Sunday, 5 February 2017

आघाड्यांचा राजकारणाचा शेवट?

गोव्यात लिहिताना एक गडबड नेहमी व्हायची. विषय समजावून सांगण्याच्या नादात मांडायची मूळ गोष्ट राहूनच जायची. ते मग शेवटच्या पॅरेग्राफमधे उरायचं. आता `गोवन वार्ता`साठी लिहितानाही तसंच होतंय. पण लिहायलाच हवं. गोव्यातल्या वाचकांशी एक वेगळं नातं बनलंय. फोन करून प्रतिसाद देण्याचा त्यांचा फारसा स्वभाव नाही, तरीही.

उद्धव ठाकरेंनी मुंबई महानगरपालिकेतल्या निवडणुकीसाठी भाजपशी असलेली युती तोडली. त्याविषयी महाराष्ट्राबाहेरच्या वाचकांशी कसं बोलता येईल, याचा प्रयत्न केलाय. देशाच्या पातळीवर महापालिका आणि युतीचं महत्त्व सापडतंय का ते पाहिलंय. फारसं जमलेलं नाही. पण हात अगदीच काही रिकामा राहणार नाही. 

भाषाव्रती

यंदा जवळ असूनही साहित्य संमेलनाला गेलो नाही. जायला हवं होतं. निदान पुस्तकं विकत घ्यायला तरी. त्यातल्या त्यात साहित्य संमेलनाशी संबंध उरला तो एका लेखापुरता. ग्रंथालीचं रूची नावाचं मासिक आहे. प्रल्हाद जाधवांनी त्याचा मराठी भाषा विशेषांक संपादित केलाय. त्यात माझा छोटा लेख आहे, यास्मिन शेखांवरचा.

यास्मिन शेखांचा हिरव्या रंगाचा `मराठी शब्दलेखनकोश` मी भरपूर वापरलाय. कितीतरी जणांना विकत घ्यायला लावलाय. आता त्याच्या विस्तारित आवृत्त्याही येऊन संपल्यात. मराठी भाषा विकास संस्थेची `मराठी लेखन मार्गदर्शिका`ही तशीच मोलाची. लिहिणाऱ्या हातांनी ही दोन्ही पुस्तकं नेहमी हाताशी ठेवावीत अशीच. आजवर लिहिताना या दोन पुस्तकांनी खूप आधार दिला. हा लेख त्यासाठीचीच कृतज्ञता आहे.

कपड्यांची संस्कृती, संस्कृतीचे कपडे

आज रविवार ५ फेब्रुवारीच्या टाइम्स ऑफ इंडिया मधे मालिनी अय्यर यांचा लेख वाचला, व्हाय ब्रा पँटीज आर नॉट बॉम्ब्ज? महाराष्ट्र टाइम्समधे स्पृहा जोशीने फेसबूकवर अपलोड केलेल्या बोल्ड फोटोची बातमी वाचली. म्हटलं लिहिलेला लेख ब्लॉगवर टाकण्याचं सत्कृत्य आज करायलाच हवं. एसएनडीटी युनिवर्सिटीतल्या मुलींसाठी ड्रेस कोडचा फतवा निघाला. त्यावर लिहिलेला लेख गेल्या रविवारी दिव्य मराठीच्या अघळपघळ कॉलमात छापून आला होता. त्याचा मथळा होता, संकुचितांची बोंबाबोंब.

Friday, 27 January 2017

मजबुरी का नाम नरेंद्र मोदी


गोव्यातली तीन वर्षं मजेतच गेली. नवे मित्र भेटले. खूप नवं समजून घेता आलं. खूप नवं शिकता आलं. तिथल्यासाठी लिहिताना शैलीही मुळातून बदलावी लागली होती. एकतर आक्रमकता आवरायला लागली. तसा गोव्याचा स्वभावच नाही. मी ज्या पेपरचा संपादक होतो, त्या गोवादूतचा स्वभावही माझ्या आजवरच्या लिखाणापेक्षा वेगळा होता. मुंबईत लिहिताना वाचक अगदी ओळखीचा होता. गोव्यात तसं नव्हतं. विषय समजावून सांगण्यातच लेखाची शब्दसंख्या संपून जायची. भूमिका कशीबशी शेवटच्या पॅराग्राफमधे मांडावी लागायची. शिवाय नियमित अग्रलेख लिहिणं थकवणारंच होतं. आमचे कार्यकारी संपादक सुनील डोळे यांनी त्याचा भार फार येऊ दिला नाही. तरीही अनेकदा माहीत नसलेल्या विषयांवरही लिहावं लागायचं. पर्याय नव्हता.

मोर्चा निघावा शूद्रत्वाच्या सन्मानासाठी


मला आलेला मेल. १५ जानेवारीची सकाळ.

परब,
तुमचा लेख वाचला आणि जाणवलं की तुमच्यासारख्या छुपा जातीयवादी माणसाचा जो तर-फडा होत आहे तोच ह्या मोर्चाच्या आयोजनाचा फायदा आहे.
अरे किती दिवस तुम्ही लोक मराठा समाजाला तुमचा गुलाम समजणार?
तो मोदी स्वतः गांधीची जागा घेत आहे तिथे लिहा ना लेख, गोडसेच्या औलादीकडून आम्हांला तत्वज्ञानांची आवश्यकता नाही.
आम्ही दिव्य मराठी पेपर विकत घेवून वाचतो. जरी आज ब्राह्मण पत्रकार 98 टक्के मीडियामध्ये आहे म्हणून आम्ही तुम्हाला फॉलो करणार नाही. जरा व्यावसायिकता जपा आणि लोकांना खोट्या भाकडकथा सांगून पोट भरायचे धंदे बंद करा.
एक मराठा लाख मराठा

Friday, 6 January 2017

१ जानेवारी १८१८

श्रीरंगजी म्हणतात पत्रकारितेतले अनेकजण मधूनच कोमात जातात. म्हणजे ते मेन स्ट्रीममधे दिसत नाहीत. आर्थिक गणित बिघडलेलं असतं. समोर दिशा कळत नाही. कुछ जमता नही. सप्टेंबरच्या आसपास रिंगणचं काम संपल्यानंतर मीपण तसा कोमातच जमा होतो.

माझं श्रीरंगजींना म्हणणं असतं आपण अधूनमधून कोमात असणारच. तेव्हाही आपण नाचतच राहायला हवं, शुद्धीवर असताना नाचतो तसेच. सगळं सुरळीत असताना कोमा स्वतःहून ओढावून घ्यायची खाज असेल तर असं पॉझिटिव राहण्याशिवाय गत्यंतरही नसतं. तरीही कधीतरी निराशा येऊनच जाते. १६च्या शेवटचे चारपाच दिवस तसे होते. पण नव्या वर्षात सगळी जळमटं फेकली गेली. हॅपी न्यू इयर.

Tuesday, 23 February 2016

यंदा संत निवृत्तीनाथ

त्र्यंबकेश्वर येथील संत निवृत्तीनाथांची समाधी
कालच पुणे विद्यापीठातल्या संत नामदेव अध्यासनातून दत्तोपासक सरांचा व्हॉट्सअप मेसेज आला होता. आज संत निवृत्तीनाथांची जयंती आहे. घरच्यांचेच वाढदिवस लक्षात असतात ते नशीब. निवृत्तीनाथांची जयंती लक्षात राहणं कठीणच. त्यामुळे दत्तोपासक सरांना थँक्स म्हणायलाच हवं.

यंदा निवृत्तीनाथांची जयंती विसरून कसं चालेल. २०१६चा रिंगणचा अंक निवृत्तीनाथांवर करायचा, हे गेल्या वर्षीच्या रिंगणमध्येच ठरलंय.

Tuesday, 16 February 2016

पुन्हा आदरणीय कॉम्रेड

१६ फेब्रुवारी २०१५. भल्या सकाळीच एसेमेस आला कॉम्रेड गोविंद पानसरेंवर हल्ला झाला. पण त्याची भीषणता कळली नव्हती. कणकवलीहून अंकुश कदमचा फोन आला. तो हादरलेला होता. त्याने सांगितलं तेव्हा टीव्ही बघायला घेतला. चारही बाजूंनी माहिती मिळत होती. पण समजून घेण्याची क्षमताच संपल्यासारखं बधीर झालो होतो. त्याला आज एक वर्षं झालं.

Saturday, 21 March 2015

संमेलनाच्या अध्यक्षाचं भाषण वगैरे

संमेलनाच्या अध्य़क्षाचं भाषण देताना मी. सोबत विचारपीठावर महेश थोरवे
श्रीपाल सबनीस, हरि नरके, विनोद शिरसाठ आणि भूषण कदम
कधी कोणत्या साहित्य संमेलनाचा अध्यक्ष बनेन असं मला कधीच वाटलं नव्हतं. कोणी परिसंवादासाठी वगैरे बोलावलं तरी मिळवलं, असं अजूनही वाटतं. तरीही माझासारखा पत्रकार पहिल्या अखिल भारतीय युवा साहित्य संमेलनाचा अध्यक्ष बनला. आयोजकांशी माझी ओळखदेख नव्हती, तरीही. दोन दिवसांचा हा अनुभव समृद्ध करून जाणारा होता. अनेक नवे मित्र जोडले. नवं ऐकता आलं. समजून घेता आलं. स्वतःला दुरुस्त करून घेता आलं. त्यात माझाही पीआर वगैरे झाला.

संमेलन सुरू असताना माझ्याशी फोनवर बोलताना आई म्हणाली की माणसं आहेत, म्हणजे तुझं पोट भरलं असेल. मी अध्यक्ष म्हणून हरि नरके सर मुद्दामून भाषण ऐकण्यासाठी आले होते. मला पत्रकारितेच्या पहिल्या दिवसापासून पाहणारे पराग पाटील आणि सुनील कर्णिक मुंबईहून आले होते. सोबत नारायण बांदेकरही होते. आमचे दत्ताभाऊ बाळसराफ मुंबईहून आले.

Saturday, 21 February 2015

आदरणीय कॉम्रेड,

`तुम्ही लवकरच बरे व्हाल आणि पुन्हा एकदा विवेक वाटत वाटत तुमच्या हल्लेखोरांनाही प्रेमाने आलिंगन द्यायला उभे राहाल, याची खात्री आहे आम्हाला. तुमच्या या प्रेमामुळेच तर अविवेकी लोक तुम्हाला घाबरले.` पानसरे सरांवर हल्ला झाला तेव्हा गोवादूतच्या अग्रलेखात लिहिलं होतं. विश्वास होता की सर बरे होतील. पण ते होणं नव्हतं.
सरांचा खून झालाय. खून करणाऱ्यांनो, तुमचे दिवस भरले. तुम्ही जे कुणी असाल, तुम्हाला संपवल्याशिवाय राहणार नाही. पानसरे सरांचा खून तुम्हाला महाग पडेल. फार महाग. किती जणांना मारणार तुम्ही?
यावर एकच उपाय. प्रतिगामी विचारांचा पगडा दूर करायला हवा. उजेडाने काळोख संपतो. त्यासाठी गांधीजी, दाभोलकर आणि पानसरे सरांचा विवेक शेवटच्या माणसापर्यंत न्यायलाच हवा. पानसरे सरांचे शिवाजी महाराज प्रत्येक माणसापर्यंत पोहोचायलाच हवेत.
आता आणखी गाफील राहून चालणार नाही. आता टंगळमंगळ करून चालणार नाही. स्वतःपासून सुरुवात करायला हवी. आपण स्वतः ज्या क्षेत्रात काम करतो आहोत त्यापासून सुरुवात करायला हवी. स्वतःला धार लावायला हवी. स्वतःचं सर्वस्व द्यायला हवं आता. दुसरा कोणताच पर्याय ठेवलेला नाही मारणाऱ्यांनीच.
दिवस जातील तसे विसरू आपण पानसरे सरांच्या हौतात्म्याला. गांधीजींना विसरलो तसे. दाभोलकरांना विसरलो तसे. पण हे होता कामा नये. तो सगळ्यात मोठा धोका आहे. एकमेकांना जागं करत ठेवायला हवं. आणखी कुणी पानसरे होऊ नये म्हणून आता जागं राहायलाच हवं. जागं ठेवायला हवं.

आम्हाला संपवल्यानंतर तुम्ही आम्हाला जाळणार असाल
तर आम्ही सोनं आहोत. उजळून निघू.
आम्हाला संपवण्यानंतर तुम्ही खोल पुरणार असाल
तर आम्ही बिया आहोत. नव्याने उगवू.
मारा आणखी किती मारायचंय ते.
मरायला तयार आहोत आम्ही.
लढायला तयार आहोत आम्ही.
तुम्हालाही बदलायला तयार आहोत आम्ही.