Friday, 27 January 2017

मोर्चा निघावा शूद्रत्वाच्या सन्मानासाठी


मला आलेला मेल. १५ जानेवारीची सकाळ.

परब,
तुमचा लेख वाचला आणि जाणवलं की तुमच्यासारख्या छुपा जातीयवादी माणसाचा जो तर-फडा होत आहे तोच ह्या मोर्चाच्या आयोजनाचा फायदा आहे.
अरे किती दिवस तुम्ही लोक मराठा समाजाला तुमचा गुलाम समजणार?
तो मोदी स्वतः गांधीची जागा घेत आहे तिथे लिहा ना लेख, गोडसेच्या औलादीकडून आम्हांला तत्वज्ञानांची आवश्यकता नाही.
आम्ही दिव्य मराठी पेपर विकत घेवून वाचतो. जरी आज ब्राह्मण पत्रकार 98 टक्के मीडियामध्ये आहे म्हणून आम्ही तुम्हाला फॉलो करणार नाही. जरा व्यावसायिकता जपा आणि लोकांना खोट्या भाकडकथा सांगून पोट भरायचे धंदे बंद करा.
एक मराठा लाख मराठा

Friday, 6 January 2017

१ जानेवारी १८१८

श्रीरंगजी म्हणतात पत्रकारितेतले अनेकजण मधूनच कोमात जातात. म्हणजे ते मेन स्ट्रीममधे दिसत नाहीत. आर्थिक गणित बिघडलेलं असतं. समोर दिशा कळत नाही. कुछ जमता नही. सप्टेंबरच्या आसपास रिंगणचं काम संपल्यानंतर मीपण तसा कोमातच जमा होतो.

माझं श्रीरंगजींना म्हणणं असतं आपण अधूनमधून कोमात असणारच. तेव्हाही आपण नाचतच राहायला हवं, शुद्धीवर असताना नाचतो तसेच. सगळं सुरळीत असताना कोमा स्वतःहून ओढावून घ्यायची खाज असेल तर असं पॉझिटिव राहण्याशिवाय गत्यंतरही नसतं. तरीही कधीतरी निराशा येऊनच जाते. १६च्या शेवटचे चारपाच दिवस तसे होते. पण नव्या वर्षात सगळी जळमटं फेकली गेली. हॅपी न्यू इयर.

Tuesday, 23 February 2016

यंदा संत निवृत्तीनाथ

त्र्यंबकेश्वर येथील संत निवृत्तीनाथांची समाधी
कालच पुणे विद्यापीठातल्या संत नामदेव अध्यासनातून दत्तोपासक सरांचा व्हॉट्सअप मेसेज आला होता. आज संत निवृत्तीनाथांची जयंती आहे. घरच्यांचेच वाढदिवस लक्षात असतात ते नशीब. निवृत्तीनाथांची जयंती लक्षात राहणं कठीणच. त्यामुळे दत्तोपासक सरांना थँक्स म्हणायलाच हवं.

यंदा निवृत्तीनाथांची जयंती विसरून कसं चालेल. २०१६चा रिंगणचा अंक निवृत्तीनाथांवर करायचा, हे गेल्या वर्षीच्या रिंगणमध्येच ठरलंय.

Tuesday, 16 February 2016

पुन्हा आदरणीय कॉम्रेड

१६ फेब्रुवारी २०१५. भल्या सकाळीच एसेमेस आला कॉम्रेड गोविंद पानसरेंवर हल्ला झाला. पण त्याची भीषणता कळली नव्हती. कणकवलीहून अंकुश कदमचा फोन आला. तो हादरलेला होता. त्याने सांगितलं तेव्हा टीव्ही बघायला घेतला. चारही बाजूंनी माहिती मिळत होती. पण समजून घेण्याची क्षमताच संपल्यासारखं बधीर झालो होतो. त्याला आज एक वर्षं झालं.

Saturday, 21 March 2015

संमेलनाच्या अध्यक्षाचं भाषण वगैरे

संमेलनाच्या अध्य़क्षाचं भाषण देताना मी. सोबत विचारपीठावर महेश थोरवे
श्रीपाल सबनीस, हरि नरके, विनोद शिरसाठ आणि भूषण कदम
कधी कोणत्या साहित्य संमेलनाचा अध्यक्ष बनेन असं मला कधीच वाटलं नव्हतं. कोणी परिसंवादासाठी वगैरे बोलावलं तरी मिळवलं, असं अजूनही वाटतं. तरीही माझासारखा पत्रकार पहिल्या अखिल भारतीय युवा साहित्य संमेलनाचा अध्यक्ष बनला. आयोजकांशी माझी ओळखदेख नव्हती, तरीही. दोन दिवसांचा हा अनुभव समृद्ध करून जाणारा होता. अनेक नवे मित्र जोडले. नवं ऐकता आलं. समजून घेता आलं. स्वतःला दुरुस्त करून घेता आलं. त्यात माझाही पीआर वगैरे झाला.

संमेलन सुरू असताना माझ्याशी फोनवर बोलताना आई म्हणाली की माणसं आहेत, म्हणजे तुझं पोट भरलं असेल. मी अध्यक्ष म्हणून हरि नरके सर मुद्दामून भाषण ऐकण्यासाठी आले होते. मला पत्रकारितेच्या पहिल्या दिवसापासून पाहणारे पराग पाटील आणि सुनील कर्णिक मुंबईहून आले होते. सोबत नारायण बांदेकरही होते. आमचे दत्ताभाऊ बाळसराफ मुंबईहून आले.

Saturday, 21 February 2015

आदरणीय कॉम्रेड,

`तुम्ही लवकरच बरे व्हाल आणि पुन्हा एकदा विवेक वाटत वाटत तुमच्या हल्लेखोरांनाही प्रेमाने आलिंगन द्यायला उभे राहाल, याची खात्री आहे आम्हाला. तुमच्या या प्रेमामुळेच तर अविवेकी लोक तुम्हाला घाबरले.` पानसरे सरांवर हल्ला झाला तेव्हा गोवादूतच्या अग्रलेखात लिहिलं होतं. विश्वास होता की सर बरे होतील. पण ते होणं नव्हतं.
सरांचा खून झालाय. खून करणाऱ्यांनो, तुमचे दिवस भरले. तुम्ही जे कुणी असाल, तुम्हाला संपवल्याशिवाय राहणार नाही. पानसरे सरांचा खून तुम्हाला महाग पडेल. फार महाग. किती जणांना मारणार तुम्ही?
यावर एकच उपाय. प्रतिगामी विचारांचा पगडा दूर करायला हवा. उजेडाने काळोख संपतो. त्यासाठी गांधीजी, दाभोलकर आणि पानसरे सरांचा विवेक शेवटच्या माणसापर्यंत न्यायलाच हवा. पानसरे सरांचे शिवाजी महाराज प्रत्येक माणसापर्यंत पोहोचायलाच हवेत.
आता आणखी गाफील राहून चालणार नाही. आता टंगळमंगळ करून चालणार नाही. स्वतःपासून सुरुवात करायला हवी. आपण स्वतः ज्या क्षेत्रात काम करतो आहोत त्यापासून सुरुवात करायला हवी. स्वतःला धार लावायला हवी. स्वतःचं सर्वस्व द्यायला हवं आता. दुसरा कोणताच पर्याय ठेवलेला नाही मारणाऱ्यांनीच.
दिवस जातील तसे विसरू आपण पानसरे सरांच्या हौतात्म्याला. गांधीजींना विसरलो तसे. दाभोलकरांना विसरलो तसे. पण हे होता कामा नये. तो सगळ्यात मोठा धोका आहे. एकमेकांना जागं करत ठेवायला हवं. आणखी कुणी पानसरे होऊ नये म्हणून आता जागं राहायलाच हवं. जागं ठेवायला हवं.

आम्हाला संपवल्यानंतर तुम्ही आम्हाला जाळणार असाल
तर आम्ही सोनं आहोत. उजळून निघू.
आम्हाला संपवण्यानंतर तुम्ही खोल पुरणार असाल
तर आम्ही बिया आहोत. नव्याने उगवू.
मारा आणखी किती मारायचंय ते.
मरायला तयार आहोत आम्ही.
लढायला तयार आहोत आम्ही.
तुम्हालाही बदलायला तयार आहोत आम्ही.

Thursday, 1 January 2015

यंदाचं `रिंगण` जनाबाईंवरचं

मला वाटतं नोव्हेंबरात मुक्ता, रुद्र आणि मी पंढरपुरात गेलो होतो. दत्तघाटाशेजारचा कबीर मठ फक्त बाहेरूनच बघितला होता. तिथे गेलो. आत संत कबीरांची सहा सातशे वर्षं जुनी मूर्ती पाहिली आणि कमालाची समाधीही. लाखो मैल अंतरावरच्या कबीरपुत्र कमालाने चंद्रभागेच्या किनाऱ्यावर शेवटचा श्वास घेतला, याची ती निशाणी. त्या समाधीला नमस्कार करताना अंग शहारलं.

तिथे आताचे कबीरदास महाराज भेटले. थोडी घाई होती त्यांना, तरीही त्यांनी वेळ देऊन गप्पा मारल्या. कबीरपंथी साधूंची दिंडी पालखी वाराणशीहून पंढरपूरला येत होती. कबीरही पंढरपुरात आले होते. पण ते पांडुरंगाला भेटण्यासाठी आले नव्हते. ते इथे आले ते संत जनाबाईंचं दर्शन घेण्यासाठी. जनाबाईंनी त्यांना विठ्ठलाचं दर्शन घडवलं. महाराजांनी त्यांच्या परंपरेतली आख्यायिका सांगितली. मी उडालोच.

संतांचं संत म्हणून काश्मीर ते कन्याकुमारी ज्याचा डंका आहे ते कबीर एवढ्या लांबून आमच्या जनाबाईंना भेटण्यासाठी येतात, ही गोष्टच अद्भूत आहे. `जनी सब संतनकी काशी `असं कबीरांनी लिहून ठेवल्याचे संदर्भ सापडतात. जनाबाईंची ही थोरवी समजून घ्यायलाच हवी. एका शिंप्याच्या घरची ही मोलकरीण त्या काळातल्या सर्वात मोठ्या मानल्या जाणाऱ्या अध्यात्माच्या क्षेत्रात इतकं अत्युच्च स्थान मिळवते, हाच मोठा चमत्कार आहे.

संत नामदेवांच्या पाठीशी ठामपणे उभ्या राहणाऱ्या जनाबाई. चोखोबांना आधार देणाऱया जनाबाई. ज्ञानेश्वर नामदेवांमधला समन्वय घडवणाऱ्या जनाबाई. सर्व समकालीन संतांच्या नेटवर्किंगमधला ओलावा असणाऱ्या जनाबाई. सहजसुंदर काव्याचं मराठी साहित्यातलं सर्वात मोठं शिखर असणाऱ्या जनाबाई. `जनी म्हणे देवा, मी झाले वेसवा` असं अगदी सहज म्हणत स्त्रीशक्तीचा आणि स्त्रीमुक्तीचाही अविष्कार घडवणाऱ्या जनाबाई. प्रत्येक बाईला आपल्या दुःखाचं प्रतीक वाटू शकेल अशा आख्यायिकांमधून सापडणाऱ्या जनाबाई. शेकडो वर्षं जात्यावरच्या ओव्यांमधून लोकसाहित्याचा मानबिंदू झालेल्या जनाबाई. शोधायलाच हव्यात जनाबाई. त्यानिमित्ताने वारकरी परंपरेतलं बाईचं स्थान शोधता येईल. अन्य महिला संतांचाही वेध घेता येईल. गंगाखेड आणि पंढरपुरात जनाबाईंच्या आठवणींचा शोध घेता येईल. मराठवाड्यातली वारकरी परंपरा शोधता येईल. मोलकरीण किंवा घरगडी या व्यवसायाचाही इतिहास शोधता येईल.

म्हणून यंदाचा `रिंगण` हा आषाढी विशेषांक संत जनाबाईंवरचाच. संत नामदेव आणि संत चोखामेळा यांच्यावरच्या `रिंगण`ने आम्हाला भरभरून दिलं. दिवाळीचे अंक असतात तर महाराष्ट्राचा सर्वात मोठा सोहळा असलेल्या आषाढी एकादशीचे अंक का नकोत? आणि संतपरंपरेची सामाजिक सांस्कृतिक अंगाने मांडणी करता येऊ शकते का? या आमच्या मनात आलेल्या प्रश्नांमुळे `रिंगण`चा प्रवास सुरू झाला. पहिल्या दोन्ही अंकांनी आम्हाला आनंद दिला. समाधान दिलं. औकातीपेक्षा खूप मानसन्मानही दिला. पण आमच्याकडून `रिंगण`मधे अनेक चुका राहिल्या. शुद्धलेखन नीट तपासता आलं नाही. लेखकांचा चांगला फॉलोअप करता आला नाही. काही वेगळे आयाम शोधायचेही राहून गेले. आर्थिक गणित नीट बांधायचं राहून गेलं. यंदा हे जमेल तेवढं टाळावं म्हणून लवकर सुरुवात करतो आहे. त्यात तुमच्या सगळ्यांची मदत हवी आहे.

जनाबाईंवरची पुस्तकं कोणती? त्यांच्यावरचं लिखाण कोणी केलं आहे का? कोणाला त्यांच्यावर लिहायचं आहे का, आम्हाला काही सांगायचं आहे का? त्यांच्यावर कुणी अभ्यास केला आहे का किंवा पीएचडी वगैरे आहे का? तुमच्या गावात त्यांचं कुठे देऊळ आहे का? त्यांचे वेगळे संदर्भ कुठे सापडत आहेत का? आम्हाला या क्षणाला तरी यापैकी काहीच माहीत नाही. ते तुमच्याकडूनच हवंय. कारण हे `रिंगण` फक्त आमचं आहे, असं आम्ही कधीच मानलं नाही. ते आमच्याइतकंच तुमच्या सगळ्यांचं आहे. आपलं हे `रिंगण` समृद्ध करण्यासाठी तुमची मदत हवी आहे.

आणखी एक छोटीशी गोष्ट. चोखोबांवरचं `रिंगण` लवकरच पुस्तकरूपात येतं आहे. त्यात काही नवे लेखही आहेत. अंकातल्या चुका टाळल्या आहेत. मायबापहो!, `महानामा`ला तुम्ही डोक्यावर घेतलंत. आता `जोहार चोखोबा`ला देखील आपलं माना, हे मनापासून मागणं.

Friday, 12 December 2014

सर्वजनवादाचे प्रणेते

सदानंद मोरे सर साहित्य संमेलनाचे अध्यक्ष झाले. पहिल्या फेरीतच ते जिंकले. चांगलं झालं. ते पडले असते तरीही माझ्या दृष्टीने त्यांच्या मोठेपणात काही बाधा आली नसती. कारण त्यांचे माझ्यासारख्यावरचे उपकार मोठे आहेत. मी आज जे मोडकंतोडकं लिहितो त्यातलं बरचसं सरांनीच लिहिलेल्यातलं वाचलेलं असतं. किंवा त्यावरून सुचलेलं असतं. सरांमुळेच वर्तमानावर लिहिताना इतिहासाचं भान ठेवण्याचं भान आलं. त्यांच्यामुळेच `रिंगण` झालं. ब्लॉगवरच्या लिखाणात मोरे सरांचा प्रभाव अनेक ठिकाणी आहे.

मी महानगरात वाढलेलो. त्यामुळे एक बरं झालं, माझ्या मागे कोणतीच ओळख नव्हती. ना जात, धर्म, कूळ, वंश, काहीच नाही. माझ्या पणजोबांच्या आधी आम्ही मूळ नक्की आमच्या गावीच राहत होतो का, मला शंका आहे. माझ्या पूर्वजांची बोली मालवणी मलाच काय माझ्या आईबाबांनाही बोलता येत नाही. माझी ओळख असलेलं फक्त माझं शहर, मुंबई. मी महाराष्ट्रीय, मी भारतीय म्हणजे काय, याचा अद्याप शोधच चाललेला. असाच चाचपडताना मला `तुकाराम दर्शन` भेटलं. माझ्या मुळांपर्यंतचा रस्ता लख्ख दिसल्यासारखं झालं. मोरे सरांचं जसजसं वाचत गेलो तसतसं डोळे उघडत गेले.

Friday, 24 October 2014

हॅपी दिवाळी



दिवाळी आली की दिवाळी अंक येतात. दिवाळी अंक करणाऱ्यांना दिवाळीची भूणभूण सगळ्यात आधी लागते. मग ते लेखकांच्या मागे भूणभूण करतात. माझ्यासारख्या आळशी माणसाच्या मागे बरीच भूणभूण करावी लागते. यंदा आजारपणामुळे एकाही दिवाळी अंकात लिहिणं जमलं नाही. पण गेल्यावर्षी तीन चार ठिकाणी लिहिलं होतं. यंदाही पाच सहा अंकवाल्यांनी सांगितलं होतं. आमच्या `गोवादूत`च्या अंकातही लेख लिहिता आला नाही.

गेल्या वर्षीच्या `गोवादूता`त लेख लिहिला होता. परिवर्तन की आवर्तन नावाचा. लोकसभा निवडणुकांत काय होणार, असा धांडोळा घेतला होता. मोदी लाटेने एकदम तोंडघशी पाडलं. त्यामुळे ते काही शेअर करत नाही. पण त्याच अंकात एक संपादकीय लिहिलं होतं. फेसबूकवर काय काय हळवं हलकंफुलकं वाचत राहण्याचे दुष्परिणाम काय असतात त्यासाठी हे छोटं संपादकीय वाचायला हरकत नाही.
सगळ्यांना हॅपी दिवाळी...

Wednesday, 10 September 2014

अमर हबीबः साधेपणाची साधना

आमच्या गावच्या घरी काढलेला अमरजींचा फोटो
आज खरं तर अंबाजोगाईत असायला हवं होतं. जायचं ठरलं होतं. बऱ्याच महिन्यांपूर्वी अमरजींना तसं सांगितलंही होतं. एकतर माझ्यासारखा आळशी माणूस उद्याचंही काही ठरवत नाही. ठरवलं की असं होतं. आजारी पडलो. अंबाजोगाईला जाणं शक्यच नाही. अमरजींचा आज साठावा वाढदिवस. तो त्यांच्या फक्त सोबत राहून साजरा करायचा होता. त्यांच्यासोबत राहायचं म्हणजे समृद्ध होणं असतं. तसं अधिक श्रीमंत व्हायचं होतं. आता झालं नाही तरी त्याचं चक्रवाढ पद्धतीनं उट्ट काढावंच लागणार.

अमरजींना पहिल्यांदा भेटलो तेव्हापासूनच हा अनुभव आहे. प्रत्येक भेटीत त्यांनी समृद्ध केलंय. मी २००२ वगैरे साली दिल्लीत होतो. ईटीव्हीचा दिल्ली प्रतिनिधी. मराठी पत्रकार एकमेकांना भेटायचे. त्यात एक विचित्र नाव कानावर यायचं, अमर हबीब. फोनवर एकदोनचा बोलणं झालं पण भेट झाली नव्हती. अशीच कधीतरी भेट झाली. बहुतेक प्रमोदसोबत. मग आम्ही अमरजींच्या मागे लोकचुंबकासारखे आपोआप चिटकलो. अमर हबीब, प्रमोद चुंचूवार आणि मी. किती रात्री आणि किती दिवस आम्ही चर्चा केल्या असतील, गणतीच नाही. त्या अनोळखी शहरात ते आमचे पालकच होते. पण कधी पालक असल्याचं त्यांनी जाणवू दिलं नाही. ते आम्हाला घडवत होते, पण त्याचा वासही आला नाही. त्यांचे दोस्त म्हणवून घ्यायला आम्ही खूपच लहान आहोत. पण तरीही ते आमचे दोस्त होते आणि आहेत.

आज मी संपादक वगैरे आहे. लोक कौतुक वगैरे करतात. त्यातलं खूप काही अमरजींनी दिलेलं आहे. त्यांनी माझ्यासारख्या पोरांना नव्याने विचार करायला शिकवलं. नव्याने प्रश्न विचारायला शिकवलं. आम्हाला जगायला शिकवलं. गोष्टींच्या मूळात शिरायला शिकवलं. त्यांच्यामुळे जगण्यातली मजा वाढली. त्यांच्यामुळे जगण्यात श्रीमंत झालो. जगजीतने गायलेली एक गझल आहे, मुझ में जो कुछ अच्छा हैं सब उसका हैं, मेरा जितना चर्चा हैं सब उसका हैं. उसका मेरा रिश्ता बडा पुराना हैं, मैंने जो कुछ सोचा हैं सब उसका हैं. असंच काहीसं तरी. असं असणारा मी एकटा नाही. खूपजण आहेत. आता तर सोशल नेटवर्किंगमुळे त्यांच्या घडवण्याचा परिघ आणखी वाढलाय. ते सगळीकडे पसरलेत.

काही महिन्यांपूर्वी अमरावतीच्या आम्ही सारे फाऊंडेशनने त्यांना कार्यकर्ता पुरस्कार दिला. कार्यक्रम घरचा होता. जाऊ शकलो नाही. आता अमरजींचा वाढदिवस आहे. ठरवूनही जाऊ शकलो नाही. अविनाश दुधेच्या आग्रहामुळे तेव्हा अमरजींवर एक लेख लिहिला होता. प्रयत्न करूनही कितीतरी वेळ लिहिता येत नव्हतं. तरीही लिहिलं. लेख कसा झालाय माहीत नाही. पण त्यात अतिशयोक्ती एका पैशाचीही नाही. लेख नेहमीसारखा कटपेस्ट