Friday, 24 March 2017

तळवलकर मला भेटले


मटात छापून आलेलं तळवलकरांचं देखणं ग्राफिक्स रेखाटन
गोव्यातलं एक आघाडीचं वर्तमानपत्र असलेल्या नवप्रभाचे संपादक परेश प्रभू यांच्यामुळे मी गोविंद तळवळकरांवर लेख लिहिला. त्या लेखात बरीच भर घालून ही पोस्ट तयार केलीय.
..........

छगन भुजबळ उपमुख्यमंत्री असताना महाराष्ट्र टाइम्समधल्या नव्या प्रथेप्रमाणे गेस्ट एडिटर होते. तेव्हा भारतकुमार राऊत मटाचे संपादक होते. एका दिवसाचं संपादकपद भूषवण्यामध्ये भुजबळांना खूपच रस होता. त्यांचं स्वागत झालं. ते संपादकांच्या केबिनमध्ये पोहोचले. खूप सन्मानाने त्यांना संपादकाच्या खुर्चीवर बसवण्यात आलं. तिथे बसताच नेहमीच्या खुशखुशीत शैलीत ते म्हणाले, ही महाराष्ट्राची नंबर दोनची खुर्ची आहे. पहिली मुख्यमंत्र्यांची. त्यावर तर मला बसता येणार नाही. या खुर्चीत तरी बसायला मिळालंय. सगळे हसले. त्याच केबिनमध्ये असणारा मीही हसलो. महाराष्ट्र राज्याचा दोन नंबरचा नेता असणारा उपमुख्यमंत्री असं म्हणत होता. गोविंदराव तळवळकरांना प्रत्यक्षात मी कधी भेटलो नाही. तसं पाहिलंही नाही. पण त्याक्षणी मला वाटलं, मला तळवळकर भेटले. या खुर्चीत ही ताकद आहे, कारण यावर सत्तावीस वर्षं तळवळकर बसले होते.

Friday, 10 March 2017

दिल हैं हिंदुस्तानी


अविनाश दुधे माझा मित्र आहे, याचा मला अभिमान आहे. ताकदीने लिहिणारा. लिहिलंय त्यासाठी लढणारा. लढाईसाठी त्याग करून किंमत चुकवणारा असा आजघडीला माझ्या पिढीतला मला माहीत असणारा एकमेव संपादक. विचारांच्या बाबतीत टोक टाळणारा. तरीही स्वतःची भूमिका असणारा. त्यासाठी काहीही करायला तयार असणारा अविनाश मी जवळून बघितलाय. अनेकदा ही तात्त्विक वगैरे माणसं खूप कोरडी असतात. आमचा अविनाश तसा नाही. उलट तो आहे खूप हळवा आणि लाघवी. त्याने अफाट माणसं जोडलीत. त्याच्यावर जीव ओवाळून टाकायला तयार मित्रांचा गोतावळा खूप मोठा आहे.

टोकाच्या उजवेपणाकडून मध्याच्या डावीकडे पोहोचण्याचा त्याचा प्रवास अद्भूत आहे. तो त्याचा स्वतःचा संघर्ष आहे. पत्रकारितेत येताना विचारांच्या टोकांना असणाऱ्यांना विचारांच्या प्रवासाची संधी असते. कारण आमच्या या धंद्यात संवाद सगळ्यांशी करावाच लागतो. झापडं लावायचं निक्षून टाळायचं असेल तर विचारांचा प्रवास आनंदाने करता येतो. किंबहुना पत्रकारितेच्या मैदानात असेपर्यंत असा प्रवास सुरुच असतो. त्यासाठी स्वतःला तपासून घ्यावं लागतं सतत. बदलण्याची तयारी ठेवावी लागते. अविनाश या विचारांच्या प्रवासाचा आनंदयात्री आहे. त्याचा विचार त्याला बौद्धिकांमधून किंवा पुस्तकांमधून रेडिमेड मिळालेला नाही. तो त्याने स्वतः कमावलेला आहे. म्हणून त्याला त्याची किंमत माहीत आहे. तो त्याच्या विचारांसाठी बभ्रा न करता त्याग करू शकतो.

सुरुवात नागपूर तरुण भारत. नंतर चित्रलेखा. तिथून लोकमत. शेवटी पुण्यनगरी. हा अविनाशचा प्रवास नाही, तो त्याच्या करियरचा प्रवास आहे. पाचवीला पुजलेल्या आजारपणामुळे अमरावती सोडायची नव्हती म्हणून तो अडकून राहिला. नाहीतर आज मुंबई किंवा नागपूरला आणखी मोठ्या बॅनरमध्ये तो संपादक असता. आजवर प्रत्येक ठिकाणी त्याला लिखाणामुळे नोकरी सोडावी लागलीय. असं करावं लागणं हा एका पत्रकाराच्या लेखणीचा खूपच मोठा सन्मान असतो. अविनाशला घडवणारे संपादक ज्ञानेश महाराव यांच्यामुळे त्याचा चित्रलेखातला निरोप सुखद झाला. नियम सिद्ध करणारा हा एकमेव अपवाद सोडला तर प्रत्येक ठिकाणी तो हसत हसत सक्तीच्या राजीनाम्याचा सन्मान भोगून आलाय. आता त्याचा आणि त्याच्या करियरचा प्रवास `मीडिया वॉच`पर्यंत येऊन थांबलाय. मीडिया वॉच हे त्याचं गाजलेलं सदर. त्याच नावाचा त्याचा दिवाळी अंकही गाजला. आता गेल्याच महिन्यात त्याचं त्रैमासिक बनलंय. पहिल्याच अंकात त्याने मला विषय दिला होता, `आपण भारतीय कट्टर होत आहोत का?` मला त्यावर जे काही किडुकमिडुक वाटलं ते लिहिलंय.

Sunday, 5 February 2017

आघाड्यांचा राजकारणाचा शेवट?

गोव्यात लिहिताना एक गडबड नेहमी व्हायची. विषय समजावून सांगण्याच्या नादात मांडायची मूळ गोष्ट राहूनच जायची. ते मग शेवटच्या पॅरेग्राफमधे उरायचं. आता `गोवन वार्ता`साठी लिहितानाही तसंच होतंय. पण लिहायलाच हवं. गोव्यातल्या वाचकांशी एक वेगळं नातं बनलंय. फोन करून प्रतिसाद देण्याचा त्यांचा फारसा स्वभाव नाही, तरीही.

उद्धव ठाकरेंनी मुंबई महानगरपालिकेतल्या निवडणुकीसाठी भाजपशी असलेली युती तोडली. त्याविषयी महाराष्ट्राबाहेरच्या वाचकांशी कसं बोलता येईल, याचा प्रयत्न केलाय. देशाच्या पातळीवर महापालिका आणि युतीचं महत्त्व सापडतंय का ते पाहिलंय. फारसं जमलेलं नाही. पण हात अगदीच काही रिकामा राहणार नाही. 

भाषाव्रती

यंदा जवळ असूनही साहित्य संमेलनाला गेलो नाही. जायला हवं होतं. निदान पुस्तकं विकत घ्यायला तरी. त्यातल्या त्यात साहित्य संमेलनाशी संबंध उरला तो एका लेखापुरता. ग्रंथालीचं रूची नावाचं मासिक आहे. प्रल्हाद जाधवांनी त्याचा मराठी भाषा विशेषांक संपादित केलाय. त्यात माझा छोटा लेख आहे, यास्मिन शेखांवरचा.

यास्मिन शेखांचा हिरव्या रंगाचा `मराठी शब्दलेखनकोश` मी भरपूर वापरलाय. कितीतरी जणांना विकत घ्यायला लावलाय. आता त्याच्या विस्तारित आवृत्त्याही येऊन संपल्यात. मराठी भाषा विकास संस्थेची `मराठी लेखन मार्गदर्शिका`ही तशीच मोलाची. लिहिणाऱ्या हातांनी ही दोन्ही पुस्तकं नेहमी हाताशी ठेवावीत अशीच. आजवर लिहिताना या दोन पुस्तकांनी खूप आधार दिला. हा लेख त्यासाठीचीच कृतज्ञता आहे.

कपड्यांची संस्कृती, संस्कृतीचे कपडे

आज रविवार ५ फेब्रुवारीच्या टाइम्स ऑफ इंडिया मधे मालिनी अय्यर यांचा लेख वाचला, व्हाय ब्रा पँटीज आर नॉट बॉम्ब्ज? महाराष्ट्र टाइम्समधे स्पृहा जोशीने फेसबूकवर अपलोड केलेल्या बोल्ड फोटोची बातमी वाचली. म्हटलं लिहिलेला लेख ब्लॉगवर टाकण्याचं सत्कृत्य आज करायलाच हवं. एसएनडीटी युनिवर्सिटीतल्या मुलींसाठी ड्रेस कोडचा फतवा निघाला. त्यावर लिहिलेला लेख गेल्या रविवारी दिव्य मराठीच्या अघळपघळ कॉलमात छापून आला होता. त्याचा मथळा होता, संकुचितांची बोंबाबोंब.

Friday, 27 January 2017

मजबुरी का नाम नरेंद्र मोदी


गोव्यातली तीन वर्षं मजेतच गेली. नवे मित्र भेटले. खूप नवं समजून घेता आलं. खूप नवं शिकता आलं. तिथल्यासाठी लिहिताना शैलीही मुळातून बदलावी लागली होती. एकतर आक्रमकता आवरायला लागली. तसा गोव्याचा स्वभावच नाही. मी ज्या पेपरचा संपादक होतो, त्या गोवादूतचा स्वभावही माझ्या आजवरच्या लिखाणापेक्षा वेगळा होता. मुंबईत लिहिताना वाचक अगदी ओळखीचा होता. गोव्यात तसं नव्हतं. विषय समजावून सांगण्यातच लेखाची शब्दसंख्या संपून जायची. भूमिका कशीबशी शेवटच्या पॅराग्राफमधे मांडावी लागायची. शिवाय नियमित अग्रलेख लिहिणं थकवणारंच होतं. आमचे कार्यकारी संपादक सुनील डोळे यांनी त्याचा भार फार येऊ दिला नाही. तरीही अनेकदा माहीत नसलेल्या विषयांवरही लिहावं लागायचं. पर्याय नव्हता.

मोर्चा निघावा शूद्रत्वाच्या सन्मानासाठी


मला आलेला मेल. १५ जानेवारीची सकाळ.

परब,
तुमचा लेख वाचला आणि जाणवलं की तुमच्यासारख्या छुपा जातीयवादी माणसाचा जो तर-फडा होत आहे तोच ह्या मोर्चाच्या आयोजनाचा फायदा आहे.
अरे किती दिवस तुम्ही लोक मराठा समाजाला तुमचा गुलाम समजणार?
तो मोदी स्वतः गांधीची जागा घेत आहे तिथे लिहा ना लेख, गोडसेच्या औलादीकडून आम्हांला तत्वज्ञानांची आवश्यकता नाही.
आम्ही दिव्य मराठी पेपर विकत घेवून वाचतो. जरी आज ब्राह्मण पत्रकार 98 टक्के मीडियामध्ये आहे म्हणून आम्ही तुम्हाला फॉलो करणार नाही. जरा व्यावसायिकता जपा आणि लोकांना खोट्या भाकडकथा सांगून पोट भरायचे धंदे बंद करा.
एक मराठा लाख मराठा

Friday, 6 January 2017

१ जानेवारी १८१८

श्रीरंगजी म्हणतात पत्रकारितेतले अनेकजण मधूनच कोमात जातात. म्हणजे ते मेन स्ट्रीममधे दिसत नाहीत. आर्थिक गणित बिघडलेलं असतं. समोर दिशा कळत नाही. कुछ जमता नही. सप्टेंबरच्या आसपास रिंगणचं काम संपल्यानंतर मीपण तसा कोमातच जमा होतो.

माझं श्रीरंगजींना म्हणणं असतं आपण अधूनमधून कोमात असणारच. तेव्हाही आपण नाचतच राहायला हवं, शुद्धीवर असताना नाचतो तसेच. सगळं सुरळीत असताना कोमा स्वतःहून ओढावून घ्यायची खाज असेल तर असं पॉझिटिव राहण्याशिवाय गत्यंतरही नसतं. तरीही कधीतरी निराशा येऊनच जाते. १६च्या शेवटचे चारपाच दिवस तसे होते. पण नव्या वर्षात सगळी जळमटं फेकली गेली. हॅपी न्यू इयर.

Tuesday, 23 February 2016

यंदा संत निवृत्तीनाथ

त्र्यंबकेश्वर येथील संत निवृत्तीनाथांची समाधी
कालच पुणे विद्यापीठातल्या संत नामदेव अध्यासनातून दत्तोपासक सरांचा व्हॉट्सअप मेसेज आला होता. आज संत निवृत्तीनाथांची जयंती आहे. घरच्यांचेच वाढदिवस लक्षात असतात ते नशीब. निवृत्तीनाथांची जयंती लक्षात राहणं कठीणच. त्यामुळे दत्तोपासक सरांना थँक्स म्हणायलाच हवं.

यंदा निवृत्तीनाथांची जयंती विसरून कसं चालेल. २०१६चा रिंगणचा अंक निवृत्तीनाथांवर करायचा, हे गेल्या वर्षीच्या रिंगणमध्येच ठरलंय.

Tuesday, 16 February 2016

पुन्हा आदरणीय कॉम्रेड

१६ फेब्रुवारी २०१५. भल्या सकाळीच एसेमेस आला कॉम्रेड गोविंद पानसरेंवर हल्ला झाला. पण त्याची भीषणता कळली नव्हती. कणकवलीहून अंकुश कदमचा फोन आला. तो हादरलेला होता. त्याने सांगितलं तेव्हा टीव्ही बघायला घेतला. चारही बाजूंनी माहिती मिळत होती. पण समजून घेण्याची क्षमताच संपल्यासारखं बधीर झालो होतो. त्याला आज एक वर्षं झालं.