्तीच्या संरक्षणाला. सकाळी दरवाजे उघडण्यापासून ते रात्रभर मंदिरात थांबण्यापर्यंत, नैवेद्यापासून पूजासामग्री आणि साज-या होणा-या उत्सवांपर्यंत सगळी व्यवस्था. त्याबदल्यात बडव्यांना मिळाला, स्वत: पूजा करताही देवापुढच्या दक्षिणेचा अधिकार आणि मंदिराची कथित मालकी. आता तर या सगळ्या व्यवस्थांची काळजी घेण्यासाठी मंदिर समिती आहे. पण दक्षिणेची मालकी सध्यातरी बडव्यांकडेच शाबूत आहे.

निर्विवाद नसलं तरी बडव्यांचं पुढारपण बाबा बडवेंकडे आहे. मंदिराच्या आसपास दिसणा-या कोणत्याही बडव्याशी बोलायला जा. बोलायला सुरुवात करण्याआधी किंवा थोडंफार बोलल्यानंतर तो म्हणतो, बाबामालकांशी बोला . बाबासाहेबांना भेटा .

काळा मारुती मंदिराजवळ गजानन महाराजांच्या मठासमोर रस्त्याच्या कडेला चाळीसेक दुकानांची रांग आहे. त्यातल्या एका निमुळत्या बोळातून आत बाबामालकांचा बंगल. शेजारी दोनचार झाडं. मोकळी जागा. पत्रकार म्हटल्यावर हाफचड्डीतले बाबा चकाचक सिल्कच्या सद-यात अवतरतात. ते भाजपचे पंढरपूर शहर अध्यक्ष आहेत. वय पन्नाशीचं. केस काळे. रंग गोरा. डोळे घारे.

' पंढरपुरातल्या एस्टी स्टॅन्डवरच्या हमालापासून पुंडलिकाच्या देवळातल्या पुजा-यापर्यंत, कोणीही अरेरावी केली की खापर फुटतं ते बडव्यांवर. बडव्यांना बडवणं ही फॅशन झालीय. पण आमची बाजू कुणी समजावून घेत नाही.' ते आपली बाजू सांगतात. टोकाची, पण दणकून. 'बडव्यांचं काही चुकत होतं, असं मी तरी म्हणणार नाही. पैसे बडवे मागत नाहीत. पुजारी मागतात. कारण देवासमोर ठेवलेले पैसे बडव्यांचेच असतात. पुजा-याना ते मिळत नाहीत, म्हणून ते मागतात. आणि भाविकांना बडवे पुजारी असा भेद माहीतच नसतो.'

मग काय बडवे धुतल्या तांदळासारखे स्वच्छ आहेत?

या प्रश्नावर ते गडबडतात. ' तसं नाही , पिंडे पिंडे मतिर्भिन्न. डावेउजवे सगळीकडेच असतात. जे चुका करतात त्यांना शिक्षा कराना! दोघाचौघांच्या चुकांची शिक्षा अख्ख्या समाजाला कशाला? देवाची सेवा, मूर्तींचं संरक्षण आणि दागिन्यांची निगा, यात आम्हाला एका पैशाचाही दोष देता येणार नाह . देवीच्या, प्लेगच्या साथीने गाव ओस पडलं होतं, पण नित्योपचारात खंड पडला नाही. मंदिर समितीच्या कर्मचा-याचा संप झाला. आम्ही घरून महानैवेद्य आणला. इंग्रजांच्या काळातलं ऑडिट, नाडकर्णी कमिशन, कोर्ट, कुणीही याबाबतीत बोट दाखवलेलं नाही. मोगलांची दोन आक्रमणं झाली. आमच्या पूर्वजांनी जिवावर उदार होऊन त्याचं रक्षण केलं. कागदोपत्री पुरावे आहेत. आरोप झाले ते फक्त दर्शनव्यवस्थेविषयी.'

बाबा आता वयोमानपरत्वे मंदिरात पुजेला जात नाहीत. त्यांच्या वाड्याशेजारच्या चाळीसेक दुकानांचं भाडं येतं. त्यावर त्यांचं चालतं .

०००
वा . ना . उत्पात. पंढरपुरातलं एक ज्येष्ठ मानाचं प्रस्थ. देवळाच्या उजव्या हाताला एका एकमजली कोठीच्या दर्शनी भागावर स्वातंत्र्यवीर सावरकरांचा फोटो. शेजारीच वा . नां . ची पुस्तके,  कॅसेट्स उपलब्ध असल्याची पाटी. त्यामुळे नावाची वेगळी पाटी दारावर लावायची गरज नसते. ते टीव्ही, रेडियोवर अधुनमधून झळकत असतात. रूक्मिणीमंदिरात चातुर्मासात चालणारं त्यांचं भागवत निरुपण वारक-यामध्ये हिट आहे.

घराच्या दिवाणखान्यात खुर्चीवर रेलून बसलेले वानामहाराज हसून स्वागत करतात. 'सेक्युलर म्हणवणा-या सरकारला धर्मात हस्तक्षेप करण्याचं कारणच काय? लोकशाही ही सरकारी हुकूमशाहीच झालीय. सरकारीकरण म्हणजे बॅड टू वर्स्ट.'  वाना प्राध्यापकी थाटात मुद्देसूद आणि अभ्यासू वाटावं असं बोलतात. मधूनच प्रवचनासारखं टाळीबाज चमकदार वाक्य टाकतात. 'मान्य ! रोग झालाय. रोग बरा करायचा की रोगी मारायचा? तुम्ही रोगी मारता.' आवाज टिपेला. 'आम्ही कुलधर्म म्हणून ज्या निष्ठेने सेवा करतो. तसं पगारी नोकर करणार का?'

मग सरकारीकरणाचं खरं कारण काय वाटतं तुम्हाला ?

प्रश्न संपण्याआधी उत्तर येतं , 'शासनाचा ब्राह्माणद्वेष!'

' अल्पसंख्यकांच्या मशीदी - अग्यारी घेता का ताब्यात? जामा मशीद घ्याल ताब्यात? नाही ना! हिंदू बहुसंख्याक म्हणून कसाही खेळ करायचा? एवढंच कशाला, मराठ्यांच्या ताब्यातली मंदिरं तरी घेतलीत का स्वत:कडे?' त्यांचा रोख तुळजापुराकडे असतो. ' विश्व हिंदू परिषदेच्या व्यासपीठावर मी सांगितलंय. आम्ही जात्यात तर तुम्ही सुपात आहा. देवस्थानांच्या पैशांवर सरकारचा डोळा आहे.'

उद्या सुप्रीम कोर्टाचा अंतिम निकाल विरोधात गेला तर ?

'तर लढाईच संपली . कूळकायद्यात ब्राह्माणांच्या जमिनी गेल्या. गांधीवधानंतर घरं जाळली. काय केलं? उपजीविकेची नवी साधनं शोधल. आता दुकानं उघडू. पौरोहित्य करू. त्यापासून तर कुणी रोखलं नाही ना! उत्पात जागे आहेत. आमच्या उत्पन्नातून आम्ही पैसे बाजूला काढत आलो आहोत. गोपाळपुराला बावीस एकर जमीन घेतलीय. शहरातही साडेतीन एकर जमीन आहे. कुलधर्माची उपासना करण्यासाठी तिथे पर्यायी रुक्मिणीमंदिर बांधू. बडव्यांकडे ताकपिठ्या विठोबा आहे.' ते निर्वाणीचं बोलतात. ' मी सगळ्या उत्पातांना विचारलंय.ते म्हणाले, आम्हाला एकही पैसा नकोय. बाहेर पैसा कमव. पण कुलधर्म कसा सोडायचा? श्रद्धा आणि परंपरा यांची किंमत नसते. पवनाकाठचा धोंडी माहीत आहे ना?'

वाना स्वत: देवळात पुजेला जात नाहीत. त्यामुळे हक्क गेल्याने त्यांना व्यक्तिश: र्थिक नुकसान नाही. तरीही ते निष्ठेनं काम करत आहेत. कीर्तन निरुपणातून मिळणा-या पैशांतून ते सावरकरांच्या नावाने क्रांतिकारकांचं स्मारक उभारताहेत. सावरकर त्यांचे आदर्श. विषय निघाल्यावर भरभरून बोलतात. कर्मकांडांना विज्ञाननिष्ठ विरोध करणा-या सावरकरांची सांगड वानांच्या कुलधर्माशी कशी लावायची असा विचार मनात येतो.

०००

तात्या उपाख्य पांडुरंग डिंगरे . माणूस ऐंशीच्या घरात . पण पाहिल्यावर दीनानाथ टाकळकरांची आठवण व्हावी असा कडक माणूस. बाभूळझाड. पंढरपूरचे माजी आमदार. स्वत: ब्राह्मण, सेवेधारी असूनही बडवेशाहीविरुद्ध लढण्यात हयात गेली.

विषय आवडीचा, नॉनस्टॉप बोलतात. 'खरं देवाची पूजा सेवा करणारे आम्ही सेवेधारी. पण काहीच करता दक्षिणेवर हक्क मात्र बडव्यांचा. मग सेवेधारी काय करणार? त्यांचं पोट कसं भरणार? पुजारी पैसे मागतो. पैसे मागितल्यावर भाविक रागावतात. त्यांना खरं काय माहीत?'

तात्या दलित मंदिर प्रवेश आणि सर्वधर्म मंदिर प्रवेशाच्या आंदोलनांतले बिनीचे शिलेदार . साने गुरुजी उपोषण करत होते आणि ते संपवण्याच्या आदेशाची तार दस्तुरखुद्द गांधीजींनी पाठवली होती. क्रांतिसिंह नाना पाटलांनी त्यांच्या क्रांतीसेनेची परेड पंढरपुरातून काढून, ' साने गुरुजींचं काही बरं वाईट झालं तर बडव्यांची घरं पेटवून देऊ', अशी बडव्यांना धमकी दिली. बबनराव बडवे आणि पांडुरंग उत्पात या तेव्हाच्या नेत्यांनी मंदिरप्रवेशासाठी कशी मेहनत घेतली होती, पण तब्बल एक्याऐंशी बडव्यांनी बबनरावांच्या विरोधातच कोर्टात धाव घेतली होती, अशा गोष्टी ऐकायच्या तात्यांच्या खणखणीत आवाजात.

दलित प्रवेशानंतर सनातनी विद्वान भगवानशास्त्री धारुरकर यांनी विठोबा बाटल्याची हाळी दिली . आता मंदिरप्रवेश करू नये असा फतवा काढला. देवाचं देवत्व घागरीत भरून ठेवलं. त्यामुळे त्यांचे शिष्य असणा-या अनेक दिग्गजांनी मंदिरप्रवेश करण्याच्या प्रतिज्ञा घेतल्या. वारक-यामध्ये आदराचं स्थान असलेले किसनमहाराज साखरे अजूनही देवाच्या दर्शनाला मंदिरात येत नाहीत. इति तात्या.

०००

बडवे, उत्पात आणि सेवेधारी यांचं मूळ याविषयी ठामपणे काहीच सांगता येत नाही . बडवे म्हणजे बडवणारे हा शब्दश: अर्थ बडव्यांना कसा मान्य असणार  त्याची एक कथाही आहे. पंढरपुरात कुळीज नावाचे ब्राह्माण मूळ पुजारी होते. त्यांच्या हाताखालचे पांडुरंगांचे धोतर धुणारे, बडवणारे ते बडवे. कुळीज निर्वंश झाल्यावर बडवे पुजारी बनले. ही फक्त सांगोवांगी कथा. फुलबुडवे या शब्दापासून बडवे आल्याची एक उत्पत्ती आहे. काही बडवेमंडळी म्हणतात, आम्ही मुळचे बरवे म्हणजे भले. अपभ्रंशात चा होतो. तानबा , मल्हार , तिम्मण आणि श्यामराज हे चार भाऊ बडव्यांचे मूळ पुरुष. त्यांची नावं कर्नाटकी धाटणीची, त्यामुळे त्यांचं मूळ कर्नाटकात असावं .

बडव्यांविषयी सर्वात जुनी प्रमाणित कागदपत्रं चारेकशे वर्षांपूवीर्ची. विजापुरीच्या आदिलशाही दरबारची. त्यापेक्षा जुना उल्लेख ' मालुतारण ' या ग्रंथातला. त्यात शालिवाहन राजाने दिंडीरवनातली झाडं तोडून पांडुरंग नगरी वसवली आणि ती आपला प्रधान रामचंदपंत याला भेट दिली. पंतांनी मंदिराचं उत्पन्न कोळी सरदारांना बक्षिसपत्राने दिल्याचा उल्लेख आहे. पण हा ग्रंथ प्रमाण मानला जात नाही. पांडुरंगाला विटेवर उभा करणारा भक्तराज पुंडलिक हा महादेव कोळी होता. आजही त्याचं मंदिर महादेव कोळ्यांच्या ताब्यात आहे. तसंच विठ्ठल मंदिरही त्यांच्याकडे होतं, असं मालुतारणचा आधार घेऊन सांगितलं जातं. पुढे बडव्यांनी ते जबरीने आपल्या ताब्यात घेतल्याचंही सांगतात.

वारीच्या काळात भाविकांना काठीने मारणा-या बडव्यांच्या गोष्टी आताआतापर्यंत वारकरी सांगत असत. बडव्यांचं आताचं अरेरावीचं वर्तनही त्यांच्या अमानवी अत्याचारांचा पुरावा बनलंय. जबरदस्तीने पैसे मागणारे, शिव्या घालणारे, पैशासाठी पातळी सोडणारे, बायकांना धक्काबुक्की करणारे, भाविकांना कस्पटासमान मानून त्यांची मानगूट पकडणारे, हमरीतुमरीवरून भांडणं करणारे, दादागिरी करणारे बडवे ही सांगोवांगी नाही , इतिहास आहे . किमान साडेसातशे वर्षांचा. 'बडवे मज मारिताती , काय केला अपराध' हा चोखोबांचा अभंग त्याला साक्ष आहे .

माजी राज्यमंत्री दिगंबर बागलांचा बडवेगिरीचा अनुभव पुरेसा आहे. दिगूमामा आज हयात असते तर त्यांच्या फक्कड गावरान शैलीत त्यांनी सांगितला असता. सोलापुरातल्याच करमाळ्याचे ते आमदार. राज्यमंत्री असताना पांडुरंगाच्या दर्शनाला आले होते. देवाच्या पायावरचं डोकं वर केल्या केल्या बडव्यांनी पैसे टाकायचा हुकूम सोडला. बडवे म्हणत होते, इंदिरा गांधींही आपल्यासमोर पैसे टाकल्याशिवाय पुढे जाऊ शकली नाही तर राज्यमंत्री कोण? दिगूमामा कशाला ऐकतायत? त्यांनी रीतसर तक्रार केली. कोर्टात गेल. बडव्याला काही दिवसांची का होईना जेलची वारी घडवली.

शैलेश बडवे. बडवे युवा मंचचा अध्यक्ष. नगरपालिकेच्या शिक्षणसमितीवर आहे. वय तीसच्या आसपास. आमच्या पूर्वजांनी देवाची रोजची उपासना चुकू नये म्हणून सावकारांची कर्जं काढून वारीला फेडली. आता सरकारला पैसा दिसू लागला... एखाद्या नव्या दमाच्या युनियन लीडरसारखा बोलतो. आम्ही गरीब आहोत, पण देवाचे एवढे मोठे अधिकार असल्यामुळं राहणीमान चांगलं ठेवावं लागतं. तोंड दाबून बुक्क्याचा मार. भाविकांकडं पैसे मागण्याचंही समर्थन त्याच्याकडे आहे, मंदिर समितीनं देवाचा लिलाव कमीतकमी दहा हजारांवर नेलाय.

०००

देवाचा लिलाव. मंदिराच्या पोटमाळ्यावरची ग्रंथालय म्हणवणारी खोली. संध्याकाळी पाचची वेळ. चार बडवे. एक मंदिर व्यवस्थापन समितीचा माणूस. समितीचा माणूस लिलाव पुकारतो. दहा हजार एकपासून आकडा सुरू होतो. कोणत्या दिवशी किती रुपये जमा होणार, याचा अंदाज पक्का असतो. त्याआधारे मग सट्टा लावायचा. साडेअकरा हजारावर लिलाव थांबतो. अकरा हजार पाचशे... एक... दोन... तीन. देवाचा लिलाव जिंकलेला बडवा समितीच्या सभामंडपातल्या ऑफिसात येऊन पैसे भरतो. पुढचा दिवस त्याचा असतो. देवासमोर ठेवलेल्या सगळ्या पैशांवर आता त्याचा अधिकार. म्हणजे साडेअकरा हजारांवर जितके जमा होणार तो निव्वळ फायदा.

हा लिलाव काही समितीने सुरू केलेला नाही. समस्त बडवेमंडळ पूर्वी हा लिलाव घ्यायचे. आता मंदिर समिती घेते. पण आधीच भेटून बडवे लिलाव करून समितीसमोर लुटूपुटूचा खेळ खेळायची . हे बघून किशोरराजे निंबाळकर यांनी कार्यकारी अधिकारी असताना लिलावाची किमान रक्कम दहा हजार केली. दहा हजारी लिलावामुळे समितीच्या गंगाजळीत भर पडली. पण त्यामुळे चारदोघांची मक्तेदारी अधिक बळकट झाली. पंढरपुरात आजघडीला बडव्यांची तीनशेच्या आसपास घरं आहेत. त्यापैकी प्रत्येकजण या लिलावात भाग घेऊ शकतो. वास्तवात असं घडत नाही. बडवे लिलावाला ' खंडणी ' म्हणतात. खंडणीसाठी काही बडवे एकत्र येतात त्याला ' कंपनी ' म्हणतात . आपसात मांडवली करून हे ' अंडरवर्ल्ड माफिया ' उद्याची खंडणी कुणाला ते ठरवतात. समितीसमोर पुन्हा लुटूपुटू.

देवाजवळ बसण्याला ' बसणी ' म्हणतात . एका कंपनीतले बडवे दिवस शिफ्टमधे वाटून घेतात. साधारणत: तीन तासांची एक शिफ्ट. मग ' खंडणी ' वसूलण्याची सुरुवात होते. साधारणत: तीसेक घरांमध्येच ही बसणी फिरताना दिसते. बाकीचे त्यांचे वेठबिगार. त्यांनी मग प्रत्यक्ष बडवेगिरीचं पाप करता, खंडणी कमवता, बडवे असल्याबद्दलच्या शिव्या खायच्या. आणि रोजीरोटीसाठी दुसरे मार्ग शोधायचे.

गोपाळ बडवे. एका गॅरेजमधे मेकॅनिक. मिसरूड फुटल्यापासून तेच काम करतोय. हुशारी नव्हती म्हणून ' कंपनी ' वाल्यांच्या दांडगाईत टिकण्याचा प्रश्नच नव्हता. पण हुशारी असल्यावर टिकाव लागतोच असं नाही. अतुल बडवे, त्यातलेच एक. स्थानिक पत्रकार आहेत. सर्वसामान्य पिचल्या जाणा-या बडव्यांची व्यथा ते सांगतात, दहा हजार रुपये भरण्याची आमच्यापैकी कुणाची ऐपत नाही. दोघाचौघांनी मिळून केलेली हिम्मत आतापर्यंत आमच्या अंगाशीच आलीय. एकतर आम्हाला अंदाज नसतो. नेहमीचे कंपनीवाले लिलाव मुद्दाम फुगवतात. त्यातही आम्ही त्यांना पुरून उरलो, पण भाविकांकडून पैसे मिळवायचं तंत्र आम्हाला अवगत नसतं. त्यांचे बांधलेले सिक्युरिटीवाले बारी घाईने पुढे पळवतात. मग दहा सोडाच पाच हजारपण मिळत नाहीत.

मंदिराच्या आसपास, नामदेव पायरीच्या वर, दोन - चार दोन - चार बडवे गि-हायकाच्या शोधात उभे असतात. खूप रांग आहे, चार तास लागतील, असं सांगून एखादा गळाला बांधायचा. त्याला रांगेत घुसवून दर्शन मिळवून द्यायचं. पण बडव्यांचा अशांपेक्षाही आपल्या हक्काच्या ' वाटसरूं ' वर जास्त भरवसा असतो. पूर्वी लॉज नव्हते. भाविक दर्शनाला आले की राहायचे बडव्यांच्या वाड्यांवर. अजूनही परंपरा आहे म्हणून त्यांच्याच घरी उतरणा-याची संख्या कमी नाही. त्यांना बडवे 'वाटसरू ' म्हणतात आणि त्यांना दर्शन घडवण्याला 'आर्जव'. त्यांच्यात महापूजा करणा-याचं मोठं प्रमाण असतं. मग त्यांचं जेवणखाण वगैरे करत बरीच दक्षिणा जमा होते.

बारीच्या वेळी अशी दक्षिणावाली धेंडं नसतात. दोन्ही वारींना बडवे जुन्या अंधा-या वाड्यांमधे पन्नास शंभरजण कोंबून भरतात. त्यांच्या घरी अष्टमीपासून द्वादशीपर्यंत राहण्याचं भाडं असतं फक्त पन्नास रुपये. ऐपतीप्रमाणे त्यात कमी जास्त होतं. त्यानुसार सुविधाही वरखाली. पंढरपूरच्या मास्टरप्लानमधे बडव्यांचे मंदिराजवळचे वाडे तुटले आणि अनेकांचा उत्पन्नाचा मोठा आधारही. फक्त बडवेच नाही, पंढरपुरातली सर्वच जातीची माणसं अशा वाटसरूंना वारीच्या वेळी घरी उतरवतात. पण मधे घुसून दर्शन देण्याचे अधिकार फक्त बडव्यांचेच.

०००

पन्नासेक वर्षांपूर्वी कौलगी प्रकरण गाजलं होतं. मंदिराजवळच्या कौलगी वाड्याच्या मालकानं पैसेवाल्या वाटसरूंचे खून करून संपत्ती हडप केली. पोलिसांनी जेव्हा वाड्याची जमीन खणली, तेव्हा त्यात अनेक सापळे सापडले. निठारी बालहत्याकांडासारखे. कौलगी बडवा नव्हता. पण तिकीट बडव्यांवरच फाडलं गेलं. कारण अनेकांना कौलगी बडवा नसल्याचं ठाऊकच नव्हतं . ज्यांना माहीत होतं, ते म्हणाले , बडवे असं करत नसतीलच कशावरून? असं वाटायला लागण्यामागेही कारण होतं. त्यांच्या मंदिरातल्या वर्तनासारखंच मंदिराबाहेरचं वर्तनही देवाच्या मालकांना साजेसं ' आदर्श ' होतं. अर्थात काही सन्माननीय अपवाद वगळता.

देऊळ बडव्यांकडून समितीच्या ताब्यात गेलं, तेव्हा झाडलोट करताना मंदिराच्या वर दारुच्या रिकाम्या बाटल्या आणि मटणाची हाडं सापडली होती, ही पंढरपुरात सर्रास सांगितली जाणारी गोष्ट. तशा बातम्याही छापून आल्या होत्या म्हणे. पण गाजली ती गोपाळ बडव्याची 'र्दुमकी'. विठोबा रखुमाईच्या अभिषेकाचं पाणी गोमुखातून तीर्थकुंडात येतं. भाविक तिथलं पाणी तीर्थ म्हणून पितात. १५ मे २००३ ला मंदिराच्या सिक्युरिटीने ' . पू .' गोपाळ रामकृष्ण बडवे यांना त्या तीर्थकुंडात लघवी करताना पकडलं. यात काय नवल, आपण हे नेहमी करायचो, असंही गोपाळरावांनी पकडल्यावर सांगितलं म्हणे! कुलाचाराची आणि परंपरेची द्वाही फिरवणा-या बडवेमंडळींसाठी ती चपराकच होती.

गांजाच्या जांभळ्या पेढ्यानं, ज्याला बडव्यांचा खास शब्द आहे ' बंटा ', देवाच्या या मालकांना गुलाम बनवलंय. गेल्या दोनेक वर्षांत शहराबाहेरच्या हायवेवर ' ढाबा कल्चर ' जन्माला आलंय. ढाब्यांमध्ये मांसाहार असतोच. पण ढाब्यांची ओळख झाडांमधल्या किंवा बारदानांनी सजवलेल्या खास अंधा-या जागांमधल्या मद्यपानासाठी आहे. बडव्यांची तरुण मुलं हे त्यांचे मुख्य ग्राहक. एका ढाबेवाल्यानं सांगितलं, किमान दहाबारा बडवे त्याच्याकडे जवळपास दररोज येतात. मुंबईत डान्सबार जोरात असताना स्टेशन रोडवरच्या आंबेडकरांच्या पुतळ्याजवळून रोज संध्याकाळी ट्रॅक्स पनवेलला निघायच्या. संध्याकाळी चार वाजता निघायचं. सुसाट सहा - आठ तासांत पनवेल. रात्रभर मजा मारून दुस-या दिवशी दुपारपर्यंत परत. आता बारबंदी झाल्यानंतर बॅक टू बेसिक्स. जवळच्याच बैठ्या लावण्यांसाठी प्रसिद्ध गावांमध्ये गर्दी होऊ लागली आहे. या सगळ्यात बडवे आघाडीवर असतात.

ओंकार बडवेमुळे या सगळ्याची कुजबूज चव्हाट्यावर आली. १४ एप्रिल ०५ ला ओंकारने निशा पोर्टे नावाच्या वेश्येच्या डोक्यात पाटा घालून खून केला होता. देवळाला लागून असलेल्या त्याच्या घरी वेश्येचा मृतदेह तीन दिवस कुजत पडला होता. पंढरपूर कधी नव्हतं एवढं हादरलं. कारण ओंकारचं घर शहरात परिचित. आईवडील दोघे शिक्षक. घरात परंपरागत मंदिरातली पूजा. त्यावर मोठा जमीनजुमला कमावलेला. ओंकार दहावीला मेरिटमध्ये आलेला हुशार मुलगा. त्यालाही गांजाचा नाद होता.

फक्त देवाजवळ बसायचं आणि दिवसाला दोन ते तीन हजार घरी घेऊन जायचे. एवढ्या ' इझी मनी' मुळे बडव्यांची तरुण पिढी बरबाद होतेय, ही या सगळ्या अध:पाताची सोपीसपाट कारणमीमांसा आहे. ज्येष्ठ बडवे तरुणांची श्रद्धा कमी होत असल्याबद्दल दु: व्यक्त करतात. पण तोंडाने देवाधर्माच्या गप्पा मारत फक्त पैशालाच पूजणा-या जुन्या पिढीकडून तरुणांनी असा आदर्श घेतला तर काय आश्चर्य? कदाचित देवाच्या नावाने दाबून ठेवलेली नैतिकतेची स्प्रिंग जागतिकीकरणाच्या धबडग्यात जोराने उसळलीय.

०००
या सगळ्यामुळे जेव्हा विदोही चळवळीनं बडवे हटाव आंदोलन सुरू केलं तेव्हा त्याला चांगला प्रतिसाद मिळाला. डॉ. भारत पाटणकर आणि पार्थ पोळके यांनी अनेक मूलभूत मुद्दे मांडले. विशेष म्हणजे यावेळी पंढरपुरातूनही काही मंडळी बडव्यांना पूर्ण हटवण्यासाठी समोर आली. शहरातल्या सनातनी वातावरणाच्या नाड्या हातात असलेल्या बडव्यांच्या विरोधात कुणी जाईल, हे अशक्य मानलं जातं होतं . आता विरोधात आलेल्यांमध्ये ब्राम्हणेतर तरुण होते. याच सुमारास ' बडवे युवा मंच' च्या सोबतच 'संभाजी ब्रिगेड' चे बोर्डही शहरात दिसू लागले होते.

किरण घाडगे. काँग्रेसच्या पाठिंब्यावरच्या स्थानिक आघाडीचा नगरसेवक म्हणून नुकताच निवडून आलाय. वय वर्षं सव्वीस फक्त. विद्रोहींचा शहरातला एक प्रमुख कार्यकर्ता. मुळातला संभाजी ब्रिगेडवाला . तुकाराम गाथेविषयी त्याने सांगितलेली गोष्ट सर्वात हादरवणारी . एक वारकरी रुक्मिणीमंदिरात तुकाराम गाथा वाचत असताना उत्पातांनी त्याला रोखलं. ब्राह्मण नसलेल्या संतांचे ग्रंथ मंदिरात वाचण्यास आडकाठी केली जात असल्याचं त्यामुळे समोर आलं. विदोहींनी या जातीयवादी अत्याचाराला वाचा फोडली आणि आता दरवर्षी हजारो तरुण तुकाराम बीजेला मंदिरात बसून गाथा वाचतात.

विद्रोहींची भूमिका मांडताना किरण म्हणतो, जनसामान्यांचं आणि सातशे वर्षांची समतेची परंपरा सांगणा-या वारकरी संप्रदायाचं दैवत असणा-या पांडुरंगाच्या पूजेवर एका विशिष्ट पोटजातीचीच मक्तेदारी कशी काय असू शकते? तीही बडव्यांच्या निष्ठेचे आणि पावित्र्याचे धिंडवडे निघाले असताना! त्यामुळे वैदिक पद्धतीचे पूजापाठ नकोत. विशेषत: पहाटेच्या पूजेतलं पुरुषसूक्त तर नकोच नको. त्याऐवजी वारकरी पद्धतीचे विधी चालतील. सर्व जातीच्या स्त्री - पुरुषांना पूजेचा अधिकार हवा. बडव्यांचं पूर्णपणे उच्चाटन हवं.

किरणरावांची तलवार बडव्यांबरोबरच सरकारी समितीवरही चलते. सरकारी अधिकारी कशाला हवेत? त्यापेक्षा महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेशातल्या प्रत्येक जिल्ह्यातून एकेक प्रतिनिधी निवडणूक घेऊन समितीवर निवडावा.' विद्रोहींची ही कल्पना शिरोमणी गुरुद्वारा कमिटीच्या निवडणुकांची आठवण करून देणारी. तुळजापूरलाही भोपेंना हटवायला हवं का? असं विचारल्यावर त्याचं उत्तर असतं, 'हो, त्यांनाही हटवायला हवं, पण ते बडव्यांसारखे नाहीत ना!'

किरणभौ काहीही म्हणोत... भोपे ब्राह्मण नाहीत, मराठे आहेत. पण बडवेगिरी त्यांच्यातही आहेच. एवढंच कशाला खुद्द पंढरपुरात पुंडलिकाच्या देवळातले महादेव कोळी पुजारी बडव्यांच्या दहा पावलं पुढे आहेत. नामदेव पायरीच्या समोरच चोखोबांची समाधी आहे. तिथे त्यांचे वंशजच पुजारी आहेत. त्यांची बडवेगिरी पाहिली तर चोखोबा पुन्हा एकदा म्हणतील, धाव घाली विठू आता...

मंदिर समितीवर स्वत: मंदिर समिती वगळता कुणीही समाधानी नाही. सुरुवातीला बडव्यांनी जेरीला आणलं. पण खमके अधिकारी आले तेव्हा त्यांनी समितीला भक्कम केलं. समितीच्या नावावर काही चांगल्या गोष्टी नक्की आहेत. त्यातली सर्वात मोठी गोष्ट म्हणजे समितीमुळे बडव्यांच्या देवळावरील मालकीवर आलेली टाच. शिवाय समितीने सातमजली दर्शनमंडप बांधला. स्वच्छता वाढली. बजबजपुरी तुलनेने ओसरली.

समितीकडे उण्याच्याही अनेक गोष्टी. समिती पारदर्शकतेच्या गोष्टी करते, पण रोज लाखोंनी येणारा पैसा जिरण्यास फटी कमी नाहीत. दर्शनमंडप, तुकाराम भवन यांच्या बांधकामातही अनेक गफलती. गैरव्यवहाराचे आरोप झाले. ब्लॅकने दर्शनपास विकण्याचा मोठा बभ्रा झाला. एवढंच काय महापूजाही ब्लॅकने विकल्या जातात. खोटी पावतीपुस्तकं छापण्यापर्यंत मजल गेली. पण विशेष म्हणजे ज्यासाठी समिती आली ते बडवेगिरी संपवण्याचं काम झालेलं नाही. म्हणजे कायदे नियम असूनही जबरदस्तीने पैसे मागणं, भाविकांना फसवणं, मध्ये घुसवणं असे प्रकार सुरूच आहेत आणि विशेष म्हणजे समितीच्या लोकांच्या मदतीशिवाय ते शक्यही नाही. त्यामुळे आताचे बडवे मंदिराबाहेर गेलेच तर उद्या त्यांची जागा घ्यायला सरकारी बडवे तयार आहेत.

तेव्हा ... बोला , पुंडलिका वरदे हारी विठ्ठल !

०००

5 comments:

  1. Sahi ! Thanks for this information.

    ReplyDelete
  2. This comment has been removed by the author.

    ReplyDelete
  3. जबरदस्त सर. शब्दच नाहीत खूप अभ्यासपूर्ण लेख आहे.

    ReplyDelete
  4. देऊळ बडव्यांकडून समितीच्या ताब्यात गेलं, तेव्हा झाडलोट करताना मंदिराच्या वर दारुच्या रिकाम्या बाटल्या आणि मटणाची हाडं सापडली होती, ही पंढरपुरात सर्रास सांगितली जाणारी गोष्ट. तशा बातम्याही छापून आल्या होत्या म्हणे. पण गाजली ती गोपाळ बडव्याची 'मर्दुमकी'. विठोबा रखुमाईच्या अभिषेकाचं पाणी गोमुखातून तीर्थकुंडात येतं. भाविक तिथलं पाणी तीर्थ म्हणून पितात. १५ मे २००३ ला मंदिराच्या सिक्युरिटीने ' प . पू .' गोपाळ रामकृष्ण बडवे यांना त्या तीर्थकुंडात लघवी करताना पकडलं. यात काय नवल, आपण हे नेहमी करायचो, असंही गोपाळरावांनी पकडल्यावर सांगितलं म्हणे! कुलाचाराची आणि परंपरेची द्वाही फिरवणा-या बडवेमंडळींसाठी ती चपराकच होती. हा प्रकार एका कट्टर पंथ्याकडून ऐकला होता. पण आज तुम्ही लिहल्याने त्याबद्दल खात्री पटली.

    ReplyDelete